February 19, 2025
Temperatures have risen but there is a chance of cold weather even in February
Home » तापमान वाढले पण फेब्रुवारीमध्येही थंडीची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

तापमान वाढले पण फेब्रुवारीमध्येही थंडीची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.

माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.

प्रश्न – कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील तापमान कसे राहील ?

माणिकराव खुळे – कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, कमाल ३२ ते ३५ तर किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान जाणवत आहे. कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या ३ ते ५ अंश सेल्सिअसने अधिक आहेत. त्यातही विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छ. सं.,नगर, परभणी, विदर्भातील अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथील दुपारी ३ चे कमाल व पहाटे ५ चे किमान तापमान हे त्या ठिकाणच्या, त्यावेळच्या, सरासरी तापमानापेक्षा ३ ते ५ डिग्रीने सध्या वाढलेले आहे.

पुणे  व अकोला ( विदर्भ ) शहराचे कमाल तापमान तर जवळपास ३६ तर सोलापूर चे ३५ तर नाशिकचे ३४ डिग्री पर्यन्त पोहोचले आहे. नाशिक, पुणे, अकोला शहरांची ही वाढ जवळपास सरासरीच्या ५ डिग्रीने अधिक आहे. संपूर्ण विदर्भातही कमाल तापमात वाढ झालेली जाणवत आहे. जळगांवसह खान्देशांतील तीन जिल्ह्यात मात्र उष्मा अद्याप जाणवत नाही.

प्रश्न – मुंबईसह संपूर्ण कोकणातील तापमान कसे आहे ?

माणिकराव खुळे – मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात,कमाल २९ ते ३२ तर किमान तापमान १७ ते २१ डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. मुंबई ( कुलाबा ) वगळता, उर्वरित मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र ही तापमाने सरासरी इतकेच जाणवतात. मुंबई कुलाब्याचे पहाटेचे किमान तापमान मात्र २१ डिग्री से. ग्रेड असुन सरासरीच्या दिड डिग्रीने अधिक आहे. त्यामुळे तेथे उर्वरित महाराष्ट्राइतकी उष्णतेची दाहकता सध्या मुंबईसह कोकणात जाणवत नसली तरीदेखील, दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुद्धा मुंबईत बऱ्याच वेळा ह्यापेक्षा अधिक आणि चांगलीच थंडी जाणवत असते.

प्रश्न – कश्यामुळे वाढली ही उष्णता ?

माणिकराव खुळे –  वाढलेल्या उष्णतेचा संबंध लगेच काही अभ्यासक ग्लोबल वार्मिंगशी जोडून मोकळे होतात. प्रत्यक्षात सध्याची तात्पुरती वातावरणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात जाणवत आहे. गेल्या ३ ते ४ दिवसापासून, ठराविक दिशा न घेणारे असे, वारंवार दिशा बदलणाऱ्या पण कमकुवत वाऱ्यांचे अस्थिर वहन सध्या महाराष्ट्रावर चालु आहे. हवेचा पुर्वो-पश्चिम कमी दाबाचा आस जरी महाराष्ट्रावर काहीसा जाणवत असला तरी एकूणच महाराष्ट्रावर हवेच्या उच्चं दाबातून,  प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांचा कल हा घड्याळ काटा दिशेने असल्यामुळे, रात्रीची बाहेर पडणारी दिर्घ-लहरी उष्णता पूर्णपणे बाहेर फेकली जात नाही. त्यामुळे  निरभ्र आकाश असूनही सध्या संचित, अत्याधिक उष्णता कोकण वगळता महाराष्ट्रात जाणवत आहे.

प्रश्न – अजुन किती दिवस ही उष्णता जाणवेल ?

माणिकराव खुळे – पुढील ५ ते ६ दिवस  म्हणजे ६ फेब्रुवारी पर्यन्त किमान तापमानात होणाऱ्या ह्या वाढीमुळे थंडी अजुन कमी होण्याची शक्यता जाणवते. परंतु एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे तसेच उत्तर भारतात समुद्रसपाटी पासून दहा ते बारा किमी. उंचीवर पश्चिम दिशेकडून ताशी २५० ते २६० किमी वेगाने प्रवाही झोताचे ‘ पश्चिमी’ वारे वाहत आहे. त्यामुळे ह्या दोन प्रणल्यांच्या एकत्रित परिणामातून महाराष्ट्राकडे थंडी वाहण्याचा स्रोत अजून पूर्णपणे संपला असे म्हणता येणार नाही. अजूनही फेब्रुवारीमध्ये थंडीची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून थंडी कायमची गायब झाली असे समजू नये.

प्रश्न – महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते का ?

माणिकराव खुळे – महाराष्ट्रावरील सध्याचे प्रत्यावर्ती चक्रीय वारे जेंव्हा  बंगालच्या उपसागरात स्थलांतरीत होण्याच्या शक्यतेतून व त्यामुळे वेगाने पूर्वेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे ( ताशी ३० ते ३५ किमी.)   बं. उपसागरातून आर्द्रता महाराष्ट्राकडे लोटली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आता १ ते ५ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ढगाळ वातावरणसहित, मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.

प्रश्न – शिर्डी – कोपरगाव परिसरात रात्री थंडीत चांगली वाढ जाणवली व तीन – चार दिवसा पासून जाणवत असलेली उष्णता देखील थोडया प्रमाणात कमी जाणवली. याचे कारण काय ?

माणिकराव खुळे – सध्या अजुन हिवाळाच चालु आहे. किमान तापमान कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, कमाल ३२ ते ३५ तर किमान तापमान १३ ते २० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. ही दोन्हीही तापमाने सरासरीच्या ३ ते ५ डिग्री से. ग्रेड ने अधिक आहेत.

आता शिर्डी – कोपरगांव परिसर उत्तर नगर जिल्ह्यात मोडतो, व हिवाळ्यात तो वर्षानुवर्षे थंडीचा परिसर गणला जातो. त्यामुळे त्याच्या १००- १२५ वर्षाच्या किमान तापमानाची सरासरी ही सुद्धा खालावलेल्या अंकाची आहे. म्हणजे जसे कि ‘किमान तापमान १३ ते २० डिग्री से. ग्रेड दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच ते २० नव्हे तर १३ डिग्री से. ग्रेड दरम्यानच्या शक्ययेमुळे आणि सरासरीच्या ५ डिग्री से. ग्रेड ने नव्हे तर ३ डिग्री से. ग्रेड ने अधिक आहेत.

थोडक्यात थंडीच्या कमी सरासरी असलेल्या भुभागावर  १३ डिग्री से. ग्रेडचे किमान तापमान आणि सध्याच्या कालावधीत ते जरी सरासरीच्या ३ डिग्रीने अधिक असले तरी हिवाळ्यात, सकाळच्या वेळेस, त्या भागात अधिक नसला तरी गारवा हा जाणवणारच ना! म्हणून जाणवणारी थंडी ही त्यातलाच भाग समजावा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading