📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 30, 2026
मुक्त संवाद

वर्ध्याची समृद्ध वाङ्मय परंपरा Wardha rich literary tradition

Explore Wardha’s rich literary tradition, from Gunadhya and Buddhist heritage to Phule, Gandhi, Vinoba, Ambedkar and modern literary movements.

विदर्भ साहित्य संघ, नागपूर चे तिसरे जिल्हा साहित्य संमेलन वर्धा येथे झाले. यामध्ये डॉ .राजेंद्र मुंढे यांनी केलेले अध्यक्षीय भाषण

वर्धा म्हणजे केवळ महात्मा गांधींचे सेवाग्राम, विनोबांची गीताई किंवा स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींची भूमी नव्हे. गुणाढ्यांच्या कथासंपदेपासून केळझरच्या बौद्ध वारशापर्यंत, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक विचारांपासून गांधींच्या सत्य-अहिंसेपर्यंत, विनोबांच्या सर्वोदयापासून आंबेडकरी, बहुजन, स्त्रीवादी, आदिवासी आणि शेतकरी साहित्यचळवळीपर्यंत वर्ध्याने महाराष्ट्राच्या वैचारिक आणि साहित्यिक जडणघडणीत सातत्याने योगदान दिले आहे. म्हणूनच वर्ध्याची वाङ्मयपरंपरा ही केवळ लेखक-कवींची यादी नसून माणूस, समाज, समता आणि परिवर्तन यांचा प्रदीर्घ विचारप्रवास आहे.

डॉ .राजेंद्र मुंढे

आदरणीय विचारपीठावरील मान्यवर,

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या तिसऱ्या वर्धा जिल्हा साहित्य संमेलनासाठी उपस्थित झालेले साहित्यिक, अभ्यासक, संशोधक, पत्रकार, शिक्षक, कवी, लेखक, रसिकबंधू-भगिनी आणि माझ्या प्रिय साहित्यप्रेमींनो,या संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना माझ्या मनात आनंदापेक्षा जबाबदारीची भावना अधिक आहे. कारण आज मला केवळ एका जिल्ह्याच्या साहित्याचा इतिहास मांडायचा नाही; तर त्या इतिहासामागे उभ्या असलेल्या एका प्रदीर्घ सांस्कृतिक प्रवासाचे स्मरण करायचे आहे. वर्ध्याची वाङ्मयपरंपरा समजून घेणे म्हणजे केवळ लेखक, कवी, ग्रंथ किंवा साहित्यसंस्था यांची नावे सांगणे नव्हे; तर या भूमीच्या सांस्कृतिक स्मृतीचा, वैचारिक उत्क्रांतीचा आणि समाजजीवनाला घडविणाऱ्या मूल्यप्रवाहांचा मागोवा घेणे होय.

एखाद्या प्रदेशाची साहित्यपरंपरा ही अचानक निर्माण होत नसते.ती त्या भूमीच्या इतिहासातून,लोकजीवनातून,संघर्षातून,श्रद्धा-अश्रद्धांच्या संवादातून, ज्ञानपरंपरेतून आणि सांस्कृतिक अनुभवातून आकार घेत असते.भूमी,भाषा,लोक आणि विचार यांचा परस्परसंबंध जेव्हा दीर्घ काळ टिकून राहतो, तेव्हाच त्या प्रदेशाची स्वतंत्र साहित्यिक ओळख घडते.म्हणूनच वर्ध्याच्या वाङ्मयाचा विचार करताना प्रथम वर्ध्याच्या भूमीचे महात्म्य समजून घेणे आवश्यक ठरते.

‘वरदा’—जी वर देणारी,समृद्धीची दात्री. काळाच्या ओघात हाच शब्द ‘वर्धा’ झाला. नाव बदलले; पण या भूमीचा स्वभाव बदलला नाही. आजही ही भूमी विचारांना पोसते, माणसे घडविते, चळवळींना जन्म देते आणि समाजाला नवी दिशा दाखविण्याचे सामर्थ्य जपून आहे.म्हणूनच वर्धा हा केवळ महाराष्ट्राच्या नकाशावरील एक जिल्हा नाही; तर भारतीय सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासातील एक स्वतंत्र अध्याय आहे.

या भूमीचे वैशिष्ट्य एवढेच नाही की येथे महात्मा गांधींचे सेवाग्राम आहे.त्याही आधीच्या अनेक शतकांत या प्रदेशाने भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे.वर्ध्याची सांस्कृतिक स्मृती प्राचीन काळापर्यंत पोहोचते.पुरातत्त्वीय अवशेष,लोकपरंपरा,संतपरंपरा,ज्ञानपरंपरा आणि स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या सर्वांचा परस्पर संबंध येथे अनुभवास येतो.

भारतीय कथापरंपरेचे आद्य शिल्पकार

वर्ध्याच्या प्राचीन वैभवाचा विचार करताना सर्वप्रथम स्मरण होते ते गुणाढ्यांचे.भारतीय कथासाहित्याच्या इतिहासात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, त्या महान कथाकार गुणाढ्यांचा संबंध हिंगणघाट तालुक्यातील पोथरा या गावाशी जोडणारे संशोधन ज्येष्ठ संशोधक डॉ.भाऊ मांडवकर यांनी आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथातून मांडले.गुणाढ्यांनी पैशाची या लोकभाषेत रचलेली ‘बृहत्कथा’ ही केवळ एक साहित्यकृती नव्हती; ती भारतीय लोकस्मृतीचे विश्वकोशीय रूप होती.मूळ ग्रंथ आज उपलब्ध नसला,तरी त्यावर आधारलेले क्षेमेंद्र यांचे ‘बृहत्कथामंजरी’ आणि सोमदेवांचे ‘कथासरित्सागर’ यांनी भारतीय कथासाहित्यात अमर स्थान मिळविले. जगभरातील लोककथांच्या अभ्यासात गुणाढ्यांचे नाव आजही आदराने उच्चारले जाते.

यामुळे गुणाढ्य हे केवळ एका प्रदेशाचे साहित्यिक राहात नाहीत; ते भारतीय कथापरंपरेचे आद्य शिल्पकार ठरतात.म्हणूनच त्यांचा वर्ध्याशी असलेला संबंध हा केवळ प्रादेशिक अभिमानाचा विषय नाही; तर भारतीय साहित्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक संदर्भ आहे. या संदर्भाचा अधिक व्यापक आणि शास्त्रीय अभ्यास होणे ही आजच्या संशोधकांची जबाबदारी आहे.

बुद्धांच्या अनुयायांना आश्रय

वर्ध्याच्या सांस्कृतिक प्रवासातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे बौद्ध विचारांचा स्पर्श.वर्ध्या जवळील केळझर येथे झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननातून बौद्ध संस्कृतीचे अवशेष, विहारपरंपरेच्या खुणा आणि बौद्ध विचारप्रवाहाची साक्ष देणारे पुरावे उपलब्ध झाले आहेत. या अवशेषांकडे केवळ पुरातत्त्वीय वस्तू म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. ते या भूमीवरून वाहून गेलेल्या करुणा, प्रज्ञा आणि समतेच्या एका महान वैचारिक प्रवाहाचे सजीव साक्षीदार आहेत.
याच कारणामुळे मला असे वाटते की, वर्ध्याचा वैचारिक इतिहास गांधींपासून सुरू होत नाही; तो त्याही आधी बुद्धांच्या करुणामय तत्त्वज्ञानाच्या परिसस्पर्शाने उजळलेला आहे. या भूमीने बुद्धांच्या अनुयायांना आश्रय दिला, त्यांच्या विचारांना स्थान दिले आणि माणसाला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या जीवनदृष्टीचे बीज आपल्या संस्कृतीत जपले. हा वारसा पुढे अनेक शतकांनंतर नव्या रूपाने पुन्हा प्रकट होताना दिसतो. आणि याच ठिकाणी वर्ध्याच्या इतिहासात एका विलक्षण वैचारिक सातत्याची सुरुवात होते.

