📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 21, 2026
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धरणाच्या तळाशी दबलेली माणुसकी

Poetry depicting a village submerged by dam water symbolizing displacement and lost humanity

सारिका उबाळे यांच्या ‘धरणाच्या तळाला’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ… शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता शेकाप भवन कोल्हापूर येथे होणार आहे त्या निमित्ताने…

सारिका धरणाच्या पाण्यामुळे बुडालेलं गाव, गुरांची फुगलेले देह, पाण्यावर तरंगणारी प्रेतं, सगळंच्या सगळं वर घेऊन आलीय आणि जाब विचारतेय, जे प्रत्येक कवीचं कर्तव्य असतंय. तुकारामाला म्हणे इंद्रायणीनं वर येऊन बुडवलेल्या कविता, पोथ्या, अभंग आणून दिलेले…. सारिकानं त्या इंद्रायणीसारखंच वर आणून दिलेल्या या गावाला जिवंत कोण करेल ?

मलिका अमरशेख

सारिकाच्या कविता वाचणं किंवा त्यावर बोलणं लिहिणं हे वाचक, कवी व समीक्षकांची परीक्षा घेणारं असतं. कारण तिच्या कवितांतून एवढे प्रश्न, एवढ्या दुःखाच्या हजारो मिती, व्यक्ती अन् समाजातले असंख्य गुंतागुंतीचे अंतर्विरोध बंदुकीच्या गोळ्यासारखे सटासट सुटतात की त्यापासून आपण वाचणं ही आपल्या बेजबाबदारपणाची कबुलीच देण्यासारखं. परत त्याला सामोरं जाणं म्हणजे पण कठीणच. कारण आपण त्या साऱ्या प्रश्नांना, दुःखाला, वेदनेला फक्त वाचू शकतो आणि ती तर, सांग आता बोल आता अशा निर्णायक अवस्थेला आलेली असते.

आताच्या तिच्या नव्या ‘धरणाच्या तळाला’ या कविता संग्रहातूनही तिनं असं एक विशिष्ट गाव उभं केलंय की मन आणि मेंदू सुन्न होतो. दुःखाला, उद्ध्वस्तपणाला आपण दाद नाही देऊ शकत. माती सगळीकडे सारखी नसते. रंग वेगळा, गंध वेगळा. काही मातीत खोल खोल जिवाभाव, काही सांगाडे, तर काही उगवायला उत्सुक अशा बिया, रुजवा धरून पाहणाऱ्या तर काहीत आपल्या आठवणींच्या बिया असतात. रांगणाऱ्या पावलांचे ठसे, हळदीच्या पायांचे ठसे, आईच्या सुरकुतलेल्या हातांनी सावरलेले अंगण हे सारं सारं त्या मातीत रुजलेलं असतं. त्याचा मोठा वृक्ष होतो मनात, मेंदूत आणि त्याच्याच दाटीत सावलीत आपण निवांत विसांबा घेतो. पण एकदम असं सर्वच उध्वस्त करून असलेल्या ताणात फेकून द्यावं, असं फेकणं यंत्र का पुनर्वसनाच्या गोंडस नावाखाली? विकास महत्त्वाचा की माणूस? माणसांनी जिवंत ठेवलेलं गाव, विकास कुणासाठी? सत्तेसाठी? चार धनदांडग्या डोक्यांसाठी? की गावातल्या माणसांसाठी? जर माणूसच शिल्लक नाही ना माणुसकी तर मग हा विकास कसला? कशासाठी?

सारिका हे सगळे प्रश्न उभे करते आणि तेही त्यांच्या शब्दात सांगते. पाण्यात बुडून तट फुगलेली प्रेतं जिवंत करीत. ती विचारतायत जाब :

तुम्ही दाखवत राहिलात तुमच्या कागदी नियमावल्या /
आणि आम्ही आमच्या मागण्या लावून धरल्या /
आम्हाला हवे होते हक्क आमच्या जगण्याचे /
आणि तुम्हाला धरणाचे लाभ /
तुम्ही नोटांची बंडलं मोजत भरली /
आणि आम्ही शोधत राहिलो /
पडक्या घरात भिजलेली कागदपत्रं /
साहेब, /
आम्ही हरलो दोन पिढ्यांची लढाई

असं जेव्हा सारिका त्या दुःखाचा, शोकांतिकेचा उच्चाराने आक्रोश करते तेव्हा तो एका कवीचा आक्रोश नसतो, तो त्या एका गावाचा आक्रोश नसतो, तो त्या दुर्दैवी अमानुष इतिहासाचा, शतकांचा, माणुसपणाचा आक्रोश असतो. ही फक्त दोनच पिढ्यांची लढाई नसते, ही गोष्ट आता एका गावापुरती, त्या पिढ्यापुरती राहत नाही; सत्ता आणि वंचित, शोषक आणि शोषित, सत्य आणि असत्य, हुकूमशाही विरुद्ध लोकशाही, इतिहास विरुद्ध भविष्य अशी होऊन जाते. चिरडून टाकणारे
जिवंत राहणार असतील जगात, तर भविष्यात या दुर्दैवी वंशांचे सर्जक मातीत हिरवं पान पण उगवणार नाही. कारण तो हिरवेपण जपणारी माणसं, गावं नष्ट झालेली असतील. धरणाच्या दगडी छातीत फक्त कवितांचे बोल निनादत राहतील. पुढच्यांना सावध करणारे. सारिका ही त्यांचा आवाज आहे. ती म्हणते :

