शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतल्यानंतरही त्याच्या कुटुंबाची परवड थांबत नाही.शेतकऱ्याच्या या असह्य जगण्याची, कर्जबाजारीपणाची आणि आत्महत्येनंतर मागे उरलेल्या कुटुंबाच्या वेदनेची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी नाटककार वि. न. भोळे यांच्या ‘कर्जबळी’ या पुस्तकातील ‘बळी गेला रे…!’ आणि ‘झुरणझुला’ या दोन नाट्यसंहितांतून प्रभावीपणे समोर येते. मराठवाड्याच्या अस्सल बोलीभाषेचा गंध, ग्रामीण जीवनाचं वास्तव आणि व्यवस्थेवर परखड भाष्य यामुळे ‘कर्जबळी’ हे केवळ नाट्यपुस्तक न राहता शेतकरी जीवनाच्या विदारक वास्तवाचा दस्तऐवज ठरतं. – प्रा. डॉ. बाळकृष्ण लळित ४०३/सी, ऑक्सी गॅलेक्सी, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे – ४१२२०७ (केसनंद – शिवाजी पुतळा – थेऊर रस्ता) मो. ९६६५९९६२६०
शेतकऱ्याचं जीवन, त्याचं जगणं, त्याचं मरण आणि मरणानंतर त्याच्या कुटुंबाची होणारी परवड यांचं वास्तवदर्शी चित्रण करणाऱ्या दोन सशक्त नाट्यसंहितांचा संग्रह म्हणजे ‘कर्जबळी’ हे पुस्तक होय. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील गणगोत प्रकाशनाने नाटककार वि. न. भोळे यांच्या नाट्यलेखनाला आकर्षक मुखपृष्ठासह ग्रंथरूप दिलं आहे. ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण रंगभूमीच्या दृष्टीने ही निश्चितच अभिनंदनीय बाब आहे.
मुळात नाटक ही प्रयोगशील कला आहे. रसिकांसमोर प्रयोगाच्या माध्यमातून सादर करणं हा नाटककाराचा मूळ हेतू असतो. मात्र, प्रयोगासाठी संहिता मुद्रित स्वरूपात उपलब्ध असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे नाटकाचा प्रयोग प्रत्यक्ष पाहता न आलेल्या वाचकालाही पुस्तकाच्या माध्यमातून ती कलाकृती समजून घेता येते. या दृष्टीनं दोन सशक्त नाट्यसंहितांचं लेखन करून नाटककार वि. न. भोळे यांनी ग्रामीण नाट्यलेखनाच्या क्षेत्रात मोलाची नाट्यसेवा केली आहे.
‘बळी गेला रे…!’ आणि ‘झुरणझुला’ या दोन नाट्यसंहितांचा समावेश ‘कर्जबळी’ या पुस्तकात आहे. मराठवाड्यातील ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांच्या समस्या, कर्जबाजारीपणा, आत्महत्या आणि आत्महत्येनंतर कुटुंबाच्या वाट्याला येणारं दु:ख या ज्वलंत वास्तवाचा वेध या दोन्ही नाटकांत घेतला आहे.
मराठवाडी बोलीचा अस्सल स्पर्श
‘कर्जबळी’ या पुस्तकाचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही नाटकांमध्ये केलेला मराठवाड्यातील ग्रामीण बोलीभाषेचा नैसर्गिक आणि प्रभावी वापर. पात्रांच्या सामाजिक स्तरानुसार त्यांची भाषा बदलते. त्यामुळे संवाद अधिक जिवंत, वास्तववादी आणि परिणामकारक झाले आहेत.
म्हणी, वाक्प्रचार, लोकभाषेतील शब्द आणि दैनंदिन व्यवहारातील बोलण्याची शैली यांचा नाटककाराने केलेला वापर नाटकांना स्थानिक जीवनाचा गंध देतो. ग्रामीण समाजातील अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, शेतकऱ्यांच्या समस्या आणि आर्थिक विवंचना यांसारखे विषय बोलीभाषेतून अधिक परिणामकारकपणे समोर येतात.
बोलीभाषेमुळे प्रेक्षकांना पात्रांशी सहज आत्मीयता निर्माण होते आणि नाटकाचा सामाजिक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचतो. या दोन्ही नाट्यसंहिता मराठवाड्याच्या ग्रामीण बोलीभाषेचं जतन करणाऱ्या आहेत. या भाषेचं सौंदर्य आणि तिची अभिव्यक्तीशक्ती अधोरेखित करणारी ही महत्त्वाची सामाजिक नाट्यकृती आहे, असं म्हणावं लागेल.
