📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 17, 2026
कविता

समई मानवतेची…

Lamp of humanity Poem by Dr Vittal Wagh on Bapusaheb Dhakare

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य सैनिक कविवर्य लोकनेते गुरुवर्य स्व. बापूसाहेब ढाकरे यांना भावपूर्ण वंदन. या निमित्ताने लोककवी कविवर्य डॉ. विठ्ठल वाघ यांची कविता…

समई मानवतेची

सातपुड्याच्या कुशीत आहे.
दरवळणारा चंदनखोरा..
त्याचा अवघा गंध लेऊनी
बापू घडले दानापुरा…

वाण नदीचे झुळझूळ पाणी
सुचवून गेले मंजुळ गाणी
जीवन तैसे शुभ्र वसनही
अमृत ल्याली मधुर वाणी

काळ्या मातीत बीजे पेरता
मळा बहरला साहित्याचा
स्वच्छ राहुनी राजकारणी
ध्यास ठेवला लोकहिताचा

शाळेपुढल्या प्रांगणातुनी
किती कळ्यांना फुलविले
तम साराया युगायुगाचा
विद्येचे नव दीप लाविले

दीनदलितांची मूक आसवे
तव डोळ्यातुनी ओघळली
आणि समई मानवतेची
घराघरातुनी पाजळली

पावन मंगल शब्दालागी
आचरणातुनी अर्थ दिला
सरस्वतीला साधनेतुनी
कवितेचा नव हार दिला

श्याम सावळ्या माथ्यावरती
कुकाजीच्या टिळा लावला
कुणबिकीचा हिरवा झेंडा
निळ्या नभातुनी उंच रोवला

– लोककवी कविवर्य डाॅ. विठ्ठल वाघ

Related posts

तुझ्यामुळेच दरवळला आसमंत….

आळशी बनवण्याचा धंदा

सत्ता गाते गाणे…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406