📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 2, 2026
मुक्त संवाद

मराठी कथा बदलत्या समाजाचा आरसा ठरतेय का ? ‘कथावकाश’मधून उलगडले आधुनिक कथेचे नवे विश्व

Dr. Randhir Shinde’s Kathavakash explores modern Marathi storytelling, social change, rural and urban realities, women’s writing and evolving literary sensibilities.
मनीषा उगले
Manisha Ugale

मराठी कथा म्हणजे केवळ मनोरंजनासाठी सांगितलेली गोष्ट नाही; ती काळाच्या बदलत्या चेहऱ्याची संवेदनशील नोंद असते. शेकोटीभोवतीच्या मौखिक कथांपासून आधुनिक महानगरीय जीवन, ग्रामीण वास्तव, दलित-स्त्रीवादी जाणिवा आणि बदलत्या मानवी नातेसंबंधांपर्यंत मराठी कथेने मोठा प्रवास केला आहे. या प्रवासातील बदलती सामाजिक-सांस्कृतिक स्पंदने, कथेचे विविध प्रवाह आणि तिच्या आशय-शिल्पातील स्थित्यंतरे यांचा चिकित्सक मागोवा डॉ. रणधीर शिंदे यांच्या ‘कथावकाश’ या समीक्षाग्रंथातून घेतला आहे. तेरा दीर्घ समीक्षा लेख आणि तीन विशेष कथाटिपणांतून साकारलेला हा ग्रंथ मराठी कथेच्या परिचित चौकटीपलीकडील समृद्ध आणि अपरिचित अवकाशाचा शोध घेतो.

मनीषा उगले

मराठी कथेतील आधुनिक स्थित्यंतरजाणिवांचा – ‘कथावकाश’

मराठी कथेला दीर्घकालीन आणि समृद्ध असा इतिहास आहे. शेकोटीभोवतीच्या गोष्टी, भूतकथा, अद्भुतकथा, सांगीवांगीच्या गोष्टी, कहाण्या, व्रतकथा, दैवतकथा, आजी-आजोबांच्या गोष्टी अशा मौखिक परंपरेतून लघुकथा, कथा आणि दीर्घकथा अशी अनेक वाटावळणे घेत मराठी कथेची परंपरा वाहती राहिली आहे. कथा परंपरेचा हा सारा प्रवास म्हणजे केवळ तिच्या आकृतिबंधात वेळोवेळी होत गेलेले वरवरचे बदल नव्हेत. समाजातील वैचारिक, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतरांची, त्याच्या वर्तमान स्पंदनांची नोंद घेणारा एक महत्त्वाचा दस्तावेज म्हणूनही त्याकडे पाहावे लागते. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी आपल्या ‘कथावकाश’ या समीक्षाग्रंथातून कथेचे वाङ्मयीन सौंदर्यशास्त्र आणि समाजशास्त्राचा हाच सेंद्रिय अनुबंध शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधुनिक मराठी कथा परंपरा समृद्ध करणाऱ्या विविध काळातील काही महत्त्वाच्या कथाकारांवर प्रसंगोपात लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. मराठी कथेचे वेगवेगळे प्रवाह आणि वैशिष्ट्ये यांवर केलेल्या मर्मग्राही भाष्यलेखांनी तो साकार झाला आहे.

