क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर
आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग आणि आशा यांच्या गुंफणीतून साकारलेला ‘क्लेशवृक्षाच्या छायेत’ हा काव्यसंग्रह वाचकाला अंतर्मुख करतो. कवी राजकुमार कवठेकर यांनी दुःखाच्या गाभाऱ्यातूनही आशेचा किरण शोधत शब्दांना अशी जादू दिली आहे की, क्लेशाच्या सावलीतही आनंदाची फुले उमलू शकतात, याची जाणीव प्रत्येक कवितेतून होते.
सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
९४२१२२५४९१
आयुष्याचे वस्त्र हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असले तरी सुखापेक्षा दु:खाचे धागेच जास्त दाट आहेत कि काय असे वाटावे असे सर्वसामान्य माणसाचे जगणे असते. ‘ सर्वसुखी ‘ तर लांबच पण थोडेसे सुखही लाभले नाही अशा दु:खितांची संख्याही काही कमी नाही. किंबहुना दु:ख हेच जीवनातील अंतिम सत्य आहे असे म्हटले तर चूक ठरु नये. कारण ते प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेले असते. ते दु:ख स्वत: भोगणे, दु:खाची जाणीव असणे, दुसऱ्याच्या दु:खाने व्यथीत होणे आणि त्याच दु:खाचा शोध घेत घेत याच जन्मात त्याची पाळेमुळे छाटून टाकण्याचा प्रयत्न करताना या सर्व वेदना आपल्या शब्दातून व्यक्त करणे ज्याला जमते तोच क्लेश वृक्षाच्या छायेलाही आपलेसे करू शकतो. असा कवी मग कुठलीही खंत न बाळगता आपल्या सोसण्याच्या तपामुळे क्लेशवृक्षालाही आनंदाचे फळ येईल असे आत्मविश्वासपूर्वक म्हणू शकतो. क्लेशवृक्षाच्या छायेत बसुनही
” होईल कधितरी स्वप्न हासरे खांद्यावर चे मूलऽऽ
क्लेशतरुवर फुलेल जे फुल पडेल त्याची भूल ऽऽ “
असे म्हणणारे मिरजेचे कवी, गझलकार राजकुमार कवठेकर यांच्या ‘क्लेशवृक्षाच्या ‘ प्रत्येक पानापानातून याची खात्री पटते.
‘बंद मनाच्या दारावर ‘ या सुमारे तीस वर्षांपूर्वी प्रकाशित केलेल्या पहिल्या काव्यसंग्रहानंतर , आपल्या मनाचे दार रसिकांसाठी खुले करुन ‘ क्लेशवृक्षाच्या छायेत ‘ हा दुसरा कविता संग्रह प्रकाशित केला आहे. दु:खाची महिरप असणाऱ्या या कविता संग्रहात डोकावून पाहिले तर ,काहीशा आत्ममग्न असणाऱ्या या कविने निसर्ग, प्रेमाच्या तरल भावना, जगण्यातली अगतिकता, वस्तुस्थितीची प्रामाणिक कबुली, तिच्या आणि त्याच्याही भावना व्यक्त करणाऱ्या, अशा विविधांगी रचना समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे आयुष्यातील चढ उतारामुळे जगणे जसे जगावेसे वाटते तितक्याच उत्सुकतेने आपण हा संग्रह शेवटपर्यंत वाचत जातो.
बोलक्या मुखपृष्ठातून व्यक्त होणारा क्लेशवृक्ष आणि त्याची छाया ओलांडून पुढे जाताना , कविच्या मनाची स्पंदने शब्दाशब्दातून ऐकू येतील अशा भावकविता वाचताना एकामागून एक कविता वाचण्याची ओढ लागून रहाते.