‘बळी गेला रे…!’ : कर्जाच्या विळख्यातला शेतकरी
नाटककार वि. न. भोळे यांचं ‘बळी गेला रे…!’ हे ग्रामीण जीवन, शेतकऱ्यांच्या समस्या आणि कर्जबाजारीपणावर आधारित सामाजिक नाटक आहे. या नाटकात दौलतराव हा कष्टकरी शेतकरी, त्याची पत्नी लक्ष्मीबाई, मुलगा शरद आणि त्यांचं कुटुंब यांची कथा केंद्रस्थानी आहे.
गरिबी असूनही दौलतराव आपल्या कुटुंबाचं सुखी आयुष्य आणि मुलांचं उज्ज्वल भविष्य यासाठी दिवसरात्र मेहनत करतो. कोणताही जबाबदार कुटुंबप्रमुख करेल, तेच तो करत असतो. मात्र शेतीवर अवलंबून असलेलं त्याचं जीवन सततच्या संकटांनी वेढलेलं आहे.
शेतातील नुकसान, गावातील वाद, अन्याय आणि आर्थिक अडचणींमुळे त्याची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाते. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आणि शेती सुधारण्यासाठी तो बँकेचं कर्ज घेतो. विहीर खोदणं, वीजजोडणी घेणं आणि शेतीत सुधारणा करून उत्पन्न वाढवण्याचं स्वप्न तो पाहतो. परंतु वाढत जाणारं कर्ज, सावकाराचं व्याज, भ्रष्ट व्यवस्था आणि नैसर्गिक संकटं यामुळे त्याची स्वप्नं हळूहळू कोलमडत जातात.
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेणारे दलाल, सावकार आणि भ्रष्ट व्यवस्थेतील घटकांचं वास्तववादी चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी अधिकाधिक अडचणीत सापडतो. कुटुंबाची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाची चिंता आणि शेतीतील अनिश्चितता यामुळे त्याचं मानसिक खच्चीकरण होत जातं.
त्यामुळे ‘बळी गेला रे…!’ हे केवळ एका शेतकऱ्याची कथा राहत नाही; ते भारतीय शेतकरी समाजाच्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करणारं नाटक ठरतं. शेतकऱ्यांना योग्य मदत, न्याय्य व्यवस्था आणि समाजाची साथ मिळणं किती आवश्यक आहे, हा महत्त्वाचा संदेश नाटकातून दिला जातो.
‘झुरणझुला’ : आत्महत्येनंतरच्या कुटुंबाची व्यथा
याच पुस्तकातील ‘झुरणझुला’ ही दुसरी सामाजिक नाट्यसंहिता आहे. विशेष म्हणजे ‘बळी गेला रे…!’मधील काही पात्रे या नाटकातही आहेत. त्यामुळे एका अर्थानं या दोन्ही नाट्यसंहिता एकमेकांशी जोडलेल्या मालिकेचा अनुभव देतात.
शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची कशी परवड होते, त्यांच्यासमोर कोणते सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे राहतात आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या कुटुंबाला समाजव्यवस्था कशी छळत राहते, याचं वास्तवदर्शी चित्रण ‘झुरणझुला’मध्ये करण्यात आलं आहे.
अभ्यासक मनोहर सुरवाडे यांनी ‘ग्रामीण साहित्य : प्रकार, स्वरूप आणि चिकित्सा’ या ग्रंथात ग्रामीण नाट्यलेखनाकडे झालेल्या दुर्लक्षाची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या मते आधुनिक ग्रामीण साहित्यात कविता, कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन झालं; मात्र ग्रामीण नाटक या प्रकाराकडे अभ्यासक आणि समीक्षकांचं अपेक्षित लक्ष गेलं नाही.
या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील ग्रामीण विषयांवर सातत्याने नाट्यलेखन करणाऱ्या वि. न. भोळे यांचं लेखन विशेष उल्लेखनीय ठरतं. त्यांनी आपल्या नाटकांतून ग्रामीण शेतकरी वर्गाचे ज्वलंत प्रश्न मांडले आणि नाट्याच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम केलं आहे.
