आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ. माणिकराव खुळे, जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे. ९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
पुढील तीन दिवस म्हणजे सोमवार १७ ऑगस्ट पर्यन्त मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व छत्रपती संभाजी नगर अश्या २७ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते.
दरम्यानच्या काळात, उर्वरित मराठवाडा आणि अहिल्यानगर व सोलापूर अश्या ९ जिल्ह्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
ह्या आठवड्यात मान्सूनची महाराष्ट्रात ही सक्रियता कश्यामुळे?
(i)मान्सूनी आस –
सध्या मान्सूनचा आसाचे पश्चिमे कडील टोक त्याच्या नेहमीच्या सरासरीजागे पेक्षा उत्तरेकडे तर पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे वायव्य बं. उपसागरापर्यंत झुकलेले आहे.आज मान्सून चा आस समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीपर्यन्तच्या हवेच्या जाडीत, फिरोझपूर मुझफ्फरनगर बाराबंकी देहरी ह्या शहरावरून जात आहे.
तसेच
(ii) शिअर झोन –
वाऱ्याचा उभा शिअर झोन ( म्हणजे एकमेकांविरुद्ध वाहणारे वारे ) महाराष्ट्राच्या साधारण २२ डिग्री उत्तर (म्हणजे साधारण नंदुरबार धुळे जळगांव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यांच्या वरून) अक्षवृत्तावर, समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी. उंच अश्या साडेचार किमी हवेच्या जाडीत पूर्व-पश्चिम पसरल्यामुळे व त्यातूनच त्या उंचीवर तयार झालेल्या चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून मुंबई सह संपूर्ण कोकण, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर व छ. सं. नगर अश्या २७ जिल्ह्यात काहीशी मध्यम ते मुसळधार पावसाची
शक्यता निर्माण झाली आहे .त्यातही कोकण व घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असेल.
(iii)अरबी समुद्रीय मान्सूनी पश्चिमी वाऱ्यांना मिळणारी बळकटी –
सध्या वायव्य बं उपसागरात तयार झालेले हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे अरबी समुद्रातील वाहणाऱ्या पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांना बळकटी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उर्वरित ऑगस्ट मध्ये पावसासाठी अनुकूल वातावरणीय प्रणालीची शक्यता जाणवते काय ?
वायव्य बंगाल उपसागरात तयार झालेले हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्र जर दक्षिण-वायव्ये दिशेने मार्गस्थ झाल्यास ऑगस्ट च्या उर्वरित शेवटच्या दोन आठवड्यात, जुलै सारखीच महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होवू शकते.अर्थात ह्याला जर-तर चे कंगोरे आहे. हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्राचे मार्गक्रमण व तीव्रता बदलाच्या निरीक्षणांतीच ते ठरवता येईल.