स्मरणांचा जाच चुकत नाही. दु:खाचा पहारा उठत नाही. अशा अवस्थेत जगण्याचा हा अवजड मेणा कुठवर वाहुन न्यायचा असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. वास्तवाच्या वणव्यात मन होरपळत असताना आणि या छळवादी आयुष्याला सामोरे जात असताना दमछाक तर होतेच आहे. पण एवढे सहन केल्यावर तरी आशेची रम्य पहाट दाखवणारे एखादे वळण या वाटेवर येणार आहे का ?
वारंवार अश्रूच वाट्याला यावेत असा वेदनेचा शाप आयुष्याला लागला आहे. सुखांना मोकळेपणाने नांदताच येत नाही. सांत्वनाच्या आहेरांनी मनावरच्या जखमा भरून येत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग चालुच आहे. या भ्रमंतीत स्वत:ला हरवून बसावे, स्वतःचा शोध स्वतःला लागूनच नये अशी अवस्था झाली आहे. हाताच्या मुठी वळल्या तरी ठोस पाऊल उचलावे एवढे बळ आणायचे कुठून ? जगण्यातली अगतिकता इतकी पराकोटीला गेली आहे की सगळं समजत असून सुद्धा
आंतरिक समुद्राच्या लाटा आतल्या आतच हेलकावे घेत असतात. रोज उगवणारा दिवस ही इतरांसाठी सकाळ असली तरी आपल्यासाठी मात्र ती आणखीन एका वजावटीच्या दिवसाची सुरुवात असते हे कठोर सत्य नाकारता येत नाही.
दु:खाच्या सागरात हेलकावे खाणारे हे जगणे, पराभवाने ग्रासले असले तरी यशाचे गीत म्हणणे आणि हृदयात स्वप्नांचे फुल फुलवणे कविने सोडून दिलेले नाही. मनातील दुर्दम्य इच्छाशक्तीने दु:खावर मात केली आहे आणि काटेरी प्रारब्धाला आशेचे जरतारी वस्त्र नेसवण्याचे धैर्य कविला मिळाले आहे. फुटक्या आरशात स्वत:चीच शेकडो प्रतिबिंबे दिसावीत तसा मी स्वत:ला पाहताना दिसतो आणि समजतच नाही मी नेमका खरा कोणता ? मग लक्षात येतं, आपण तर शब्दांच्या राईत मग्न असतो. ठरलेली वाट नसतेच आपली. आपला आपल्याला तरी भरवसा आहे का ? ज्यांच्यात असतो त्यांचेही आपण नसतो. कदाचित हे वेगळेपण हीच आपली खरी ओळख असेल. कविच्या आत्ममग्नतेतून आत्मशोधाचा हा प्रवास आपल्यालाही अंतर्मुख करतो.
संपूर्ण आयुष्यभर एकच ऋतू नशिबी आलाय. तो म्हणजे पानझडीचा. सगळं काही ‘ठिक ‘ आहे असं दाखवावं लागत असलं तरी किती खरं किती खोटं ज्याचं त्यालाच माहित. शेवटी जगणं म्हणजे तरी काय असतं ? कवीच्याच शब्दात सांगायचं तर :
जगणं असते एक कविता, कळली तर पटकन कळणारी….नाही तर आमरण छळणारी…
आपल्या आत्ममग्नतेमुळे आयुष्यातील महत्त्वाचे कितीतरी क्षण निसटुन गेले आहेत आणि आयुष्य हेळसांडून गेले आहे. त्यामुळे असाही प्रश्न पडतो की
‘ कुठवर जगण्याचा जाच हा सांग सोसू
कुठवर हसण्याचे रेशमी वस्त्र नेसू ?
