भौतिक बदलाबरोबर समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक इयत्ता सुधारली पाहिजे, यावर सा. रे. पाटील यांचा विश्वास होता. ग्रंथसंस्कृती व वाचन संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते. परिवर्तनवादी चळवळीतील नियतकालिकांना वर्गणीरूपी भरघोस अर्थसाहाय्य करत. तरुणपणी शाहीर अमर शेख व अण्णा भाऊ साठे यांची गाणी त्यांच्या ओठांवर होती.
डॉ. रणधीर शिंदे, मराठी विभाग प्रमुख,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
पत्रकार सुभाष धुमे हे कायम लेखनमग्न असणारे पत्रकार आहेत. आजवर त्यांनी स्थानिक प्रश्नांपासून ते सेवाभावी व्यक्तींवर लेखन केले आहे. या ग्रंथात त्यांनी सा. रे. पाटील यांच्या कर्तृत्वाची कहाणी मांडली आहे. ती प्रेरणादायी आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. सा. रे. पाटील यांच्या सामाजिक कार्याचे स्वरूप हे ‘लोकांचे विद्यापीठ’ या दृष्टीने न्याहाळले आहे. शिरोळ-जयसिंगपूर परिसरात हरितक्रांती, दुग्ध व सहकार क्रांती करण्यात सा. रे. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आयुष्यभर जनतेची निरलस सेवा केली. राष्ट्र सेवा दल व समाजवादी विचारांच्या निष्ठेने त्यांनी आयुष्यभर काम केले. दत्त सहकारी कारखाना व दत्त उद्योग समूहाची उभारणी हे त्यांच्या कृतिशील स्वरूपाच्या द्रष्टेपणाचे उदाहरण आहे.
सुभाष धुमे यांनी लिहिलेले हे चरित्र, रूढार्थाने सरधोपटपणे इतिहासक्रमाने लिहिलेले चरित्र नाही. तसेच ते सा. रे. पाटील यांच्या आयुष्यातील घटना क्रमशः ठेवून सलग रेषेत लिहिलेले हे चरित्र नाही. तर हा रूढ मार्ग टाळून त्यांनी सा. रे. पाटील यांच्या कार्याचे धुमे यांच्या मनावर जे ठसे उमटले आहेत, त्यास या चरित्रात मध्यवर्ती केले आहे. त्यामुळे त्यास माहितीपर व मोकळेढाकळे स्वरूप प्राप्त झाले आहे. धुमे यांच्यावर सा. रे. पाटील यांच्या कार्याचे ७५ वर्षांच्या काळात जे ठसे उमटले, त्यांचे स्वरूप या लेखनात आहेत. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सा. रे. पाटील यांच्या जडणघडणीच्या व विचारविश्वाच्या खुणा आरंभ भागात आहेत. पाटील यांच्या बालपणी आवतीभोवती असणारे स्वातंत्र्याचे वारे, शेती पार्श्वभूमी सांगून समाजवादी विचारनिष्ठेची मूल्ये सा. रे. पाटील यांच्यात रुजली. विशेषतः राष्ट्र सेवा दलाचा संस्कार व शिबिरातील सहभागाने सा. रे. पाटील यांच्या आयुष्याला नवे वळण लाभले. तरुणपणाच्या काळातील परिसरातील तुल्यबळ काँग्रेस नेतृत्व प्रतिकूलता पार्श्वभूमीवर सहकार आणि शेती परिवर्तनाची स्वप्नसृष्टी सा. रे. पाटील यांच्यात रुजली व त्यांचा अखंड कृतिशील विस्तार सा. रे. पाटील यांच्या या कहाणीत आहे. त्यांची ही सामाजिक चरित्रकहाणी धुमे यांनी विविध प्रकरणांतून मांडली आहे.
