अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे अधिक बळकट होत आहे.
माणिकराव खुळे
मान्सून ने आज संपूर्ण महाराष्ट्रावर कब्जा केला आहे. सह्याद्री घाटमाथ्यावर काहीं हलक्याशा तीव्रतेने का होईना पण मान्सूनचा वावर जाणवू लागला आहे. त्यामुळे सध्या आजपासुन जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे रविवार (दि. ३० जून) पर्यन्त महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. परंतु मान्सूनच्या काहीस्या खंडानंतर, महाराष्ट्रात मान्सून चा पाऊस सुरु होणार असल्यामुळे पुन्हा त्याचे स्वरूप, सुरवातीचे काही दिवस हे कदाचित पूर्वमोसमी वळीव स्वरूपातील गडगडाटी पावसासारखेही असु शकते.
विभागवार पावसाची तीव्रता अशी असु शकते ?
मुंबईसह संपूर्ण कोकण:-
गेल्या पाच दिवसापासून म्हणजे मंगळवार ( दि.१८ जून) पासून मुंबईशहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. जूनच्या ह्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता ही अजुनही कायम टिकून आहे. तर मुंबई शहर, उपनगर, व कोकणात ह्या आठवड्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
.
विदर्भ :-
गेल्या चार दिवसापासून म्हणजे गुरुवार दि.२० जून पासुन, संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात, पावसाने मध्यम ते जोरदारपणे हजेरी लावली आहे. मान्सून बंगाल उपसागरीय शाखेच्या सक्रियतेमुळे आता जूनच्या ह्या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात सुद्धा संपूर्ण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता ही कायम टिकून आहे.
मध्य महाराष्ट्र :-
मान्सून बंगाल उपसागरीय शाखा सक्रिय झाल्यामुळे मान्सून अरबी समुद्रीय शाखाही काहीशी उर्जीतावस्थेत आली आहे. त्यामुळे मान्सून साधारण एक किमी. उंचीचा सह्याद्री घाट चढून घाट माथ्यावर वावरतांना जाणवत आहे.त्यामुळे मान्सून खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अश्या १० जिल्ह्यात आजपासुन जूनअखेर पर्यंतच्या संपूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता जाणवते.
हे सर्व जरी असले तरी, नाशिक नगर पुणे व छत्रपती संभाजीनगर अश्या चार जिल्ह्यांच्या काही भागात जून अखेरपर्यंतच्या आठवड्यात, सरासरीपेक्षा, महाराष्ट्रातील उर्वरित भागाच्या तुलनेत, पावसाचे प्रमाण, काहीसे, कमी असण्याची शक्यता जाणवते. ह्याचीही शेतकऱ्यांच्या मनी नोंद असावी, असे वाटते.
मराठवाडा :-
मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात आजपासुन पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि २६ जूनपर्यन्त केवळ मध्यम पावसाचीच शक्यता आहे. गुरुवार दि.२७ ते ३० जूनच्या चार दिवसात मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता उर्वरित ७ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो. या ७ पैकी धाराशिव, लातूर अश्या दोन जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तर कदाचित आजपासूनच जोरदार पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
खरीप पिके व पेरी संबंधी, ह्या पावसाची उपयुक्तता काय असु शकते?
पेर झालेल्या पिकांना जीवदान, तर नापेर ठिकाणी पेर होण्याची, शक्यता ह्या आठवड्यातील पावसाने मिळू शकते, असे वाटते.
नजिकच्या काळात ह्यापेक्षा अधिक चांगल्या पावसाची शक्यता कधी असु शकते ?
भारत वि्षुववृत्तीय उपसागरीय क्षेत्रात, एमजेओ च्या सक्रियतेमुळे, शनिवार दि. २९ जून ते ६ जुलै दरम्यानच्या आठवड्यात कदाचित महाराष्ट्रात अधिक चांगल्या पावसाची शक्यता जाणवते.
मान्सूनची सक्रियतेची शक्यता कश्यामुळे वाढली ?
(i) तीन आठवडे म्हणजे ३१मे पासून एकाच जागेवर खिळलेल्या बंगाल उपसागरीय मान्सूनी शाखेने आपली जागा सोडून काहीशी पुढे झेपावली आहे.
(ii)अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टी समोर, समुद्र सपाटीच्या पातळीत तयार झालेला हवेच्या कमी दाबाचा दक्षिणोत्तर आस आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर पश्चिमेंकडून पूर्वेकडे मान्सूनी वारे अधिक बळकट होत आहे.
(iii) राजस्थान व छत्तीसगड वर असलेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती व त्यांना जोडणारा हवेच्या कमी दाबाचा एक तर दुसरा राजस्थान ते ईशान्य अरबी समुद्र जोडणाऱ्या दोन आसामुळे मान्सूनी पावसाला स्थिती पूरक झाली आहे.
माणिकराव खुळे

