March 21, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Like करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
It is necessary to do the prescribed deeds with mind
Home » मन लावून विहित कर्मे करणे गरजेचे
विश्वाचे आर्त

मन लावून विहित कर्मे करणे गरजेचे

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली साधना होत नाही. सोहम साधनेचे उचित फळ मिळण्यासाठी मनातून साधना करायला हवी. मन साधनेवर केंद्रीत ठेवायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देऊनी । करी कर्मे ।। २६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा

ओवीचा अर्थ – अर्जुना, तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्म फलाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस.

साधना हे सुद्धा कर्मच आहे. या कर्मातून आपणाला काय मिळते ? मनशांती साधनेतून मिळते. उर्जा, चैतन्य, स्फुर्ती, तजेलता, उत्साह अशा अनेक गोष्टी साधनेतून मिळतात. यासाठी साधनेचे कर्म हे करायलाच हवे. मनापासून साधना करायला हवी. अपेक्षा ठेवून आपण कर्म करायला लागलो तर आपल्या हाती काहीच लागत नाही, असे बऱ्याचदा घडते. याचा उलटा परिणामही होऊ शकतो. यासाठीच कर्म करायचे पण फळाची आशा ठेवायची नाही. हे मिळेल, ते मिळेल अशी आशा ठेवून कर्म कधीच करायचे नाही. कारण त्या गोष्टी मिळाल्या नाहीत, तर नैराश्य पदरी पडू शकते. हे नैराश्य मनाची स्थिती बिघडवू शकते. साधनेत मन न लागण्याची समस्या बळावू शकते.

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली साधना होत नाही. सोहम साधनेचे उचित फळ मिळण्यासाठी मनातून साधना करायला हवी. मन साधनेवर केंद्रीत ठेवायला हवे. जप करताना आपण माळा फक्त ओढतच राहातो. किती माळा साधना झाली याचेही भान कधी कधी आपणाला नसते. तोंडातून जप मात्र सुरू असतो, पण मन मात्र जपामध्ये गुंतलेले नसते. असे बऱ्याचदा होते. कर्म करत राहायचे, पण मन मात्र कर्मात गुंतलेले नसते. अशाने उचित फळप्राप्ती कशी होईल ? यासाठीच एक माळ जप करावा, पण तो मनापासून करावा.

जप करत असताना नाम मुखातून उच्चारले जात असते, पण मन मात्र त्यावर केंद्रीत नसते. मनाला जेंव्हा याची जाणीव होते तेंव्हा आपण सावध होतो अन् पुन्हा जपावर मन केंद्रीत करतो. असे बऱ्याचदा होत असते. मनामध्ये जागृती येणे महत्त्वाचे आहे. भानावर येऊन साधना करायला हवी. हळूहळू सवयीने मनाची ही भटकंती कमी होऊ शकते. यासाठीच साधनेचा सराव हा नित्य करायला हवा. सरावाने साधनेत मन रमू लागते. मनापासून साधनेचे कर्म होऊ शकते.

आपले मन साधनेत असो वा नसो, साधना मात्र नित्य सुरू असते. सोहमचे स्वर हे आपल्यात उमटत असतात. श्वास जोपर्यंत सुरू असतो तोपर्यंत सोहमचा हा स्वर निर्माण होतच असतो. हा सुरू असलेला स्वर आपणाला पकडायचा असतो. हेच आपले कर्म आहे. स्वराचा अनुभव आपल्या मनाला जेंव्हा होईल अन् मन त्या स्वरामध्ये रमेल तेंव्हाच खरी साधना फलद्रुप होईल. स्वर मनाने, कानाने ऐकायचा, स्वराचा स्पर्श अनुभवयाचा, स्वराचा स्वाद चाखायचा, त्याची गोडी जेंव्हा आपणाला अनुभवता येईल तेंव्हाच त्याचे ज्ञान आपणाला होईल. हे स्वराचे ज्ञान हेच आत्मज्ञान. हीच अनुभुती आपणाला साधनेत यायला हवी. यासाठीच मन लावून साधनेचे विहित कर्म हे करणे गरजेचे आहे.

Related posts

कोकणातील दहीहंडी व्हायरल व्हिडिओ…

एडिसनचा विद्युत दिवा !

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा – डॉ. दीपक पवार

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!