  महात्मा ते महात्मा — वर्ध्याच्या वैचारिक परंपरेचा सेतू

मान्यवरहो,
केळझरच्या बौद्ध अवशेषांपासून सुरू झालेला हा वैचारिक प्रवास पुढे अनेक शतकांनंतर एका नव्या रूपाने आपल्या समोर येतो. म्हणूनच मला वर्ध्याच्या सांस्कृतिक इतिहासाकडे पाहताना एक सूत्र स्पष्टपणे जाणवते—"महात्मा ते महात्मा." या सूत्राचा अर्थ व्यक्तींच्या पूजेत नाही; तर विचारांच्या अखंड परंपरेत आहे.

महात्मा गौतम बुद्धांनी करुणा, प्रज्ञा आणि समतेचा विचार दिला. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या करुणेला सामाजिक न्यायाची दिशा दिली; सत्यशोध, शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि जातिव्यवस्थेविरुद्धच्या संघर्षातून भारतीय समाजाला आत्मपरीक्षणाची दृष्टी दिली.

महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा, श्रमप्रतिष्ठा, ग्रामस्वराज्य आणि नैतिक राजकारणातून त्या विचारांना व्यापक लोकजीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला. हे तीन महात्म्ये काळाने वेगळी असली, त्यांच्या कार्यपद्धती वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू एकच होता—माणूस. दुःखातून माणसाची मुक्ती, अन्यायातून त्याची सुटका आणि अधिक न्याय्य, समतामूलक समाजरचनेची निर्मिती.याच अर्थाने वर्ध्याचा इतिहास हा महात्मा ते महात्मा असा विचारप्रवास आहे. यातील दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे महात्मा फुले आणि वर्धा यांचे ऐतिहासिक नाते.गांधीजी वर्ध्यात येण्याच्या आधीच महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रसार या भूमीत सुरू झाला होता. ही बाब महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले महात्मा फुल्यांचे चरित्र वर्ध्यातील जीनदासजी चवडे यांनी त्यांच्या छापखान्यात मुद्रित करून १९२८ मध्ये प्रकाशित केले. फुले विचारांना छापील शब्दरूप देणाऱ्या या घटनेला केवळ प्रकाशनाचा इतिहास म्हणून पाहता येणार नाही; ती महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे.

जीनदासजी चवडे हे केवळ मुद्रक किंवा प्रकाशक नव्हते. त्यांनी आपल्या छापखान्याच्या माध्यमातून सत्यशोधक विचारांना अभिव्यक्ती दिली, सामाजिक परिवर्तनाच्या साहित्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि वर्ध्याला वैचारिक संवादाचे केंद्र बनविले. त्यांनी जैन साहित्याचीही विपुल निर्मिती केली; त्यांनी स्वतः व आपल्या बंधुंसह लिहून सदर केलेली संगीत नाटके खूपच गाजत असे , त्याचबरोबर सत्यशोधक चळवळीच्या साहित्यप्रसारातही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

याच काळात सत्यशोधक चळवळीचे विचार, जलसे आणि प्रबोधनपर उपक्रम पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणावर घडत होते. सामाजिक समतेची बीजे लोकमानसात रुजविण्याचे हे कार्य वर्ध्याने निष्ठेने केले. पुढे व्यंकटराव गोडे यांच्या रूपाने सत्यशोधक पत्रकारितेला एक प्रभावी वैचारिक स्वर लाभला. सामाजिक प्रश्नांवर चिकित्सक दृष्टी, बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा आणि परिवर्तनवादी पत्रकारितेची परंपरा या भूमीत दृढ होत गेली.म्हणूनच असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही की, वर्ध्याने महात्मा फुल्यांच्या विचारांचे केवळ स्वागत केले नाही; तर त्या विचारांना मुद्रित शब्द, सार्वजनिक व्यासपीठ आणि सामाजिक संवादाची भूमी उपलब्ध करून दिली.याच वैचारिक पायावर पुढे गांधीयुगाची उभारणी झाली.
महात्मा गांधी प्रथम १९३४ मध्ये वर्ध्यात आले आणि १९३६ पासून सेवाग्राम ही त्यांची कर्मभूमी झाली. त्यानंतर वर्धा हा केवळ एक जिल्हा राहिला नाही; तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा, विधायक कार्यक्रमांचा, ग्रामस्वराज्याच्या प्रयोगांचा आणि राष्ट्रीय विचारमंथनाचा केंद्रबिंदू बनला. सेवाग्राममध्ये देशभरातील विचारवंत, साहित्यिक, समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार यांचा सतत राबता राहू लागला. राष्ट्रीय जीवनाचे अनेक निर्णायक निर्णय या भूमीत घडले.भारतीय स्वातंत्र्यलढ्याची राजकीय राजधानी दिल्ली असेल; पण त्याची नैतिक आणि विधायक राजधानी सेवाग्राम होती, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

याच काळात वर्ध्यात विचार, शिक्षण, पत्रकारिता, प्रकाशन, साहित्य, ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तन यांचा अद्वितीय संगम घडून आला. नई तालीमची संकल्पना, ग्रामोद्योग, खादी, स्वावलंबन, सर्वधर्मसमभाव आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये यांचा प्रभाव येथील सामाजिक आणि साहित्यिक जीवनावर खोलवर उमटला. यामुळे वर्ध्याच्या वाङ्मयपरंपरेचा विचार करताना आपण केवळ साहित्याचा इतिहास सांगत नाही; तर भारतीय प्रबोधनाच्या तीन महत्त्वाच्या टप्प्यांचा मागोवा घेतो—बुद्धांची करुणा, फुल्यांची समता आणि गांधींचे सत्य-अहिंसेवर आधारित मानवतावाद.माझ्या दृष्टीने हीच वर्ध्याच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाची सर्वांत मोठी ओळख आहे. म्हणूनच ही भूमी केवळ संतांची, महात्म्यांची किंवा साहित्यिकांची भूमी नाही; ती विचारांना कृतीत आणि कृतीला संस्कृतीत रूपांतरित करणारी भूमी आहे.

गांधी–विनोबा युग — सेवाग्राम आणि वैचारिक अधिष्ठान
मान्यवरहो,
महात्मा गांधींच्या सेवाग्राम आगमनानंतर वर्ध्याच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. त्या आधी या भूमीला प्राचीन सांस्कृतिक वारसा, संतपरंपरा आणि सत्यशोधक विचारांचा स्पर्श लाभला होता; परंतु १९३६ मध्ये गांधीजींनी सेवाग्रामला आपल्या वास्तव्यासाठी निवडले आणि वर्धा एका जिल्ह्याच्या सीमेत न राहता राष्ट्रीय विचारमंथनाचे केंद्र बनला. सेवाग्राम हा केवळ एक आश्रम नव्हता; तो नवभारताच्या उभारणीची प्रयोगशाळा होता. स्वातंत्र्यलढा, विधायक कार्यक्रम, ग्रामस्वराज्य, नई तालीम, खादी, ग्रामोद्योग, अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण, सर्वधर्मसमभाव आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्ये येथे प्रत्यक्ष कृतीत उतरली.

याच भूमीतून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला नैतिक अधिष्ठान लाभले. देशभरातील राजकीय नेते, साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार, अर्थतज्ज्ञ, धर्मचिंतक आणि समाजसुधारक सेवाग्राममध्ये येत राहिले. त्यामुळे वर्धा हा केवळ गांधींचा निवास राहिला नाही; तो भारतीय विचारविश्वाचा मुक्त संवादमंच बनला. याचा दूरगामी परिणाम येथील साहित्य, पत्रकारिता, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनावर झाला.

गांधीजींनी विचारांना कृतीची जोड दिली; तर आचार्य विनोबा भावे यांनी त्या विचारांना अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि भाषिक अभिव्यक्तीची विलक्षण उंची दिली. म्हणूनच वर्ध्याच्या वाङ्मयपरंपरेत विनोबांचे स्थान केवळ गांधींचे शिष्य म्हणून नाही; तर स्वतंत्र विचारवंत, साहित्यिक आणि प्राच्यविद्यापारंगत अभ्यासक म्हणून आहे.

