📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 8, 2026
सत्ता संघर्ष

बांकीपूरच्या निकालाने भाजपच्या सत्तेला दिली इशारा घंटा ! Prashant Kishor Shocks BJP in Its Bihar Bastion

Prashant Kishor’s victory in Bankipur, a BJP stronghold for three decades, signals growing voter discontent and a new political challenge for BJP in Bihar.

स्टेटलाइन –

तीस वर्षे भाजपच्या भगव्या झेंड्याखाली राहिलेला बिहारमधील बांकीपूरचा गड अखेर ढासळला आणि त्या भग्नावशेषातून प्रशांत किशोरांच्या जनसुराज्याचा पिवळा झेंडा वर आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या पारंपरिक मतदारसंघातच प्रशांत किशोर यांनी १९ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवलेला विजय हा केवळ एका पोटनिवडणुकीचा निकाल नाही; तो सत्तेच्या आत्मविश्वासाला, संघटनशक्तीच्या माजाला आणि मतदारांना गृहित धरणाऱ्या राजकीय संस्कृतीला मिळालेला धक्कादायक इशारा आहे. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार आणि पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व अशी संपूर्ण ताकद मैदानात उतरूनही भाजपला आपला किल्ला वाचवता आला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्व २३६ जागांवर पराभव पत्करलेल्या जनसुराज्य पक्षाने हार न मानता केलेल्या संघटनबांधणीचे हे पहिले मोठे राजकीय फलित मानले जात आहे. बिहारच्या राजकारणात आता भाजप विरुद्ध राजद या पारंपरिक द्वंद्वाला प्रशांत किशोर हा नवा पर्याय आव्हान देऊ लागला आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

भाजपच्या गडावर प्रशांत किशोरांचा उदय

बिहारमधे गेली तीस वर्षे भाजपचा गड असलेल्या आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन यांना चार टर्म निवडून देणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक व राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांचा दणदणीत झालेला विजय ही शक्तिशाली भाजपला इशारा घंटा आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असताना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परंपरागत मतदारसंघात भाजपचा झालेला पराभव ही राज्य व केंद्रीय नेतृत्वावर मोठी नामुष्की आहे.

दिल्लीत जंतरमंतरवर झालेले जेन झी आंदोलन,अयोध्येतील राम मंदिरात दानपेटीवर पडलेला दरोडा,देशभर वाढलेली प्रचंड बेरोजगारी व जनतेत खदखदत असलेला असंतोष याचे प्रतिबिंब बिहारमधील बांकीपुरा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीत पडले.गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाने लढविलेल्या सर्व २३६ जागांवर दारूण पराभव झाल्यानंतर प्रशांत किशोर खचले नाहीत, त्यांनी पक्षाचे काम, संघटन बांधणी व जनसंपर्क थांबवला नाही, बकवास आश्वासने दिली नाहीत, जनतेला स्वप्नरंजनात गुंतवले नाही. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने सर्व ताकद पणाला लावली असतानाही किशोर यांचा १९ हजारपेक्षा जास्त मतांनी विजय झाला व तीस दशकानंतर भाजपाला आपला भक्कम गड गमवावा लागला.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजप- जनता यु आघाडीचे सरकार स्थापन झाले.जनता दल यु चे सर्वोच्च नेते नितिश कुमार यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करून भाजपने विधानसभा निवडणूक लढवली.निवडणुकीनंतर नितिश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली पण काही महिन्यांतच त्यांची केंद्रात गरज असल्याचे भाजपने त्यांना पटवून दिले व सम्राट चौधरी यांनी भाजपचे पहिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपचा मुख्यमंत्री झाला म्हणून पक्षाचे नेतृत्व खूश झाले.तसेच चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या नितिन नवीन यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. केवळ बिहारपुरते मर्यादीत असलेल्या नेत्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नेमल्याचे अनेकांना आश्चर्यही वाटले. नितीन नवीन केंद्रात येणार म्हणून त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवडही झाली. संसदेत खासदार म्हणून गेल्याने नितिन नवीन यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व त्यांच्या बांकीपूर मतदारसंघात भाजपने पोटनिवडणूक ओढवून घेतली. निवडणुकीत जय- पराजय होत असतात, पण ज्यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांच्या राज्यातील विधानसभा मतदारसंघात पक्षाला पराभव पत्करावा लागतो हे लाजिरवाणे ठरले.

नितिन नवीन यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करेपर्यंत त्यांचे नाव देशात कुणाला ठाऊक असण्याचे कारण नव्हते.आमदार असताना ते प्रादेशिक नेते एवढीच त्यांची प्रतिमा होती. पश्चिम बंगालमधे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून हटवले व कोलकतामधे भाजपचे सरकार स्थापन झाले. बिहार पाठोपाठ पश्चिम बंगालमधे भाजपचा प्रथमच मुख्यमंत्री झाला याचे श्रेय मोदी- शहांबरोबरच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नवीन यांना दिले गेले. मग बांकीपूर मतदारसंघातील पराभवाचे खापर कुणावर फोडले जाणार ?

