मराठी साहित्यविश्वातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अलीकडील निवडणुकीने केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल घडवला नाही, तर संस्थेच्या कार्यपद्धती, संस्कृती आणि साहित्याभोवतीच्या वातावरणावरही नव्याने चर्चा सुरू केली आहे. खुर्च्यांच्या राजकारणापेक्षा साहित्याचा विचार मोठा असला पाहिजे, ही जाणीव या निवडणुकीने पुन्हा एकदा अधोरेखित केली. बदलाची ही प्रक्रिया केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता तळागाळातील साहित्यचळवळीला नवी ऊर्जा देईल का, हा आता खरा प्रश्न आहे.
मराठी माणूस आणि संस्था या दोन गोष्टींचं नातं फारच विलक्षण असतं. माणूस संस्थेला जन्म देतो, पण काही काळानंतर संस्था माणसांनाच जन्म देऊ लागते. मग त्या संस्थेत विचारापेक्षा खुर्ची मोठी होते, साहित्यापेक्षा सभा मोठी होते आणि कार्यापेक्षा पदांची रांग मोठी होते. अशीच काहीशी अवस्था अलीकडे महाराष्ट्र साहित्य परिषद या प्रतिष्ठित संस्थेबाबतही दिसत होती. साहित्याची मशाल हातात घेऊन निघालेली ही संस्था अनेक वर्षे मराठी संस्कृतीच्या दारी उभी राहिली; पण गेल्या काही काळात त्या मशालीवर थोडासा धूर चढल्याची भावना अनेकांना वाटू लागली होती. आणि म्हणूनच अलीकडची निवडणूक गाजली, चर्चेत राहिली आणि शेवटी खांदेपालटही झाला.
निवडणुका जिंकणे हा काही अंतिम विजय नसतो, हे आपण भारतीय लोकशाहीकडून शिकलो आहोत. निवडणूक जिंकली म्हणजे आपणच सत्याचे मालक झालो असे होत नाही. पण तरीही निवडणुकीतून बदल घडतो, हा बदलच लोकशाहीचा श्वास असतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीतही असाच एक बदल घडलेला दिसतो. हा बदल फार मोठ्या बहुमताने झाला नाही. काठावर पास झाल्यासारखा झाला. पण काठावरचा विजयही कधी कधी मोठ्या प्रवाहाला दिशा देतो, हेही तेवढंच खरं आहे.
गेल्या दहा वर्षांत साहित्य परिषदेच्या कारभाराबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते. एखाद्या संस्थेत एखादे नेतृत्व दीर्घकाळ राहिले की ते नेतृत्व संस्थेपेक्षा स्वतःच्या अस्तित्वाची जास्त काळजी करू लागते, अशी एक मानवी प्रवृत्ती आहे. “मी आहे म्हणून संस्था आहे,” असा एक अदृश्य समज हळूहळू वाढत जातो. त्या समजाला मग सभागृहातील टाळ्या, सभासदांची भीती आणि कार्यकर्त्यांची अनिच्छुक निष्ठा खतपाणी घालत असते. परिणामी संस्थेचे वातावरण मुक्त विचारांचे न राहता दबावाचे बनते.
साहित्यिकांच्या संस्थेत जर धमकावण्याची भाषा ऐकू येऊ लागली, “तुम्हाला बघून घेतो” असे वाक्य जर सभासदांच्या कानावर पडू लागले, तर त्या संस्थेच्या भिंतींनाही लाज वाटली पाहिजे. कारण साहित्य ही गोष्टच मुळात मुक्ततेची आहे. शब्दाला जर भीती वाटू लागली तर साहित्याचा श्वासच गुदमरतो. आणि म्हणूनच काही काळापासून अनेक सदस्यांच्या मनात अस्वस्थता होती. ही अस्वस्थता शेवटी निवडणुकीच्या पेटीत उतरली आणि बदलाची प्रक्रिया सुरू झाली.
नवी कार्यकारिणी सत्तेत आली आहे. सत्तेत येणे हा पहिला टप्पा असतो; पण खरी परीक्षा त्यानंतर सुरू होते. कारण बदलाचा आवाज उठवणारे अनेक असतात, पण बदलाला दिशा देणारे थोडेच असतात. नवी कार्यकारिणी आता अशा वळणावर उभी आहे की, जिथे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकावे लागणार आहे.
यातील गंमत अशी की, जुनी कार्यकारिणी पूर्णपणे नाहीशी झालेली नाही. त्यातील काही सदस्य आजही नव्या व्यवस्थेत आहेत. त्यामुळे नवा विचार आणि जुन्या सवयी यांचा एक विलक्षण संगम या संस्थेत दिसणार आहे. जुन्या सवयींना जर योग्य वेळी समज दिली नाही, तर “येरे माझ्या मागल्या”ची परंपरा पुन्हा सुरू होण्यास वेळ लागणार नाही. आणि हे लक्षात ठेवायला हवे की, बदल हा नेहमी शांतपणे होत नाही. कधी कधी तो उठावातून घडतो. असंतोषाचा आवाज जेव्हा दीर्घकाळ दाबून ठेवला जातो, तेव्हा तो एका क्षणी विस्फोटक होतो.
