कल्पना करा—जमिनीची सुपीकता अचानक कमी झाली तर? अन्नधान्याचा तुटवडा, वाढत्या किमती आणि संकटात सापडलेला शेतकरी… ही केवळ कल्पना नसून बदलत्या हवामान आणि रासायनिक शेतीमुळे निर्माण होणारी संभाव्य वास्तवता आहे. त्यामुळे जमिनीचे आरोग्य जपणे हे आजच्या शेतीसमोरील सर्वात मोठे आव्हान बनले आहे.
प्रा. डॉ. सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार (९४०५१३८२६९)
अखिल भारतीय समन्वित तीळ सुधार प्रकल्प, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव-४२५००१.
भारत देशात मान्सूनच्या पडणाऱ्या पावसाच्या लहरीपणावर संपूर्ण शेती हंगाम अवलंबून असल्याने बदलत्या हवामानामुळे पिकांवर आणि पिकांच्या उत्पादकतेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. कल्पना करा समजा पाण्याच्या दुष्काळा सारखा परिणाम करणारा बॉम्ब जर शेतीवर आदळला तर काय होईल ? सगळीकडे हाहाकार माजेल, जगभरात अन्नधान्याचा तुडवडा होऊन अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडतील, पिण्याच्या पाण्यासाठी माणसे एकमेकांचे दुश्मन होऊन संपतील, निसर्गसंपदा जिच्या जीवावर आपण मोकळा श्वास घेऊ शकतो तिचे सौंदर्य विद्रूप होईल, जीव जंतु, संपूर्ण प्राणिमात्रेचा जीव धोक्यात येईल थोडक्यात सर्वच अकल्पित घडेल.
निसर्ग कृपेने हे होणार नाही असेच समजून चलु पण नुसती ह्या बाबतची कल्पना किती भयान आहे. भारतवासी आनंदात असतील कारण भारत भूमीत हे कदापी होणार नाही याला कारण भारत देश विविधतेने नटलेला आहे, एकाचवेळेस भारतात वेगवेगळे ऋतू आपल्याला विविध भागात पाहायला मिळतात. निसर्ग कृपेने विश्वातील सगळ्यात जास्त लागवडी योग्य वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदर जमिनी भारताकडे आहे, बारमाही गोड पाण्याने वाहणाऱ्या हिमालयातून उगम पावणाऱ्या जीवनदायी नद्या आहेत. भारत देश जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या जीवावर होऊ शकतो फक्त शेतकरी जगवायला पाहिजे, शेतकऱ्याची शेती वाचवायला पाहिजे.
शेती सुधारणेसाठी शेतकऱ्याच्या जमिनीचे शासनाने शास्त्रीय पद्धतीने मोजमाप करून येण्याजाण्याच्या शेत रस्त्यासह मोजून द्यावी, शेतीतील मातीचे नमुने आणि शेतीसाठी वापरत असलेल्या पाण्याचे पृथःकरण शास्त्रीय पद्धतीने करून अद्यावत परीक्षण करण्यात यावे त्यावर आधारित अत्याधुनिक पीक उत्पादन नियोजनाचे रोडमॅप तयार करून द्यावेत म्हणजे सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि बळीराजा खऱ्या अर्थाने राजा संबोधल्या जाईल.
शेतकरी वर्गांसाठी सरकार खूप योजना आखतो, राबवतो, खूप मोठ्या सवलती कागदावर दिसतात परंतु शेतकरी बंधूंना त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. खरा फायदा कुणाचा होत असेल तर कृषी वस्तू उत्पादक कंपन्यांचा, ते अगोदरच निर्मित वस्तूंचे दर मिळणाऱ्या सबसिडी च्या चौप्पट करून ठेवतात आणि मिळणाऱ्या सवलतीचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला न होता शेती साहित्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्ष होताना दिसतो. शेतकरी दादांना सरळ सोप असे काहीही मिळत नाही. आपल्याच जमिनीचा सातबारा, घराचा उतारा काढण्यासाठी त्यांना तलाठी कार्यालयाच्या, ग्राम पंचायतीच्या खेटा घालाव्या लागतात आणि त्यासाठी पैसे मोजावे लागतात हे सत्य आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वच क्षेत्रात फार विदारक परिस्थिती अस्तित्वात आहे. जगाचा पोशिंदा आपण ज्याला संबोधतो तो अस्मानी सुलतानी संकटामुळे पूर्णतः देशोधडीला लागला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत कसाही तो ह्या गर्तेतून बाहेर पडू शकत नाही, किंबहुना त्यांना ह्या गर्तेत डुबवून संपवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील आहेत. देशभरात कृषी साहित्य उत्पादन करणाऱ्या विदेशी कंपन्यांना जाळे निर्माण करायला पोषक वातावरण मिळाले असुन आधुनिकतेच्या नावाखाली शेतकऱ्यांचे रक्त ह्या कंपन्या पित आहेत आणि सोबत जमिनीचा पोत निकृष्ट करण्याचे अप्रत्यक्ष काम करीत आहेत.
भारतात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आई.सी.एम.आर. संस्थेच्या अहवालात १०० माणसांच्या घेतलेल्या रक्त नमुन्याची चाचणी केली असता ७८ माणसांच्या रक्तात घातक कीटकनाशकांचे, बुरशीनाशकांचे अंश आढळून आलेले आहेत. तसेच प्रत्येक २० माणसांच्या मागे एक व्यक्ती जीव घेणाऱ्या कॅन्सर चे रुग्ण सापडत आहेत. घातक कीटकनाशके, बुरशीनाशके, रासायनिक खते आपल्या निसर्गातील जैवविविधता संपवण्याचे काम करीत असुन जमीन नापीक करीत आहे एकंदरीत फार मोठ्या येणाऱ्या धोक्याची घंटा वाजत असुन आपल्याला खुणावत आहे निश्चित.
