March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Gurus order Mahaprasada for devotee article by Rajendra Ghorpade
Home » गुरुंची आज्ञा हा शिष्यासाठी महाप्रसाद
विश्वाचे आर्त

गुरुंची आज्ञा हा शिष्यासाठी महाप्रसाद

गुरूंची आज्ञा हा शिष्यासाठी येथे महाप्रसाद आहे. सध्या मंदिरात, मठामध्ये महाप्रसाद असतो. तो घेण्यासाठी मोठी गर्दी होते. उद्योगपती, मोठे व्यापारी, काही गैरधंदा करणारेही हा महाप्रसाद वाटतात. अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. यात शंकाच नाही. वाढती महागाई, अन्न सुरक्षितता, कुपोषण आदी प्रश्नांचा विचार केला असता याला महत्त्व हे आहेच. पण अध्यात्म शिक्षणाच्या या पद्धतीत महाप्रसाद हा गुरू आज्ञेचा आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणाेनि साविया जाला स्वानंदु ।
आतां निराेपीन प्रबंधु । अवधान दीजे ।। १९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा

ओवीचा अर्थ – सद्गुरु बोलले तेव्हा ज्ञानेश्वर महाराज यांना सहजच आनंद झाला व ते म्हणाले, महाराज आपण जी मला आज्ञा केली, ती मी आपला महाप्रसाद समजतो. तर आतां आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथा सांगेन, आपण लक्ष देण्याची कृपा करावी.

पुणे विद्यापीठात काही विभागामध्ये स्वायत्त शिक्षण पद्धती आहे. येथे प्रत्येक शिक्षकाची विद्यार्थी घडविण्याची, त्यांच्यात संशोधनाची वृत्ती उत्पन्न करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. काही शिक्षक तर तोंडी परीक्षेच्यावेळी स्वतः प्रश्न विचारत नाहीत. ते विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारा असे सांगतात. यामध्ये नेमके काय होते. शिक्षकांना प्रश्न विचारायचे म्हणजे स्वतःलाच तो विषय प्रथम समजलेला असायला हवा. म्हणजे समजून घेण्यासाठी त्याचा अभ्यास हा करायला हवा. त्यातून जे समजत नाही, त्याचा प्रश्न तयार होतो. मग आपण तो प्रश्न त्या प्राध्यापकांना विचारतो. येथे काय होते? जो प्रश्न विचारला त्यातून त्या विद्यार्थ्याला हा विषय किती समजला? या विषयाचे त्याला किती आकलन झाले? या गोष्टी स्पष्ट होतात. विद्यार्थी यामध्ये किती पुढे आहे किती मागे आहे हे समजते.

संशोधक तयार करण्यासाठी ही पद्धती अतिशय उत्तम आहे. संत परंपराही हीसुद्धा एक शिक्षण पद्धतीच आहे. येथे अध्यात्म शिकवले जाते. त्याचा अभ्यास घेतला जातो. शिक्षणाच्या या पद्धतीत विद्यार्थी घडविण्याचीही रीत थोडी वेगळीच आहे. संत ज्ञानेश्वर महाराज त्यांचे गुरू संत निवृत्तिनाथ महाराज यांच्यासमोर ज्ञानेश्वरी सांगत आहेत. येथे वक्ता शिष्य आहे आणि श्रोता गुरू आहे. शिष्य गुरूला सांगत आहे. पण येथे मीपणाची भावना नाही. समर्पणाची भावना आहे. जे काही सुचले ते गुरूंच्यामुळे सुचले. जे काही तोंडात आले ते गुरूंचेच बोल होते. त्यांचेच शिक्षण होते हा भाव आहे. मीच गुरूला शिकवतो असा भाव नाही. असा गर्व नाही. माझेच गुरू ऐकतात, असे विचारही येथे नाहीत. कारण गुरूंच्याच आज्ञेने शिष्य वक्तव्य करत आहे.

गुरूंची आज्ञा हा शिष्यासाठी येथे महाप्रसाद आहे. सध्या मंदिरात, मठामध्ये महाप्रसाद असतो. तो घेण्यासाठी मोठी गर्दी होते. उद्योगपती, मोठे व्यापारी, काही गैरधंदा करणारेही हा महाप्रसाद वाटतात. अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. यात शंकाच नाही. वाढती महागाई, अन्न सुरक्षितता, कुपोषण आदी प्रश्नांचा विचार केला असता याला महत्त्व हे आहेच. पण अध्यात्म शिक्षणाच्या या पद्धतीत महाप्रसाद हा गुरू आज्ञेचा आहे. तो गुरूंनी दिलेला आहे. गुरूंच्या आज्ञेवरूनच ज्ञानदान होते, अन्नदान होते. म्हणून तो महाप्रसाद आहे. शिष्याच्या मनात दानाची भावना ही गुरूच उत्पन्न करतात. शिष्य घडविण्याचे कार्य येथे केले जाते. शिष्य आत्मज्ञानी व्हावा हाच भाव येथे आहे. शिष्याने आत्मज्ञानाचा शोध घ्यावा तो संशोधक व्हावा. अशी ही शिक्षण पद्धती निश्चितच आजच्या नव्या पिढीला नवा विचार देणारी आहे.

Related posts

शिवाजी विद्यापीठातील पुतळ्यास विद्युत रोषणाई

निंबोळीचे कीडनाशक आरोग्यदायी !

मनाला सोऽहमचा स्वर ऐकण्याची सवय लावल्यास…

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!