जगात अनेक साम्राज्ये तलवारीने उभी राहिली; पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा एका मातेच्या संस्कारातून घडला. मृत्युसमयीही शिवरायांसाठी सोने जपून ठेवणाऱ्या जिजाऊंनी प्रत्यक्षात महाराष्ट्राला त्याहून अमूल्य ठेवा दिला. स्वराज्याची प्रेरणा, संस्कारांची ताकद आणि मातृत्वाचे तेज. आज जागतिक मातृदिन साजरा होत असताना आधुनिकतेच्या वेगात बदलणाऱ्या कुटुंबव्यवस्था, डिजिटल संस्कृतीचे वाढते सावट आणि मूल्यांच्या ढासळत्या भिंती यामध्ये “आई” या संकल्पनेचा नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भारतीय संस्कृतीतील मातृत्वाचे महत्त्व, मातेचे कर्तव्य, नव्या पिढीसमोरील आव्हाने आणि जिजाऊंसारख्या मातृत्वाच्या आदर्शांचा घेतलेला हा वेध…
जगातल्या प्रत्येक महान व्यक्तिमत्त्वामागे एखादी महान माता उभी असते, हे आपण सहजपणे म्हणतो; पण त्या वाक्यामागे किती गहिरे वास्तव दडलेले आहे, याचा विचार आपण क्वचितच करतो. कारण आई ही केवळ जन्म देणारी स्त्री नसते; ती संस्कारांचे पहिले विद्यापीठ असते, ती माणसाच्या आत्म्यातील पहिली भाषा असते, ती माणसाच्या मनात रुजणाऱ्या मूल्यांची पहिली शाळा असते. म्हणूनच भारतीय संस्कृतीने देवापूर्वी “मातृदेवो भव” म्हटले. देव दिसत नाही; पण आई दिसते. देव बोलत नाही; पण आईचे मौनही बोलते. देव न्याय करतो की नाही माहीत नाही; पण आईचा त्याग मात्र निर्विवाद असतो.
आज जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आधुनिक जग मोठमोठ्या शुभेच्छा देत आहे, सामाजिक माध्यमांवर छायाचित्रांचे पूर वाहत आहेत, “माय इज माय लाईफ” असे लिहिणारी पिढी मोबाईलच्या पडद्यावर भावना व्यक्त करत आहे; पण या उत्सवाच्या झगमगाटात एक प्रश्न शांतपणे उभा आहे. आजच्या काळात मातृत्वाचा आत्मा टिकून आहे का? आईचे स्थान अजूनही संस्कारकेंद्र म्हणून उरले आहे का? की आई आता फक्त व्यवस्थापन करणारी व्यक्ती बनत चालली आहे? मातृदिन हा केवळ फुलांचा, केकचा आणि संदेशांचा दिवस नाही; तो भारतीय संस्कृतीतील मातृत्वाच्या परंपरेचा पुनर्विचार करण्याचा दिवस आहे.
भारतीय इतिहासात जर “माता” या शब्दाला सर्वाधिक तेज प्राप्त झाले असेल, तर ते राजमाता जिजाऊ यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सामर्थ्य तलवारीत नव्हते; ते त्यांच्या मनात रुजवलेल्या संस्कारांत होते. आणि ते संस्कार घडवले जिजाऊंनी. इतिहासात एक उल्लेख येतो, मृत्युसमयी जिजाऊंनी शिवरायांसाठी सोने ठेवले होते. हा प्रसंग केवळ संपत्तीचा नाही; तो मातृत्वाच्या दूरदृष्टीचा आहे. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभ्या असतानाही त्या मुलाच्या भविष्याचा विचार करत होत्या. स्वतःचा शेवट जवळ असतानाही त्या स्वराज्याच्या संघर्षाची चिंता करत होत्या. हीच भारतीय मातृत्वाची व्याख्या आहे. स्वतःच्या अस्तित्वापेक्षा मुलाच्या आणि समाजाच्या भविष्याचा विचार करणारी चेतना.
जिजाऊंनी शिवरायांना केवळ युद्ध शिकवले नाही; त्यांनी न्याय शिकवला, स्त्रीसन्मान शिकवला, धर्मनिरपेक्षता शिकवली, स्वराज्याचा अर्थ शिकवला. त्यांनी सांगितले की सत्ता म्हणजे दडपशाही नव्हे; सत्ता म्हणजे जनतेचे रक्षण तसेच जनतेच्या न्याय हक्कासाठी लढा. आजच्या काळात मुलांना करिअर शिकवले जाते, पण चारित्र्य शिकवले जाते का? मुलांना इंग्रजी शिकवले जाते, पण अंतःकरणाची भाषा शिकवली जाते का? मुलांना स्पर्धा शिकवली जाते, पण संवेदना शिकवल्या जातात का? हा प्रश्न प्रत्येक मातेसमोर उभा आहे.
भारतीय संस्कृतीत आई ही फक्त घर सांभाळणारी व्यक्ती नव्हती. ती घराचा आत्मा होती. रामायणात कौसल्या आहेत, महाभारतात कुंती आहे, संत परंपरेत संत ज्ञानेश्वर यांच्या आयुष्यातील मातृत्वाची वेदना आहे, तर सावित्रीबाई फुले यांच्या रूपाने समाजमातेचे दर्शन आहे. भारतीय संस्कृतीने मातेला जैविक मर्यादेत बंदिस्त केले नाही; ती मूल्यांची वाहक मानली. म्हणूनच भूमीलाही “भारत माता” म्हटले गेले, भाषेलाही “मातृभाषा” म्हटले गेले.
