वेगळीच झिंग चढवणाऱ्या ‘घात’चा थ्रिलिंग अनुभव मी घेतला, तुम्हीही घ्यावा ! – अभिनेता जितेंद्र जोशी
एकाच जन्मात अनेक जन्म अनुभवण्याची संधी कोणाला मिळत असेल तर ती अभिनय करणाऱ्या कलावंतांना. अनेक कलावंत हे त्या भूमिका जिवंत करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करीत असतात. त्यात जितेंद्र जोशी अग्रेसर असल्याचे आपण त्यांच्या आजवरच्या भूमिका पाहून नक्कीच म्हणू शकतो, दुनियादारीतील साईनाथ असो किंवा गोदावरीत निशिकांत असो. प्रचंड रेंज असलेला हा अभिनेता आता वेगळ्यारूपात ‘घात’ या चित्रपटातून रसिकांच्या भेटीस येत आहे. छत्रपाल निनावे लिखित – दिग्दर्शित ‘घात’ची शिलादित्य बोरा यांची ”प्लॅटून वन’, मनीष मुंद्रा यांची ‘दृश्यम फिल्म्स’ आणि मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता आणि कुणाल कुमार यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. एसीपी नागपुरे ही मनस्वी वेगळी व्यक्तिरेखा चित्रपटगृहातच का पहावी हे जाणून घेण्यासाठी जितेंद्र यांच्याशी साधलेला हा संवाद !
प्रश्न : जितेंद्रला ‘घात’ का करावासा वाटला ?
जितेंद्र जोशी : हा सिनेमा करण्यामागचं पहिलं प्रमुख कारण म्हणजे, छत्रपाल निनावे. आमच्या फिल्मचा लेखक, दिग्दर्शक. हा चित्रपट करण्यामागचा छत्रपालचा हेतू त्याने केलेली मांडणी, त्याची पद्धत हे सगळं ऐकून वाटलं,मला हा सिनेमा करायचाच आहे.
प्रश्न : घात सुव्यवस्थेचा…. घात कायद्याचा… घात माणुसकीचा… आजचं हे चित्र आपल्या देशात – राज्यात दिसून येत आहे… एक संवेदनशील कवीमनाच्या कलावंत म्हणून काय सांगाल ?
जितेंद्र जोशी : ‘घात’ हा शब्द बरं का फार अनोळखी नाहीये. म्हणजे आपणच आपला घात करत असतो अनेकदा. आयुष्याचं एक स्वप्नील चित्र असतं लहानपणी मोठं होताना कळतं मोठा घात झालाय आपला. आपण जशी कल्पना केली तसं आयुष्य नाहीच. पण तरी आपण त्यावर मात करत पुढे जातो. तर घात सिनेमातही असंच काय काय होत जातं, यातल्या पात्रांच्या बाबतीत. मधुर राय म्हणतात, “आदमी जितना ज्यादा जानता है, उतना अपना व्याप बढाता है”. जितके अधिक संवेदनशील व्हाल तितकं तुम्ही अधिक जाणून घेता. समाजातली विषमता दिसायला लागते. अर्थात काही चांगली माणसंसुद्धा आहेत. अशा चांगल्या लोकांच्या मागे उभं राहायला हवं. छत्रपालही तसाच एक काहीतरी करू पाहणारा माणूस आहे. म्हणून त्याचा विषय ऐकायला हवा. ती फिल्म करायला हवी.
प्रश्न : एसीपी नागपुरे पात्र कसं साकारलं ?
जितेंद्र जोशी : एसीपीची बदली झालीय आणि तो त्या नव्या पोस्टिंगला वैतागलाय. त्याला इथून लवकरात लवकर निघायचंय. या अत्यंत भ्रष्ट माणसालाही जेरीस आणणारं हे पोस्टिंग आहे. याची एक बॅकस्टोरीपण आहेच. तो अतिशय व्यथित आहे, त्याच्या बायकोशी त्याचं पटत नाही, पण मुलीवर प्रेम आहे. हे सगळं छत्रपालशी चर्चा करून मी जाणून घेतलं. त्यातून मला ते पात्र सापडत गेलं. त्याच्या अॅक्शन-रिअॅक्शन सापडल्या. गवसला मला तो.
प्रश्न : दिग्दर्शक छत्रपालबद्दल काय सांगाल ?
जितेंद्र जोशी : अरे धमाल होता. येडा आहे हा माणूस. याचा पहिला सिनेमा असं मला वाटलंच नाही. कारण प्रत्यक्षात उतरायच्या बराच आधी त्याने सिनेमा मनातल्या मनात इतक्यांदा करून झालाय की काय सांगू. महत्त्वाचं म्हणजे त्याला घाई नाही कसलीच. त्याच्याकडे एक ठेहराव आहे. त्याला या माध्यमाविषयी, त्या गोष्टीविषयी, सिनेमाविषयी त्याला प्रेम आहे.
प्रश्न : ‘घात’च्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता?
जितेंद्र जोशी : खतरनाक… मला अनेकदा वाटलेलं आहे, छत्रपालला हो म्हणून मी माझाच ‘घात’ केलाय…हाहाहा. गंमत सोडा पण चित्रीकरणाचा अनुभव खरंच वेगळा होता. आम्ही एका टापूवर चित्रीकरण करत होतो. काही सीन तर थेट जंगलात बिंगलात जाऊन घेतलेत. मी तर होडीपण वल्हवलीय. सगळी टीम किनाऱ्यावर मी एकटाच बोटीत. वल्हवतोय नुसता. कितीपण वल्हवा ती पुढे जाईचना, गोल गोल फिरे. तिकडे किनाऱ्यावर हा भाई ओरडतोय, सर बोट पुढे जायला पाहिजे…… मी म्हटलं, अरे मी काय नावाडी आहे का ? शेवटी कॅमेरामनला माझी दया आली…आम्ही काय काय उद्योग केले आणि तो सीन शूट केला.