गीताई हा मराठी भाषेच्या सांस्कृतिक इतिहासातील एक मैलाचा दगड आहे. भगवद्गीतेचा आशय लोकभाषेत, लोकांच्या संवेदनांशी एकरूप करून देण्याचे जे कार्य विनोबांनी केले, ते अद्वितीय आहे. गीता प्रवचने, मधुकर, गीताई-चिंतनिका, ईशावास्यवृत्ती, अष्टादशी, जीवनदृष्टी, भागवत धर्मसार, लोकनीती, विचारपोथी, साम्यसूत्र, स्थितप्रज्ञदर्शन, गुरुबोधसार यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी अध्यात्माला सामाजिक आशय दिला. त्यांच्या लेखनात पांडित्य आहे; पण ते जीवनापासून तुटलेले नाही. त्यात तत्त्वज्ञान आहे; पण ते माणसापासून दूर जात नाही. म्हणूनच विनोबांचे साहित्य हे विचार आणि आचरण यांचे अद्वितीय ऐक्य आहे.विनोबांच्या प्रभावातून वर्ध्यात एक स्वतंत्र वैचारिक परंपरा घडली. तिच्यातील अग्रणी नाव म्हणजे दादा धर्माधिकारी. भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील कार्यकर्ते, प्रखर चिंतक आणि असामान्य लेखक म्हणून त्यांचे स्थान विशेष आहे. आपल्या गणराज्याची घडण, गांधीजी की दृष्टि, तरुणाई, दादांच्या बोधकथा, दादांच्या शब्दांत दादा, नागरिक विश्वविद्यालय, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही : विकास आणि भविष्य, सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन अशा असंख्य ग्रंथांतून त्यांनी लोकशाही, मानवी स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समता आणि नैतिक समाजरचनेचा विचार सातत्याने मांडला. त्यांच्या लेखनात गांधीवाद हा स्थिर सिद्धांत नाही; तो सतत विकसित होणारा मानवी संवाद आहे.

हीच परंपरा पुढे न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी अधिक व्यापक केली. न्यायव्यवस्था, संविधान, अध्यात्म आणि मानवी मूल्ये यांचा समन्वय त्यांच्या लेखनात दिसतो. अंतर्यात्रा, काळाची पाऊले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया, मंझिल दूरच राहिली यांसारख्या ग्रंथांतून त्यांनी न्याय, नैतिकता आणि मानवतावादाचा विचार मांडला. त्यांच्या लेखनात न्यायमूर्तीची चिकित्सक बुद्धी आणि गांधीवादी संवेदनशीलता यांचा सुंदर संगम दिसून येतो.

या वैचारिक विश्वातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. य. देशपांडे. मराठी कादंबरी, वैचारिक साहित्य आणि चिंतनपर लेखनाला त्यांनी नवी उंची दिली. बंधनाच्या पलीकडे, सदाफुली, काळी राणी, मयूरपंख, विशाल जीवन या कादंबऱ्या, भविघोष–धर्मघोष आणि साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविलेली अनामिकाची चिंतनिका यांसारख्या साहित्यकृती त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. गांधीजीच का? या वैचारिक ग्रंथातून त्यांनी गांधीविचारांचा चिकित्सक वेध घेतला. त्यांच्या लेखनात व्यक्तीचे अंतर्मन, समाजाचे बदलते स्वरूप आणि विचारांची नैतिक जबाबदारी यांचा अत्यंत सूक्ष्म शोध दिसतो.

आचार्य काका कालेलकर हे गांधीयुगातील आणखी एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. गुजराती, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. राष्ट्रजीवन, संस्कृती, शिक्षण, अध्यात्म, भाषा आणि प्रवासवर्णन या सर्व क्षेत्रांत त्यांनी स्वतंत्र ठसा उमटविला. त्यांचे साहित्य भारतीय संस्कृतीतील विविधतेला एका व्यापक मानवतावादी चौकटीत पाहण्याची दृष्टी देते.

वर्ध्याच्या या वैचारिक परिवारात भदंत आनंद कौसल्यायन यांचे योगदानही तितकेच उल्लेखनीय आहे. बौद्ध धर्म, पाली भाषा, भारतीय तत्त्वज्ञान आणि बौद्ध वाङ्मयाच्या अभ्यासाला त्यांनी नवे अधिष्ठान दिले. बुद्धांच्या करुणामय विचारांचा आधुनिक पुनर्विचार त्यांच्या लेखनातून घडताना दिसतो. वर्ध्याच्या भूमीतील बौद्ध परंपरेला त्यांनी आधुनिक बौद्धिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.

हिंदीतील ख्यातनाम कवी भवानीप्रसाद मिश्र यांचे नाव घेतल्याशिवाय सेवाग्रामच्या साहित्यविश्वाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या कवितेत गांधीजींच्या जीवनमूल्यांचा सहज आणि स्वाभाविक आविष्कार दिसतो. कृत्रिम घोषणांपेक्षा साधेपणा, मानवी संवेदना आणि नैतिकतेवरील विश्वास ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. गांधीवादी जीवनदृष्टी आणि आधुनिक काव्यसंवेदना यांचा त्यांनी साधलेला समन्वय भारतीय साहित्याच्या इतिहासात विशेष मानला जातो.

या सर्व व्यक्तिमत्त्वांचा विचार एकत्रितपणे केला तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते—वर्ध्याने केवळ लेखक घडविले नाहीत; त्याने विचारवंत घडविले. येथे साहित्य हे समाजापासून वेगळे नव्हते; शिक्षणापासून वेगळे नव्हते; नैतिकतेपासून वेगळे नव्हते. येथे शब्दाला जीवनाचा आधार होता आणि जीवनाला मूल्यांचे अधिष्ठान.

याच वैचारिक वातावरणात शंकरराव देव, श्रीकृष्णदास जाजू, श्रीमन्नारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, डॉ. म. गो. बोकरे, मदालसा नारायण, प्रा. निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदास बंग, सुमनताई बंग आणि पुढे डॉ. अभय बंग यांसारख्या अनेक विचारवंतांनी आपल्या लेखनातून व सार्वजनिक कार्यातून वर्ध्याच्या वैचारिक परंपरेला समृद्ध केले. त्यामुळे वर्धा हा केवळ साहित्याचा जिल्हा न राहता, विचार, कृती आणि मानवमूल्यांचा अखंड विद्यापीठ बनला.

कथासाहित्य, संतपरंपरा, संशोधन, पत्रकारिता आणि प्रकाशन
मान्यवरहो,
गांधी–विनोबा विचारांच्या या समृद्ध अधिष्ठानावर उभ्या राहिलेल्या वर्ध्याच्या वाङ्मयविश्वाने पुढे अनेक साहित्यप्रवाहांना जन्म दिला. विचारप्रधान साहित्याबरोबरच कथा, कादंबरी, संतसाहित्य, भाषाशास्त्र, संशोधन, पत्रकारिता आणि प्रकाशन या सर्व क्षेत्रांत या भूमीने उल्लेखनीय योगदान दिले आहे.

वर्ध्याच्या साहित्यपरंपरेचा विचार करताना वामनराव चोरघडे यांचा उल्लेख अत्यंत आदराने करावा लागतो. मराठी लघुकथेला स्वतंत्र ओळख देणाऱ्या लेखकांमध्ये त्यांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. त्यांच्या कथांतील ग्रामीण जीवन, माणुसकी, संस्कार आणि नैतिक मूल्ये ही गांधीवादी जीवनदृष्टीशी सुसंगत आहेत. त्यांनी स्वतः ‘जडणघडण’ या आत्मचरित्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाची घडण वर्ध्यात झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वामनराव चोरघडे हे केवळ मराठी कथाकार नाहीत; ते वर्ध्याच्या साहित्यसंस्कारांचे प्रतिनिधी आहेत.याच परंपरेत खादी, ग्रामजीवन आणि विधायक कार्याचा इतिहास शब्दबद्ध करणारे रघुनाथ कुलकर्णी यांचे ‘खादीशी जुळले नाते’ हे आत्मकथन विशेष महत्त्वाचे ठरते. खादी चळवळीचा इतिहास त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातून उलगडला आहे. आज त्यांचे सुपुत्र सुहास कुलकर्णी ‘अनुभव’ मासिक आणि समकालीन प्रकाशनाच्या माध्यमातून संपादन, प्रकाशन आणि वैचारिक साहित्यनिर्मितीची परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत.

