स्टेटलाइन –
राजकारणात विचारसरणीपेक्षा सत्तेची गणिते महत्त्वाची ठरत चालली आहेत, याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे भाजपाने विविध पक्षांतून आलेल्या नेत्यांना थेट मुख्यमंत्रीपदाची माळ घालण्याची सुरू केलेली परंपरा. काँग्रेस, तृणमूल, जनता दल, आसाम गण परिषद किंवा प्रादेशिक पक्षांतून आलेले अनेक नेते आज भाजपाचे चेहेरे बनले आहेत. पक्षनिष्ठेपेक्षा ‘जिंकून आणण्याची क्षमता’ आणि सामाजिक समीकरणे यांना प्राधान्य देत भाजपाने आयाराम नेत्यांवर मोठा विश्वास टाकला आहे. बिहारपासून पश्चिम बंगालपर्यंत आणि ईशान्य भारतापासून कर्नाटकपर्यंत भाजपाच्या सत्ताविस्तारामागे या आयाराम नेत्यांचीच राजकीय चांदी झाल्याचे चित्र दिसत आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
भारतीय जनता पक्षाने अवघ्या एका महिन्याच्या अवधीत बिहार व पश्चिम बंगाल या दोन मोठ्या राज्यांना असे दोन नवीन मुख्यमंत्री दिले की ते पक्षातले आयाराम तर आहेतच पण त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपाच्या विचार प्रणालिशी काहीही संबंध नाही. मात्र त्या त्या राज्यात पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या हायकमांडला जे जे अपेक्षित आहे, ते ते दोन्ही नेते करून दाखवतील अशी त्यांची क्षमता आहे. बिहारमधे नितीश कुमार यांना हटवून भाजपाने सम्राट चौधरी यांच्यावर राजमुगूट चढवला तर पश्चिम बंगालमधे ममता बॅनर्जींना दोन वेळा परभूत करणाऱ्या सुवेंधू अधिकारी यांचा राज्याभिषेक केला. ते भाजपात आले व त्यांचे नशीब फळफळले असेच म्हणावे लागेल.
सुवेंधू अधिकारी ( पश्चिम बंगाल ) – मुख्यमंत्री सुवेंधू अधिकारी हे २०२१ मधे भाजपात आले त्यापूर्वी ते तृणमल काँग्रेसमधे ममता बॅनर्जी यांचे निकटर्तीय म्हणून ओळखले जायचे. सुवेंदु हे अगोदर काँग्रेसमधे होते. त्यांचे वडिल शिशिर अधिकारी हे तर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमधे केंद्रीयमंत्री होते. सुवेंदू यांनीही १९९५ मधे काँग्रेस पक्षातून करिअरला सुरूवात केली. मेदिनीपूर नगर परिषदेत ते काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९८ मधे ममता बॅनर्जी काँग्रेस सोडून तृणमूल काँग्रेस हा स्वत: पक्ष स्थापन केला, तेव्हा सुवेंधू व त्यांचा परिवार तृणमूल काँग्रेसमधे सामील झाला. २००६ मधे कांथी दक्षिण मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले होते. २०२० च्या सुमारास ममता यांनी त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांना पक्षाचा चेहरा म्हणून प्रकाशात आणायला सुरूवात केली, तेव्हापासून सुवेंधूंचे बिनसले. त्यानंतर सुवेंधू यांनी डिसेंबर २०२० मधे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपामधे प्रवेश केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत सुवेंधू यांनी नंदिग्रामधे ममता यांचा पराभव केल्याने भाजपामधे त्याचे महत्व वाढले. २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी ममता यांचा भवानीपूरमधे पराभव केलाच पण नंदिग्राम व भवानीपूर अशा दोन्ही ते मतदारसंघातून निवडून आले.
सम्राट चौधरी ( बिहार ) – भाजपात असले तरी त्यांचा प्रवास भरपूर इकडून तिकडून फिरून झाला आहे. सम्राट यांचे वडिल शकुनी चौधरी हे तर वेगवेगळ्या पक्षातून आमदार, खासदार व मंत्री झाले. शकुनी चौधरी हे समता पार्टीचे एक संस्थापक सदस्य होते. सम्राट चौधरी यांनी १९९० च्या दशकात समता पार्टीपासून राजकारणात प्रवेश केला. मे १९९९ मधे राबडी देवींच्या नेतृत्वाखालील राजद सरकारमधे ते कृषी मंत्री होते. नंतर सम्राट यांनी लालू प्रसाद यांच्या राजदच्या तिकीटावर निवडणुका लढल्या. २०१४ मधे त्यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडमधे प्रवेश केला. जेव्हा जतिराम मांझी यांनी नितीश कुमार यांच्याविरोधात बंड केले, तेव्हा सम्राट यांनी मांझी यांच्या हम या पक्षाचे समर्थन केले. जनता दल यु व हम यांच्यात राजकीय रस्सीखेच चालू असताना सम्राट चौधरी यांनी २०१७ मधे थेट भाजपाचा रस्ता पकडला. २०१८ मधे त्यांची प्रदेश भाजपाचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. २०२१ मधे एनडीएच्या सरकारमधे ते पंचायत राज मंत्री झाले. २०२२ मधे विधान परिषदेत ते विरोधी पक्षनेता झाले. २०२३ मधे प्रदेश भाजपाचे अध्यक्ष झाले. २०२४ मधे नितीश कुमार एनडीएमधे परतले व त्यांच्या सरकारमधे सम्राट उपमुख्यमंत्री झाले. २०२५ ची विधानसभा निवडणूक जनता दल यू व भाजपाने युती करून लढवली. निकालानंतर नितीश कुमार हे मुख्यमंत्री झाले व सम्राट चौधरी पुन्हा उपमुख्यमंत्री बनले. अवघ्या वर्षाच्या आतच नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन राज्यसभेत जावे लागले व त्यांच्या जागेवर सम्राट चौधरी भाजपाचे पहिले मुख्यमंत्री झाले.
