२६ जुलै रोजी बार्शीत कालिदास महोत्सवात पुरस्कार वितरण; विविध क्षेत्रांतील मान्यवरांचाही होणार गौरव
बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने दरवर्षी कालिदास दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कालिदास महोत्सवात दिला जाणारा राज्यस्तरीय ‘मेघदूत काव्य पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. ‘तळ्यातले आकाश’ या काव्यसंग्रहासाठी दीपाली दातार (पुणे) आणि ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ या काव्यसंग्रहासाठी प्रदीप बडदे (नवी मुंबई)यांची सन २०२५-२६ च्या मेघदूत काव्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कालिदास मंडळाच्या बैठकीत मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब घावटे यांनी पुरस्कारांची घोषणा केली.
पुरस्कार वितरण सोहळा रविवार,२६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बार्शी येथील मातृमंदिर,ढगे मळा,कुर्डूवाडी रोड येथे होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक अरविंद जोशी (सोलापूर) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जुगलकिशोर तिवाडी असतील.पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यात मायबोली सांस्कृतिक मंडळ,बार्शी, महाराष्ट्र साहित्य परिषद (बार्शी शाखा), भगवंत योग परिवार, बार्शी, तसेच स्वप्निल पाठक आणि सान्वी पाठक यांचा समावेश आहे.या पुरस्कार वितरण सोहळ्यास साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि बार्शीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कवी कालिदास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश गव्हाणे, सुमन चंद्रशेखर, अर्चना पोळ, रविराज फुरडे, रामचंद्र इकारे, मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी आणि शिवानंद चंद्रशेखर हे परिश्रम घेत आहेत.