आत्महत्येनंतरचा शेतकरी : एक अस्वस्थ करणारी कल्पना
नांदेडचे नाट्यअभ्यासक महेश मोरे यांनी ‘झुरणझुला’ या नाटकाविषयी लिहिताना त्याला ‘शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची परवड सांगणारं वास्तवदर्शी नाटक’ असं संबोधलं आहे.
१८ ऑक्टोबर २०१४ रोजी स्पर्धेसाठी सादर झालेला या नाटकाचा प्रयोग पाहिल्यानंतर महेश मोरे यांनी केलेली प्रतिक्रिया नाटकाच्या परिणामकारकतेची साक्ष देते. त्यांच्या मते, नाटक पाहताना संवाद ऐकून कान तृप्त झाले आणि अभिनय पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं.
नाटकातील यमराज आणि आत्महत्या केलेला शेतकरी दौलतराव मोरे यांच्यातील प्रसंग विशेष लक्षवेधी आहे. आत्महत्या करण्यापासून दौलतरावला परावृत्त करण्याचा प्रयत्न यमराज करतो. ‘तू जगाचा अन्नदाता आहेस, जगाचा पोशिंदा आहेस. तू जग आणि जगाला जगवण्यासाठी कष्ट कर,’ असा संदेश तो देतो.
मात्र भोवतालच्या परिस्थितीने गांजलेला दौलतराव मृत्यूच्या निर्णयापासून मागे हटत नाही. ‘हे मानसं जीतेपणीच मजे लचके तोडायलेत,’ ही त्याची भावना त्याच्या मानसिक अवस्थेची तीव्रता स्पष्ट करते.
दौलतरावला परत पाठवण्यापूर्वी यमराज त्याला त्याच्या कुटुंबाची अवस्था पाहण्यास सांगतो. त्यानंतर नाटककार एक विलक्षण आणि अस्वस्थ करणारी कल्पना मांडतात—आत्महत्या करणाऱ्याला ना स्वर्गात स्थान, ना नरकात; त्याला अधांतरी ठेवण्यात येईल. त्याला आपल्या कुटुंबातील प्रत्येक घटना दिसेल; मात्र कुटुंबीयांना तो दिसणार नाही. त्यांना मदत करण्याची इच्छाही त्याला असहाय्यपणे पाहावी लागेल.
ही कल्पना नाटकाला केवळ नाट्यमयता देत नाही, तर आत्महत्येच्या निर्णयानंतर मागे राहणाऱ्या कुटुंबाची वेदना अधिक तीव्रपणे प्रेक्षकांसमोर आणते.
शेतकरी आत्महत्येचंही राजकारण !
‘झुरणझुला’ची आणखी एक जमेची बाजू म्हणजे शेतकरी आत्महत्येभोवती उभं राहणारं राजकारण आणि माध्यमांचं वास्तववादी चित्रण.
शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचतात. शेतकऱ्याच्या प्रश्नाशी त्यांचा खरा संबंध किती आणि टीआरपी वाढवण्याची धडपड किती, हा प्रश्न नाटककार उपस्थित करतात.
विरोधी पक्षाचे नेते, आमदार, लोकप्रतिनिधी आणि माध्यमं न्याय मिळवून देण्याची आश्वासनं देतात; मात्र प्रत्यक्ष मदतीच्या वेळी परिस्थिती बदलत नाही. टीव्हीवरील ‘ज्वलंत समस्या’सारख्या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबाला, आमदारांना आणि पालकमंत्र्यांना बोलावलं जातं; पण प्रश्न सोडवण्याऐवजी प्रत्येक जण आपापलं गाऱ्हाणं मांडताना दिसतो.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार नाटककार अत्यंत तीव्रतेने मांडतात. त्यामुळे ‘झुरणझुला’ हे केवळ शेतकरी आत्महत्येचं नाटक राहत नाही; तर त्या आत्महत्येभोवती उभ्या राहणाऱ्या सामाजिक, राजकीय आणि माध्यमीय व्यवस्थेचंही परीक्षण करतं.
रंगभूमीपासून चित्रपटापर्यंत…
जीवन विकास मंडळ, देगलूर, जि. नांदेड या संस्थेच्या माध्यमातून या नाटकाचे प्रयोग सादर झाले आहेत. मात्र या नाटकांची सामाजिक परिणामकारकता लक्षात घेता त्यांचे प्रयोग अधिकाधिक गावांमध्ये पोहोचणं गरजेचं आहे.