वर्ध्याच्या सांस्कृतिक इतिहासात एक विलक्षण योगायोग दिसतो. आधुनिक मराठी कवितेचे जनक मानले जाणारे केशवसुत यांचे बालपण या भूमीत गेले; तर पुढे कवी मंगेश पाडगावकर यांना त्यांच्या काव्यजीवनातील ‘जिप्सी’चा अनुभव याच गांधीनगरीत लाभला. ही घटना केवळ आठवण म्हणून नव्हे, तर वर्ध्याच्या साहित्यसंस्कारांच्या व्यापकतेचे प्रतीक म्हणून लक्षात घ्यावी लागते.

संतसाहित्याच्या अभ्यासातही वर्ध्याने मोलाचे योगदान दिले आहे. ल. रा. पांगरकर, प्रा. अ. ना. देशपांडे, प्रा. मा. शं. वाबगावकर यांनी संतवाङ्मयाचा सखोल अभ्यास केला. मधुकर केचे यांच्या कवितेने आणि प्रभावी वक्तृत्वाने आधुनिक मराठी साहित्यविश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. देवळीचे रामजी हरी फुटाणे (हरीसुत) यांनी दीडशे वर्षांपूर्वी अभंगवृत्तात लिहिलेले गीताभाष्य अलीकडे डॉ. गणेश मालधुरे यांनी संशोधनातून प्रकाशात आणले. हा शोध वर्ध्याच्या संतपरंपरेतील महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज आहे.

संशोधनाच्या क्षेत्रात डॉ.भाऊ मांडवकर यांचे योगदान विशेष अधोरेखित करावे लागेल. गुणाढ्य, विदर्भ, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक इतिहास यांचा त्यांनी केलेला अभ्यास वर्ध्याच्या इतिहासाला नवे संदर्भ देणारा आहे. त्यांच्या संशोधनामुळे गुणाढ्य आणि पोथरा यांचा संबंध नव्याने प्रकाशात आला. वर्ध्यातील परांजपे घराण्याने तीन पिढ्यांतून साहित्यसेवा केली, ही महाराष्ट्राच्या साहित्यइतिहासातील दुर्मीळ घटना आहे. श्रीधर विष्णु परांजपे यांनी केकावलीचे भाष्य केले; भा. श्री. परांजपे यांनी संतसाहित्य, इतिहास आणि बालसाहित्य समृद्ध केले; तर डॉ. जयंत परांजपे यांनी *’ग्रेस आणि दुर्बोधता’*सारख्या अभ्यासपूर्ण ग्रंथातून आधुनिक समीक्षेला नवा आयाम दिला. संशोधन आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात डॉ. सदाशिव डांगे, म. ल. वऱ्हाडपांडे, गोविंद विनायक देशमुख, पद्माकर गणेश चितळे आणि डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांनी स्वतंत्र कार्य केले. विशेषतः नागपुरी बोलीच्या भाषाशास्त्रीय अभ्यासातून डॉ. वसंत वऱ्हाडपांडे यांनी तिच्या भौगोलिक सीमांचे शास्त्रीय अधिष्ठान स्पष्ट केले.

न्यायतीर्थ स्वामी सत्यभक्त यांच्या विपुल ग्रंथनिर्मितीने धार्मिक आणि तत्त्वचिंतनात्मक साहित्य समृद्ध झाले. पुढे मो. दा. देशमुख, दिवाकर देशपांडे आणि डॉ. मधुकर आष्टीकर यांनी नाटक, विनोद आणि साहित्याच्या विविध प्रकारां उल्लेखनीय योगदान दिले. मो. दा. देशमुख यांचे ‘घराण्याचा न्यायदंड’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरले. भाषा आणि लोकसंस्कृतीच्या जतनासाठी दे. गं. सोटे यांनी तयार केलेला वऱ्हाडी शब्दकोश आजही महत्त्वाचा संदर्भग्रंथ मानला जातो. त्यानंतर डॉ. विद्याधर उमाठे आणि विजय कविमंडन यांनी समकालीन साहित्याला नवे स्वर दिले.

या सर्व साहित्यप्रवाहांइतकीच महत्त्वाची परंपरा म्हणजे पत्रकारिता आणि प्रकाशन. वर्ध्यातील जीनदासजी चवडे हे केवळ प्रकाशक नव्हते; ते आधुनिक वैचारिक पत्रकारितेचेही अग्रणी होते. जैन भास्कर आणि जैन बंधू या नियतकालिकांमधून त्यांनी विचारप्रबोधनाचे कार्य केले. त्यांचा छापखाना हा सामाजिक परिवर्तनाच्या साहित्याचा केंद्रबिंदू बनला. हिंदी पत्रकारितेत अमिट ठसा उमटविणारे मनोहर सप्रे यांचाही वर्ध्याशी निकटचा संबंध होता. पुढे गांधीजींनी सेवाग्राममधून आपल्या वृत्तपत्रांचे संपादन केले आणि पत्रकारितेला नैतिक जबाबदारीचे अधिष्ठान दिले.

याच परंपरेत व्यंकटराव गोडे यांच्या ब्राह्मणेतर साप्ताहिकाने सत्यशोधक पत्रकारितेला वैचारिक धार दिली. मा. गो. वैद्य, दि. मा. घुमरे हे पत्राकार द्वय वर्ध्याचे भूमिपुत्र होत , वामनराव घोरपडे, भा. शि. बाभळे यांनीही पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली. आज सुहास कुलकर्णी यांच्या संपादनाखालील समकालीन प्रकाशनातर्फे निघणारे अनुभव मासिक ही परंपरा अभिमानाने पुढे नेत आहे.

या सर्वांचा एकत्रित विचार केला असता असे लक्षात येते की, वर्ध्याची साहित्यपरंपरा ही केवळ लेखकांची यादी नाही; ती संशोधन, प्रकाशन, पत्रकारिता, संतपरंपरा आणि सामाजिक प्रबोधन यांच्या परस्परसंबंधातून घडलेली एक सजीव सांस्कृतिक परंपरा आहे. हाच पाया पुढे नव्या पिढीच्या साहित्यचळवळीला बळ देणारा ठरला.

आधुनिक वर्ध्याची साहित्यचळवळ – नवे लेखक, नवी समीक्षा आणि सृजनाचा विस्तार
मान्यवरहो,
वर्ध्याच्या वाङ्मयपरंपरेचा हा प्रवास गांधी–विनोबा युगात थांबत नाही. प्रत्येक काळ आपले नवे प्रश्न घेऊन येतो आणि त्या प्रश्नांना प्रतिसाद देणारी नवी साहित्यिक पिढी घडवत असतो. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वर्ध्याने अशाच एका नव्या साहित्यिक उभारणीचा अनुभव घेतला. वर्ध्यात १९६९ ला ४५ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन संपन्न झालेले परंतु खरे तर एखादे साहित्य संमेलन एखाद्या प्रदेशात उत्साह निर्माण करते; पण तो उत्साह दीर्घकाळ टिकतोच असे नाही. वर्ध्यातही १९७० ते १९८० या दशकात साहित्यिक चळवळीला काहीशी मरगळ आलेली दिसते. मात्र १९८० नंतरचा काळ हा नव्या उमेदीचा ठरला. साहित्यसंस्था, वाचनसंस्कृती, समीक्षेचे नवे भान, नियतकालिके, ग्रंथप्रकाशन आणि नवोदित लेखकांना मिळालेले व्यासपीठ यांमुळे वर्ध्याच्या साहित्यविश्वाला नवसंजीवनी लाभली.

