कोल्हापूर ः ‘गावगाडा’ (त्रिं. ना. आत्रे), ‘आमचा गाव बदलापूर’ (ना. गो. चाफेकर), ‘गावगाडा… शतकानंतर’ (अनिल पाटील-सुर्डीकर), ‘कोसळता गावगाडा’ (उल्का महाजन) ते ‘गावकळा’ (लक्ष्मण महाडिक) आणि ‘गावकथा’ (अतुल मुळीक) याही पलीकडे आणखी एक गोष्ट आहे, ‘गावाकडची गोष्ट..!’
विष्णु पावले
नावच किती भारी वाटतं ! मातीतून काही उगवून आल्याचं जाणवतं. हो ! ही ‘गोष्ट’ खरी आहे. या गोष्टीत ‘खेडे’ आहे. ज्या खेड्याने दृष्टी दिली, ते खेडे. विलासदादा तोळसणकर यांचे. त्यांनीच ही गोष्ट सांगितली आहे. खेड्याची आणि दहा किलोमीटरच्या आतील गावांची. अशी खेडी… अशी मान्सं… त्यांची वाक-वळणं… त्यांचे सण… त्यांचे बंध… असं बरंच काही की, जी या ‘आपल्या’च नजीकचं पण आपल्या ‘जगात’ नसणारं. वरीचं जातं ते तिरावडं… मायमावल्यांचं नितळ हसणं ते बांधावर बसून भाकर खाणं… आणि प्रातिनिधिक रूपात अवतरलेलं वारणा खोरं..!
दादांनी सांगितलेली ही काळीजभर गोष्ट… साऱ्यांची… एकाच गावात नांदणाऱ्या अनेक गावांची… ती साऱ्यांनीच ऐकायला हवी. डोळाभर पाहायला हवी.
”चला तर मग आजच जाऊ..!”
‘कुठे?’
”आपल्या कोल्हापुरातील ‘शाहू स्मारक भवन’ला.
तोळसणकर दादांचं खेडं बघायला!”
#गावाकडची गोष्ट
प्रदर्शन कालावधी : ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२६