सरकारकडून शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी समाजप्रबोधन हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अशा नाटकांच्या प्रयोगांसाठी नाट्यसंस्थांना आर्थिक अनुदान मिळणं आवश्यक आहे. पूर्वी शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत विविध सामाजिक विषयांवरील लघुपट गावोगावी दाखवले जात असत. त्याच धर्तीवर शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण जीवनातील प्रश्नांवर प्रभावी नाट्यकृती लोकांपर्यंत पोहोचवता येतील.
या दृष्टीने ‘बळी गेला रे…!’ आणि ‘झुरणझुला’ या दोन्ही नाटकांचं चित्रपट माध्यमात रूपांतर करण्याचा विचार नाटककार वि. न. भोळे यांनी करावा, असं सुचवावंसं वाटतं. चित्रपट आणि दृक्श्राव्य माध्यमातून ही कथा व्यापक समाजापर्यंत पोहोचू शकते.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी आर्थिक मदत, कर्जव्यवस्था, शेतीमालाला योग्य भाव, सिंचन आणि सामाजिक सुरक्षा या उपायांबरोबरच लोकजागृती आणि प्रबोधनाची गरज आहे. नाटक आणि चित्रपट हे त्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकतात.
या नाटकांचे प्रयोग महाराष्ट्राच्या राजधानीतही व्हावेत. मराठवाड्यातील आमदार, खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी अशा प्रयोगांना पाठबळ द्यावं. कारण या नाट्यकृती केवळ मनोरंजनासाठी नाहीत; त्या शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे ज्वलंत प्रश्न समाज आणि सत्तेच्या केंद्रस्थानी आणण्याचं काम करतात.
ग्रामीण रंगभूमीला ‘कर्जबळी’ची जोड
मराठवाड्याच्या ग्रामीण जीवनाचा अस्सल पोत, शेतकऱ्यांच्या जगण्याची धडपड, कर्जबाजारीपणाची वेदना, आत्महत्येची शोकांतिका आणि त्यानंतर कुटुंबाच्या वाट्याला येणारं दु:ख—या सगळ्याचा वेध ‘कर्जबळी’ या पुस्तकातील दोन्ही नाटकांत घेतला आहे.
विशेष म्हणजे नाटककार वि. न. भोळे यांनी ग्रामीण जीवनाकडे केवळ सहानुभूतीच्या नजरेने पाहिलेलं नाही; तर त्यातील विसंगती, शोषण, राजकीय उदासीनता, माध्यमांचं बाजारीकरण आणि व्यवस्थेतील दोष यांच्यावरही भाष्य केलं आहे. त्यामुळे त्यांचं लेखन सामाजिक वास्तवाला भिडणारं आणि प्रबोधनाची भूमिका बजावणारं ठरतं.
‘कर्जबळी’ हे पुस्तक ग्रामीण नाट्यलेखनाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मराठवाड्यातील ग्रामीण बोलीभाषेचं जतन, शेतकरी जीवनाचं वास्तववादी चित्रण आणि सामाजिक प्रश्नांवर रंगभूमीच्या माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न या तिन्ही स्तरांवर हे पुस्तक लक्षवेधी ठरतं.
नाटककार वि. न. भोळे यांनी ग्रामीण शेतकरी समाजाचे प्रश्न रंगभूमीवर सातत्याने मांडले आहेत. त्यामुळे त्यांच्या या प्रयत्नांचं मनापासून अभिनंदन करावं लागेल.
‘कर्जबळी’च्या माध्यमातून शेतकऱ्याच्या वेदनेला आवाज मिळतो आणि त्या आवाजातून समाजाला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला जातो—शेतकरी जगाचा अन्नदाता आहे; मग त्याचं जगणं इतकं असुरक्षित का?
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याची जबाबदारी केवळ शासनाची नाही, तर संपूर्ण समाजाची आहे. ‘कर्जबळी’ हे पुस्तक त्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारं महत्त्वाचं नाट्यपुस्तक आहे.
नाटककार वि. न. भोळे यांना त्यांच्या पुढील साहित्यिक आणि नाट्यलेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
पुस्तकाचे नाव : ‘कर्जबळी’
लेखक : वि. न. भोळे
प्रकाशक : गणगोत प्रकाशन, देगलूर, जि. नांदेड
किंमत : ₹२५०
संदर्भ : नाट्यसंहिता आणि महेश मोरे यांचा लेख