परंतु आधुनिकतेच्या वेगात मातृत्वाचे स्वरूप बदलत आहे. आजची आई शिक्षित आहे, स्वावलंबी आहे, करिअर करणारी आहे; हे स्वागतार्ह आहे. पण त्याचवेळी तिच्यासमोरची आव्हाने अधिक कठीण झाली आहेत. पूर्वी संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकू यांच्या सहवासातून संस्कारांची साखळी टिकत होती. आता अणुकुटुंबात मुलाचे विश्व मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेभोवती फिरते. आईच्या कुशीत झोपण्यापेक्षा मुलगा मोबाईलच्या स्क्रीनसमोर अधिक वेळ घालवतो. संशोधन सांगते की डिजिटल माध्यमांच्या अतिवापरामुळे मुलांमधील भावनिक संवाद कमी होत आहे, चिडचिड वाढत आहे आणि सहनशीलता कमी होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही बालमानसावर डिजिटल व्यसनाचे दुष्परिणाम अधोरेखित केले आहेत. अशा वेळी आईची भूमिका केवळ काळजीवाहकाची राहत नाही; ती भावनिक दिशादर्शकाची बनते.
आजची माता एका विचित्र द्वंद्वात जगत आहे. एका बाजूला आर्थिक स्वावलंबनाची आवश्यकता, दुसऱ्या बाजूला मुलांना वेळ देण्याची तगमग. एका बाजूला स्पर्धात्मक जग, दुसऱ्या बाजूला मूल्यांचे जतन. मुलांच्या भविष्याची धडपड करताना अनेक माता स्वतःचे मानसिक स्वास्थ्य गमावत आहेत. आधुनिक मानसशास्त्रीय अभ्यास सांगतात की शहरी जीवनशैलीत मातांमध्ये ताण, नैराश्य आणि अपराधभाव वाढत आहे. कारण समाज अजूनही आईकडून परिपूर्णतेची अपेक्षा करतो. मुलगा बिघडला तर दोष आईचा; मुलगा यशस्वी झाला तर श्रेय व्यवस्थेचे ! ही विसंगती समाजाने समजून घेतली पाहिजे.
मातृत्व म्हणजे फक्त माया नव्हे; ती शिस्तही आहे. भारतीय संस्कृतीतील माता प्रेमळ होती, पण ती तितकीच कठोरही होती. जिजाऊंनी शिवरायांना तलवार दिली, पण त्याचबरोबर संयमही दिला. आज मुलांना सर्व सुविधा दिल्या जातात; पण मर्यादा शिकवल्या जातात का? “नाही” हे ऐकण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण केली जाते का? आई जर फक्त इच्छा पूर्ण करणारी व्यक्ती बनली, तर पुढची पिढी अधिकार मागणारी बनेल; कर्तव्य ओळखणारी नाही.
मातृदिनाच्या निमित्ताने आपण एक गोष्ट स्पष्टपणे मान्य केली पाहिजे की, समाजाच्या भवितव्याचा पाया मातृत्वावर उभा असतो. सरकार धोरणे ठरवू शकतात, शाळा शिक्षण देऊ शकतात, तंत्रज्ञान सुविधा देऊ शकते; पण संस्कार केवळ माता देऊ शकते. कारण संस्कार पुस्तकातून येत नाहीत; ते सहवासातून येतात. मुलगा आईला वृद्धांचा सन्मान करताना पाहतो, तेव्हा तो आदर शिकतो. आई संकटात धैर्य राखताना दिसते, तेव्हा तो संघर्ष शिकतो. आई प्रामाणिक राहते, तेव्हा तो सचोटी शिकतो.
आजच्या काळात मातृत्वाला केवळ भावनिक गौरव नव्हे, तर सामाजिक आधारही आवश्यक आहे. मातृत्व रजा, मानसिक आरोग्य सुविधा, सुरक्षित कार्यस्थळ, बालसंगोपन केंद्रे, कुटुंबातील पुरुषांची जबाबदारी या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहावे लागेल. आईला “त्यागमूर्ती” म्हणणे सोपे आहे; पण तिच्या श्रमांचे सामाजिक मूल्य मान्य करणे अधिक आवश्यक आहे.
मातृदिन हा पाश्चात्त्य संस्कृतीतून आलेला उत्सव असला, तरी भारतीय संस्कृतीत मातेला रोज वंदन करण्याची परंपरा आहे. आपल्या येथे आई ही केवळ नातं नाही; ती जीवनदृष्टी आहे. म्हणूनच मातृदिन साजरा करताना फक्त शुभेच्छा देऊन भागणार नाही. आपल्या घरात संवाद वाढवावा लागेल, मुलांना संस्कारांचे वारस बनवावे लागेल, मातेला निर्णयक्षम स्थान द्यावे लागेल आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मातृत्वाचा आदर कृतीतून दाखवावा लागेल.
आज पुन्हा जिजाऊंची आठवण होते. मृत्यूच्या दारात उभ्या राहूनही ज्यांनी मुलासाठी सोने जपून ठेवले, त्या जिजाऊंनी प्रत्यक्षात शिवरायांच्या मनात अधिक मौल्यवान ठेवा ठेवला होता तो म्हणजे स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि मानवतेचा. त्या संस्कारांचे सोने आजच्या मातांनी नव्या पिढीच्या मनात ठेवले, तरच हा मातृदिन खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. अन्यथा उरेल ती फक्त सोशल मीडियावरची भावनिक गर्दी आणि आतून रिकामे होत जाणारे समाजजीवन.
आई म्हणजे फक्त जन्म देणारी व्यक्ती नाही; आई म्हणजे काळोखात दिशा दाखवणारा दिवा. आणि जोपर्यंत त्या दिव्याची वात संस्कारांच्या तेलाने पेटती राहील, तोपर्यंत भारतीय संस्कृतीचे घर अंधारात जाणार नाही.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