ललित पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ‘कथावकाश’ या ग्रंथाचे स्वरूप एकूण तेरा दीर्घ समीक्षा लेख आणि तीन विशेष कथाटिपणे असे आहे. यात विसाव्या शतकापासून आजपर्यंतच्या मराठी कथेचा प्रवास मांडताना आनंदीबाई शिर्के, विजय तेंडुलकर, चारुता सागर, विद्याधर पुंडलिक, राजन गवस, जयंत पवार, किरण गुरव, आसाराम लोमटे, अनिल साबळे आणि बंगाली लेखक रवींद्रनाथ टागोर आदींच्या कथाविश्वावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकलेला आहे. सोबतच ऐंशीच्या दशकानंतर कथालेखनात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रिया तेंडुलकर, प्रतिमा जोशी, मेघना पेठे, नीरजा, मोनिका गजेंद्रगडकर, वंदना भागवत, मनस्विनी लता रवींद्र आणि प्रज्ञा पवार अशा ताकदीच्या लेखिकांच्या कथासाहित्याचाही यात चिकित्सक आढावा घेतलेला आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात सखा कलाल, शांताराम आणि भास्कर चंदनशिव यांच्या कथांवरची विशेष टिपणे जोडल्याने या ग्रंथाची बलवत्ता आणखी वाढली आहे. महानगरीय जीवन ते ग्रामीण भागातील रानशिवारापर्यंत व्याप्त झालेला मराठी कथेचा विविधरंगी आणि अपरिचित ‘कथावकाश’ शोधण्याचा प्रयत्न या लेखांतून केलेला आहे. त्यातून कथेचा केवळ बाह्य आकृतिबंध किंवा तांत्रिक मांडणी तपासलेली नाही, तर तिच्या निर्मितीच्या मुळाशी असलेला प्रादेशिक, महानगरीय, दलित, ग्रामीण आणि स्त्रीवादी जाणिवांचा विस्तीर्ण ‘अवकाश’ शोधण्याचा आस्थापूर्ण प्रयत्नही केलेला आहे. प्रसिद्ध लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांची मार्मिक पाठराखण या ग्रंथाला लाभली आहे.

‘कथावकाश’मधील पहिल्याच लेखात डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील आद्य कथालेखिका आनंदीबाई शिर्के यांच्या मराठी कथेतील मौलिक योगदानाचा वेध घेतला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुजन व ब्राह्मणेतर स्त्रियांचा सामाजिक क्षेत्रातील वावर मर्यादित स्वरूपाचा होता. स्त्रियांना स्वतःच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रचंड सामाजिक दडपणांचा सामना करावा लागत असे. अशा विषम सामाजिक परिस्थितीत मराठा कुटुंबात जन्मलेल्या एक कर्तबगार व्यक्ती आनंदीबाई शिर्के यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात बहुमोल कार्य केले.

विचारांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी ललित लेखनाची वाट निवडली. अनेक वैशिष्ट्यपूर्ण कथासंग्रहांच्या व ललितकृतींच्या माध्यमातून त्यांनी बहुजन स्त्रीच्या आंतरिक जाणिवांना, त्यांच्या मूक वेदनांना समर्थपणे वाचा फोडली. आनंदीबाईंच्या कथेचे स्वरूप हे मुख्यत्वे तत्कालीन मध्यमवर्गीय कौटुंबिक चौकटीतील ‘प्रश्नकथेचे’ राहिले आहे, असे निरीक्षण शिंदे यांनी मांडले आहे. त्यांच्या कथांमधून बालकांच्या भावविश्वापासून ते प्रौढ व वृद्ध स्त्रियांच्या कौटुंबिक छळाचे, उपेक्षेचे आणि त्यांच्या सुप्त आकांक्षांचे सूक्ष्म असे दर्शन घडते. त्यांच्या कथाप्रदेशातील स्त्रियांचे जग पुरुषी सत्तेने आणि सनातनी कुटुंबसमाज चौकटींनी पूर्णपणे नियंत्रित केलेले दिसते. तरीही शिक्षणाच्या पर्यायी वाटेची निवड करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची आणि बंधनातून बाहेर पडण्याची एक जोरकस आकांक्षा त्या बाळगताना दिसतात. त्यांच्या कथेतून शिक्षिका किंवा परिचारिका अशा नोकरदार नायिकांच्या रूपाने आधुनिक महाराष्ट्राच्या स्त्री-भावविश्वाचे एक प्रागतिक रूप साकार झाले याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.