या पुनरुज्जीवनामध्ये डॉ. किशोर सानप आणि प्रा. नवनीत देशमुख यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरीनिमित्त वर्ध्यात आलेल्या या दोन्ही साहित्यिकांनी जिल्ह्याच्या साहित्यचळवळीला नवी दिशा दिली. विशेषतः विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून डॉ. किशोर सानप यांनी अनेक साहित्यिक उपक्रमांना चालना दिली. त्यांच्या पुढाकारामुळे नव्या लेखकांना लेखन, वाचन आणि चिकित्सक संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले. डॉ. किशोर सानप हे समकालीन मराठीतील साक्षेपी समीक्षक, कादंबरीकार आणि कवी म्हणून विशेष परिचित आहेत. ऋतू हा त्यांचा कवितासंग्रह, पांगुळवाडा, हारास आणि भूवैकुंठ या कादंबऱ्या, दोन कथासंग्रह आणि वीसहून अधिक समीक्षाग्रंथ यांच्या माध्यमातून त्यांनी मराठी साहित्याला समृद्ध केले. त्यांची समीक्षा ही केवळ ग्रंथपरिचयापुरती मर्यादित राहत नाही; ती साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि सौंदर्यात्मक संदर्भांचा शोध घेणारी समीक्षा आहे. प्रा. नवनीत देशमुख यांनी अंगणवाडी, झेड.पी. आणि माणसाळलेला या कादंबऱ्यांतून ग्रामीण समाजजीवनाचे बदलते वास्तव प्रभावीपणे मांडले. ममी, काळा गुलाब आणि टेकओव्हर या कथासंग्रहांतूनही त्यांनी समकालीन जीवनातील मानवी संघर्षाचे चित्रण केले.

याच साहित्यपरंपरेत डॉ. हेमचंद्र वैद्य यांनी हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांत उल्लेखनीय लेखन केले. डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी विज्ञान शाखेचे विद्यार्थी असूनही विज्ञानकवितेचे अभिनव प्रयोग केले. पुढे कथा, कादंबरी, कविता, पटकथा आणि संवादलेखन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. राजा शहाजी या महाकादंबरीने त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळवून दिली. काळात समीक्षेच्या क्षेत्रात अनेक समर्थ अभ्यासक पुढे आले. डॉ. मनोज तायडे यांनी कवी नारायण सुर्वे यांची काव्यदृष्टी, आस्वादक समीक्षा आणि कर्मयोगी गाडगेबाबा या ग्रंथांतून चिकित्सक लेखन केले. डॉ. अशोक चोपडे यांनी सत्यशोधक साहित्याचा संशोधक म्हणून स्वतंत्र स्थान निर्माण केले. आधुनिक मराठी कवितेचे जनक जोतीबा फुले, विदर्भातील सत्यशोधक चळवळ, साप्ताहिक ब्राह्मणेतरमधील अग्रलेखांचे संपादन आणि अन्य संशोधनपर ग्रंथांतून त्यांनी सत्यशोधक परंपरेचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले.काव्याच्या क्षेत्रात प्रशांत पनवेलकर यांनी पूर्वा , नवा पेटता काकडा आणि गडद संदर्भाचा अन्वयार्थ या संग्रहांतून समकालीन संवेदनांना अभिव्यक्ती दिली.

याच पिढीत डॉ. राजेंद्र मुंढे यांनी कविता, समीक्षा, चरित्र, इतिहास, संपादन, पत्रकारिता आणि संशोधन या सर्व क्षेत्रांत सातत्याने लेखन केले. राष्ट्रसंत तुकडोजी, राष्ट्रसंतांचे मौलिक विचार, बंडखोर खेड्यांची गोष्ट, डॉ. किशोर सानप : व्यक्ती आणि वाङ्मय, वरदा… वर्धा यांसह प्रौढ साक्षरतेवरील पुस्तके, बालनाटिका, अनुवाद आणि विविध वैचारिक लेखनातून त्यांनी वर्ध्याच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासाचे दस्तऐवजीकरण केले आहे. प्रकाशनाच्या मार्गावर असलेले त्यांचे अनेक ग्रंथ ही या सातत्यपूर्ण साहित्यसाधनेची साक्ष आहेत. रंगभूमीच्या क्षेत्रात डॉ. सतीश पावडे यांनी नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक, अनुवादक आणि नाट्यप्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. नाटक, समीक्षा, चरित्र, अनुवाद, रूपांतर आणि संपादन अशा विविध क्षेत्रांतील त्यांच्या सव्वीस ग्रंथांनी मराठी रंगभूमी समृद्ध केली आहे. मराठी रंगभूमी आणि अॅब्सर्ड थिएटर हा त्यांचा अभ्यासग्रंथ विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.समकालीन समीक्षेच्या क्षेत्रात डॉ. पुरुषोत्तम माळोदे यांचे सृजनाचे झरे, विदग्ध प्रतिभावंत : विश्राम बेडेकर, हिंडणारा सूर्य आणि सर्किट परमात्मा ही पुस्तके उल्लेखनीय आहेत. डॉ. पुरुषोत्तम कालभूत यांनी लोकसाहित्याच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले, तर मनोहर नरांजे यांनी कविता, पुरातत्त्व आणि संशोधन या तिन्ही क्षेत्रांत सातत्यपूर्ण कार्य केले. गझल आणि कवितेच्या क्षेत्रात संजय इंगळे तिगावकर यांचे अंगारबीज आणि दोलनवेणा हा संग्रह विशेष दखलपात्र आहेत. तरुण पिढीतील प्रतीक पुरी यांनी वैनतेय, मेघापुरुष, वाफाळलेले दिवस आणि पाखंडगाथा या कादंबऱ्यांतून नव्या पिढीचे बदलते मानसिक विश्व प्रभावीपणे उभे केले. सुकल्प करंजेकर हे तरुण पिढीचे सक्षमपणे लेखन करणारे प्रतिनिधी होत .

आजचे महत्त्वाचे समीक्षक आणि कवी डॉ. नितीन रिंढे यांची साहित्यिक जडणघडण याच वर्ध्याच्या भूमीत झाली. प्रफुल्ल शिलेदार आणि तीर्थराज कापगते आणि इंदुमती जोंधळे यांच्या शिक्षणकाळाचाही वर्ध्याशी निकट संबंध आहे. कथाकार सतीश तराळ, कवी व संपादक सुखदेव ढाणके, आत्माराम कानिराम राठोड, रवींद्र जवादे, तसेच सेवाग्राममध्ये जन्मलेल्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रतिभा सराफ यांनीही आपल्या लेखनातून समकालीन साहित्य समृद्ध केले आहे.

जुन्या आणि नव्या पिढीला जोडणाऱ्या लेखकांमध्ये रामदास कुहिटे, म. ना. घाटूर्ले, अनंत भिमणवार, प्रभाकर पाटील, प्रभाकर उघडे, भालचंद्र डंभे, जनार्धन ददगाळे, , प्रमोद सलामे यांच्यासह आता दिलीप वीरखेडे, डॉ. संजीव लाभे, प्रशांत झिलपे, प्रशांत ढोले, श्रीकांत करंजेकर, दिलीप गायकवाड, विद्यानंद हाडके , सुरेंद्र डाफ, चंद्रकांत शहाकार, नारायण नखाते, वीरेंद्र कडू, गिरीधर काचोळे , नरेंद्र गंधारे , अभय दांडेकर , आशिष वरघने , सुरेश सुरजुसे आणि अभिजित डाखोरे यांचीही नावे आदराने घ्यावी लागतील. प्रत्येकाने आपल्या स्वतंत्र लेखनातून वर्ध्याच्या साहित्यविश्वात आपला ठसा उमटविला आहे.

या सर्वांचा विचार केला असता एक गोष्ट स्पष्ट दिसते—आधुनिक वर्ध्याची साहित्यचळवळ ही एखाद्या एकट्या लेखकाची किंवा एका साहित्यप्रकाराची कहाणी नाही. ती कविता, कथा, कादंबरी, समीक्षा, नाटक, पत्रकारिता, संशोधन, लोकसाहित्य आणि सांस्कृतिक चळवळी यांचा एकत्रित इतिहास आहे. साहित्य चळवळीला उर्जावान करणाऱ्या चार दशकांपासून कार्यरत यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे योगदान अतिशय मोलाचे आहे. या इतिहासात परंपरेचा सन्मान आहे; पण नव्या विचारांचे स्वागतही आहे. त्यामुळेच वर्ध्याची वाङ्मयपरंपरा आजही गतिमान, सर्जनशील आणि भविष्योन्मुख आहे.

