‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य….
‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कविता जगण्याच्या सांदीकोपऱ्यापर्यंत शिरत असलेल्या अरिष्टाच्या भयावह रूपाचे आकलन मांडतात. हे अरिष्ट केवळ व्यक्तिगत आयुष्यात वादळे उठवण्यापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते लोकजीवनाचे सामाजिक आणि राजकीय अंग छेदत खूप खोलवर शिरत असल्याचे संकेत या कवितेत आहेत. अफवा, संभ्रम, संशय, भीती, मुस्कटदाबी या गोष्टींचा धूर्तपणे वापर करीत चालून येणारे हे अरिष्ट पाशवी बहुमताच्या जोरावर समताधिष्ठित मानवी जीवनशैलीवर आघात करीत प्रसंगी संविधानाच्या गाभ्याला नख लावण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा गंभीर इशारा ही कविता देते. समाजातील संवेदनशील सहिष्णू माणसं, सत्तेला जाब विचारणारे लेखक तसेच समतेसाठी लढणारे कार्यकर्ते पत्करत असलेली जोखीम या कवितेत अधोरेखित झालेली आहे. माणसाच्या अभिव्यक्तीला कुंपण घालण्यासोबतच त्याच्या मेंदुचादेखील ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांकडे निर्देश करीत ही कविता आजच्या संभ्रमित काळाचे स्वरूप स्पष्ट करते.
एका बाजूला गोतावळा, गावगाडा, कुणबिकी यात गुंतलेली मुळं तर दुसऱ्या बाजूला फक्त वावरातच नव्हे, तर मेंदूतही माजलेला कुंधा अशा दुहेरी पेचात अडकलेल्या मनाची तगमग या कवितेतून परिणामकारकरित्या अभिव्यक्त झाली आहे. व्यक्तिगत जगण्यातला ताण मानवी जीवनातील कोलाहलापर्यत विस्तारत नेणारी ही कविता आजच्या जटिल काळाचे अनेक संदर्भ घेत त्यातले बहुविध पेच उलगडण्याचा प्रयत्न करीत संथपणे वाचकाला अंतर्मुख आणि अस्वस्थ करते.
या कवितासंग्रहातील एक कविता…
चिकोत्रा
चिकोत्रे,
मनसोक्त फिरलोय मी
तुझ्या काठाकाठावरून
आणि डुंबलोय तुझ्या डोहात मन भरून
तुझेच प्यायलोय पाणी
गायलोय मनमुराद तुझी हिरवीगार गाणी
लहानाचा मोठा झालोय तुझ्याच बळावर
तुझी गर्द सावली माझ्या बालपणीच्या काळावर.
तुझ्या प्रवाहाचा चैतन्यनाद
भिनलाय माझ्या नसानसांत
तुला पुरेपूर साठवून ठेवलंय मी माझ्यात
म्हणूनच बळ एकवटून लढू शकतोय जगण्यात…
तसा तुझा अवकाश मर्यादित
अगदी मर्यादित
एका डोंगराच्या कुशीतून संथपणे निघालीस
आणि वळणावर वळणं घेत
काठावरची गावंशिवारं फुलवीत
वेदगंगेला जाऊन मिळालीस
तेवढेच तुझे अस्तित्व.
तुलनेने तू तशी लहान
खूपच लहान.
तरीही कितीजणांची शतकानुशतकांची
भागवलीस तहान
कित्येकांना अंगाखांद्यावर खेळवलीस
अनेकांचे संसार सावरलीस
तुझ्या साक्षीनेच वसली तुझ्या काठावर
सहानुभावाची समूहसंस्कृती.
चिकोत्रे,
बाई तुझे किती उपकार आमच्यावर
जेव्हा दुष्काळाचा धाक जगण्यावर
तेव्हा गावंच्यागावं
कशी बांधून ठेवलीस काठावर.
तशी तू नव्हेस बारमाही
तरीही भरून वाहिलीस काठोकाठ
कधी रुसलीसही पाठोपाठ
कोरडी पडलीस
तेव्हाही सोडला नाहीस परोपकाराचा वसा.
आमच्या जगण्यावर तुझ्या मायेंचा ठसा
उघड्या पात्रात खोदल्यावर खोल
सापडतेच की ओल
सांगितलीस समजावून जगण्याचे मोल.
शिकवलीस जगायला
परिस्थितीशी झुंजायला
टिकून राहायला
आणि ओल जपायला.
कितीतरी रूपं तुझी
जशी तुझी
तशीच तुझ्या सहवासातली माझीही
मनाच्या तळात खोल ठेवलेत साठवून
आणि आता अस्वस्थ होतो मी तुला आठवून.
आज तुझ्यापासून इतके शहरात मी इतका दूर
आणि तुझ्या ओढीची मनात ही अनावर हूरहूर…
पुस्तकाचे नाव – अरिष्टकाळाचे भयसूचन
कवी – एकनाथ पाटील
प्रकाशक – ललित पब्लिकेशन, मुंबई
किंमत – २०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क – ९८६९३७७८०६ शशिकांत पवार