विजय तेंडुलकर यांच्या कथाविश्वाचा अतिशय साक्षेपी मागोवा शिंदे यांनी घेतला आहे. तेंडुलकरांच्या नावाला वलय दिले ते प्रामुख्याने त्यांच्या नाट्यलेखनाने. त्यांची नाटके मराठी रंगभूमीवर इतिहास घडविणारी ठरली. त्यामुळे त्यांच्या दर्जेदार कथालेखनाकडे मात्र मराठी समीक्षेचे काहीसे दुर्लक्ष झाले, हे महत्त्वाचे निरीक्षण शिंदे यांनी मांडले आहे. विसाव्या शतकातील अपवादग्रस्त आणि बंडखोर प्रतिभावंतांमध्ये तेंडुलकरांचे नाव महत्त्वाचे. मानवी नातेसंबंधांमधील अंतर्विरोध त्यांनी उघड केले.

मानवी मनातील मूलभूत आदिम प्रवृत्ती, संस्कृतीच्या सभ्य मुखवट्याआड दडलेली पशुपातळीवरची सुप्त हिंसा, कामवासनेचे आदिबंध, बदलत्या काळाचे आणि नागरीकरणाचे मध्यमवर्गीय माणसावर होणारे जीवघेणे आक्रमण आणि माणसाची आंतरिक सत्ताकांक्षा यांची भेदक चिकित्सा तेंडुलकरांनी आपल्या कथेतून केली. शहरी मध्यमवर्गीय संस्कृतीतील विविध विसंगतींचे दर्शन घडवणाऱ्या या कथा व्यक्तिचित्रणात्मक आणि लोकविलक्षण, काहीशा विक्षिप्त पात्रांनी गजबजलेल्या आहेत. संवादांमधून कथेत नाट्य निर्माण करणे हे त्यांचे प्रमुख बलस्थान असले, तरी कथेला अधिक नाट्यात्मक करण्याच्या हव्यासापोटी त्यांनी योजिलेल्या काही तांत्रिक क्लृप्त्या आणि कथेचा अचानक केलेला अनपेक्षित शेवट अनेकदा अवास्तव व अस्वाभाविक वाटला आहे, अशी तेंडुलकरांच्या कथाशिल्पाची एक मर्यादाही शिंदे तटस्थपणे नोंदवताना दिसतात.

चारुता सागर यांच्या ‘अनाम प्रदेशाच्या समृद्ध कथेचा’ मागोवा घेताना त्यांच्या कथासंग्रहांतील प्रमुख आशयसूत्रे आणि सामर्थ्यस्थानांचा वेध घेतलेला आहे. चारुता सागर यांनी आपल्या कथालेखनातून ‘केवळ शेतकरी आणि गावखेड्याचे वर्णन म्हणजे ग्रामीण साहित्य’ अशा संकुचित कल्पनेला छेद दिला. संपूर्ण गावशिवाराचा जिवंत कोलाहल त्यांच्या कथेतून साकार झाला आहे. भटक्या-विमुक्तांच्या जीवनाचे भेदक चित्रण, लोकसमजुती, पूर्वापार चालत आलेल्या श्रद्धा-अंधश्रद्धा आणि प्राण्यांचे मानवी भावजीवनाशी असलेले नाते त्यांनी अतिशय अस्सलतेने मांडले. धर्माच्या नावाखाली, देवदासी किंवा जोगतिणींच्या रूपाने शोषण होणाऱ्या उपेक्षित स्त्रियांच्या शोकात्म आणि करुण कहाण्या त्यांच्या लेखणीतून संवेदनशीलतेने साकार झाल्या आहेत. चारुता सागर यांची कथा वाचकांच्या संवेदनेला एक नवा सामाजिक दृष्टिकोन मिळवून देणारी आणि मराठी कथाप्रदेशाला खऱ्या अर्थाने समृद्ध करणारी आहे, असा शिंदे यांच्या प्रतिपादनाचा आशय आहे.