स्त्री लेखनाची समृद्ध परंपरा आणि दलित–आंबेडकरी साहित्याचा वैचारिक उदय
मान्यवरहो,
कोणत्याही प्रदेशाची साहित्यपरंपरा तेव्हाच समृद्ध मानली जाते, जेव्हा त्या परंपरेत समाजातील उपेक्षित, वंचित, स्त्रिया, श्रमिक, दलित, आदिवासी आणि सर्वसामान्य माणसांचे अनुभव अभिव्यक्त होतात. वर्ध्याची वाङ्मयपरंपरा याच अर्थाने अधिक व्यापक आणि अधिक मानवी ठरते. येथे गांधीवादी, सत्यशोधकी आणि सर्वोदय विचारांच्या जोडीने स्त्रीवादी, दलित–आंबेडकरी आणि बहुजन जाणिवांचे साहित्यही समर्थपणे विकसित झाले.
वर्ध्यातील स्त्री लेखनाचा विचार करताना सर्वप्रथम उषा देशमुख यांचे नाव आदराने घ्यावे लागते. आधुनिक अर्थाने स्त्रीच्या अनुभवविश्वाला, तिच्या आत्मभानाला आणि सामाजिक जाणिवेला साहित्यिक अभिव्यक्ती देणाऱ्या त्या वर्ध्यातील अग्रणी लेखिका होत. दरवळ या त्यांच्या कवितासंग्रहासह कथा, ललित लेख आणि वैचारिक लेखनातून त्यांनी स्त्रीजीवनाचे अनेक पदर उलगडले. जवळजवळ पाच दशकांच्या सातत्यपूर्ण साहित्यसाधनेतून त्यांनी वर्ध्यात स्त्री लेखनाची भक्कम पायाभरणी केली.

ही परंपरा पुढे डॉ. सुनिता कावळे यांनी अधिक समृद्ध केली. उत्तर, कमला लेले, व्रतस्थ, अजिंक्य या कादंबऱ्या, कॉलनी आजीसारख्या बालकादंबऱ्या, बालनाटके, एकांकिका आणि विविध साहित्यप्रकारांतून त्यांनी स्त्रीजीवन, कुटुंब, संस्कार आणि बदलत्या समाजजीवनाचे प्रभावी चित्रण केले.समकालीन स्त्रीअनुभवाला काव्य आण कादंबरीतून अभिव्यक्त करणाऱ्या दीपमाला कुबडे यांनी अनुराधा या कादंबरीसह दीपमाळ गझलांची, स्वप्नगंधा आणि आयुष्याच्या या वळणावर या काव्यसंग्रहांतून स्त्रीमनातील संघर्ष, स्वप्ने आणि आत्मविश्वास यांचे संवेदनशील चित्र रेखाटले.
विदर्भातील यशस्वी प्रकाशिका आणि समर्थ लेखिका म्हणून अरुणा सबाने यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुन्नी, विमुक्ता आणि आत्मकथनपर मी सूर्याला गिळले या साहित्यकृतींतून त्यांनी स्त्रीच्या आत्मसंघर्षाला आणि आत्मसन्मानाला समर्थ अभिव्यक्ती दिली. प्रकाशन क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्यही तेवढेच उल्लेखनीय आहे.

या परंपरेला इंदुमती जोंधळे, तारा धर्माधिकारी, लक्ष्मी गेडाम, सुमती वानखेडे, सुनिता झाडे, डॉ. स्मिता वानखेडे, डॉ. मधुलिका जुननकर, डॉ. विजया मोरोणे, वीणा कावळे देव, प्रा. विमल थोरात, मीना कारंजेकर, मंजुषा चौगावकर, ऋता देशमुख-खापर्डे, कल्पना नरांजे, नूतन माळवी, सुषमा पाखरे, जयश्री कोटगीरवार, किरण नागतोडे, सुहास चौधरी, इंदुमती कुकडकर आणि आशा निंभोरकार यांनी विविध साहित्यप्रकारांतून समृद्ध केले आहे.

विशेषतः नूतन माळवी यांनी फुले–आंबेडकरी विचारांच्या संदर्भात विद्येची देवता : सरस्वती की सावित्री, सावित्रीबाई फुले, लेकी भूमीच्या, सत्यशोधक विवाहपद्धती, श्री-पुरुष तुलना (संपादन), प्रेरणांचा अर्थ आणि बहुजन स्त्रियांच्या विकासाचे संदर्भ या ग्रंथांतून स्त्रीमुक्तीचा वैचारिक इतिहास नव्या पिढीसमोर उभा केला आहे.

अनुवादाच्या क्षेत्रातही वर्ध्याचे योगदान उल्लेखनीय आहे. मृणालिनी केळकर यांनी बंगाली साहित्यसम्राज्ञी आशापूर्णादेवी यांचे साहित्य मराठीत आणले, तर रंजना पाठक यांनी सुनील गंगोपाध्याय यांच्या साहित्याच्या अनुवादासाठी साहित्य अकादमीचा सन्मान प्राप्त केला. या दोन्ही लेखिकांनी मराठी साहित्याला भारतीय भाषांशी जोडणारा महत्त्वाचा सेतू उभारला.डॉ . मनीषा रिठे, मनीषा भोयर , निशा काळे , कविता बेदरकार , प्रीती वाडीभस्मे , नंदिनी बर्वे , सीमा मुळे , राजश्री देशमुख आदी लेखिका लिहित्या आहेत .

बंधूंनो आणि भगिनींनो,
दलित–आंबेडकरी साहित्याची परंपरा.
समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना साहित्यिक अभिव्यक्ती देणाऱ्या या प्रवाहाने वर्ध्याच्या साहित्याला नवे नैतिक अधिष्ठान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित अनेक लेखकांनी साहित्याला परिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनविया परंपरेच्या प्रारंभी पतितपावन दास यांचे नाव अत्यंत आदराने घ्यावे लागेल. काळाराम मंदिर प्रवेश चळवळीतील त्यांचे योगदान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्यावर असलेला विश्वास ही इतिहासातील महत्त्वाची नोंद आहे. डॉ. मधुकर कासारे यांनी आंबेडकरी विचारांचा अभ्यास समृद्ध केला; तर सूर्यकांत भगत यांनी बुद्ध आणि कबीर यांच्या साहित्याचे संशोधन व अनुवाद करून वैचारिक कार्याला नवी दिशा दिली.

दलित कथासाहित्यात डॉ. अमिताभ यांनी पड, ललकार, अंधारयात्री यांसारख्या कथासंग्रहांतून उपेक्षित समाजाचे वास्तव मांडले. योगेंद्र मेश्राम यांनी कथा आणि लोकनुकंपा या त्रैमासिकाच्या संपादनातून दलित–आंबेडकरी विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. इंद्रजीत ओरके, अशोक बुरबुरे, डॉ. सुभाष खंडारे, वैभव सोनारकर, दीपक रंगारी, अरुण विघ्ने, मनोहर नाईक, भूषण रामटेके, डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. चंद्रकांत नगराळे, प्रमोद नारायणे, संजय ओरके, कृष्ण हरले-साहूरकर, प्रशांत ढोले, प्रशांत झिलपे, मोरेश्वर सहारे, राजेश डंभारे आणि संदीप धावडे यांनी कविता, कथा, कादंबरी, समीक्षा आणि वैचारिक लेखनातून या साहित्यप्रवाहाला समृद्ध केले आहे. या सर्व साहित्यिकांचे कार्य पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—वर्ध्यातील दलित–आंबेडकरी साहित्य हे केवळ विद्रोहाचे साहित्य नाही; ते माणसाच्या प्रतिष्ठेचा, संविधानिक मूल्यांचा, सामाजिक समतेचा आणि सांस्कृतिक पुनर्जागरणाचा साहित्यिक दस्तऐवज आहे. त्यामुळे या साहित्यप्रवाहाने केवळ मराठी साहित्य समृद्ध केले नाही; तर भारतीय लोकशाहीच्या मूल्यांनाही बौद्धिक बळ दिले.

