भारताचे नागरी हवाई क्षेत्र गेल्या काही वर्षात फार मोठ्या वेगाने विस्तारलेले आहे.अनेक नवीन कंपन्यांचा उदय झाला. विमान चालवण्यास प्राशिक्षित व मान्यताप्राप्त वैमानिक आवश्यक असतो. आपल्याकडे विमाने जास्त व वैमानिक कमी अशी अवस्था निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कै. राकेश झुनझुनवाला यांनी मोठी गुंतवणूक केलेली “आकासा एअर” कंपनी अडचणीच्या मार्गावर आहे. या समस्येचा घेतलेला हा धांडोळा.
प्रा. नंदकुमार काकिर्डे
जेष्ठ अर्थविषयक पत्रकार
ऑगस्ट 2022 मध्ये एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ‘आकासा एअर’ने पहिले बोईंग 737 मॅक्स विमान खरेदी करून मुंबई – अहमदाबाद या उड्डाणाद्वारे देशांतर्गत हवाई सेवा क्षेत्रात पदार्पण केले. विनय दुबे व आदित्य घोष हे कंपनीचे मुख्य प्रवर्तक. त्यांनी या कंपनीतील 46 टक्के भाग भांडवल भारतातील प्रख्यात शेअर बाजार गुंतवणूकदार कै. राकेश झुनझुनवाला यांना दिले. पहिल्या पाच वर्षात 72 विमाने खरेदी करून देशातील सर्व प्रमुख छोट्या मोठ्या शहरांच्या दरम्यान विमान सेवा देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. पहिल्या वर्षात कंपनीकडे 20 विमाने असून 16 शहरांमध्ये त्यांची कमी खर्चाची ( Low cost) विमान सेवा सुरू आहे. कंपनीने आणखी 56 विमानांची मागणी नोंदवलेली असून लवकरच आंतरराष्ट्रीय हवाई सेवा क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी त्यांना नुकतीच परवानगी मिळाली आहे. इंडिगो व एअर इंडिया हे त्यांचे मुख्य स्पर्धक आहेत. याशिवाय स्पाइस जेट, गो एअर, विस्तारा, एअर एशिया, अलायन्स एअर अशा अनेक स्पर्धक कंपन्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. मार्च २०२३ अखेर आकासा एअरचा तोटा 602 कोटी रुपये होता. त्यांनी साधारणपणे सहा लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केलेली होती
मात्र पहिल्याच वर्षांमध्ये प्रशिक्षित विमान चालक म्हणजे वैमानिकांच्या तुटवड्यामुळे “आकासा एअर” ही अडचणीत सापडलेली आहे. सप्टेंबरमध्ये या कंपनीने त्यांच्या 19 वैमानिकांना नोटीस देऊन प्रत्येकाकडून मोठी नुकसान भरपाई मागितलेली आहे. हे वैमानिक ‘आकासा एअर’ मध्ये नोकरीत असताना त्यांनी नियमाप्रमाणे सहा महिन्यांची पूर्वसूचना न देता अचानकपणे नोकरीचा राजीनामा देऊन ते अन्य विमान कंपनीत रुजू झाले आहेत. या वैमानिकांनी अचानकपणे राजीनामे दिल्याने कंपनीला अनेक उड्डाणे रद्द करावी लागून नामुष्कीची वेळ आली. या कंपनीकडे सध्या तीस विमाने चालवण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित पायलट असल्याचा दावा कंपनीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी केला आहे. तसेच कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बंद करण्याची वेळ येणार नाही असा विश्वासही व्यक्त केला आहे.