परंपरा आणि आधुनिकतेच्या सीमारेषेवर उभे असणारे लेखक विद्याधर पुंडलिक यांच्या कथासंचिताचे मूल्यभान तपासताना शिंदे यांनी त्यांच्या कथालेखनाचा विस्तृतपणे तपास काढला आहे. पुंडलिकांच्या कथेत वर्तमान-भूतकाळ, ऐलतीर-पैलतीर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आणि पार्थिव-अपार्थिव यांमधील द्वैताने आकाराला आलेले मानवी मन केंद्रस्थानी राहिले आहे. मात्र, त्यांच्या राजकीय आशयाच्या कथांमध्ये राजकारणातील अंतर्गत गुंतागुंतीच्या सखोल दर्शनाऐवजी पूर्वकल्पित, काहीसा एकरंगी राजकीय अभिप्राय व्यक्त झाल्याची मर्यादा शिंदे यांनी लक्षात आणून दिली आहे. पुंडलिकांच्या कथासृष्टीत परंपरेविषयीचे एक आदिम आकर्षण आणि आधुनिकतेविषयीचा खोल आस्थाभाव एकत्र नांदताना दिसतो, त्यामुळे त्यांच्या कथेला एक वेगळे तत्त्वचिंतक परिमाण प्राप्त झाले आहे. म्हणूनच, हा लेखक जुन्यात नवा आणि नव्यात जुना वाटतो, अशीही नोंद शिंदे यांनी घेतली आहे.

कृषी संस्कृतीचा आर्थिक-सामाजिक ताण आणि समकालीन गावगाड्याचे वास्तव मांडताना राजन गवस आणि आसाराम लोमटे यांचे योगदान अनन्यसाधारण ठरले आहे. कथा, कादंबरी, कविता आणि ललित अशा विविध वाङ्मय प्रकारात मोलाचे लेखन करणाऱ्या राजन गवस यांनी आपल्या कथेतून दक्षिण महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीची झालेली आर्थिक कोंडी, तिथली बदलती सत्तासमीकरणे, संस्थात्मक शोषणाचे वास्तव धारदार आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक बोलीभाषेत उलगडले आहे. तर आसाराम लोमटे यांचे लेखन समकालीन ग्रामीण वास्तवाची मांडणी करणारे असले तरी ते रूढ अर्थाने ग्रामीण साहित्याच्या संज्ञेत सीमित होणारे नाही. त्यांनी आपली ‘इडा पीडा टळो’ आणि ‘आलोक’ सारखी कथा पारंपरिक रंजनवादी किंवा रोमँटिक साच्यात बसवलेली नाही. लोमटे यांनी ग्रामीण जीवनातील पाण्याचे दुर्भिक्ष्य, अवर्षणग्रस्त भूभाग, कोरडवाहू शेतीची दुरवस्था, जागतिकीकरणानंतर बदललेला शेतकरी आणि गावपातळीवरील राजकारण व टोकदार जातभानाचे दुखरे वास्तव धारदारपणे मांडले आहे.शेतीव्यवस्थेच्या ऱ्हासामुळे देशोधडीला लागलेला शेतकरी वर्ग, सालगडी आणि दलितांचे दुःखपेच मांडणारी त्यांची ही समस्याप्रधान कथा समूहजीवनाचे मूल्यभान देणारे एक सशक्त आणि समकालीन महत्त्वाचे कथाशिल्प ठरले आहे असे शिंदे यांचे मत आहे