एकदा हरवला गाव की /
होत नाही पुन्हा कधीच तुमचं ‘पुनर्वसन’ /
घर गाव किंवा देश प्रदेश सुटल्यावर /
‘निर्वासित’ नावाची चिकटवली जाते जात /
उपेक्षणाही एक संस्कृती असते / माहितीय तुम्हाला ?

मध्यरात्री अचानक महापुरात आलेला पाण्याचा लोंढा, त्यात वाहून गेलेली गुरं, गाळात रुतलेले निष्प्राण देह, चिखल-पाण्यात तरंगून राहिलेली गाडगी, भांडी, उध्वस्त गेलेलं घरदार, वासे, कुजत चाललेल्या स्वप्नांचा कडू वास, माणुसकी नावाचं ‘लावणसारखी’ प्रेतांना हुंगत पंचनामा नावाचं नाटक करताना… हे सगळं भयावह
चित्र सारिका चार–पाच ओळींतल्या या कवितांतून इतक्या वेगळ्या यातनाकांडातून उभं करते की कुठलाही सुज्ञ, संवेदनक्षम माणूस अस्वस्थ होईल. संकट आसमानी असलं तर माणूस देवाला दोष देतो आणि सुलतानांनी असेल तर ? पण कुठल्याही प्रकारे आली तरी त्या दुःखाची भीषणता कमी होत नाही. ती लिहिते की :

या धरणाच्या पाण्यानं /
चार खांबातून घेतली आमची घरं /
भीतीला चिकटून बसलेली /
स्वप्नं बी वेचावी /
खरवडून काढा /
नाहीतर पायथा–पायथानं /
बाहेर जायची ती चुकून /
पुन्हा कुठ्या गरिबाखोरी

किंवा

उपरे म्हणून हिणवलं /
तुम्हाला माणसं मिळाली /
आणि भोगायला बाया /
आमचा गाव पाण्यात बुडाला /
आणि तुमची माणुसकी

असं दाहक, जळजळीत लिहिते. उपरोध, उपहास ही सगळी शाब्दिक शस्त्र-अस्त्र वापरून ती धरणाच्या पाण्यात बुडालेल्या गावाला पुन्हा वर काढून जिवंत करते, तेव्हा ते अवशेष फक्त बुडालेल्या गावाची, निरपराध माणसांच्या प्रेताची कथा सांगत नाहीत तर ती समाजाचा एक भेसूर चेहराही दाखवते, जो कुठल्याच आरशात वा पाण्यात दिसलेला नसतोय. साडी न फेडता येणारी तारा, पोहता न येणारी तारा, गाव-घर न सोडणाऱ्या दोन म्हाताऱ्या, दावणीला बांधलेली गुरं, दावं न सुटल्याने हंबरून मेलेल्या गाईंचे डोळे असं किती अन् काय काय येतं मग तिच्या कवितेत :
गाव बुडालं पाणी झालं /
आता आम्ही काय करावं ? /
शेती नाही माती नाही /
मजूरदारानं काय करावं ? /
घर गेलं संसार गेला /
आता नव्या जानोश्यात कसं रहावं? /
पोरगं नाही साहेब आम्हाला /
पोरगी कशी वारस नाही /
तिला जनताना बायकोनं /
काय कळा सोसल्या नाही ? जीवन मरण अन अस्तित्वालाही /
तसा अर्थ नसतोच काही / जात धर्म सत्तेच्या कागदी चळती / अन बंडलांपुढे

सारिका धरणाच्या पाण्यामुळे बुडालेलं गाव, गुरांची फुगलेले देह, पाण्यावर तरंगणारी प्रेतं, सगळंच्या सगळं वर घेऊन आलीय आणि जाब विचारतेय, जे प्रत्येक कवीचं कर्तव्य असतंय. तुकारामाला म्हणे इंद्रायणीनं वर येऊन बुडवलेल्या कविता, पोथ्या, अभंग आणून दिलेले…. सारिकानं त्या इंद्रायणीसारखंच वर आणून दिलेल्या या गावाला जिवंत कोण करेल ?

पुस्तकाचे नाव – धरणाच्या तळाशी
कवयित्रीसारिका उबाळे
प्रकाशकमुक्ता प्रकाशन अमरावती मोबाईल – 8080463483
किंमत – 120 रुपये

Related posts

कवितेच्या जन्मा मागची गोष्ट सांगणारा लेखसंग्रह

तिमाही जीडीपीबाबत आत्मसंतृष्टता नको, अडचणींवर मात करा !

किटकांच्या दुनियेत – वाळवी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406