सुखाचा पाऊस आलाच नाही
दोन बिघा जमीनीतला पाऊन तुकडा
समृद्धी महामार्गात काय गेला
पैशाची लॉटरी लागली
आणि सुबत्तेचा पाऊस पडला
घर गाडी चैनीच्या सुखोपयोगी
वस्तूंची हौसमौज करण्यात
सारा पैसा आला तसा गेला
वडिलोपार्जित शेतीच्या
चतकोर तुकड्यात
आता काय ऊगवायचं?
पश्चात्तापाच्या पावसा शिवाय
उरला फक्त दुःखाचा पाऊस
सुखाचा पाऊस
बळीराजाच्या
पुढच्या पिढीलाही
कायमचाच बंद झाला
आणि तो फक्त
बातम्या ऐकत राहिला
कुठे महापूर
कुठे पावसामुळे
दरडी कोसळून गाव संपले
कुठे कोरडाठाक दुष्काळ
तर कुठे अवकाळी
त्यांनी समृद्धी महामार्ग जोडले
त्यांचे रस्ते समृद्ध पावसात भिजले
इकडे मात्र दोन बिघा जमीनीवर
पेरणी कधी झालीच नाही
जमीनीचा चतकोर तुकडाही
दुःखाच्या पावसात लुप्त झाला
पुन्हा सुखाचा पाऊस
आलाच नाही….
कवी : चंद्रशेखर प्रभाकर कासार
चांदवडकर , धुळे.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