महानगरीय जगण्यातील पडझड आणि मानवी मूल्यांच्या अधःपतनाचे दर्शन जयंत पवार यांच्या लेखनातून स्फोटक आणि तितक्याच कारुण्यमयतेने घडते. शिंदे यांनी जयंत पवार यांच्या बहुमुखी महानगरीय कथाचित्रणाचा वेध दोन प्रदीर्घ लेखांतून घेतला आहे. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या संग्रहाच्या निमित्ताने, मुंबईतील गिरण्या बंद पडल्यानंतर उद्ध्वस्त झालेली चाळ संस्कृती, कामगार वर्गाचा झालेला नैतिक व आर्थिक ऱ्हास आणि अस्तित्वाच्या लढ्याचे दाहक चित्र पवारांच्या कथेतून कसे प्रकट झाले आहे, याचे मर्मग्राही विश्लेषण त्यांनी केलेले आहे. जयंत पवारांची कथा केवळ महानगरातील निर्मम हिंसाचार किंवा गुन्हेगारीचे जग टिपत नाही, तर त्या कोलाहलातही मानव्याचा आणि करुणेचा शोध ती घेते. माणसाच्या भयाकुलतेचा संदर्भ महानगराशी जोडत, मरणभान आणि जुन्या मिथकांचा कल्पक वापर करत नव्या मूल्यांचे चित्रण करणाऱ्या त्यांच्या या कथेने मराठी कथेचे नवोन्मेषी रूप घडवण्यात मोलाचे योगदान दिले आहे.

आधुनिकतेच्या याच टप्प्यावर किरण गुरव आणि अनिल साबळे यांनी मराठी कथेचा पैस अधिक विस्तारत नेला आहे. किरण गुरवांनी आपल्या कथामाध्यमातून जागतिकीकरणाचे आणि नव्या भांडवली जगाचे वास्तव टिपले आहे. तृतीयपुरुषी निवेदनाचा कल्पक वापर ही गुरव यांच्या कथेची जमेची बाजू. तंत्रज्ञान आणि महानगरीय विस्तारामुळे मानवी नातेसंबंधात आलेले कोरडेपण, मानवी नेणिवेतील सुप्त वासनांचे भय आणि ग्रामीण स्त्री जीवनाकडे पाहण्याची गुरव यांची निकोप व मूल्ययुक्त जीवनदृष्टी शिंदे यांनी आलोकित केली आहे. अनिल साबळे यांचा ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा संग्रह रूढ नागर संकेत आणि पारंपरिक ग्रामीण चौकटी ओलांडत रानशिवारातील पशुपक्षी, प्राणी, निसर्ग आणि किशोरवयीन मुलांच्या भावावस्थेचे सखोल दर्शन घडवणारा. या अपरिचित अनुभवविश्वाच्या ऐवजाने मराठी कथेला नवी श्रीमंती बहाल केली. अद्भुतरम्यतेचा आणि भयाकुलतेचा असाच एक वेगळा अनुभव देणाऱ्या मोहन पाटील यांच्या ‘शापित वास्तू: कल्पित गोष्टी’ या संग्रहाचा रूपशोध शिंदे यांनी घेतला आहे. यातील कथा वास्तव-कल्पिताच्या सीमारेषेवरील लोकजीवनातील समजुतींचा वापर करत मानवी मनातील भीतीचा वेध घेतात, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठी साहित्यातील स्त्री-लेखनाच्या ऐतिहासिक आणि वैचारिक जाणिवांचा वेध घेत रणधीर शिंदे यांनी नीरजा यांनी संपादित केलेल्या ‘ऐंशीनंतरची मराठीतील स्त्रियांची कथा’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाची सविस्तर चर्चा एका प्रदीर्घ लेखातून केली आहे. या लेखाचे स्वरूप केवळ समीक्षालेखाचे नाही. मराठी स्त्री-लेखनाचा ऐतिहासिक पट उलगडणारा हा एक महत्त्वाचा लेख आहे. साहित्याच्या अभ्यासकांसाठी त्याची उपयुक्तता विशेष स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत अधिकारच नाकारला गेल्यामुळे त्यांचे लेखन वाङ्मयीन प्रवाहात उशिरा सुरू झाले. आरंभीचे हे लेखन बराच काळ नागर आणि मध्यमवर्गीय चौकटीपुरतेच मर्यादित राहिले होते. मात्र, विभावरी शिरूरकर यांच्या ‘कळ्यांचे निःश्वास’ या क्रांतिकारी कथासंग्रहाच्या प्रकाशनानंतर मराठी स्त्री-कथेला एक निर्णायक आणि महत्त्वाचे वळण मिळाले आहे. पुढे ऐंशीच्या दशकानंतर स्त्रीवादी विचारांच्या आणि चळवळींच्या थेट प्रभावातून या कथेने स्त्री-पुरुष सत्तासंबंधांच्या अंतर्गत राजकारणाची, शोषणाची आणि कौटुंबिक दडपशाहीची जाहीर चिकित्सा करण्यास निर्भीडपणे सुरुवात केली. या ऐतिहासिक बदलांची वाट चालणाऱ्या आठ महत्त्वाच्या लेखिकांच्या कथांचे सूक्ष्म विश्लेषण शिंदे यांनी या ग्रंथात विस्तृतपणे मांडले आहे. आधुनिक स्त्री कथेची वाटचाल समजून घेण्यासाठी दिशादर्शक स्वरूपाचा हा लेख आहे.

