पगार जेमतेमच… त्यातच संसार नुकताच सुरू झाला होता आणि गरजा मात्र दिवसेंदिवस वाढत होत्या. गावापासून दूर, कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नोकरी करताना आठवडी बाजारात ‘छटाक हिरव्या मिरच्या’ मागण्याची वेळ आली. विक्रेत्याने त्या मिरच्या चिमटीत टाकत, “पैसे नका देऊ, तशाच घेऊन जा!” म्हटले आणि त्या क्षणी मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली—आपण खरंच साहेब आहोत की परिस्थितीसमोर हतबल झालेला एक सामान्य माणूस? आज आयुष्याने कितीही उंची गाठली असली, तरी त्या छटाक मिरच्यांची चिमूट भूतकाळातील संघर्ष, अपमान आणि त्यातून उभं राहण्याची जिद्द पुन्हा पुन्हा आठवून देते.
निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,
मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन, गंगापूर,
जि.छत्रपती संभाजीनगर.9423180393,8668779597
कमी पगारावर नोकरी करायची म्हणजे त्या कमनशिबी साहेबात खूपच हिम्मत लागते! ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने’ यापेक्षा बत्थर परिस्थितींचा सामना ! पहिलं राहायची जागा चांगली अन् कमी म्हणजे माफक दर्जातली मिळायला हवी ! तीही सु वस्तीत. असं ठिकाण मिळालं म्हणजे पंचाहत्तर टक्के काम झालं ! असं समजून उत्तम निवारा प्राप्त झाला या आनंदात पुढे सगळं यथासांग होईल अशी अपेक्षा ठेवायची. त्यानंतर अन्न म्हणजे किराणा,भाजीपाला अन् दूध वगैरे असं बारीक-सारीक त्यात आलं. ही दुसरी प्राथमिकतेतली गरज. कपडे तर आम्हां नवरा बायकोला लग्नकार्यात मिळालेलेच होते!…..हळद, कुंकू, लग्न अन् तदनंतरचा नवऱ्या मुलीला संसारपाशात नुकत्याच गुंतलेल्या नवरदेवाने मंगळसूत्र घातल्यानंतर अग्निभोवताली फेऱ्या मारण्याचा कार्यक्रम तेव्हाही एक शेवटचा ड्रेस अर्थातच त्याला आमच्याकडे फळ भरताना मिळालेला कपडा कपडालत्ता संबोधतात. असे लग्न झाल्यानंतर चमचमीत कपडे होतेच त्यामुळे निदान दोन-तीन वर्ष तरी कपड्यांवर खर्च होणार नाही अशी मला शंभर टक्के शाश्वती वाटत होती!
करार पद्धतीने अर्थातच कंत्राटी ग्रामसेवक (इतरांच्या दृष्टीने दुय्यम दर्जाचे)असताना मी उगाचच लग्न बंधनात अडकलो !अगदी गोत्यात आलेला कार्यक्रम असतो तसा ! फक्त पंचवीससे या नाममात्र पगारावर रुजू झालेला नवनियुक्त लग्नाळू पोरगा ! कमी पैशांमध्ये एकटा कसाबसा राहायचो मात्र आता दोनाचे चार झालेले….! अनेक यक्षप्रश्न समोर थयथया नाचायचे! परंतु “ पोस्ट ग्रॅज्युएट झालास ना तू? मग घाबरून कसं चालेल? तूच तुझा मार्ग शोध…..” एकदा उभयंतांवर अक्षदा पडल्यानंतर नंतरच्या काळात जास्त विचार करण्यात अर्थ नव्हता. झालं ते झालं म्हणून अनंत सामाजिक तसेच कौटुंबिक अडचणींना पेव फुटलं! त्यातल्या काही देणंघेणं नसताना सुद्धा उचंबळून आल्या. धीराने सामोरे गेलो….
सुरुवातीचे काही दिवस स्वतःच हाताने स्वयंपाक करून नानाविध अनुभव घेतले.जगाच्या नकाशावर नसतील तेवढे देश चपात्यांमधून आम्ही निर्माण केले! काळ्या,लाल मसाल्यांखेरीज मी मध्यम रंगाच्या भाज्यांचे शोध देखील आपसूक योगायोगाने लावले! त्यातूनच मला जगप्रसिद्ध ‘मटकी खिचडीचा’शोध देखील लागला! तिचं पेटंट मात्र घ्यायचं राहिलं. कमी पैशात आठवडी बाजारात फिरता फिरता बसलेल्या विक्रेत्याला फक्त “छटाक हिरव्या मिरच्या द्या.” असं म्हणल्यावर समोरच्याने भिकाऱ्याला तीन बोटांच्या चिमटीमध्ये येतील तेवढ्या मिरच्या माझ्या पिशवीत टाकत…., “पैसे नका देऊ, तशाच घेऊन जा!” असं हलक्या दर्जाचं बोलणं ऐकल्यावर “मी खरंच एखाद्या खात्यातील चार-पाच गावांचा साहेब आहे का?”ह्या आणि अशाच अनेक भानगडींनी उचल खाल्ली! त्या दिवसापासून आजही मिरच्या घेताना नक्कीच तो प्रसंग आठवतो ! बदललेले दिवस कितीही मंत्रमुग्ध करणारे असले तरीही जुन्या गोष्टींची मनात सल कायमच टिकून असते!
सातवी- आठवी पासून मी स्वतः घरच्या मिरच्या,कांदे,गवार, भेंडी, कोथिंबीर अन् तत्सम भाजीपाला सायकलवर बोंबा मारून किती तरी वेळा विकलेला परंतु कमी पगारावरचा गावापासून लांब गेलेला शेतकऱ्याच्या घरातला नोकरदार म्हणून आलेला हा अपमानित करणारा अनुभव नक्कीच माझ्या जीवनातली उत्कर्ष करणारी घटना ठरावी असाच आहे…..! आजही ‘छटाक मिरच्या’ कित्येक आठवणींना जाग्या करतात……