प्रश्न : प्रत्यक्ष लोकेशनवर शूट करण्याचा अनुभव कसा होता ?
जितेंद्र जोशी : खडतर. कारण जंगल होतं. वन्यप्राणी म्हणजे नॉर्मल ये जा करायचे. व्हॅनिटी वगैरे लाड नाहीत. काही ठिकाणी तर गाड्या पण जात नव्हत्या. जेमतेम आडोसा करून बसायचं. दणकून डास चावायचे. किडे तोंडावर यायचे. पाली तर एवढ्या डेंजर. आम्ही गमतीने म्हणायचो, या पाली जरा जाड्या असत्या तर मगरीच झाल्या असत्या.
प्रश्न : या दरम्यानचा एखादा लक्षात राहिलेला किस्सा सांगा…
जितेंद्र जोशी : आमच्या शूटिंगच्या परिसरात एकदा अर्ध खाल्लेलं हरीण दिसलं. सगळ्यांची पाचावर धारण. मीपण त्यात. तरीपण चक्कर मारायला बाहेर पडलो. तर एक मच्छीमार भेटला. आमच्या शूटिंगच्या आसपासच तो झोपडी करून राहतो होता. हा साहेब कलकत्त्याहून इथे कामाच्या शोधात आलेला. मी विचारलं, ते वाघाचं कळलं का, इथे असतो म्हणे.. तो म्हणाला, हो माहितीय की मला. ओळखीचा झालाय आता. काही करत नाही हो तो. तो त्याच्या कामात आपण आपल्या. मला नाही भीती वाटत. मी इतका अवाक झालो आणि एका अर्थी डोळेही उघडले माझे. आयुष्य किती वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असतं. आपण जी शांतता शोधत रानोमाळ भटकतो ती या मच्छीमाराच्या झोपडीत सहज होती. निसर्ग आणि त्याचं सान्निध्य किती महत्त्वाचं असतं, त्याचा पुन्हा प्रत्यय आला.
प्रश्न :बर्लिन मधील तुमचा अनुभव कसा होता ?
जितेंद्र जोशी : खूप भारी होता. लोकांचा प्रतिसाद जबरदस्त होता. संपूर्ण अनोळखी देशातल्या, भाषेतल्या प्रेक्षकांनी सिनेमा समजून त्यावर टाळ्यांचा गजर करणं बेफाट असतं. त्याची झिंग वेगळीच. चित्रीकरणातल्या सगळ्या पाली, किडे, होडी सगळ्याची आठवण आली आणि ते केल्याचं चीज झाल्याचं समाधान मिळालं. बर्लिनमध्ये आयुष्यात कोणीतरी सही घेतला पहिल्यांदा, लई मजा होती.
प्रश्न :ओटीटीच्या युगात ‘घात’ चित्रपटगृहात जाऊन का पहावा ?
जितेंद्र जोशी : याची भव्यता अनुभवण्यासाठी! अनवट पार्श्वसंगीत आणि आम्हा सर्वांचा अभिनय, त्यासाठी सर्वांनी अफाट घेतलेली मेहनत, अंगावर शहारे आणणारे वास्तव, खोल जंगल, वास्तवाशी मिळतंजुळतं वातावरण हे सारं थिएटरला जाऊन मुद्दाम बघा. एक निराळं वास्तव तुमच्यासमोर येईल. हे एक वेगळं जग आहे. ते समजून घ्यायला हवं. आज जगभरातील महोत्सवांमध्ये या सिनेमाला प्रतिसाद मिळाला, प्रेक्षकप्रेम मिळालं तर फक्त छत्रपाल, आम्ही नव्हे तर त्याच्यासारख्या अनेक हौशी, धडपड्या दिग्दर्शकांसाठी ती एक चांगली सुरुवात असेल. त्यामुळे २७ तारखेपासून थिएटरला जाऊन सिनेमा बघाच.
प्रश्न : आपण हा चित्रपट पुन्हा सुरु केला असं ऐकण्यात आलं आहे…
जितेंद्र जोशी : आपण नसू पण सिनेमा असेल.. मी म्हणजे सिनेमा बंद पाडणारा नट म्हणून प्रसिद्ध होतो. आतापर्यंत म्हणजे नेहमीच नाही. काहीवेळा मला जर का सेटवर व्यवस्थित चाललेलं दिसलं नाही, तर मी सरळ सांगतो. हा टाइमपास असेल तर करू नका सिनेमा.. निर्मात्याचे पैसे फुकट घालवू नका. पण या सिनेमात मात्र मी पिक्चर बंद पडू नये, यासाठी प्रयत्न केले. आम्ही दाट जंगलात शूट करत होतो. कुठल्याही सुविधा नव्हत्या. फक्त डेडीकेशन, विषयाचं महत्त्व म्हणून सगळे जी जान लगाकर काम करत होते. त्यात एक दिवस एकदम राडाच झाला. शिफ्टचा काहीतरी प्रॉब्लेम म्हणून छत्रपाल आणि कॅमेरामन वगैरे यांच्यात वादावादी झाली. सगळे गप्प. निर्मात्याला फोन गेला. करायचा नाहीय हा सिनेमा. मला वाटलं, आता काहीतरी करायला पाहिजे. कारण विषय महत्त्वाचा आहे. सिनेमा व्हायला हवा. शेवटी दिग्दर्शक, कलाकार जातात पण सिनेमा म्हणजे कलाकृती राहते. मी माझ्या परीने सगळ्यांना समजावले. सगळ्यांना ऐकलं माझं. आणि सिनेमा डब्यात जाता जाता थिएटरमध्ये गेला.






