May 21, 2026
Home » शिवमहिमेचा महाकाव्यांतील अविष्कार
मुक्त संवाद

शिवमहिमेचा महाकाव्यांतील अविष्कार

Comparative literary study of Marathi historical epics on Chhatrapati Shivaji Maharaj

महाकाव्याची एकरूपता व्यासांनी लक्षात घेतली त्याच्या दृष्टिकोनातून कारण सहज ध्यानात येते. ऐतिहासिक महाकाव्ये तर आणखी कमी आहेत. पौराणिक कथावस्तूवरील महाकाव्यांना रामायण–महाभारताचा आधार मिळतो. ऐतिहासिक महाकाव्यांसाठी स्वतंत्र प्रतिभेची गरज अधिक भासते. छत्रपती शिवरायांसारखा महापुरुष जन्माला येऊनही मराठीत त्यांच्या चरित्रावरील महाकाव्य लिहिले जाण्यास जवळजवळ तीनशे वर्षे उलटून जावी लागली याचे कारण हेच असावे.

डॉ. स्नेहल तावरे

ज्या ‘श्रीमंत योगी’ पुरुषाने हिंदुस्थानात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली आणि हिंदुसमाजाला शक्ती व प्रेरणा दिली त्या युगपुरुष छत्रपती शिवाजीमहाराजांवरील महाकाव्यांचा चिकित्सक आणि तुलनात्मक परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत ग्रंथात केला आहे. सीझर, अलेक्झांडर, नेपोलियन, हिटलर अशा महान योद्ध्यांच्या मालिकेत छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेतले जाते. पण शिवरायांच्या ठायी पराक्रमाबरोबरच जी एक उदात्तता आणि नैतिक उंची होती ती इतर वीरांमध्ये आढळत नाही. त्यात शिवाजीमहाराजांचे आगळेवेगळे वैशिष्ट्य साठवलेले आहे.

म्हणूनच सुमारे साडेतीनशे वर्षे गुलामगिरीच्या अंधारात चाचपडणाऱ्या हिंदूं स्वातंत्र्याचा प्रकाश शिवरायांनी दाखविला. तीव्र बुद्धिमत्तास्वराज्य स्थापनेची महत्त्वाकांक्षा, असामान्य धैर्य, सदैव जागरूक वृत्ती, अचूक दर्जाची मुत्सद्देगिरी, सर्वधर्माविषयीचा आदर, सेवकांच्या गुणांची जाण, वृत्तीची उदारता, कडक शिस्त, सहकाऱ्यांविषयी प्रेम आणि न्यायावर आधारित राज्यव्यवस्था अशा राजाच्या गुणांचा आदर्श आजही सर्वांना प्रेरणा देणारा आहे. राजा कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजीमहाराज ! स्त्रियांना आणि सर्व जातिधर्मातील लोकांना त्यांनी सन्मानाची वागणूक दिली. उदात्त चारित्र्य आणि परधर्मसहिष्णुता याचे धडे शिवाजीमहाराजांनी दिले. हजारो भारतीयांना स्वाभिमानाचे आणि स्वराज्याचे बाळकडू राजांनी पाजले, –

काशीची कला जाती । मथुरा मशीद होती ।
यदि शिवाजी न होते । तो सुन्नत होती सबकी ।

भूषण कवीच्या या पंक्तीतून वस्तुस्थितीचे प्रखर असे दर्शन होते. भूषण कवींनी जणू एक कटू सत्य सांगितले आहे.

‘शिवाजीमहाराज’ हा विषय सर्वांचाच आवडता असा आहे. केवळ मराठीपुरता नव्हे तर भारतीय इतर भाषांमध्येही त्यांच्या कार्यावर आणि जीवनावर ग्रंथरचना आवर्जून निर्माण झालेली आहे आणि आजही होत आहे. केवळ मराठी भाषेतच शिवाजीमहाराजांवर शेकडो ग्रंथ तयार झाले आहेत. वाङ्मयाच्या या प्रचंड साठ्यातून अभ्यासाची निवड करणे सोपे नाही. ‘महाकाव्य’ या प्रकाराला विशेष स्थान आहे. शिवाजीमहाराजांचे जीवनचरित्र महाकाव्यात्मक भासावे असेच आहे.

