March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Esacape From Agra Book By Ajit Joshi
Home » आग्र्याहून सुटकेची तर्कशुद्ध मांडणी
संशोधन आणि तंत्रज्ञान

आग्र्याहून सुटकेची तर्कशुद्ध मांडणी

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासात त्यांच्या “आग्र्याहून सुटके”चे महत्व अनन्यसाधारण आहे. जर महाराज तेथून सुटून सुखरूप परत आलेच नसते तर……? विचारच करवत नाही………! शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. नंतरच्या काळात महाराजांनी उभे केलेले स्वराज्य आणि त्यांच्या पाईकांनी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला इतके जेरीस आणले कि त्याचा इथेच अंत झाला आणि मोंगल साम्राज्य धुळीस मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली !

डॉ. अजित जोशी, मोबाईल – 9922431609

“आग्र्याहून सुटका” या ग्रंथातील विषयाची मांडणी, ऐतिहासिक पुराव्यांचे सादरीकरण आणि त्यांचा अन्वयार्थ लावण्याची पद्धत, तसेच त्यात सामील असलेल्या विविध व्यक्तींच्या स्वभावांचा विचार करून मांडलेला शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा नवा सिद्धांत या गोष्टी प्रशंसनिय आहेत. या इतिहास संशोधनात्मक ग्रंथाला पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेने ‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे पारितोषिका’ने गौरविले आहे.

आग्र्याहून सुटका’ या ग्रंथांत इतिहाससंशोधन विषद केले असले तरी त्याची मांडणी आणि वाचनीयता खूपच चांगली आहे. नव्या सिद्धांताबद्दलचे पुरावे आणि त्यातून काढलेले निष्कर्ष एखाद्या शास्त्रीय संशोधनाप्रमाणे अतिशय तर्कशुद्ध आहेत. तरीसुद्धा त्यातील भाषा लालित्यपूर्ण असून ती समजण्यास अतिशय सुलभ आहे. विशेष म्हणजे, इतिहासाच्या संशोधनात्मक ग्रंथांमध्ये विस्तृतपणे आढळणाऱ्या ‘तळटीपा’ यात नाहीत! “आग्र्याहून सुटका” या ग्रंथांत प्रथमच एखाद्या ऐतिहासिक प्रसंगातील विविध व्यक्तींचे स्वभावविशेष आणि मानसिकता लक्षात घेऊन निष्कर्ष काढले आहेत. शिवाजीमहाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे हे कोडे सोडविताना लेखकाने अस्सल ऐतिहासिक दस्तऐवजांच्या मर्यादेत राहूनच श्रेष्ठ दर्जाची कल्पनाशक्ती दाखवली आहे. डॉ. अजित जोशी यांनी इंग्रजी माध्यमातून रसायनतंत्रशास्त्र विषयात डॉक्टरेट घेतलेली असून देखील या ग्रंथातील मराठी भाषा अतिशय शुद्ध आणि अचूक आहे.

कै. डॉ. व. दि. कुलकर्णी, मराठीचे प्राध्यापक, चिकित्सक समीक्षक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक

छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या इतिहासात त्यांच्या “आग्र्याहून सुटके”चे महत्व अनन्यसाधारण आहे. जर महाराज तेथून सुटून सुखरूप परत आलेच नसते तर……? विचारच करवत नाही………!

शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका ही मराठ्यांच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. नंतरच्या काळात महाराजांनी उभे केलेले स्वराज्य आणि त्यांच्या पाईकांनी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला इतके जेरीस आणले कि त्याचा इथेच अंत झाला आणि मोंगल साम्राज्य धुळीस मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली !

महाराजांची ‘आग्र्याहून सुटका’ हे एक ३५५ वर्षांहून अधिक काळ पूर्णपणे न उलगडलेले कोडे आहे ! खुद्द महाराजांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे रहस्य कोणासही पूर्णपणे सांगितलेले नाही ! आणि म्हणूनच, त्याचा उलगडा उपलब्ध पुरावे, त्यांचे योग्य मूल्यमापन आणि अन्वयार्थ, त्यातील व्यक्तींचे स्वभाव विशेष, इतर संबंधित गोष्टी इत्यादींची तर्कशुद्ध मांडणी करून मगच करावा लागतो. या महत्वपूर्ण घटनेचे साधार विश्लेषण “आग्र्याहून सुटका” या ३०४ पृष्ठांच्या संशोधनत्मक ग्रंथात एकूण १०३ संदर्भग्रंथांच्या आधारे केले आहे. त्यासंबंधातील अनेक गोष्टींचे विस्त्रुत विवेचन केले आहे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा नवा सिद्धांत मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून केंव्हा निसटले ?