प्रशांत किशोर यांची ख्याती निवडणूक प्रचाराचे आराखडा तज्ञ अशी आहे. त्यांनी विविध राज्यात राजकीय पक्षांना निवडणूक व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले आहे. अनेक राज्यात त्यांच्या रणनितीमुळे राजकीय पक्षाला सत्ता मिळाली व त्यांच्या बुध्दीमत्तेचा लाभ घेऊन अनेक जण मुख्यमंत्रीही झाले. गेल्या वर्षी जनसुराज्य पक्षाला विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के अपयश पदरी पडल्यावर किशोर यांची सर्वत्र टिंगल टवाळी झाली. तेव्हा स्वत: किशोर उमेदवार म्हणून मैदानात नव्हते. मात्र बांकीपूरच्या पोट निवडणुकीत ते स्वत: उमेदवार म्हणून लढले व भाजपाचा पराभव करून विजयी झाले.

बांकीपूर विधानसभा पोटनिवडणकीसाठी भाजपाने अगोदर अभिषेक कुमार सिन्हा यांना उमेदवारी जाहीर केली होती. गेल्या वर्षी ९ जुलै रोजी त्यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्जही दाखल केला होता. दोनच दिवसात चक्रे फिरली. स्वत: अभिषेक यांनी आपण निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. भाजपाने अभिषेक यांच्या ऐवजी नीरज कुमार सिन्हा यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले. पक्षाने उमेदवार बदलला म्हणून कार्यकर्ते व मतदारही संभ्रमात पडले. बांकीपुर मतदारसंघातून प्रशांत किशोर यांच्या विरोधात भाजपने एक सर्वसामान्य कार्यकर्ता उभा केला. तेव्हाच भाजपच्या विजयाबद्दल धाक धूक वाटू लागली होती. प्रशांत किशोर भाजपच्या उमेदवाराला भारी पडू शकतात, अशी चर्चा सुरू झाली. त्यातच दिल्लीत जेन झी आंदोलनाला धार चढली, देशभर जेन झी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. बिहारमधेही जेन झी मोर्चावर पाण्याचे फवारे मारून त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. जेन झी आंदोलनातून भाजपविरोधात रोष प्रकट होत राहीला. पण आपल्याला कोणी पराभूत करू शकत नाही, अशा अहंकारात भाजपाचा प्रचार चालू राहिला.

किशोर यांना ६४ हजार १५१ मते मिळाली,भाजपचे नीरज कुमार यांना ४४ हजार ८२७ तर राजदच्या रेखा कुमारी यांना १४ हजार २७३ मते मिळाली. निकालानंतर किशोर म्हणाले- बांकीपूरची निवडणूक ही केवळ आमदार निवडण्यासाठी नव्हती. निकालाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला स्पष्ट संदेश दिला आहे,. बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती असू नये ,ही जनतेची इच्छा आहे.राज्याला शिक्षण, रोजगार, आणि विकासाला प्राधान्य देणारा मुख्यमंत्री हवा आहे.

निवडणुककाळात प्रशांत किशोर यांच्या विरोधात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नवीन हे आठ दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. मुख्यमंत्री सम्राट चौधरी, राज्याचे मंत्री, पक्षाचे १८ खासदार , २७ आमदार, भोजपुरी चित्रपटातील कलाकार अहोरात्र मतदारांना आकर्षित करीत होते. सत्ताधारी पक्षाचाचा बोलबाला व्हावा यासाठी साथीला गोदी मिडिया होताच. तरीही किशोर यांनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन भाजपवर मात केली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षदाच्या पदग्रहण सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितिन नवीन यांचे अभिनंदन करताना मेरे बॉस हैं, नितीन जी.. असे उदगार काढले होते. मोदींच्या बॉसच्या मतदारसंघात भाजपचा पराभव झाला अशी चर्चा सुरू झाली आहे.

प्रशांत किशोर यांच्या विजयाने भाजप स्तब्ध झाला आहे आणि राजदला भविष्याची चिंता भेडसावू लागली आहे.बांकीपूरवर गेली तीस वर्षे फडकत असलेल्या भगवा मतदारांनी खाली खेचला आहे व तिथे जनसुराज्य पक्षाचा पिवळा झेंडा फडकू लागला आहे. प्रशांत किशोर यांच्या विजयामुळे मुख्यमंत्री सम्राट चौधरी व राजदचे प्रमुख तेजस्वी यादव यांच्यापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. बिहारच्या विधानसभेत किशोर हे पक्षाचे एकमेव आमदार असतील पण भाजप सरकारला हैराण करतील.

भाजपने बांकीपूरच्या पोटनिवडणुकीत सारी शक्ति व कल्पकता पणाला लावली होती. प्रचारात बजरंग बली हनुमानाच्या वेषात एका कलाकाराला नाचवत ठेवले. पण हनुमान भाजपवर प्रसन्न झाला नाही.बांकीपूर से कुत्ता – बिल्ली भी लढा देंगे तो भी बीजेपी जीत जायेगी, अशा भाषेत भाजपचे बिहारचे नेते व माजी केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुक्ताफळे उधळली होती. मतदारांना गृहित धरून चालणार नाही, हाच संदेश बांकीपूरने देशाला दिला आहे.

Related posts

शेतकरी उत्पादक कंपन्यांना सिलिंगमधून वगळण्याची गरज

राजकीय पक्षांना नकोत मुस्लिम उमेदवार…

धनखड आजारी की सरकारची नाराजी ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406