📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 11, 2026
काय चाललयं अवतीभवती

‘अक्षरगौरव’ साहित्य पुरस्कारांची घोषणा; १५ ग्रंथांची निवड

Akshargaurav Literary Awards 2025 have been announced by Ashwamedh Library, Satara, honoring outstanding Marathi books, authors and literary works across various genres.

सातारा : अश्वमेध ग्रंथालय व वाचनालय, सातारा यांच्या वतीने कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ दरवर्षी दिला जाणारा ‘अक्षरगौरव’ साहित्य पुरस्कार २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट ग्रंथांसाठी जाहीर करण्यात आला आहे. यंदा या पुरस्काराचे चौदावे वर्ष असून विविध साहित्यप्रकारांतील एकूण १५ ग्रंथांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्काराचे वितरण रविवार, २३ ऑगस्ट २०२६ रोजी ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे आणि कवी-गझलकार धनंजय तडवळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथांसाठीचा कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ ‘अक्षरगौरव’ साहित्य पुरस्कार प्रत्येकी अडीच हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह स्वरूपात देण्यात येणार आहे. यामध्ये कवी चंद्रकांत पोतदार यांच्या ‘धुराच्या सैल वेलांट्या’ आणि लेखक दिवाकर कृष्ण आचार्य यांच्या ‘पीळ’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.

कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ ‘अक्षरगौरव’ साहित्य विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी बा. बा. कोटंबे यांच्या ‘ऊन सावलीच्या शोधात’ या कादंबरीची, जे. डी. पराडकर यांच्या ‘ऋतुरंग’ या ललित गद्यसंग्रहाची, प्रवीण बोपुलकर यांच्या ‘अवतरण चिन्ह’ या कवितासंग्रहाची निवड झाली आहे. तसेच रवींद्र गोळे लिखित ‘गिरीश प्रभुणे जसे कळले तसे’ या चरित्रात्मक ग्रंथाला आणि रवींद्र बेडकीहाळ यांच्या ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर कर्तृत्वाचा एक शोध’ या संशोधन, लेखन व संपादनपर ग्रंथाला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे.

सातारा जिल्ह्यातील लेखकांसाठी देण्यात येणाऱ्या कै. भास्करराव माने स्मृत्यर्थ ‘अक्षरगौरव’ साहित्य विशेष पुरस्कारासाठीही पाच ग्रंथांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी अश्विनी कोठावळे यांच्या ‘अंतर्नाद’ कवितासंग्रहाची, सीमा नुलकर यांच्या ‘फुलांचे जंगली प्रदेश’ या प्रवासवर्णनाची, अशोक शिंदे यांच्या ‘गाव पांढरीच्या वैभवखुणा’ या ललित गद्यसंग्रहाची, वासंती घाडगे यांच्या ‘देवाचिये द्वारी’ या प्रवासवर्णनाची आणि साक्षी महामुलकर यांच्या ‘प्राचीन सातारा’ या इतिहासविषयक ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.

डॉ. श्रीकांत कारखानीस स्मृत्यर्थ आरोग्यविषयक ग्रंथासाठी दिला जाणारा ‘अक्षरगौरव’ पुरस्कार ‘झुंज कॅन्सरशी’ या मराठी अनुवादित ग्रंथाला जाहीर करण्यात आला आहे. या ग्रंथाचा मराठी अनुवाद जयराम धोंगडे यांनी केला असून पुरस्काराचे स्वरूप एक हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे.

या पुरस्कारांची माहिती अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र भारती आणि अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी दिली. विविध साहित्यप्रकारांतील दर्जेदार लेखनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव्या साहित्यनिर्मितीला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अक्षरगौरव’ पुरस्कारांची परंपरा गेल्या चौदा वर्षांपासून सुरू आहे.

यंदाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे साताऱ्यातील साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, विविध साहित्यप्रकारांतील पुरस्कारप्राप्त लेखक-कवींचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे.

Related posts

सांस्कृतिक पदभ्रमंतीने होणार वर्डप्रेसच्या कोल्हापूर वर्डकॅम्पचा प्रारंभ

रानशिवार साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

लातूरच्या ल. र. फाउंडेशनचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406