खाकी वर्दी दिसली की डोळ्यांसमोर उभा राहतो तो कर्तव्यकठोर पोलीस; पण त्या वर्दीच्या आत धडधडणारे हळवे मन, कुटुंबासाठी आसुसलेला बाप आणि परदुःखाने व्याकूळ होणारा संवेदनशील माणूस अनेकदा नजरेआड राहतो. पोलीस उपनिरीक्षक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर निवृत्त झालेले अर्जुन डोमाडे यांनी आपल्या अनुभवांना कवितेचे रूप देत या अदृश्य माणूसपणाला शब्द दिले आहेत. ‘वर्दीतली वैखरी’ हा त्यांचा कवितासंग्रह म्हणजे खाकीतील संघर्ष, कर्तव्यनिष्ठा, कौटुंबिक हळवेपणा आणि समाजाप्रती असलेल्या निरामय प्रार्थनाभावाचे पद्यरूप आत्मनिवेदन होय. त्यांच्या कवितांतून पोलिसांच्या जीवनातील कटू-गोड अनुभव उलगडताना मानवी जीवनाच्या सार्थकतेचे चिंतनही प्रभावीपणे उमटते.
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून अर्जुन डोमाडे यांनी पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावली. या दरम्यान स्वकर्तृत्वाने पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणीही घातली. अलीकडेच ते नियत सेवाकाल यशस्वीपणे पूर्ण करून निवृत्त झाले. नोकरीच्या या प्रदीर्घ काळात आलेले कटू-गोड अनुभव, पोलिसांच्या जीवनातील अविराम संघर्ष आणि त्याचा वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम, अशा अनेक मितींतून आलेले अनुभव डोमाडे यांनी कवितारूपात मांडले आहेत.
मानवी जीवनाच्या सार्थकतेविषयी त्यांनी केलेल्या मौलिक चिंतनाची डूबही या कवितांत आहे.कुटुंब व समाजाच्या अपेक्षा आणि जबाबदारीचे ओझे पेलणाऱ्या, तरीही मनात एक हळवे माणूसपण जपणाऱ्या संवेदनशील पोलिसाचे हे जणू पद्यरूप आत्मनिवेदनच आहे. असे असूनही, या कविता केवळ वैयक्तिक अनुभवांपुरत्या मर्यादित न राहता, प्रत्येक वाचकाच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात.
कामावर निघताना पत्नी आणि मुलांना ‘संध्याकाळी लवकर येईन’ असे वचन देणाऱ्या, पण परिस्थितीच्या दबावामुळे ते पाळू न शकणाऱ्या कुटुंबवत्सल माणसाची हतबलता या कवितांमधून आर्ततेने व्यक्त झाली आहे. समाजाच्या संरक्षणासाठी जीवाची बाजी लावत हरघडी तत्पर राहूनही, सर्वांच्या लेखी कायमच उपेक्षित राहिलेल्या ‘वर्दीतल्या माणसाचे’ हे व्यथाकथन आहे. निष्ठेने कर्तव्य बजावूनही वर्षाखेरीस संधीसाधूंनी पळवलेले श्रेय आणि शेवटी स्वतःच्या पदरी पडणारे केवळ कष्ट, यातून येणाऱ्या उदास जाणिवेचा हलकासा उपरोधिक सूरही यात उमटला आहे. पोलीस ठाण्यात तक्रारी घेऊन येणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांमध्ये स्वतःच्या परिजनांचे चेहरे शोधणारा हळवा माणूस या कवितांतून भेटतो. आपल्याला समाजातली दुःखे दूर करता यावीत आणि संकटकाळात सामान्य माणसाची ढाल होऊन उभे राहता यावे, असा एक निरामय प्रार्थनाभाव या कवितांतून व्यक्त झाला आहे.
सहसा समाजात पोलिसांबद्दल अनेक गैरसमज आणि काहीशी भीतीची भावना असते. मात्र, खाकी वर्दीच्या आतही गरजूंना मदतीचा हात देणारा, परदुःखाने हळहळणारा संवेदनशील माणूस असतो, याची जाणीव या कविता करून देतात. जबाबदारी बजावताना कठोर होणारा कर्तव्यदक्ष पोलीस आणि प्रसंगी अतिशय मृदू होऊन लेकरासाठी डोळ्यांत पाणी आणणारा बापमाणूस, अशी एकाच व्यक्तिमत्त्वाची दोन भिन्न रूपे दाखवणारे हे हृद्य अनुभवकथन आहे. आयुष्यभर इमानेइतबारे केलेल्या सेवेनंतर उरलेल्या कृतार्थ भावनेची सुखद जाणीव या कवितेला व्यापून आहे. सत्य, प्रेम, त्याग, मानवतावाद, कर्तव्यनिष्ठा आणि निस्सीम देशभक्ती या मूल्यजाणिवांचा मनोज्ञ संगम या कवितांमध्ये झाला आहे.
पुस्तकाचे नाव – वर्दीतली वैखरी
कवी – अर्जुन डोमाडे
प्रकाशक – चांदनवेल प्रकाशन
