‘भिंगुळवाणे दिवस’ ही रमेश साळुंखे यांची कादंबरी म्हणजे कोविडकाळाचे कथात्मक संचित आहे. माणूस या प्रजातीचे अस्तित्वच पणाला लावणाऱ्या काळाचा शोधपट या कादंबरीत आहे. पत्रकार असणाऱ्या यशवंतराव या प्रौढ-प्रगल्भ नायकाच्या नजरेतून या कादंबरीचा पट चितारला आहे.
डॉ. दत्ता घोलप
समंजस आणि पत्रकारितेच्या मूल्यांवर अढळ विश्वास असणाऱ्या पत्रकाराच्या नजरेतून भोवतालातील घडामोडी सजगतेने न्याहाळलेल्या इथे दिसतात. कुटुंब, आरोग्य आणि शिक्षण अशा व्यवस्थांच्या कोविडकाळातील पडझडीच्या कथात्म नोंदी आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समाज म्हणून आपण या आपत्तीला कसे सामोरे गेलो, याचा हा कथाऐवज आहे. महामारीच्या विळख्यात अडकलेल्या मानवी वृत्ती-प्रवृत्तीचे, स्वभावाचे कालातीत कंगोरे उघड्यावाघड्या स्वरूपात रमेश साळुंखे आपल्यासमोर ठेवतात. संपूर्ण जगच बंदिशाळा झालेल्या काळाची, व्यवस्थात्मक पातळीवरून घेतलेल्या शोधाची ही कोविडगाथा आहे.
जगण्यातील क्षणभंगुरत्व आणि व्यवस्थेच्या थिटेपणात अनुभवलेल्या हतबल काळातील गलितगात्र मानवी समूहाचे हे चित्र आहे. साळुंखे यांचे लेखनवैशिष्ट्य असे की, ते संपूर्ण घटना-घडामोडी मूल्यात्मक चौकटीतून मांडतात; शिवाय रोजच्या अनुभवाचेच सामान्यीकरण केल्याने सत्यतेला दृश्यात्मकतेने साक्षात करतात, एक समाज म्हणून आपण कोविडकाळात कोणत्या अवस्थेतून गेलो, याचे सजग भान देणारी ही कादंबरी आहे.
पुस्तकाचे नाव – भिंगुळवाणे दिवस ( कादंबरी )
लेखक – रमेश साळुंखे
प्रकाशक – लोकवाङ्मय गृह
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.