March 19, 2026
fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
प्रशांत आंबी यांचे आत्मकथन बोद हे भंगार वेचकाच्या संघर्षमय जीवनाचे सत्यकथन आहे. गरिबी, अपमान, स्वप्न आणि शिक्षणासाठीची झुंज मन हेलावून टाकते.
Home » अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…
मुक्त संवाद

अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही…

बोद – प्रशांत आंबी

इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिराचा पुरस्कार घेण्यासाठी गेले असतानाचा एक अनुभव मनावर कायमचा कोरला गेला आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले असे अनेकजण तिथे उपस्थित होते. बहुतेक जण आपला एखाद-दुसरा नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणीला घेऊन आले होते. अपवाद होता प्रशांत आंबी या पुरस्कार प्राप्त लेखकाचा. त्याच्यासाठी त्याची संपूर्ण बिरादरी उपस्थित होती आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या कौतुकाचा बाजही निराळाच होता. प्रशांत आंबी या एका भंगार गोळा करणाऱ्या लेखकाचे आत्मकथन “बोद”.

डॉ. सविता नायक मोहिते,
कराड
9822403771

घरी आल्यानंतर पुस्तक वाचून काढले आणि आपण किती अक्रसलेले आयुष्य जगत असतो याची प्रकर्षाने जाणीव झाली. भंगार गोळा करणारे आपण सर्वजण आजूबाजूला रोजच बघत असतो. सकाळी उठून आपली मुले जेव्हा शाळा कॉलेजला जातात तेव्हा यांच्यातील बायका, मुले ही पाठीवर पोती (बोद) घेऊन रस्त्यावरील कचरा उचलताना आपण पाहिलेले असते. बरेच सारे माझे पेशंट देखील हा व्यवसाय करणारे. पण त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे डोकावून बघण्याचा प्रसंग किंवा प्रयत्न मी कधीच केला नव्हता याची अचानक जाणीव झाली.

पुस्तकाची भाषा अगदी साधी सरळ रोजच्या आयुष्यातली आहे. त्यात अलंकारिक काहीच नाही. अगदी प्रकरणांना सुद्धा विशेष शीर्षके नाहीत. रोज संपणाऱ्या दिवसाप्रमाणे फक्त आकडे आहेत. एक, दोन, तीन…. आकर्षक शीर्षकांची काही गरजही वाटत नाही कारण पुस्तक वाचायला सुरू केले की वाचून झाल्यावरच खाली ठेवले जाते. पुस्तक वाचत असतानाच्या कालावधीमध्ये मनात फक्त, “अरे बापरे ! हे कधी आपल्या लक्षातच आले नाही.” असे विचार उमटत जातात आणि अपराधीपणाची भावना खोलवर मनात रुजत जाते आणि ती तिथे स्थिर होते ते कायमची.

का? ते समजून घेण्यासाठी खाली काही उदाहरणे देत आहे. प्रशांत सांगतो, “आई शेतात काम करत असताना शेताच्या बांधावर चीमीला तसेच उघडे ठेवायची. चीमी खूप रडायची. पण आई तिला घ्यायची नाही. कामच करत बसायची. कधी कधी तिला मुंग्या लागायच्या” ( चिमी हे तिच्या आईला नको असलेलं अपत्य आणि प्रशांतची धाकटी बहीण, जिच्या धीठपणामुळे आणि आग्रहामुळे त्यांना भंगार वेचण्याच्या व्यवसायाची माहिती झाली आणि त्यांना आर्थिक उत्पन्न सुरू झालं)

कोल्हापुरातील अनेक झोपड्या सारख्याच जळायच्या. त्या जळायच्या की ज्यांना झोपडपट्टीतले लोक तिथे नको आहेत म्हणुन लोक त्या जाळायचे कोणास ठाऊक?. त्यावेळी आमच्या झोपडपट्टीत पूर्ण न गळणारे घर म्हणजे श्रीमंताचं घर समजलं जायचं इत्यादी.

जबरदस्तीने केलेल्या पुनर्वसनाच्या कथा त्यात आहेत. त्यामुळे होणारी आबाळकिमान गरजा पुरवण्याची असाहाय्यता पण तरीही निकराने आयुष्यात लढाई करणारी आई त्यात आहे. तिच्याकडे बघून प्रशांतच्या मनात विचार येतात आणि तो म्हणतो,” इस दुनिया मे सबसे बडी योद्धा माँ होती है”.

कचऱ्यात सापडलेले चांगले पेन, शार्पनर, पेन्सिल, खोडरबर असलं सामान सापडलं की आम्हा मुलांना वाटायचं “एवढं चांगलं साहित्य ही पोरं कशी काय फेकत असतील ? या पोरांना पैशाचा लयच माज हाय.” असं सांगत असताना शेंडा पार्कमध्ये झोपडपट्टीत कुष्ठरोगी लोकांची वस्ती होती, म्हणून तिथे कोणी भंगार वेचायला जात नसत असं तो सांगतो. पण त्यामुळेच आम्हाला तिथे चांगला माल घावायचा. जणू तिथं आमचंच राज्य होतं. त्या वस्तीत राहणाऱ्या कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही तर काहींची बोटं गळून पडलेली. हे बघून प्रशांत सांगतो चिमी मला एकदा म्हणाली, “दाद्या पाय बघ की. यांना किती त्रास होत असेल रे? यांच्यापुढे आपलं दुख काहीच नाही बघ. एवढं हाल सोसून जगायचं आपल्याला जमणार पण नाही.” तेव्हा मला पण तिचं म्हणणं पटायचं. हे त्या मुलांची संवेदनशीलता आपल्या अंगावर शहारे आणते.