हिमंता बिस्व सरमा ( आसाम ) – २००१, २००६ आणि २०११ असे तीन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर जालुकबारी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. २००२ ते २०१४ या काळात तरूण गोगोई यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारमधे ते मंत्री होते. ऑगस्ट २०१५ मधे ते भाजपामधे सामील झाले. २०१६ मधे सर्वानंद सोनोवाल यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पहिल्या सरकारमधे मंत्री झाले. २०२१ मधे विधानसभा निवडणूक निकालानंतर सोनोवाल केंद्रात मंत्री म्हणून गेले व सरमा मुख्यमंत्री झाले. २०२६ च्या निवडणुकीनंतर सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.
अर्जुन मुंडा ( झारखंड ) – राजकीय जीवनाला १९८० च्या सुमारास झारखंड मुक्ती मोर्चापासून सुरूवात केली. १९९५ मधे झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार म्हणून ते बिहार विधानसभेवर निवडून गेले. नंतर ते भाजपामधे सामील झाले. सन २०००च्या निवडणुकीत ते भाजपाचे आमदार म्हणून बिहार विधानसभेवर निवडून गेले. त्याच वर्षी झारखंड स्वतंत्र राज्य निर्माण झाले. बाबूलाल मरांडी यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या एनडीए सरकारमधे ते आदिवासी कल्याणमंत्री होते. वयाच्या ३५ व्या वर्षी ते २००३ मधे ते झारखंडचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.
सर्वांनंद सोनोवाल ( आसाम ) – २००१ मधे आसाम गण परिषेदेच्या तिकीटावर मोरानमधून आमदार व २००४ मधे दिब्रुगडमधून खासदार म्हणून निवडून आले होते. फेब्रुवारी २०११ भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामधे प्रवेश केला. २०१४ मधे मोदींच्या सरकारमधे ते केंद्रात मंत्री झाले. २०१६ मधे आसामचे मुख्यमंत्री झाले.
एन. बिरेन सिंह ( मणिपूर ) – राज्यात काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा आमदार झाले. काँग्रेस सरकारमधे मंत्री होते. २०१६ मधे तत्कालीन मुख्यमंत्री ओकराम बिबोबी सिंह यांच्या विरोधात बंड केले व भाजपामधे सामील झाले. २०१७ मधे भाजपाचे आमदार म्हणून निवडून आले. भाजपाप्रणित आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
गेगॉन्ग अपांग ( अरूणाचल प्रदेश ) – १९७२ पासून काँग्रेसमधे होते. १९७८ मधे पहिली विधानसभा निवडणूक झाल्यावर ते सरकारमधे मंत्री होते. १९८० मधे वयाच्या ३४ व्या वर्षी ते अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. ते १९९९ पर्यंत या पदावर होते. ऑगस्ट २००३ मधे अपांग आपल्या समर्थकांसह भाजपामधे सामील झाले. ईशान्येकडील राज्यात भाजपाचे पहिले सरकार अरूणाचलमधे बनले व अपांग मुख्यमंत्री झाले. २००४ च्या निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यावर अपांग पुन्हा काँग्रेसमधे आले व मुख्यमंत्री झाले. २०१४ मधे ते परत भाजपामधे आले व २०१९ मधे पुन्हा भाजपाला सोडचिठ्ठी दिली.
पेमा खंडू ( अरूणाचल प्रदेश ) – माजी मुख्यमंत्री दोरजी खंडू यांचे पुत्र. २०१६ मधे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. काही महिन्यांतच पेमा खंडूसह ४३ आमदारांनी बंड केले व भाजपाच्या सहयोगी पक्षात सामील झाले. सहयोगी पक्षातही बंडखोरी झाली, मग ते समर्थक आमदारांसह भाजपामधे सामील झाले व भाजपाचे मुख्यमंत्री झाले. २०१९ व २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले व पेमा खंडू पुन्हा मुख्यमंत्री झाले.
माणिक साहा ( त्रिपुरा ) – २०१६ पर्यंत काँग्रेसचे सदस्य होते. त्याच वर्षी भाजपात सामील झाले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बनले. तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर मार्च २०२२ मधे त्रिपुराचे ११ वे मुख्यमंत्री झाले.
बसवराज बोम्मई ( कर्नाटक ) – माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र. जनता दलात होते. रामकृष्ण हेगडे व देवेगौडा यांच्याबरोबर काम केले. धारवाडमधून विधान परिषदेवर आमदार होते. २००८ मधे भाजपामधे सामील झाले. भाजपाचे येडियुरप्पा यांच्या सरकारमधे ते मंत्री होते. जुलै २०२१ मधे भाजपाचे चौथे मुख्यमंत्री झाले.
यु के सिंह ( मणिपूर ) – २०१२ मधे तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर लढले. २०१३ मधे भाजपामधे सामील झाले. २०१७ मधे भाजपाचे आमदार झाले. २०२२ मधे बिरेन सिंह सरकारमधे मंत्री झाले. फेब्रुवारी २०२६ मधे मुख्यमंत्री झाले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