बहरत असताना झाड निष्पर्ण झाले
फिरुन फिरुन पक्षी कालचे दूर गेले “
जागतिकीकरण आणि शहरीकरणाचे चटके कवीला ही जाणवत आहेत. सुखाच्या चेह-याचे पोर्ट्रेट आयुष्यभर अंगावर मिरविले तरी भंगत जाणारे नातेसंबंध कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी पूर्ण एकजीव होत नाहीत हेच खरे. मग त्या पोर्ट्रेटच्या सौंदर्याकडे लक्ष न जाता केलेली डागडुजी मात्र ठळकपणे डोळ्यात भरुन राहते आणि मन ठसठसत राहते. बाल्कनीतली बाग,कॉलबेलच्या चिमणीचा चिवचिवाट, पोर्ट्रेट मधला समुद्र,फोनपुरता मोकळेपणा अशा कृत्रिम जीवंतपणाच्या खुणा कवितेतून स्पष्टपणे दाखवल्या आहेत. तर दुसरीकडे ‘ दोघांचेच विश्व ‘ असले तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्राकार गतीने व्यापलेल्या या जगण्यात परस्परांची भेटच होत नाही ,मग संवाद तर दूरच.मोग-याचा गजरा मात्र या सर्व धावपळीत मूकपणे दरवळत राहतो. समोर आलेल्या सुखाला नाकारायच तर नाहीच. पण या सुखाच्या चाहुलीने हुरळून न जाता भोगलेले दु:ख अजूनही मनात खोलवर सलत असतं.त्यामुळे सुखाच्या श्रावणातही दु:खाचा वैशाख वणवा विझलेला नसतोच. मग नकळतपणे शब्द येतात
” या जगण्याचे हे असेच
उमलत्या वेळीच ग्रासले कातरवेळीचे भय…
कठोर निर्णयाच्या वेळीच नेमकी
दाटून येते जुनी सय….”
पण असे असले तरी.
” तरिही जगणे…..तरिही जगणे
जरी न काही मनाप्रमाणे
रोज मनाने मनात कुढणे
ठेऊन ओठांवरती गाणे “
या खंबीर मनाने प्रवास अव्याहतपणे चालुच असतो.ओळखीची खूण सापडत नाही.स्वप्नातला गाव दिसत नाही. या एकाकी प्रवासामुळे मन कधीतरी खिन्न
होणारच. मग वाटतं ,
” पालटावा हा ऋतू माझी शमावी वेदना
श्रावणाचा मेघ दाटो चिंब होऊ दे मना
सावलीचा दो घडीचा लाभु दे रे गारवा
या तमी एकांत रानी रे दिसावा काजवा “
नियतीच्या फे-यामध्ये सुखाची सावली येईल तेव्हा येवो.पण मनाची वेदना शमविण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा मित्र कोण असणार ? सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
या संग्रहात समाविष्ट असलेल्या निसर्ग कविता म्हणजे कविने हातात कुंचला न घेता त्याच्या मनाच्या कॅनव्हासवर शब्दांचे फटकारे मारुन चित्रित केलेली देखणी निसर्ग चित्रेच आहेत. म्हणून तर
” ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा
क्षणार्धात सर्वत्र सांजावले
चकाकून जाती विजांच्या शलाका
थवे पाखरांचे घरी पातले ”
किंवा सरी बरसू लागल्यावर
“. लडीवाळ बाळापरी पावसाच्या
नभाच्या कुशीतून आल्या सरी
झळांचा बने थंडसा मंद वारा
घुमे रानझाडीतुनी बासरी “
यासारखे टपोरे शब्द कविच्या मानसमेघातून बरसु लागतात.
‘ काजळसे जमले मेघ,विजेची रेघ
कुठे चमचमते
ही हवा गार बोचरी,उठे शिरशिरी
कापरे भरते ‘
असो किंवा
‘ वा-याला कसले पिसे कसा घुमतसे
नाचवी राने….
पाण्यास मिळाले सूर खूर चौखूर
उधळी हर्षाने… ‘.
सारख्या लयबद्ध निसर्ग कविता वाचताना मन नकळतपणे डोलू लागते याठिकाणी सूर ,खूर, चौखूर या शब्दांतून साधलेला अनुप्रासात्मक नाद लक्ष वेधून घेणारा आहे.असा अनुभव अन्य काही ठिकाणीही येतो.