या ग्रंथात सा. रे. पाटील यांच्या कार्यातील महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकला आहे. साधेपण, उत्तम संघटन, सलोखा, सहिष्णुता, शेतीप्रेम, लाघवीपण, शांत व संयमी स्वभाव या त्यांच्या स्वभावाचे तसेच कार्यपद्धतीचे वेगळेपण धुमे यांनी नोंदवले आहे. सा. रे. पाटील यांनी शेती आणि सहकारात शिरोळ परिसरात अपूर्व बदल केले. शेतीचा आधुनिक दृष्टीने विचार करणे हे सा. रे. पाटील यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. शेतकऱ्यांनी आधुनिकतेचा व प्रयोगशीलतेचा अंगीकार केला पाहिजे. शेतीतून ग्रामोद्धार व राष्ट्रोद्धार व्हावा, अशी त्यामागे भावना होती. पाटील यांनी इस्रायलमधील शेती पाहिल्यानंतर शिरोळ परिसरातील शेती बदलवून टाकली. या परिसरातील शेती जीवनशैली बदलविण्यात सा. रे. पाटील यांचा मोठा वाटा आहे. शेतीतून समाज परिवर्तन अशी त्यांची ठाम धारणा होती. यामुळेच अनेक गावांत पाणी पुरवठा योजना सुरू केल्या. जोडव्यवसाय व जमीन मशागत सुधारणा केल्या. व्हॅलेंटाईन डे ला शंभर टन गुलाबाची निर्यात करणे, हे त्यांच्या धाडसी स्वप्नवृष्टीचे उदाहरण ! पाटील यांच्या या आधुनिक शेती कहाणीचे निवेदन त्यांनी केले आहे. तसेच क्षारपड जमीन मुक्ती चळवळीतील त्यांच्या प्रयत्नांची माहिती दिली आहे.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते सहकाराची मोठी पडझड होत असताना अस्वस्थ होते. सहकार टिकला पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यांच्या अखेरच्या काळात लोककल्याणकारी राज्याची ती खूण वाटत होती. अशा पडझड काळात त्यांनी केलेल्या सहकारातील कामाची नोंद धुमे यांनी घेतली आहे. दातृत्व हा सा. रे. पाटील यांच्या कार्यदृष्टीचा महत्त्वाचा आविष्कार होता. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले’ या दृष्टीने सा. रे. पाटील यांनी अनेकांना मदत केली. साहाय्य केले. गरजूंना मदत करणे, हा त्यांच्या आनंदाचा ठेवा होता. या दृष्टीने धुमे यांनी सा. रे. पाटील यांच्या मातृत्त्ववृष्टीची अनेक उदाहरणे दिली आहेत.
आयुष्यभर सा. रे. पाटील यांनी समाजसेवेचे काम केले. ‘दत्त सहकारी कारखाना’ व ‘दत्त उद्योग समूहा’ चे व्यवस्थापन आणि प्रशासन सार्वजनिक कामाचा आदर्श नमुनेदार उदाहरणे होत. दत्त सहकारी साखर कारखान्याचा परिसर हा सा. रे. पाटील यांच्या स्वप्नसृष्टीचे प्रेरणास्मृती ठिकाण आहे. सहकारी साखर कारखान्याचा परिसर इतका सुनियोजित, नेटका, सुबक हरित परिसर असणारे हे भारतातील एकमेव उदाहरण असावे.
भौतिक बदलाबरोबर समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक इयत्ता सुधारली पाहिजे, यावर सा. रे. पाटील यांचा विश्वास होता. ग्रंथसंस्कृती व वाचन संस्कृतीवर त्यांचे प्रेम होते. परिवर्तनवादी चळवळीतील नियतकालिकांना वर्गणीरूपी भरघोस अर्थसाहाय्य करत. तरुणपणी शाहीर अमर शेख व अण्णा भाऊ साठे यांची गाणी त्यांच्या ओठांवर होती. दत्त उद्योग समूहाच्या वतीने त्यांनी ‘इंद्रधनुष्य’ नावाचे दैनिक सुरु केले. आरंभ काळात वि. स. खांडेकर त्यात लिहायचे. ते स्वतः आठवड्यातून दोन वेळ कार्यालयातही येत असत. या विचारनिष्ठेमुळेच सा. रे. पाटील हे साधना ट्रस्टचे पस्तीस वर्ष विश्वस्त होते. या प्रकारची दृष्टी त्यांच्या विचारदृष्टीचे महत्त्वाचे अंग होते.
सुभाष धुमे यांनी यापूर्वी सा. रे. पाटील यांचे पुत्र गणपतराव पाटील यांचे छोटखानी चरित्र लिहिले. आता त्यांच्या वडिलांचे चरित्र लिहिले आहे. एका अर्थाने, एका कुटुंबातील समाजकार्याची ही द्विदल कहाणी आहे. अशा प्रकारच्या लेखनाचे सामाजिक तसेच सार्वजनिक चरित्राच्या दृष्टीने महत्त्व अनन्यसाधारण असते. अशा व्यक्तीच्या कार्यामुळे समाज अधिक चांगला आणि गुणसंपन्न बनत असतो. याची प्रचिती अशा लेखनातून येते. असे लेखन आदर्श समाजाला नेहमीच पथदर्शक ठरत असते. ज्यामुळे सात दशकांहून अधिक काळ गरीब माणूस केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या सा. रे. पाटील यांची ही जीवितकहाणी समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.