विदेशी कंपन्यांचे शेतीतील हस्तक्षेप दूर करण्यासाठी कृषी संशोधनावर भर देऊन कृषी अनुसंधान संस्था, कृषी विद्यापीठांना राजकीय हस्तक्षेपा पासुन लांब ठेऊन स्वतंत्र रित्या स्वायत्ता प्रदान करण्यात यावी जेणे करून त्या स्वतंत्र निर्णय घेऊन अधिकचे संशोधनाचे कार्य करू शकतील आणि शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून भर घालतील.
शेतातील पिकांना अती पाण्याचा, रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याने महाराष्ट्रातील जमिनी क्षारपट होत चालल्या असुन जमिनीचा सामू (PH) वाढत आहे, त्या मुळे जमिनी नापिकीच्या उंबरठ्यावर आलेल्या असुन कोणत्याही पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेती तोट्यात जाऊन शेतकरी वर्ग कर्जाच्या खाईत लोटल्या जात आहे. जमिनी नापिक होण्यापासून वाचवण्यासाठी पर्यत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जल, जमीन आणि हवामान हे घटक जोपर्यंत पिकांना पोषक होणार नाही तो पर्यन्त बळीराजा खऱ्या अर्थाने राजा होऊ शकत नाही. शेतीचे नुस्ते उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत नाही तर त्याच्या उत्पादनाला बाजारात उत्पादन खर्चावर आधारित चांगला भाव मिळत नाही तोपर्यंत या देशांची अर्थव्यवस्थाच मोठी होऊच शकणार नाही. शेती या व्यवसायाला प्रतिष्ठा देऊन, सद्यस्थितीत चालना देणे अत्यंत गरजेचे आहे.
जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करता येईल ?
शेतकरी बांधवांनी तीन वर्षात एकदातरी रब्बी हंगामात कोरडवाहू करडई पीक त्यानंतर उन्हाळी हंगामात मूग कडधान्य पीक घेणे गरजेचे आहे दोन्हीं पीक जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि सुधारणेसाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात. करडई पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने ते जमिनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात तसेच मूग पिकाच्या मुळावर रिझोबियम जिवाणूंच्या गाठी असतात त्यामुळे हवेतून नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत होते. विशेषतः जमिनीची धूप थांबवण्यासाठी आणि जमिनीचा कस वाढवण्यासाठी दोघेही उत्तम पीक आहेत.
- खोल नांगरट: जमीन ३ वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी, जेणेकरून मुळे खोलवर जाऊन जमीन सुधारण्यास मदत होईल.
- सेंद्रिय खत: जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीची खते (उदा. ताग, धैंचा) वापरावीत. हेक्टरी ५ टन कुजलेले शेणखत वापरल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
- जमिनीची भुसभुशीतपणा: जमिनीत खोलवर सोट मुळ जाणाऱ्या पिकांची लागवड करणे, मुळे जमिनीत खूप खोल (२ ते ३ मीटरपर्यंत) गेल्यामुळे जमिनीच्या खालील थरातील कडकपणा कमी होतो आणि जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. तसेच जमिनीचे पोत (soil structure) सुधारण्यास मदत होते.
- पोषक तत्वांचे पुनर्चक्रण (Nutrient Recycling): मुळे जमिनीच्या खोल थरातून पोषक तत्वे वर आणतात, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. पिकाची कापणी केल्यानंतर उरलेला पाचोळा किंवा अवशेष जमिनीत मिसळल्यास ते जमिनीसाठी उत्तम सेंद्रिय खत ठरतात.
- हवेची हालचाल (Aeration): मुळे खोल गेल्यामुळे जमिनीच्या आत हवेची हालचाल सुधारते, ज्यामुळे मातीची रचना सुधारते.
- सेंद्रिय कर्ब: पाने गळणाऱ्या आणि मूळ कुजणाऱ्या पिकांची लागवड करावी जेणे करून पाने, मूळ कुजल्यानंतर जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढेल.
- पिकांची फेरपालट (Crop Rotation) म्हणजे एकाच जमिनीत दरवर्षी तेच पीक न घेता पिके बदलून घेणे. यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. वेगवेगळ्या गटातील पिके आलटून पालटून घेतल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.
- क्षारयुक्त पाणी टाळणे (Saline Water) क्षारयुक्त पाणी पिकांसाठी अत्यंत घातक मानले जाते. योग्य व्यवस्थापन न केल्यास ते जमिनीची आणि पिकांची कायमस्वरूपी हानी करू शकते.
- ठिबक सिंचन: जमिनीतील पिकांना मोकाट पद्धतीने पाणी देण्याचे टाळून पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे (Drip Irrigation) करणे अधिक फायदेशीर ठरते, पिकांना गरजे पुरता मोजके पाणी दिल्याने जमिनीची सुपीकता टिकुन राहण्यास मदत होते. जमिनीत पाणी साचून राहू देऊ नये, यासाठी योग्य निचरा व्यवस्था करावी. जमिनीत पाण्याचा निचरा योग्य राहील याची काळजी घ्यावी, जेणेकरून क्षार जमिनीच्या खाली जाण्यास मदत होईल.