रूढ समजुतीप्रमाणे ते १७ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटाऱ्यांत बसून औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले. पण ते खरोखरच या दिवशी निसटले ? कि या तारखेच्या कित्येक दिवस आधीच फौलादखानाच्या हातावर तुरी देऊन निघून गेले ? महाराज आणि संभाजीराजे मिठाईच्या पेटाऱ्यांमध्ये लपून नजरकैदेतून निसटले की वेषांतर करून निघून गेले ? छोट्या संभाजीराजांना बरोबर घेऊन गेले कि मागे आग्र्यातच ठेवून गेले ? आपल्या सुटकेसाठी, आणि आपल्या जिवलग सहकाऱ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी कुठली गुप्त योजना आखली ? ती कशी सिद्धीस नेली ? महारांजांच्या जीवनातील आणि महाराष्ट्राच्या तसेच हिंदुस्थानच्या इतिहासातील या अत्यंत महत्वाच्या घटनेचा ऐतिहासिक अस्सल कागदपत्रांच्या पुराव्यांच्या आधाराने “आग्र्याहून सुटका” या ग्रंथात उलघडा केला आहे.

छत्रपति शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका हा अतिशय गहन आणि गुंतागुंतीचा विषय आहे. या एकमेवाद्वितीय घटनेचे अनेक कंगोरे आणि पदर आहेत. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे गुपित समजण्यासाठी फक्त त्यांच्या आणि औरंगजेबाच्या हालचालींचा मागोवा घेऊन भागत नाही. इतर अनेक अनुषांगिक गोष्टींची माहिती जाणून घ्यावी लागते. उदाहरणार्थ, घोड्यांच्या दौडण्याचा वेग, त्या काळातील संदेशवहनाची व्यवस्था आणि त्यासाठी लागणार वेळ, प्रवासात राहण्यासाठी असलेल्या सराया, इत्यादी. या ग्रंथांत या घटनेचे सर्व उपलब्ध अस्सल ऐतिहासिक पुरावे अनुषांगिक माहितीच्या आधारे सुलभतेने मांडले आहेत, त्यांचे विश्लेषण केले आहे. महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा नवा सिद्धांत मांडला आहे.

आग्र्याहून सुटकेची मिठाईच्या पेटाऱ्यांची कथा चुकीची कशी आहे इथून सुरुवात करून एकूण १६ प्रकरणांमधून शिवाजीमहाराजांचे आग्र्याहून सुटकेचे रहस्य उलगडून दाखविले आहे. शेवटी पेटाऱ्यांची कथा का पसरली याचेही विवेचन केले आहे. शिवाय दहा नकाशे आणि दोन परिशिष्टे समाविष्ट केली आहेत. एकूण १०३ संदर्भग्रंथांची मदत घेऊन हा ग्रंथ सिद्ध केला आहे.

पुस्तक खूप सुंदर आहे. मी ते खूप पूर्वीच वाचले आहे. लहान लहान घटनांचा खूप बारकाईने अभ्यास केला आहे. मी नेताजींच्या कलकत्त्याहून काबुलकडे निसटून जाण्याच्या घटनेचा अभ्यास करीत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेसंबंधी एखाद्या विस्तृत ग्रंथाच्या शोधात असताना योगायोगाने “आग्र्याहून सुटका” हे पुस्तक हाती लागले. हा ग्रंथ माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त विस्तृत आणि सप्रमाण निघाला ! महाराज महाराष्ट्रात आल्यावर आधी मनोहरगडावर आले; तो मनोहरगड कोणता असावा” यासारख्या गोष्टींवरही या पुस्तकात खूप तर्कशुद्ध मांडणी केली आहे. विविध ठिकाणांमधील अंतरे, पोहोचायला लागणारा वेळ, तारखांचे अंदाज, संख्यांचे अंदाज, महाराजांचा आग्र्याला जायचा आणि परतीचा रस्ता, अशा अनेक गोष्टींवर अभ्यासपूर्ण प्रकाश या पुस्तकात टाकला आहे.

अम्बरिश पुंडलिक, नामवंत अभ्यासक, लेखक

पुस्तकाचे नाव – आग्र्याहून सुटका
लेखक – डॉ. अजित जोशी, मोबाईल – 9922431609
प्रकाशक- शिवप्रताप प्रकाशन, पुणे
किंमत – ३३० रुपये. पृष्ठे – ३०४

Related posts

तुझ्यामुळेच दरवळला आसमंत….

परिणामकारक कंटेंटसाठीच्या उपयुक्त टिप्स जाणून घ्या निकिता सावरकर यांच्याकडून वर्डकॅम्प कोल्हापूरमध्ये

राष्ट्रपतींच्या हस्ते 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!