May 15, 2026
competition-exam-you-and-time George Cruz article
Home » स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्पर्धा परीक्षा आपण आणि काळ

शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय असली पाहिजे. यामध्ये चरित्र, आत्मचरित, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये व एकूणच विकासासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचले पाहिजे. यातील संपादकीयअग्रलेख वाचून चिंतन केले पाहिजे.

जॉर्ज क्रुझ मो. ९८२३९४६०८५

काळानुसार स्वतःमध्ये बदल करणारा माणूस निसर्गात टिकून राहतो. हेच डार्विनचा सिद्धांत सांगतो. कोरोनापूर्वीचा काळ व कोरोना नंतरचा काळ अशी विभागणी आपणास करावी लागेल. प्रत्येक व्याख्या काळानुसार बदलत राहते. करिअर म्हणजे आपल्याला आवड असणाऱ्या क्षेत्रात अधोजन करून समाधानाने जीवनप्रवास व्यतीत करणे. जीवन जगता आले पाहिजे, यासाठी अर्थाजन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पारंपारिक शिक्षण घेवून आपण नोकरीच्या शोधात बाहेर पडतो. मग लक्षात येते कौशल्यपूर्ण लोकांना समाजात मागणी आहे. आपण ध्येय नसणारे शिक्षण घेत असतो. खरंतर हा दोष आपला नसतो, याला शिक्षणपद्धती ही तेवढीच कारणीभूत आहे. यामध्ये हळूहळू बदल होताना दिसत आहे.

जे उमेदवार शिक्षण घेतात त्यांनी १० वीपासूनच आपले ध्येय ठरवावे. कोणी कोणी ‘व’ असे काही नसते. ज्याला ज्याप्रकारचे वातावरण व दिशा मिळते जसा माणूस विचार करतो तसेच त्याच्या जीवनात घडत असते. मग मी माझ्या विचारात बदल केला पाहिजे. तर माझी कृती बदलेल. पूर्वी शिक्षण आणि नोकरी यांचा संबंध घनिष्ठ होता. आता तो राहिला नाही. आता कौशल्य आणि नोकरी असा तो झाला आहे.

नोकरीच्या विविध संधी आहेत. लाखापासून कोटीपर्यंत पॅकेज घेणारे व्यावसायिक आहेत. तुम्हालाही असे व्हायचे असेल तर कौशल्य आत्मसात करा. ग्रामीण भागातील विद्यार्थी जीई/नीट, एमएच-सीईटी कडे १२ वी विज्ञान शाखेनंतर वळताना दिसतात. पण यशस्वी होण्याचे प्रमाण कमी दिसते. याची कारणे शोधण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. भाबडा पालक आशेने आपल्या पाल्यांना हे करावयास सांगतो. परंतु खरंच त्यांची किंवा तिची पात्रता आहे काय ? किंवा तो पात्रता वाढवण्याची क्षमता आहे काय ? याचा विचार करावयास हवा.

आर्टिफिशल इंटलेजन्समुळे उद्योग व व्यवसायाची समीकरणे बदलत आहेत. त्यामुळे भविष्याचा विचार करून पालकांनी संबंधितांशी चर्चा करून मुलांचे करिअर निवडावे.

स्पर्धा परीक्षांचा विचार करावयाचा झाल्यास ज्यांच्याकडे सातत्याने अधिक श्रम व आकलन करून अभ्यास करण्याची क्षमता आहे. त्याने १२ वी पासूनच तयारीला लागावे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे ५ वी ते बी.ए. पर्यंतचा सर्व अभ्यासक्रम. वेळीच जर लक्ष देवून अभ्यास केला तर निश्चित यश मिळू शकते. यासाठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धीमापन व विज्ञान या विषयाची तयारी पदवीला असतानाच करून घ्यावी. म्हणजे पदवी नंतर लगेच पोस्ट मिळण्याची शक्यता वाढते.

ग्रामीण भागामध्ये वाचनालयाच्या सुविधा वाढत आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतीमार्फत शासनाची वाचनालयाची तरतूद आहे, याचा सर्वांनी वापर करून घ्यावा.

केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची कोणीतीही परीक्षा असेल, त्याला तुम्ही पात्र ठरत असाल तर प्रथम अर्ज करावा. व तयारीला लागावे. १२ वी नंतर आर्मी, पोलीस, एसएससी सीएचएसएल अशा अनेक परीक्षा असतात. यामध्ये यश संपादन करून खात्यांतर्गत परीक्षा देवून आपली ग्रेड वाढवावी. पदवीनंतर एमपीएससी, युपीएससी, बँकिंग या परीक्षा द्याव्यात.

सध्या सरळसेवा परीक्षा जसे की, तलाठी, ग्रामसेवक, नगरपरिषद, एक्साईज कॉन्स्टेबल, लिपीक, जिल्हा न्यायालय या टीसीएस व आयबीपीएस या यंत्रणेकडे दिल्या आहेत व या परीक्षा ऑनलाईन घेतल्या जातात, यांची परीक्षा पद्धती समजून घ्यावी. यांच्या तयारीसाठी केंद्रीय स्तरावरचा अभ्यास करणे योग्य ठरते व त्यानुसारच संदर्भ वापरावेत.

युपीएससी प्रमाणे एमपीएससी २०२५ पासून वर्णनात्मक होणार आहे. ४०० मार्कांची पूर्व परीक्षा व १७५० गुणांची मुख्य परीक्षा व २७५ गुणांची मुलाखत. उमेदवारांना कोरोना काळात वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीची सवय लागली आहे. आता उमेदवारांना वाचन कौशल्य, लेखन कौशल्य व संभाषण कौशल्य सुधारावे लागेल. स्वत:च्या विचार करणाच्या क्षमतेमध्ये सुधारणा करावी लागेल. अधिकारी होण्याअगोदर आपण अधिकारी आहोत. असा विचार करून अभ्यास करावा लागेल व वर्तन करावे लागेल. Think Rich and Grow Rich आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेत घालावयाचे असेल तर शालेय जीवनापासूनच होणान्या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख होणे गरजेचे असेल.
अभ्यास करताना आपण अभ्यासाच्या पद्धती विकसित केल्या पाहिजेत, पेज मेथड लिंक मेथड, व्हिज्युलाईज मेथड टीसीएस मेथड यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासोबत प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये अशा प्रकारचे संस्कार रुजवणे आवश्यक आहे. जेथे जेथे व्याख्यानमाला असतील, चांगले विचार ऐकण्यास मिळतील तेथे मुलांना घेवून जाणे. गावागावात स्पर्धा परीक्षा तज्ञ मंडळीची व्याख्याने आयोजित करणे व अशा प्रकारचे बाळकडू पाजणे काळाची गरज आहे.

अभ्यास करत असताना प्रथम भूगोल विषय समजून घेवून करावा. भूगोलाचा अभ्यास चांगला झाला असेल तर सामान्य अध्ययनाचा ६० टक्के अभ्यास झालेला असतो. मग इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान व सोबत मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान करावा.

शालेय जीवनापासून अवांतर वाचनाची सवय असली पाहिजे. यामध्ये चरित्र, आत्मचरित, व्यक्तिमत्व विकासाची पुस्तके वाचली गेली पाहिजेत. स्पर्धा परीक्षेमध्ये व एकूणच विकासासाठी प्रत्येकाने वर्तमानपत्र वाचले पाहिजे. यातील संपादकीय व अग्रलेख वाचून चिंतन केले पाहिजे. काळ बदलतो आहे, काळाप्रमाणे नोकरीच्या संधी बदलत आहेत. त्यामुळे प्रत्येकांनी व्यावसायिक व कौशल्यपूर्ण शिक्षण घेणे आवश्यक आहे. नुसत्या पदवीला पदव्युत्तर पदवीचे मूल्य कमी झाले आहे. येणारे भविष्य त्यांचेच असेल जो काळाची पावले ओळखून मार्गक्रमण करील.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

एककांचे मानकरी…

वैज्ञानिक पायावर स्वराज्य उभारणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ

संस्कृती संवर्धनासाठी अनुवाद संशोधन होणे गरजेचे – माया पंडित

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406