भंगार वेचताना शाळेतल्या मित्र-मैत्रिणींनी आपल्याला बघू नये म्हणून त्यांनी केलेली कसरत, भंगार वेचतात म्हणून नातेवाईकांनी केलेली हिटाळणी, वाळीत टाकणं, लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा पूर्वग्रहदृष्टीत दृष्टिकोन याबद्दल पुस्तकात जसे सविस्तरपणे लिहिलेले आहे तसेच काही आनंदाचे वेचलेले क्षण देखील आहेत. जसे की म्हशी जवळ पुस्तक घेऊन अभ्यास करताना एका पत्रकाराने काढलेला फोटो व त्याची आलेली बातमी. एवढं कष्ट करून सुद्धा शिक्षण घेत असल्याबद्दलचे कौतुकाचे शब्द त्यांना बळ देण्यास पुरेसे असतात. एकदा भंगारामध्ये सापडलेला एक मोबाईल आणि त्याला दुरुस्त करण्यासाठी केलेला आटापिटा आणि शेवटी तो खेळामधला निघाल्यानंतरची उदासीनता अस्वस्थ करते. कचरा जाळून टाकणाऱ्या बद्दल प्रशांत म्हणतो कोंढाळ्याला लावलेली एक काडी आमच्यासारख्या अनेक भंगार वेचकांच्या घरची चूल विझवायची.

भूक असहाय झाली म्हणून पहिल्यांदा मागितलेली भीक आणि त्यावेळीची मानसिक घालमेल, दिवाळीत अर्धवट विझलेल्या फटाक्यांनी साजरी केलेली दिवाळी, लहान बहीण धीट असली तरी तिची वाटणारी काळजी, दसऱ्याला लोक घर धुवून काढतात, साफसफाई करतात तेव्हा आमची खूप कमाई व्हायची यासारखी वाक्य काळजाला घर करत जातात. “ते “आणि “आपण” यातला फरक वृद्धिंगत होत जातो.

एके ठिकाणी तो म्हणतो, “आम्ही रस्त्यावरून जात असताना लोक आपोआप बाजूला व्हायचे. बाजूला व्हा म्हणण्यासाठी आम्हाला कोणत्याच सायरनची गरज नव्हती. रस्त्यावर व्हीआयपी पेक्षा जास्त रुबाब असायचा आमचा. कारण व्हीआयपी ताफ्यापुढे असणाऱ्या गाडीतला माणूस लोकांना बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणतो. आम्हाला ते सुद्धा म्हणायची गरज नव्हती. आमचा नुसता बोद बघितला की लोक स्वतःच बाजूला व्हायचे तर दुसरीकडे तो म्हणतो, ” सध्या साबणाने सारखं सारखं धुतलेला हात त्यावर पण किती किटाणू असतात हे दाखवणारी व्यवस्था दिवसभर लोकांनी टाकलेल्या घाणीत जे काम करतात त्यांच्या हातावर किती किटाणू असतील याचा कधी विचार करते का ? भंगारवेचकाचं आणि अस्वच्छतेचं नातं अतुटच.”

अनुभवाने लहानपणीच आलेले शहाणपण लेखकाला विचार करायला आणि प्रश्न विचारायला उद्युक्त करते. तो म्हणतो, “लहानपणी कोणी बालकामगारवाले आले की मी त्यांना विचारायचो आम्हाला ते काय खायला घालणार आहेत काय ? पण आता माझं ते बिलकुल मत नाही. कारण खेळण्याबागडण्याच्या वयात कोणत्याही मुलावर काम करण्याची वेळ येऊ नये. तो शिकला पाहिजे कारण शिक्षणच त्याला या परिस्थितीतून बाहेर काढू शकतं. पण अशी बरीच मुलं आहेत ज्यांच्या घरात कोणीतरी दुर्धम्य रोगाने आजारी आहे, वयस्कर, अपंग आहे. जो पूर्णपणे त्या मुलावरच अवलंबून आहे. त्यांनं काय करायचं ? नुसतीच कोरडी सहानुभूती दाखवून फायदा नाही. बालकामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर ही वेळच येऊ नये यासाठी ही व्यवस्था काहीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही.” हे म्हणत असताना तो व्यवस्थेला आणि आपणा सर्वांनाच विचार करायला भाग पाडतो.

पुस्तक लेखकाच्या मनोगतापासूनच मनाची पकड घेत कायमस्वरूपी आपल्या मनात घर करून अस्वस्थ करत राहतं.

खरंतर आम्हालाही हे काम करण्याची हौस नव्हती, एवढ्या लहान वयात दुसऱ्या कोणत्याही पर्यायापेक्षा हा पर्यायच चांगला वाटायचा कारण भंगार वेचण्यासाठी एक बोद सोडला तर काहीही भांडवल लागत नव्हतं. तो बोदसुद्धा जिथं आम्ही भंगार विकायचो, ते दुकानदार द्यायचे; तर कधी कधी कोंडाळ्यातच वेचलेली पोती आणि दोरा घेऊन दाबणाने शिवला की, तो तयार व्हायचा. तो बोद हातात घेऊन भंगार वेचायला सुरुवात केली की, त्याच दिवसापासून पोटाची खळगी भरायला सुरुवात व्हायची. गमवायला काही नाही आणि मिळवायला सगळं जग आहे, या विचाराप्रमाणे गमवायला काही नाही आणि वेचायला सगळे कोंडाळे आमच्या समोर असायचे.

प्रशांत आंबी

पुस्तकाचे नाव – बोद
लेखक – प्रशांत आंबी
प्रकाशक – संघर्षा बुक गॅलरी
किंमत – 250 रुपये
पुस्तक घरपोच विकत घेण्यासाठी संपर्क – प्रशांत आंबी – 8421249899

Related posts

मातृमंदिर संस्थेचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

जीवनातील अनुभव कवितेच्या रुपात

विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!