प्रिया तेंडुलकर यांनी आपल्या ‘लग्न’ व ‘मा’ या कथांतून महानगरीय संस्कृतीतील परात्मता, असुरक्षितता आणि स्त्रीच्या मानसिक व शारीरिक शोषणाला कारणीभूत ठरणारी पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था कशी जबाबदार आहे, याचे दाहक आणि प्रभावी चित्रण केले. मेघना पेठे यांच्या कथेतून स्त्री-पुरुष संबंधांमधील संवादाचे नवे पदर, स्त्रीचे देहभान, तिचे निर्णयस्वातंत्र्य आणि अपारंपरिक लैंगिक अनुभवांची निर्भीड, प्रगल्भ अभिव्यक्ती प्रस्फुटित झाली. प्रतिमा जोशी यांनी आपल्या ‘जहन्नम’ व ‘नारीलता’ या कथांमधून वेश्यावस्तीतील उघडे-नागडे वास्तव, तिथल्या शोषित स्त्रियांचे अगतिक जग आणि दांभिक पुरुषी समाजव्यवस्थेचे जळजळीत व स्फोटक चित्र प्रकाशात आणले, ते वाचकाला अंतर्मुख करते. वंदना भागवत यांनी आपल्या ‘काफ्का, कामू वगैरे’ व ‘शिट्टी’ या कथांतून नोकरी करणाऱ्या आधुनिक स्त्रीची होणारी ओढाताण, तिची कौटुंबिक व व्यावसायिक स्तरावरील मानसिक कसरत आणि पारंपरिक समाजकाच ओलांडून स्वतःच्या स्वातंत्र्याची एक नवी, स्वावलंबी व्याख्या शोधणारी जीवनदृष्टी सूक्ष्मतेने मांडली.

