March 30, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Overcome doubt with truth article by Rajendra Ghorpade
Home » सत्याने संशयावर करा मात
विश्वाचे आर्त

सत्याने संशयावर करा मात

सत्याचा शोध घेऊन संशयावर मात करायला हवी. अध्यात्मातील सत्य काय आहे हे जाणून घेऊन स्वतःचे अज्ञान दूर करायला हवे. म्हणजेच अध्यात्मावरील संशय दूर होईल.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।। २०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा

ओवीचा अर्थ – म्हणून संशयापेक्षा मोठे असे दुसरें, थोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे.

संशयामुळे मनाची स्थिरता विचलित होते. घरात शांती नांदायची असेल. दोघांचा संसार चांगला चालावा असे वाटत असेल तर संशयास थारा देता कामा नये. काही नसले तरी मनात संशयाची पाल चुकचुकतेच. पण याकडे दुर्लक्ष करून त्यावर मात करता येते. घरातच आपण अनेक गोष्टीवर संशय व्यक्त करतो. याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो. खिशातले पैसे कमी झाले असे वाटले की लगेच, जोडीदाराने खिशातील पैसे हळूच काढून घेतले आहेत का ? असा अनेकदा संशय व्यक्त केला जातो. त्यातून चिडचिड होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही होते. नंतर आठवते की पैसे वेगळ्याच गोष्टीवर खर्च केले होते. मग काय माफीनामा. पण मन तेही करायला तयार होत नाही.

चूक मान्य करण्यात आपणास लाज वाटते. कमीपणा वाटतो. पण अशाने नातेसंबंध ताणत जातात. याचा विचार करायला नको का ? काही वेळेला तर अशाने घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. संशयामुळे इतकी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. संशयच व्यक्त केला नाही तर, हा प्रसंग उद्भवणारही नाही. पोलिसांची वृत्ती ही संशयी असते. प्रत्येक गोष्टीकडे ते याच दृष्टीने पाहतात. एखाद्याने चोरी केलेली नसली, तरी त्याला संशयाने पकडून बेदम मारहाण करून त्याने चोरी केली असल्याचा जबाबही नोंदवितात. संशयामुळे अशा चुका अनेकदा घडतात.

खून न केलेल्या व्यक्तीसही तुरुंगवास भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशयाने शिक्षा कधी दिली जाऊ नये. नंतर पश्चात्ताप करावा लागतो. गुन्हा न करणारी व्यक्तीही नंतर मोठा गुन्हा करू शकते. संशयावर मात करायची असेल तर, सत्य जाणून घ्यायला हवे. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पैसे जोडीदाराने घेतल्याचा संशय घेण्याऐवजी आपण कोठे खर्च केलेत का ? कोठे ठेवले होते ? कोठे पडले का ? याचा विचार प्रथम करायला हवा. पण तसे होत नाही.

संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. मानसिक विचारांमुळे आपल्या शरीरात विविध रसायने उत्पन्न होत असतात. पित्त म्हणजे हे रसायनच आहे. रागामुळे पित्त उसळते. यासाठी मानसिक संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. शांत मनामुळे शरीरात आवश्यक रसायनांचीच निर्मिती होते. साधनेमुळे मनातील राग नियंत्रित करता येतो. साहजिकच जहाल, शरीराला मारक ठरणाऱ्या अशा रसायनांची निर्मिती यामुळे कमी होते. याचा परिणाम शरीरावर निश्चितच दिसून येतो. आरोग्यही उत्तम राहाते. शांत माणसांना आजारही कमी होतात. यासाठीच संशयाने मनास पीडा देणे योग्य नाही.

यासाठी सत्याचा शोध घेऊन संशयावर मात करायला हवी. अध्यात्मातील सत्य काय आहे हे जाणून घेऊन स्वतःचे अज्ञान दूर करायला हवे. म्हणजेच अध्यात्मावरील संशय दूर होईल. ज्ञानाने, सत्याने संशयावर मात करून अज्ञान दुर करायला हवे. म्हणजे आपण निश्चितच आत्मज्ञानाचे लाभार्थी होऊ.

Related posts

बीज संवर्धन, संरक्षणाचे महत्त्व

Neettu Talks : आरोग्यासाठी दही का आवश्यक आहे ?…

दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!