May 25, 2026
Lifes second name as Friendship Seema Mangrule article
Home » जीवनाचे एक दुसरे नाव…मैत्री
मुक्त संवाद

जीवनाचे एक दुसरे नाव…मैत्री

म्हणून आपल्या आयुष्यात एक तरी मित्र असावा च असं वाटतं. भावापेक्षाही मित्र जवळचा वाटू लागतो. आपल्याला अशी मैत्रीची खूप सवय लागून रहाते. मित्र गावाला थोड्या दिवसांसाठी गेला तरी करमत नाही. असं कोणतं नातं असतं ? मैत्रीमधे…

सीमा मंगरूळे तवटे. वडूज

मैत्रीला नसते कधी
वयाचे बंधन
असे निरागस
मैत्रीचे कोंदण…

आयुष्यातील जगण्याचा मार्ग
सुखदुःख वाटून घेणार असतं एक ठिकाण

मैत्रीची अनेक रुपे , प्रत्येक वयातील होणारी मैत्री आणि या मैत्रीच एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मित्र मैत्रिणींचेही जे मित्र, मैत्रिणी असतात. त्याही आपल्या मित्र मैत्रिणी होत जातात. म्हणजेच मैत्रीची ही साखळी न तुटणारी असते आणि ती वाढतच जाणारी असते.

जेष्ठ नागरिकांची मैत्री अलीकडे खूप प्रमाणात वाढताना दिसत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. कारण निवृत्त झाले की, लोकांचा वेळ घरी अजिबात जात नसे आणि एका जागी रहाण्याने आणि विचार शक्ती खुंटल्यामुळे हे जेष्ठ नागरिक विविध आजाराला बळी पडायचे त्यामुळे कधी कधी अंथरुणावर खिळून तरी रहायचे तर कधी स्वर्गाची वाट धरायचे.

पण अलीकडे समाज झपाट्याने बदलू लागलाय मोबाईलमुळे जग जवळ येत चाललय. त्यात व्हाॅट्सपमुळे तर आणखी जग जवळ आलंय आणि याच माध्यमांचा उपयोग करुन जेष्ठ नागरिकांनी आपलाही छान मैत्री ग्रुप बनवलाय. मग तेही आपल्या ग्रुपमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात. सहल, ट्रेकिंग, योगा क्लास आणि त्यांच्या आवडीच्या उपक्रमामधे भाग घेऊन जीवनाचा आनंद लुटतात. आणि आपला वेळही छान आपल्या आवडीनिवडी नुसार घालवतात. भजन, किर्तनाचा आनंद ही घेतात.

मैत्री असते निर्झर झऱ्यासारखी खळाळत वहाणारी
संकटात हात धरणारी
मी आहे ना म्हणणारी

आयुष्य जगत असताना माणसाला अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड द्यावे लागते अशा वेळेस काही वेळा मनातल्या गोष्टी घरातील व्यक्ती जवळ बोलता येत नाही. मग व्यक्ती कधी कधी मानसिक नैराश्यामध्ये सुद्धा जाऊ शकते. अशा वेळी मैत्री तिथे धावून जाते. मग आपल्या मनातील व्यथा, वेदना आपल्या मित्र मैत्रिणी जवळ मोकळ्या होतात. आणि मग मोठं ओझं डोक्यावरून खाली उतरल्यासारख वाटत. हलक वाटत.

म्हणून आपल्या आयुष्यात एक तरी मित्र असावा च असं वाटतं. भावापेक्षाही मित्र जवळचा वाटू लागतो. आपल्याला अशी मैत्रीची खूप सवय लागून रहाते. मित्र गावाला थोड्या दिवसांसाठी गेला तरी करमत नाही. असं कोणतं नातं असतं ? मैत्रीमधे…

मैत्रीमधे नातं असतं प्रेमाच, आपुलकीच आणि महत्वाचे म्हणजे काळजीच.
महत्त्वाचे म्हणजे मैत्रीत कधीही गर्व, इर्षा नसते. आपला मित्र पुढे चाललाय तो साहेब झालाय हे एक मित्रच आपल्या मित्रांबद्दल अभिमानाने बोलू शकतो.

किती सांगावं मैत्रीबद्दल…अहो, आपण अडचणीत असलो तर आपण आपल्या पाहुण्यांपेक्षा जवळच्या मित्राला पहिला फोन लावतो आणि तोही अडचणीतून काही ना काही मार्ग काढून देतो. आणि अभिमानाने म्हणतो ही अशी असावी मैत्री

मैत्री कोणत्याही वयात आणि कोणाशीही होऊ शकते. फक्त विचार जुळले की झाली मैत्री. पण मैत्री करताना आणि निभावताही आली पाहिजे. फक्त स्वार्थ साधण्यासाठी किंवा कामापुरती मैत्री नका करू, तर ती आयुष्यभर अखंड राहावी. यासाठी दोघांकडूनही प्रयत्न झाले पाहिजेत.

असावी एक मैत्रीण
उमलणाऱ्या फुलासारखी
सुकून गेल्या पाकळ्या तरी
मैत्रीचा सुगंध कायम ठेवणारी

म्हणून मैत्रीला जागा, मैत्रीची कधीही फसवणूक करू नका. मैत्री प्रत्येकाच्या जीवनातील एक अमृत आहे. ते पिल्याने माणूस आयुष्यभर ताजा टवटवीत राहू शकतो….

Related posts

कोकणची इरसाल माणसं…

आधारवड

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!