नीरजा यांनी आपल्या ‘रत्नप्रभा जाधव…’ व ‘श्रीकांत विनायकची गोष्ट’ या कथांमधून आधुनिक स्त्रीचा आंतरिक एकाकीपणा, मानवी मनाचे सूक्ष्म मानसिक गुंते आणि सामान्य मध्यमवर्गीय माणसाचा संभ्रम व त्यातून निर्माण होणाऱ्या फसव्या आध्यात्मिक शरणभावाचे अतिशय परिणामकारक व कारुण्यपूर्ण चित्र रेखाटले. मोनिका गजेंद्रगडकर यांच्या ‘श्रद्धा’ व ‘आधार’ या कथांनी मानवी नातेसंबंधांवर असणारा धर्मश्रद्धेचा अदृश्य पगडा, कौटुंबिक नात्यांमधील अतिरेकी प्रेमाची दहशत आणि कलावंताच्या जीवनातील मानसिक व बौद्धिक संघर्षाचे प्रभावी चित्रण समोर आणले. प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या ‘पेडिक्युअर’ व ‘तिघाडा’ या कथांतून महानगरीय अवकाशातील नव्या, मुक्त लैंगिक जाणिवा, महानगरीय जगण्याचे ताण आणि पारंपरिक रूढ चौकटींना थेट आव्हान देणारा अनुभवाचा एक वेगळा मोकळेपणा अभिव्यक्त केला. मनस्विनी लता रवींद्र यांनी आपल्या ‘बाईकविना हिरो’ व ‘सुसाईडवाला लव्ह’ या कथांमध्ये आक्रस्ताळ्या किंवा आग्रही विद्रोहापेक्षा शांत, संयत आणि चिंतनशील सुरात स्त्री-पुरुष संबंधांचे अनेक सूक्ष्म व बदलत जाणारे पदर उलगडले आहेत, अशी व्यवच्छेदक आकलने शिंदे यांनी या लेखात मांडली आहेत.

भारतीय साहित्याचा व्यापक अनुबंध जोडताना एका लेखातून रणधीर शिंदे यांनी रवींद्रनाथ टागोरांच्या बंगाली कथासाहित्याचा वेध घेतला आहे. टागोरांच्या कथांमध्ये वसाहतकाळातील भारतीय समाजाचे वास्तव, निसर्गाचे काव्यात्म रूप आणि मानवी भावनांचे वैश्विक आदिबंध समर्थपणे साकार झालेले दिसतात. विशेषतः स्त्री जीवनातील कारुण्य आणि सोशिकतेची रुपे त्यांच्या साहित्याने जागतिक पटलावर मांडली. टागोरांच्या या अभिजात कथांचे सौंदर्यशास्त्रीय संदर्भ आजही समकालीन मराठी लघुकथेला समृद्ध करण्यासाठी आणि तिची समीक्षा करण्यासाठी मार्गदर्शक ठरले आहेत, असा निष्कर्ष शिंदे यांनी काढलेला आहे. ग्रंथाच्या अखेरीस जोडलेली तीन कथाटिपणे या संपूर्ण कथावकाशाला अधिक समृद्ध करणारी आहेत. यामध्ये जीवनानुभवाचा संयताविष्कार घडवणारी शांताराम यांची कथा, सखा कलाल यांच्या कथेतील अभिजात कलात्मकता आणि भास्कर चंदनशिव यांच्या कथेतील दुष्काळी मराठवाड्याच्या मातीतील राकट वास्तव, शोषणाविरुद्ध उमटणारा शेतकऱ्यांचा विद्रोहस्वर यांचे शोधन या टिपणांच्या माध्यमातून केलेले आहे.

रणधीर शिंदे यांचा ‘कथावकाश’ हा ग्रंथ मराठी समीक्षेच्या प्रांतात मोलाची भर घालणारा आहे. मराठी कथेचे सामर्थ्य, संपन्नता आणि तिची बदलती वळणे समजून घेणाऱ्या अभ्यासू आणि चोखंदळ वाचकांसाठी हा समीक्षाग्रंथ मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही. समकालीन मराठी कथेच्या अंतर्गत लयींचा, तिच्यातील भाषिक परिवर्तनाचा आणि तिच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रवासाचा रसडोळस वेध घेणारा हा ग्रंथ मराठी समीक्षेच्या संचितात मोलाची भर घालणारा ठरेल असा विश्वास वाटतो.

पुस्तकाचे नाव – कथावकाश (समीक्षा ग्रंथ)
लेखक – रणधीर शिंदे
प्रकाशक ललित पब्लिकेशन
पृष्ठे – १९२
मूल्य – ३०० ₹

Related posts

निरागस आणि कोवळीक संवेदनेची कथा

“गोष्ट एका रिटायरमेंटची” एक भावस्पर्शी गोष्ट

कळकी…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406