पावसाच्या आगमनात लग्न सोहळ्याचे मांगल्य पाहणा-या या कविला म्हणून तर पूर्ण खात्री आहे की काही काळासाठी आभाळ रुसल तरी
“. रुसण्यातुनही हसेल माया
काठिण्याला फोडित पाझर
सळसळणारे वैभव लेईल
उद्या ; आजचे श्रांत कलेवर “
अशा निसर्गात रममाण होतानाच कविच्या हाती एक पत्र येते…तिचे ते पत्रही पाऊसरुपीच असते.भरुन आलेलं आभाळ आणि भरुन आलेलं मन, एकीकडे घनांची तर दुसरीकडे शब्दांची होणारी दाटी ,अशा मनातून कोसळणा-या पावसात चिंब भिजणारं हे पत्र आपल्यालाही कधी भिजवून टाकतं समजतही नाही.
पण हा निसर्ग असा सर्वांगानं तसाच असला तरी ‘. पाखरं ‘ मात्र पहिल्यासारखी राहिली नाहीत असे कविला वाटते .ती धिटावत चालली आहेत.घाबरणं नाही.थवेही नाहीत.चिवचिविट तर कधीच बंद झालेला. ‘ पाखरं ‘ ही रुपकात्मक कविता नव्या पिढीच्या जीवनपद्धतीचे दर्शन घडवते.
या काव्यसंग्रकाही कविता ‘ त्याच्या ‘ आहेत, काही ‘तिच्या ‘ आहेत तर काही दोघांच्याही आहेत. प्रेम म्हटलं की माया, हुरहूर,रुसवा,विरह,समज, गैरसमज हे सगळं आलंच.वाढत्या वयाबरोबर येणारा समंजसपणा प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकतो.अपेक्षाही बदललेल्या असतात.हे सर्व भाव व्यक्त करणा-या श्री.कवठेकर यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील कोमल भावभावना अनुभवायला मिळतात.
एका कवितेत ते म्हणतात, तिला भेटायला निघण्यापूर्वीच ते तिच्यापाशी जाऊन पोहोचलेले असतात.त्याच कवितेच्या शेवटी ते म्हणतात मी परतूनही नसतो परतलेला. तिला भेटण्याचा आवेग आणि तिचा निरोप घेतला तरी तिथेच गुंतून राहात मनाचे घुटमळणे कविने नेमक्या शब्दात मांडले आहे . तिच्या असणं म्हणजे ‘ सर्वव्यापी निरभ्र चांदणगर्भ आकाश ‘असतं. तिच्यामुळेच तर त्याच्या आयुष्यातील अज्ञातवास संपून नवं पर्व सूरु होत असतं.या सुखाच्या चांदण्यामुळेच की काय,तिचा विरह झाला तरी तिच्या आठवणीने,तिच्या नुसत्या स्मरणानेही विरहाच्या दु:खाची बेडी तुटते . तिकडे तिची काय अवस्था असते ? ती म्हणते
“तुझा भास होई तुझी हाक येई
नको वाटते ही सुखाची घडी
तुझ्या वाचुनी रे सुन्या मैफिली या
ऋतू….आसवे….हासणे….बेगडी.