आकासा एअरच्या कंपनीच्या सुमारे 40 वैमानिकांनी अलीकडच्या काही सप्ताहांमध्ये राजीनामे दिले आहेत. त्यातील अनेकांनी टाटांच्या एअर इंडियाची नोकरीची ऑफर स्वीकारलेली आहे. याबाबत सध्या अकासा एअर कंपनीचे दोन खटले सुरू आहेत. दिल्ली उच्च न्यायालयात या कंपनीने त्यांची बाजू मांडताना वैमानिकांच्या राजीनामामुळे कंपनी संकटात आल्याचे मान्य केले असून कंपनी बंद करण्याची परिस्थिती येऊ शकते असेही नमूद केले आहे. ऑगस्ट महिन्यात कंपनीने 600 उड्डाणे रद्द केली तर सप्टेंबरमध्ये आत्तापर्यंत 700 उड्डाणे रद्द झालेली आहेत. यामुळे हवाई प्रवाशांनी कंपनीकडे पाठ फिरवली असून त्यांच्याकडे प्रवाशांची वानवा आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईत असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये राजीनामा दिलेल्या वैमानिकांविरुद्ध दाद मागितली आहे. या वैमानिकांनी त्यांच्या नोकरी सुरू असताना नियमानुसार सहा महिन्याची पूर्व सूचना देऊन नोकरी सोडणे आवश्यक होते. मात्र त्यांनी या अटींचे पालन न केल्यामुळे प्रत्येक वैमानिकाकडून 22 कोटी रुपये नुकसान भरपाई मागितली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात कंपनीने या सर्व वैमानिकांनी नागरी विमान संचालनालयाने अमलात आणलेल्या नियमानुसार सहा महिने ते बारा महिने कालावधीची पूर्व सूचना देणे आवश्यक होते असे नमूद केले आहे. हे नियम वैमानिकांनी व त्यांच्या संघटनेने मान्य केले असून त्यास आव्हान दिले आहे. दरम्यान या प्रकरणात केंद्रीय नागरी हवाई मंत्रालय व संचलनालय या दोघांनी अजिबात लक्ष घातलेले नाही. याप्रकरणी डीजीसीएने काहीतरी कारवाई करावी अशी मागणी कंपनीने केलेली आहे.दरम्यान डीजीसीएने अशी भूमिका घेतली आहे की वैमानिक आणि कंपनी यांच्यातील हे प्रकरण आहे त्यात डीजेला कुठलाही अधिकार नाही.
आज भारताच्या हवाई सेवा क्षेत्रामध्ये टाटांची एअर इंडिया, इंडिगो, स्पाईस जेट या अग्रगण्य कंपन्या आहेत. या सर्वांकडे 700 पेक्षा जास्त विमाने आहेत. देशात जरी 400 विमानतळ किंवा धावपट्ट्या असल्या तरी सध्या केवळ 136 विमानतळ कार्यरत आहेत. केंद्र सरकारने या पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन परदेशी कंपन्यांनाही या क्षेत्रात परवानगी दिलेली आहे. 2022-23 या वर्षात 27 कोटी पेक्षा जास्त प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला तर परदेशात जाणाऱ्यांची संख्या साडेपाच कोटी पेक्षा जास्त होती. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता देशात अजून किमान 2000 विमानांची गरज आहे. सध्याची 700 विमाने चालवण्यासाठी 9 हजार पायलट आहेत असा अंदाज आहे. त्यातील मोठा वर्ग इंडिगो व टाटांच्या एअर इंडिया कडे आहे.
सध्या एअरबस ए 320 किंवा बोईंग 737 विमानासाठी किमान सरासरी 12 वैमानिक लागतात. त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या विमानांना वीस ते तीस सरासरी वैमानिकांची गरज असते. यामध्ये विमानाचा कप्तान व प्रथम अधिकारी यांचा समावेश केला जातो.देशातील वैमानिकांचे प्रामाणिकरण किंवा नियमन डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजे डीजीसीए हे करतात.ते एका वर्षात हजारापेक्षा कमी व्यक्तींना परवाना मंजूर करतात.त्याचप्रमाणे कौशल्यपूर्ण वैमानिकांची सर्व विमान कंपन्यांना आवश्यकता असते. त्यासाठी ते भरपूर मासिक वेतन देतात. त्यामुळेच कुशल वैमानिकांची चंचल किंवा टंचाई या क्षेत्राला भासत आहे. एअर इंडिया ही कंपनी पुन्हा तात्यांच्या ताब्यात गेल्याने त्यांच्याकडे चांगली वैमानिक निश्चित आकर्षित होत आहेत ते पगारही चांगला देतात आणि त्यांच्याकडेअन्य कंपन्यांमधील वैमानिकांचा जास्त ओढा आहे. इंडिगो बाबतही हीच परिस्थिती आहे त्यांच्याकडे जास्त मोठ्या प्रमाणावर वैमानिक आकर्षित होत आहेत. वैमानिकाचा परवाना मिळवणे ही गोष्ट कोणत्याही आरटीओ कडून पैसे खायला घालून किंवा बिना चाचणी देता परवाना मिळवण्यासाठी नाही. त्यामुळेच अकासा एकर कंपनी प्रशिक्षित वैमागीकांत कोटी अडचणीत येऊन बुडायला नको एवढीच यामागची भावना. दरम्यान या कंपनीच्या शेअरचा भावहीबऱ्यापैकी घसरलेला आहे सध्या तो 36 रुपयाच्या घरात आहे व त्याने 57 रुपयांची गेल्या वर्षभरात गाठली होती. एकंदरीत या कंपनीची आगामी कामगिरी खूप प्रतिकूल दिसते.