संस्कृत वाङ्मयात रामायण आणि महाभारत ही जीवनाला आदर्श देणारी अशी महाकाव्ये आहेत. महाकाव्याची निर्मिती ही इतर वाङ्मयप्रकारांप्रमाणे फारच सोपी गोष्ट होऊ शकत नाही. साहजिकच मराठीत महाकाव्ये फारच कमी प्रमाणात आढळतात. जुन्या मराठीत रामायण–महाभारतावरील काही रचना महाकाव्यात मोडू शकतील. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्या रचना त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. एकनाथ आणि श्रीधर यांचाही उल्लेख त्या संदर्भात करता येईल.

महाकाव्याची एकरूपता व्यासांनी लक्षात घेतली त्याच्या दृष्टिकोनातून कारण सहज ध्यानात येते. ऐतिहासिक महाकाव्ये तर आणखी कमी आहेत. पौराणिक कथावस्तूवरील महाकाव्यांना रामायण–महाभारताचा आधार मिळतो. ऐतिहासिक महाकाव्यांसाठी स्वतंत्र प्रतिभेची गरज अधिक भासते. छत्रपती शिवरायांसारखा महापुरुष जन्माला येऊनही मराठीत त्यांच्या चरित्रावरील महाकाव्य लिहिले जाण्यास जवळजवळ तीनशे वर्षे उलटून जावी लागली याचे कारण हेच असावे.

शिवाजीमहाराजांवरील पहिल्या महाकाव्याची निर्मिती १९६८ साली झाली. महाराष्ट्रकवी यशवंत यांनी ‘छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य लिहून मराठी वाङ्मयातील ऐतिहासिक महाकाव्याचे दालन समृद्ध केले आहे. त्याच्या पाठोपाठ १९७७ मध्ये श्री. नारायण रामचंद्र मोरे यांनी ‘शिवायन’ हे महाकाव्य लिहून मराठी सारस्वतात मौलिक भर घातली. याच आधुनिक कालखंडात श्री. घाटे यांनी शिवाजीमहाराजांवर एक महाकाव्य लिहिले. परंतु ते महाकाव्य अप्रकाशित राहिले.

महाकवी मोरे यांच्या रचनांचा अभ्यास प्रस्तुत ग्रंथात प्रामुख्याने केला आहे. ऐतिहासिक आणि वाङ्मयीन अशा दोन्ही दृष्टीनं हा परामर्श घेतलेला आहे. ग्रंथाच्या प्रारंभी ‘शिवछत्रपती’वरील काव्यरचनेचा एक धावता आढावा घेतला आहे. शिवचरित्रावर आधारित दोन महाकाव्ये हा प्रस्तुत ग्रंथाच्या अभ्यासाचा प्रमुख विषय. ‘छत्रपती शिवराय’ आणि ‘शिवायन’ या महाकाव्यांचा तपशीलवार अभ्यास केलेला आहे. कथानक, व्यक्तिचित्रण आणि वर्णनशैली अशा तीन दृष्टीनं हा अभ्यास केला असून त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र प्रकरणांची योजना केली आहे. साहजिकच एका महाकाव्याला तीन प्रकरणे व दुसऱ्याला तीन अशी सहा प्रकरणे झाली आहेत. अखेरीच्या उपसंहारात या सविस्तर परामर्शातून प्राप्त होणारा निष्कर्ष थोडक्यात सांगितला आहे. ग्रंथाच्या शेवटी परिशिष्टात शिवचरित्रावर झालेल्या रचनांची माहिती दिलेली आहे.

शिवछत्रपतींचे चरित्र पूर्णत्वाने आकलन करून घ्यावे एवढे बुद्धीचे देणे मला लाभलेले नाही हे मी पुरते जाणून आहे. यथामती प्रयत्न करणे एवढेच माझ्या हाती आहे. तो प्रयत्न मी मनापासून केला आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी झाला आहे हे जाणकारांनी ठरवायचे आहे.

पुस्तकाचे नाव – छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाकाव्य रचना
लेखिका – डॉ. स्नेहल तावरे
प्रकाशक – स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे
किंमत – 500.00

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मन अन् बुद्धीचे भांडण..

आधारवड

हालवूनि खुंट। आधी करावा बळकट

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406