महाराष्ट्र साहित्य परिषद ही केवळ पुण्यातील कार्यालयापुरती मर्यादित संस्था नाही. तिची खरी ताकद जिल्ह्यांत, तालुक्यांत, गावांत पसरलेल्या कार्यकर्त्यांत आहे. पण वास्तव असे आहे की, अनेक जिल्हा कार्यकारिण्या आज केवळ नावापुरत्या उरल्या आहेत. सभांचा पत्ता नाही, साहित्यचर्चेचा मागमूस नाही आणि कार्यकर्त्यांच्या हालचालींचा तर प्रश्नच नाही. काही ठिकाणी तर बिनविरोध निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदाला जणू स्वतःची खासगी मालमत्ता समजले आहे.
सभा न घेता अध्यक्षपदाची खिरापत वाटणारे काही स्वयंघोषित कार्यकर्ते पाहिले की, मराठी साहित्याच्या भवितव्याची चिंता वाटू लागते. साहित्य ही गोष्ट केवळ संमेलनांच्या व्यासपीठावर घडत नाही. ती गावोगावी होणाऱ्या छोट्या चर्चांत, वाचनमंडळांत, तरुणांच्या संवादांत घडते. त्या जागा जर रिकाम्या राहिल्या तर मोठ्या संस्थांची भव्य इमारतही आतून पोकळ होते.
म्हणूनच नव्या कार्यकारिणीसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते तळागाळाशी पुन्हा नातं जोडण्याचं. गेल्या काही वर्षांत काही जणांनी इतरांना पुढे येऊ न देण्याची जी प्रवृत्ती जोपासली, तिचा परिणाम असा झाला की, नव्या पिढीला संस्थेच्या दाराशी उभं राहण्याचीही भीती वाटू लागली. “कोणी मोठं होऊ नये, आपली जागा सुरक्षित राहावी,” हा विचार संस्थेच्या भिंतीतून झिरपू लागला की, संस्थेचा विकास थांबतो.
संस्था म्हणजे वाहणारी नदी असते. त्या नदीत नवे प्रवाह येत राहिले पाहिजेत. जुने पाणी थांबले की नदी दलदल बनते. महाराष्ट्र साहित्य परिषदेला आता ही दलदल झटकून पुन्हा प्रवाही व्हायचे आहे. या निवडणुकीनंतर आणखी एक वेगळी चर्चा रंगली. काहींनी या बदलाकडे संघाच्या विचारसरणीचा विजय म्हणून पाहिले, तर काहींनी त्याला विरोधही व्यक्त केला. काही पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून राजीनामेही दिले. पण या सगळ्या राजकीय छटांपेक्षा महत्त्वाचा प्रश्न एकच आहे – साहित्याचा.
साहित्याला राजकारणाची सवय नसते. साहित्याला माणसाची सवय असते. विचारांची असते. भाषेची असते. त्यामुळे कोणत्या विचारसरणीचे लोक सत्तेत आले यापेक्षा ते साहित्याला किती जागा देतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. संघटनेचे विचार वेगळे असू शकतात, पण साहित्याचा दरवाजा सर्वांसाठी खुला असला पाहिजे.
मराठी भाषेचे संवर्धन ही आज काळाची मोठी गरज आहे. जागतिकीकरणाच्या लाटेत अनेक भाषा मागे पडत आहेत. अशा वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्थेवर अधिक जबाबदारी येते. केवळ संमेलनं घेणं, पुरस्कार देणं किंवा कार्यक्रमांची यादी तयार करणं इतक्यावर काम भागणार नाही. नव्या पिढीपर्यंत साहित्य पोहोचवण्याचे नवे मार्ग शोधावे लागतील. शाळा, महाविद्यालये, डिजिटल माध्यमे, वाचन चळवळी – या सगळ्या क्षेत्रात साहित्य परिषदेची उपस्थिती वाढवावी लागेल. आजचा तरुण मोबाईलवर वाचतो, स्क्रीनवर लिहितो. त्या तरुणाला साहित्य परिषद जवळची वाटली पाहिजे.
नव्या कार्यकारिणीने एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल – संस्था टिकते ती पदाधिकाऱ्यांमुळे नाही, तर कार्यकर्त्यांमुळे. आणि कार्यकर्ता तयार होतो तो विश्वासातून. जर संस्थेच्या दारात भीती उभी राहिली, तर कार्यकर्ता पळून जातो. आज महाराष्ट्र साहित्य परिषद एका वळणावर उभी आहे. मागे वाद आहेत, आरोप आहेत, असंतोष आहे. पण पुढे संधीही आहे. नव्या कार्यकारिणीने ही संधी ओळखून तळ स्वच्छ केला, तर या संस्थेचे पाणी पुन्हा स्वच्छ वाहू लागेल.
बदल झाला आहे. आता त्या बदलाची निगा राखणे हीच खरी कसोटी आहे. साहित्याची भरभराट व्हावी, मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, नव्या पिढीला शब्दांचे सामर्थ्य कळावे – या ध्येयाने जर नवी कार्यकारिणी कामाला लागली, तर हा बदल इतिहासात सकारात्मक वळण म्हणून नोंदला जाईल. आणि जर तसे झाले नाही, तर मराठी माणूस शांत बसणाऱ्यांपैकी नाही. तो पुन्हा उठाव करेल, पुन्हा बदल घडवेल. कारण मराठी साहित्याचा प्रवास हा नेहमीच जाग्या माणसांच्या पावलांनी घडलेला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