आदिवासी साहित्य, बहुजन साहित्य, पत्रकारिता आणि वर्ध्याचे सांस्कृतिक नेतृत्व
मान्यवरहो,
वर्ध्याच्या वाङ्मयपरंपरेचा विचार करताना आणखी एका महत्त्वाच्या साहित्यप्रवाहाकडे आपण गांभीर्याने पाहिले पाहिजे. तो म्हणजे आदिवासी साहित्य. विदर्भातील गोंडवनाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या या भूमीने आदिवासी समाजाच्या भाषा, संस्कृती, इतिहास आणि अस्मितेला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणारे लेखक घडविले. त्यामुळे वर्ध्याचे साहित्य केवळ मुख्य प्रवाहाचे राहिले नाही; तर समाजाच्या सर्व स्तरांचे प्रतिनिधित्व करणारे लोकाभिमुख साहित्य बनले.

या परंपरेचे अग्रणी व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यंकटेश आत्राम. संस्कृत, इतिहास, आदिवासी संस्कृती आणि संशोधन या सर्व क्षेत्रांवर प्रभुत्व असलेल्या या अभ्यासकाने गोंडी संस्कृतीचे संदर्भ, दोन क्रांतिवीर आणि आंबेडकरी चळवळ आणि आदिवासी समाज : समज–गैरसमज यांसारख्या संशोधनग्रंथांतून आदिवासी इतिहासाचा नवा अन्वयार्थ मांडला. त्यांच्या लेखनाने आदिवासी समाजाला इतिहासात आणि साहित्यविश्वात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

ही परंपरा मारोती उईके यांनी गोंडवनातला आक्रंदन, सरकारी सरण आणि आदिवासींचे मरण, आदिवासी संस्कृतीवर हल्ला आणि रावण हा गोंड राजाच होता यांसारख्या ग्रंथांतून पुढे नेली. आदिवासी समाजाच्या वेदना, संघर्ष, सांस्कृतिक स्वाभिमान आणि इतिहासाचे पुनर्वाचन त्यांच्या लेखनातून घडते.समकालीन आदिवासी कवितेत डॉ. विनोद कुमरे हे महत्त्वाचे नाव आहे. आगाजा या कवितासंग्रहामुळे त्यांनी स्वतंत्र काव्यस्वर निर्माण केला. कोयतूर या आत्मकथनपर कादंबरीतून आणि गोंदण या नियतकालिकाच्या संपादनातून त्यांनी आदिवासी साहित्याला नवी दिशा दिली. राजेश मडावी, मारोती चावरे, रंजना उईके आणि रेखा जुगनाके यांनीही कविता, संशोधन आणि अनुवादाच्या माध्यमातून या साहित्यप्रवाहाला बळ दिले.

मान्यवरहो,
वर्ध्याची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे येथे साहित्यचळवळी केवळ निर्माण झाल्या नाहीत; तर त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यविश्वाला नवी दिशा दिली.
याच भूमीत बहुजन साहित्य परिषदेची स्थापना १९८९ मध्ये कविवर्य नारायण सुर्वे आणि विचारवंत बा. ह. कल्याणकर यांच्या प्रेरणेने झाली. या परिषदेने बहुजन समाजाच्या अनुभवविश्वाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. पुढे महाराष्ट्रभर बहुजन साहित्याच्या चर्चेला नवे अधिष्ठान मिळाले.
तसेच वर्धा ही दलित–आंबेडकरी साहित्य चळवळीचीही महत्त्वाची भूमी राहिली आहे. पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन वर्ध्यात वामन होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. त्यानंतर तिसरे आणि पाचवे आंबेडकरी साहित्य संमेलन हिंगणघाट येथे झाले. पुढे २००४ मध्ये आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन वर्ध्यात डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली भरले. ही केवळ संमेलनांची नोंद नाही; तर महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी साहित्याला वर्ध्याने दिलेल्या वैचारिक अधिष्ठानाची साक्ष आहे.

आज आपण ज्या हिंगणघाट नगरीत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत, त्या भूमीने आणखी एक ऐतिहासिक कार्य केले आहे. साहित्य आणि शेतकरी यांचे नाते केवळ विषयापुरते न ठेवता ते स्वतंत्र साहित्यचळवळीत रूपांतरित करण्याची कल्पना गंगाधर मुटे यांनी मांडली. त्यांच्या पुढाकारातून शेतकरी साहित्य संमेलन ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आली. आतापर्यंत झालेल्या अकरा संमेलनांतून शेतकऱ्यांच्या जीवनसंघर्षाला, त्यांच्या प्रश्नांना आणि ग्रामीण वास्तवाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य झाले. ही चळवळ वर्ध्याच्या साहित्यिक नेतृत्वाचीच साक्ष आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रातही वर्ध्याचे योगदान तितकेच उज्ज्वल आहे. जीनदासजी चवडे यांनी आधुनिक मुद्रण, प्रकाशन आणि पत्रकारितेचा पाया घातला. मनोहर सप्रे यांनी हिंदी पत्रकारितेत ऐतिहासिक योगदान दिले. व्यंकटराव गोडे यांनी ब्राह्मणेतर साप्ताहिकातून सत्यशोधक पत्रकारितेला वैचारिक दिशा दिली. मा. गो. वैद्य, दि. मा. घुमरे, वामनराव घोरपडे, भा. शि. बाभळे आणि पुढे सुहास कुलकर्णी यांनी पत्रकारिता, संपादन आणि प्रकाशन या क्षेत्रांत वर्ध्याचे नाव उज्ज्वल केले.

साहित्याइतकेच चित्रकला, रंगभूमी, चित्रपट आणि संगीत या कलाक्षेत्रांतही वर्ध्याची परंपरा समृद्ध आहे. राजदत्त, संजय सुरकर, समृद्धी पोरे, विठ्ठलराव बडगेलवार (बी. विठ्ठल), विजयराज बोधनकर, हरिहर पेंदे, विजय राऊत, सविता बजाज, डॉ. पंकज भांबुरकर, तसेच संगीत क्षेत्रातील पं. डॉ. प्रकाश संगीत, सुरमणी वसंत जळीत, डॉ. कमल भोंडे, श्याम गुंडावार, विकास काळे आणि अजय हेडाऊ यांनी आपल्या कर्तृत्वाने वर्ध्याची सांस्कृतिक ओळख अधिक समृद्ध केली आहे.

या सर्वांचा एकत्रित विचार केला असता असे लक्षात येते की, वर्धा हा केवळ साहित्यिकांचा जिल्हा नाही; तो विचारांची प्रयोगभूमी, साहित्यचळवळींची जननी, सामाजिक परिवर्तनाची कार्यशाळा आणि सांस्कृतिक नेतृत्वाची भूमी आहे.

— वर्धा : परंपरेतून भविष्याकडे
मान्यवर उपस्थित सज्जनहो,
या अध्यक्षीय भाषणाच्या प्रारंभापासून आपण वर्ध्याच्या वाङ्मयपरंपरेचा मागोवा घेतला. वरदा नदीच्या पौराणिक स्मृतींपासून गुणाढ्यांच्या बृहत्कथेपर्यंत, केळझरच्या बौद्ध अवशेषांपासून महात्मा फुले, महात्मा गांधी, आचार्य विनोबा, सत्यशोधक, गांधीवादी, दलित–आंबेडकरी, बहुजन, आदिवासी, स्त्रीवादी, शेतकरी आणि समकालीन साहित्यप्रवाहांपर्यंतचा हा प्रवास म्हणजे एका जिल्ह्याचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचा दस्तऐवज आहे.

