May 5, 2026
A leopard cautiously moving near a village at night, reflecting human-wildlife conflict and coexistence.
Home » जवळ गेलो आणि कळलं… बिबट्या इतका भयानक नाही !
मुक्त संवाद

जवळ गेलो आणि कळलं… बिबट्या इतका भयानक नाही !

एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही—तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई समजून घेतो, तेव्हा भीती हळूहळू विरघळत जाते आणि तिची जागा आदर घेतो. बिबट्याबद्दलची माझी भावना ही अशाच एका दीर्घ प्रवासातून बदलत गेली—भीती, राग, वेदना आणि शेवटी समजूतदारपणाकडे.

प्रतिक मोरे, वन्यजीव अभ्यासक

एखाद्या वन्य प्राण्याची भीती वाटण्याचं मुख्य कारण हे तिची पूर्णपणे माहिती नसणे यामध्ये आहे… जेवढं त्याच्या जवळ जातो. जेवढं त्याचं विश्व कळायला लागतं तेवढं मग त्याच्या मनोभूमिका कळायला लागतात.. आणि मग त्याचा उमदा स्वभाव समजू लागला की मग भीतीची जागा आदर घेतो.. बिबट्याच ही तसंच झालं आहे.. आजही मला तो पहिला दिवस आठवतो.. पाचवीत असताना आम्ही मित्र मंडळी सायकली घेऊन फिरायला गेलो होतो.. संध्याकाळचे पाच सहा वाजले होते.. त्यावेळचे डांबरी रोड सुद्धा जंगलाचा भाग असावेत असेच होते.. गप्पा आणि गोंधळात अचानक एक जनावर आडवं गेलं.. अर्ध्याहून जास्तं मित्रांना तर काही दिसलंच नाही.. पण तरीही शार्दुलने तो बिबट्या होता हे सांगताच उडालेली गाळण आजही आठवते.. तेवढेच अंगावर आलेले रोमांच ही चांगलेच स्मरणात आहेत. ज्या वेगाने सायकली फिरवून आम्ही घर गाठलं होत ते आठवून आजही सर्वांच्या मनात हास्याचे फवारे उडतात.

बिबट्याची पहिली ओळख ही अशी लहानपणीच झालेली.. तिथपासून आजवर झालेला बिबट्याच्या जवळ जाणारा प्रवास हा दुःख तिरस्कार हेटाळणी पासून प्रेमात बदलण्यास अक्षरश वीस एक वर्ष लोटली असावीत. प्राणी प्रेमाची हौस ही लहानपणापासून दांडगी.. अर्थात त्याच पर्यावसान रस्त्यावरची कुत्र्याची पिल्ले घरी आणणे आणि त्यांच्यात बुडून जाणे हे तसे अगदी नैसर्गिक.. तसाच एक कुत्र्याच पिल्लू ज्याच्या आईला बिबट्याने नेल्यावर अक्षरशः अंगावर पडलं.. डोळे उघडण्याच्या आतच त्यांचं मातृछत्र हिरावल गेलं होतं.. आईविना वाढलेली ती पिल्ले माझ्या घरात कशी पोचली ते आता आठवत नाही.. पण एक कुत्री आणि एक कुत्रा मात्र आमच्याकडे वाढला.. बाकी दोन पिल्ले दुसऱ्या ओळखीच्या लोकात गेली.. अगदी डोळे न उघडलेली पिल्ले असल्यामुळे त्याचं सगळच करावं लागत होत.. पण ती जोमाने वाढली.. त्यातला तांबडा कुत्रा त्याच नंतर नाव लाल्याच पडलं. मस्त वाढला.. लहानपणीच्या धक्क्याने असेल किंवा आणि काही असेल पण तो अगदी रागीट बनला होता.. गेटची कडी जरी वाजली तरी लांबवरून क्षणार्धात प्रकट होणारा आणि अख्खं घर डोक्यावर घेणारा तो कुत्रा सर्वत्रच फेमस झाला होता. त्याच्यासाठी पिंजरा बनवला होता.

पौर्णिमेच्या चांदण्यात आजूबाजूचे आवाज घेऊन रात्र जागवताना अक्षरश त्याला आवरावे लागायचे.. इतका सावध की खुट्ट जरी वाजलं तरी तो सावध होत असे. लहानपणी त्याने चुकवलेलं मरण शेवटी त्याला एकदा तरी गाठेल अशी कोणतीच शक्यता वाटत नव्हती. पण एका अमावास्येच्या काळ्या रात्री तो असाच गायब होता.. उशिरापर्यंत न आल्याने पिंजऱ्यात जाण्याच्या प्रश्नच नाही.. उशिरा तो परत आला. मग कडी लावून पिंजरा बंद केला ती त्याची आणि माझी शेवटची भेट.. पहाटे पिंजऱ्याची कडी निघालेली होती आणि अंगणात उठलेलं पंजे.. यापुढे काय झालं हे केव्हाच कळलं नाही.. कारण तो परत दिसलाच नाही.. तरुण वयात अगदी आवडता कुत्रा असा बिबट्याने नेणं हे या बिबट्याचा तिरस्कार करण्यासाठी अगदी योग्य कारण.. मी जंगल फिरत असताना तो कायम बरोबर असणं.. समोर आलेली जनावरे बघून भुंकण आणि प्रत्येक वेळेला त्याने दिले साथ आठवून अनेक दिवस त्याच्या आठवणी अश्याच येत राहिल्या. ज्याने बिबट्याचा तिरस्कार वाढतच गेला.. हे असच होत राहील पुढेही अनेक पिल्ले आली मोठी झाली त्यातली अनेक बिबट्याच्या पोटात गेली.. यांना काय दुसरं खायला नाही काय ते अगदी यांचा बंदोबस्त करायलाच पाहिजे असे अनेक विचार येत असत..