साहजिकच अशा या सखीच्या बाबतीत मग कविला वाटते ,
” तुला वादळांचे नको हेलकावे
तुझे शीड डौलात जावो पुढे
कधी भेटता तू कुठे ; ओळखीने
पहावे…हसावे…पुरे एवढे……”
त्याला तिच्या फक्त प्रेमाचीच जाणीव आहे असे नाही तर तिच्या कर्तृत्वाचीही जाण आहे.म्हणूनच एकीकडे घर संसार आणि दुसरीकडे स्विकारलेली व्यावसायिक जबाबदारी समर्थपणे पेलताना तिची होणारी दमछाक आणि दिसणारी कर्तव्य तत्परता कविच्या नजरेतून सुटलेली नाही . कार्यमग्न असणारी तिची बोटं आणि वेळेला कवेत घेण्यासाठी तिच्या पावलांची चाललेली लगबग यांचा मेळ घालता घालता तिला दावं सोडून पळता येणार नाही,ही वस्तुस्थिती आहे.मग कवी लिहून जातो ,
” सखी कळते मलाही, काय दुखते सलते
संस्कारांच्या उंब-यांशी ,कसे पाऊल अडते “
अशी सखी लाभली हे आपले भाग्यच आहे हे सांगताना त्याला संकोच वाटत नाही.उलट ,तो म्हणतो
” जन्म अपुराच माझा तुझे फिटावया ऋण
जन्म पुन्हा पुन्हा लाभो तुझ्या इतका सुजाण “
हे भाव जसे नेमक्या शब्दात व्यक्त झाले आहेत,अगदी
त्याचं नेमकेपणाने कविने आईच्या जाण्यानंतर भाव व्यक्त केले आहेत. आई गेल्यानंतर
” घर माझ्यासम आईला तेव्हाच पोरके झाले
कुठल्याच सुखाचा धागा फाटल्या मनास बसेना “
आणखी वेगळ्या शब्दांची आवश्यकता आहे का ?
क्लेशवृक्षाच्या छायेत बसून भवताल न्याहाळत असताना कविनं जे अनुभवलं आणि जी स्वप्न पाहिली ती आपल्या समर्थ लेखणीतून उतरवत असताना शब्दसंपदा, उपमा, कविकल्पना अगदी सहजपणे कवितेत गुंफल्या असल्याचे जाणवते.अलंकारिक शब्दांचे अप्रस्तुत प्रदर्शन टाळून मनाला मोकळे करणारे शब्द त्यामुळेच वाचकाला आपल्या जवळचे वाटतात.
स्मरणांचा जाच, स्मरणांचा उंबरठा ,दु:खाचा पहारा , पहारेकरी दु:ख , वास्तवाचा वणवा ,स्वप्नांचे वेफर्स,बेदरकारपणाची झुलपे,भयपटासारखे सरकणारे आयुष्य ,निनादत येणा-या वेदना , धीराचा कलंडणारा माठ, श्वासांचे शीड , व्याकूळपणे तिष्ठणारी माया,जडत्वापोटी येणारे तान्हुले हासरे,ही त्यांची काही उदाहरणे.किंवा
” नको म्हणूस ‘ जुनेरं ‘ जरी वस्त्र धसावले
काल फाटक्या दिवसांना ऋतू यांनीच दाविले “
या दोन पंक्तींतून कविने गृहिणीला ज्या शब्दात आश्वस्त केले आहे ते शब्द कुणाचाही ‘ फाटका ‘ संसार झाकून घ्यायला पुरेसे आहेत.
या कवितांविषयी लिहावं तेवढं थोडचं आहे. कविच्याच शब्दात सांगायचं तर
“आणि यांच्याही पल्याड ,खूप काही उरणारे
खोल खोल काळजाशी, फुलणारे…सलणारे…”
असे आहे ज्याच्यावर लिहायला हवं असं वाटत.
पण
” कळते सारे : हवे उठाया
बाकी रस्ता अजुन खूपसा
हवा आवरायास पसारा,
हवी धराया पुन्हा उभारी “
हे कविचे सांगणे लक्षात घेऊ आणि
“आता मज नाही , कुठलीच खंत
मन हे दिगंत ….होऊ पाहे “
अशा सात्विक समाधानाने हा काव्य शोधप्रवास थांबवतो.
पुस्तकाचे नाव. : क्लेश वृक्षाच्या छायेत
कवी : राजकुमार कवठेकर, ९४२११०५८१३
प्रकाशक. : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर ९३०९१३८४४३
पृष्ठे. : १२०
मूल्य. : रु.२००/-
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