आज आपण एका अत्यंत वेगळ्या काळातून जात आहोत. माहितीचा विस्फोट झाला आहे; संवादाची साधने वाढली आहेत; परंतु माणसामाणसांतील संवाद कमी होत चालला आहे. बाजारपेठेने माणसाच्या गरजांबरोबरच त्याच्या संवेदनाही विक्रीसाठी मांडल्या आहेत. विज्ञानाने वेग दिला; पण मूल्यांचा वेध घेण्याचे काम साहित्यालाच करावे लागणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग येत असताना मानवी विवेक, करुणा आणि सर्जनशीलता यांचे जतन करण्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे. म्हणून आज साहित्य ही केवळ कलानिर्मिती नसून लोकशाही, समता, सहअस्तित्व आणि मानवी अस्मितेची पहारेकरी शक्ती आहे.

या संदर्भात वर्ध्याची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. कारण या भूमीने विचारांना केवळ आश्रय दिला नाही; तर त्यांना जीवनपद्धती बनविले. बुद्धांच्या करुणेचा परिसस्पर्श, महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक प्रज्ञेचा जागर, गांधींच्या सत्य-अहिंसेचा प्रयोग, विनोबांच्या सर्वोदयाची साधना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेच्या विचारांचा स्वीकार—या सर्व प्रवाहांचे संगमस्थान म्हणून वर्ध्याची ओळख निर्माण झाली आहे.

बंधूंनो आणि भगिनींनो,
या भूमीचा आणखी एक इतिहास आपल्या सामूहिक स्मृतीत कायम जागा ठेवणारा आहे. १९८४ साली देशातील शेतकरी आत्महत्यांच्या वेदनादायी इतिहासाची पहिली नोंद याच वर्धा जिल्ह्यात झाली. ही घटना केवळ एका शेतकऱ्याच्या मृत्यूची नव्हती; ती भारतीय कृषिसंस्कृतीवर आलेल्या भीषण संकटाची पहिली घंटा होती. त्यानंतर काळ पुढे सरकत गेला; शेतकरी आत्महत्यांची संख्या वाढत गेली; पण समाज, राज्यव्यवस्था आणि आपण सारेच त्या वेदनेसमोर अनेकदा असहाय्य ठरलो.

याच काळात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेची चळवळ विदर्भात आणि वर्ध्यात विस्तारली. शेतमालाला रास्त भाव, उत्पादकाला सन्मान आणि शेतीला न्याय मिळावा यासाठी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले. त्या संघर्षाने भारतीय कृषीप्रश्नांना राष्ट्रीय पटलावर आणले. तरीही हे कटू वास्तव बदलले नाही की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. हा प्रश्न आजही आपल्या विवेकाला अस्वस्थ करणारा आहे. साहित्य जर काळाचे भान जपत असेल, तर या वेदनेपासून ते अलिप्त राहू शकत नाही.

आज आपण ज्या हिंगणघाट नगरीत एकत्र आलो आहोत, त्या भूमीचा उल्लेख विशेष अभिमानाने करावासा वाटतो. कारण याच भूमीचे सुपुत्र गंगाधर मुटे यांच्या कल्पकतेतून शेतकरी साहित्य संमेलन ही अभिनव संकल्पना जन्माला आली. शेतकरी हा केवळ साहित्याचा विषय नसून साहित्याचा केंद्रबिंदू असू शकतो, ही जाणीव त्यांनी महाराष्ट्राला करून दिली. आतापर्यंत झालेल्या अकरा शेतकरी साहित्य संमेलनांनी शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे श्रम, त्यांची वेदना, त्यांची स्वप्ने आणि त्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. ही चळवळ वर्ध्याच्या साहित्यिक दूरदृष्टीची साक्ष आहे.

याचप्रमाणे वर्धा ही नव्या साहित्यचळवळींना जन्म देणारी भूमी आहे. पहिले आंबेडकरी साहित्य संमेलन वर्ध्यात वामन होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली भरले; तिसरे आणि पाचवे आंबेडकरी साहित्य संमेलन हिंगणघाट येथे संपन्न झाले; आणि आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन २००४ मध्ये डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या अध्यक्षतेखाली वर्ध्यात पार पडले. या परंपरेने परिवर्तनवादी साहित्याला संघटन, दिशा आणि नवे वैचारिक अधिष्ठान दिले.

इतकेच नव्हे, तर कविवर्य नारायण सुर्वे आणि विचारवंत बा. ह. कल्याणकर यांच्या प्रेरणेने १९८९ मध्ये बहुजन साहित्य परिषदेची स्थापना वर्ध्यात झाली. बहुजन अनुभवविश्वाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा हा महत्त्वाचा सांस्कृतिक टप्पा होता. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते—वर्धा हा केवळ साहित्याचा उपभोग घेणारा प्रदेश नाही; तर नवे साहित्यिक विचार, नवे सांस्कृतिक प्रवाह आणि नवी चळवळ घडविणारी प्रयोगभूमी आहे.

याच भूमीवर सेवाग्राम आहे; येथे नई तालीमची संकल्पना आकाराला आली; शिक्षणाला श्रम, नैतिकता आणि समाजजीवनाशी जोडण्याचा प्रयोग झाला; पुढे नवोदयसारख्या शैक्षणिक संकल्पनांनीही या भूमीला नवे परिमाण दिले. म्हणूनच वर्धा ही साहित्य, शिक्षण, संस्कृती आणि विचार यांचा एकात्म अनुभव देणारी भूमी आहे.

आज या संमेलनाच्या व्यासपीठावरून मी विशेषतः तरुण लेखक, कवी, संशोधक आणि विद्यार्थ्यांना एक विनम्र आवाहन करू इच्छितो. आपल्या पूर्वसुरींनी उभारलेली ही समृद्ध परंपरा केवळ अभिमानाने सांगण्यासाठी नाही; ती अधिक समृद्ध करण्यासाठी आहे. नवीन काळ नवीन प्रश्न घेऊन उभा आहे—पर्यावरण, पाणी, शेती, स्थलांतर, बेरोजगारी, डिजिटल जग, कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलती भाषा, बदलते नातेसंबंध आणि लोकशाहीपुढील आव्हाने. या प्रश्नांना भिडणारे साहित्य निर्माण करणे ही आपल्या पिढीची जबाबदारी आहे.

साहित्याचे खरे सामर्थ्य माणसाला माणसाशी जोडण्यात आहे. विभाजन नव्हे, संवाद; द्वेष नव्हे, सहजीवन; अन्याय नव्हे, समता; निराशा नव्हे, आशा—ही मूल्ये जपणारे साहित्यच काळाच्या कसोटीवर टिकते.

मी माझे मनोगत एका विश्वासाने समाप्त करतो—
वरदा नदी अजूनही वाहते आहे. तिच्या प्रवाहात इतिहासाच्या स्मृती आहेत; संतांची करुणा आहे; बुद्धांचा धम्म आहे; फुल्यांची सत्यशोधक ज्योत आहे; गांधींचे सत्य आहे; विनोबांची साधना आहे; बाबासाहेब आंबेडकरांची समतेची दृष्टी आहे; शेतकऱ्याच्या घामाचा सुगंध आहे; स्त्रीच्या संघर्षाचे अश्रू आहेत; आदिवासींच्या जंगलाचा श्वास आहे; दलित–आंबेडकरी अस्मितेचा स्वाभिमान आहे; आणि नव्या पिढीच्या स्वप्नांची धडधड आहे.
या प्रवाहाला अखंड ठेवणे, अधिक व्यापक करणे आणि अधिक मानवी बनविणे हीच आपल्या सर्वांची सामूहिक साहित्यिक जबाबदारी आहे.

डॉ .राजेंद्र मुंढे
आर्वी नाका , ज्ञानेश्वर नगर, वर्धा ४४२००१
चलभाष ९४२२१४००४९
Email – rajendramundhe004@gmail.com

Related posts

मुलीच्या शिक्षणाच्या प्रश्नाला वाचा फोडणारी कादंबरी

माणुसकीच्या स्नेहाळ आभाळाकडे पाहण्याची एक मर्मज्ञ नजर….गवाक्ष

परदेशस्थ मुलांचे प्रश्न मांडणाऱ्या दीर्घकथा

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406