आता अनेक वर्ष शार्दुल बरोबर कॅमेरा ट्रॅप लावताना.. बिबट्यांचा माग काढताना आणि त्याचं विश्व समजून घेताना त्यांची मजबूरी समजलीय.. रात्र रात्र जंगलं पालथी घालून.. हजारो तासांचे कॅमेरा फुटेज बघून जेव्हा एखादाही प्राणी नजरेस पडत नाही हे बघून माणसांनी जंगलाची अवस्था काय केलेय हे कळू लागलेय.. सर्वत्र पडलेल्या कचऱ्याच्या राशी.. त्यावर पोसलेले घुशी, उंदीर, भटकी कुत्री, मांजर त्यांची वाढलेली संख्या बघून लक्षात येतेय की बिबटे का दिसत आहेत.. पण आज उशीर झाला आहे.. कधी काळी बिबट्या बघण्यासाठी जंगलात जावं लागायचं आता रात्री उशिरा घरी आली तर घरच्या गेटातच तो दिसेल याची खात्री वाटू लागली आहे.

शार्दुलच्या व्यवसायामुळे रात्री अपरात्री फिरणं नेहमीच.. रस्त्यावर कडेला बसलेला बिबट्या दिसणे हे ही तितकंच सवयीचं.. रस्त्यावर मरून पडलेला एखादा उंदीर किंवा बेडूक खाण्यासाठी येणारा बिबट्या गाडीचा लाईट पडला की साइड पट्टीवर गवतात गायब व्हायचा.. असच अनेकदा घडल्यावर मग शार्दुलने एकदा गाडीतून उतरून त्याला अगदी जवळून पाहिला.. माणसांपासून गाड्यांपासून लांब राहण्यासाठी रस्त्यावरून बाजूला जाऊन डोक खाली घेऊन मुरून बसलेला बिबट्या वारंवार नजरेस पडू लागला. जेवढी भीती आम्हाला होती तेवढीच त्याला माणसांची भीती वाटते हे कळू लागले.. गाडीचा प्रकाश चुकवून माणसं जायची वाट बघणारा आणि गेली की परत रस्त्यावर येऊन ते पडलेलं खाद्य खाणारा बिबट्या आता बिचारा वाटू लागला. वाडीत वस्तीत अगदी सावध पावलांनी फिरणारा आपला कानोसा ही न लागू देणारा बिबट्या शार्दुलच्या कॅमेरात वेळोवेळी येऊ लागला.. दोन तीन वेळेला त्याने मारलेली पाडी जवळ कॅमेरा लावून गेल्यावर ती दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला हजर झाला.. हे पाहून त्याचा स्वभावही कळून गेला..बिबट्याला पाहण्यासाठी चाललेली धडपड त्याने आपल्याला आधीच बघितलेले असतं हे कळण्यापर्यंत येऊन पोचली.. त्याच्याविषयी वाटणारी भीती तिरस्कार आता कुतुहलात बदलली..

अजूनही बिबट्या पूर्ण कळला आहे असं म्हणणं बरोबर नाही.. एक रात्रीत कष्टाने पाळलेली कोंबडी, बकरी, गुरे, पाडस नेणारा बिबट्या कदाचित कहाणीचा खलनायक पण ठरतो आहे.. त्याच्या वावराने लागणारी संचारबंदी, त्याच्या भीतीने बंद होणारे खेळणे बागडणे हे सगळ्या गोष्टी तितक्याच आहेत.. पण पायवाटेवरून चालताना अगदी वीस पंचवीस फुटावर असणारा मान खाली घालून लपण्याचा प्रयत्न करणारा आणि तुम्ही जायची आतुरतेने वाट बघणारा बिबट्या ही तितकाच खरा आहे.. भरधाव गाडीने उडवलेला बिबट्या, फास्कीमध्ये अडकून मरणाची संथपणे वाट पाहणारा.. उघड्या विहिरीत पडून सुटकेची वाट पाहणारा.. आईपासून ताटातूट होऊन दुधाची वाट बघणारा बिबट्या.. तो आहे.. तो कुठंही जाणार नाही.. तो असणारच आहे.. आता त्याला शत्रू ठरवायचा की मित्र एवढंच आपल्या हातात आहे..

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

पौष्टीक अन् कुरकुरीत कोबीची वडी

मराठीचा प्रचार प्रसार करणाऱ्या नीलाक्षीताई

झाडीबोली, मराठी साहित्यिक आणि आम्ही झाडपे(!) : एक वस्तुस्थिती

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!