📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 9, 2026
मुक्त संवाद

बालमनात आनंद, संस्कार आणि निसर्गप्रेम रुजवणारा कथासंग्रह – गड्या आपुला गाव बरा

डिजिटल युगातील बालपणाला गावच्या मातीचा सुगंध, निसर्गाची ओढ, मैदानी खेळांची उमेद आणि संस्कारांची शिदोरी देणारा प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचा ‘गड्या आपुला गाव बरा’ हा बालकथासंग्रह बालसाहित्याच्या क्षेत्रात लक्षवेधी ठरला आहे. मनोरंजनातून मूल्यशिक्षण आणि कथेतून जीवनदृष्टी देणाऱ्या अकरा कथांचा हा संग्रह बालमनाशी अतिशय सहज संवाद साधतो.

– डॉ.श्रीकांत पाटील, 9834342124

बालसाहित्य हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया असतो.बालमनाला आनंद देतानाच त्यांच्यामध्ये चांगल्या मूल्यांची रुजवण करणे, निसर्ग, समाज आणि संस्कृती यांविषयी आत्मीयता निर्माण करणे हे बालसाहित्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडणारा प्रा.डॉ.नरसिंग कदम यांचा ‘गड्या आपुला गाव बरा’ हा बालकथासंग्रह वाचकांसमोर आला आहे.मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य, अभ्यासू लेखक,समीक्षक आणि संपादक म्हणून परिचित असलेल्या डॉ.कदम यांनी आपल्या अनुभवसंपन्न लेखणीतून बालमनाशी थेट संवाद साधणाऱ्या कथा साकारल्या आहेत.

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत.आवड,पेराल तेच उगवते,भुरी मैस,गड्या आपुला गाव बरा,पर्यावरणपूरक रंगपंचमी,मैदानी खेळ, छंदप्रेमी, मी मोबाईल बोलतोय, करामत, खेळाडूचे गाव आणि जलमित्र अशा विविध विषयांवर आधारित या कथा मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करतात. प्रत्येक कथा वेगळ्या आशयाची असून त्यामध्ये मनोरंजनासोबतच जीवनमूल्यांचा प्रभावी संदेश अंतर्भूत आहे.

ग्रामीण जीवन, गावगाडा, सण-उत्सव, नातेसंबंध, पर्यावरण, मैदानी खेळ, छंद, पाणी संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांचा समतोलपणे विचार या कथांमध्ये आढळतो. त्यामुळे हा कथासंग्रह एका चौकटीत अडकून राहत नाही; उलट बालजीवनाचे अनेक पैलू सहजपणे उलगडून दाखवतो.

‘गड्या आपुला गाव बरा’ ही कथा ग्रामीण संस्कृतीतील माणुसकी, जिव्हाळा आणि निसर्गाशी असलेले नाते अधोरेखित करते. शहराच्या आकर्षणापेक्षा गावातील साधेपणा, एकोप्याची भावना आणि मातीचा सुगंध किती मौल्यवान आहे, याची जाणीव ही कथा करून देते. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशा कथांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.

‘पर्यावरणपूरक रंगपंचमी’ आणि ‘जलमित्र’ या कथा पर्यावरण संवर्धनाचा अत्यंत समर्पक संदेश देतात. पाण्याची बचत, नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज या कथा मुलांच्या मनावर प्रभावीपणे बिंबवतात. उपदेशात्मक स्वर टाळून प्रसंग आणि संवादातून लेखकाने संदेश दिला आहे, हे या कथांचे विशेष वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

‘मैदानी खेळ’ आणि ‘छंदप्रेमी’ या कथा आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या पिढीला नव्याने विचार करायला भाग पाडतात. मैदानी खेळातून मिळणारे आरोग्य, सहकार्याची भावना, शिस्त आणि संघभावना यांचे महत्त्व लेखकाने सहजपणे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर छंद जोपासण्याचे महत्त्वही प्रभावीरीत्या अधोरेखित केले आहे.

आजच्या काळातील अत्यंत समर्पक विषय असलेली ‘मी मोबाईल बोलतोय’ ही कथा विशेष उल्लेखनीय आहे. मोबाईल हा शत्रू नसून त्याचा योग्य वापर होणे आवश्यक आहे, हा संतुलित विचार लेखकाने मुलांसमोर मांडला आहे. त्यामुळे कथा केवळ मनोरंजन करत नाही, तर तंत्रज्ञानाबाबत योग्य दृष्टिकोनही निर्माण करते.

या कथासंग्रहाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भाषाशैली. साधी, सोपी, ओघवती आणि आकलनसुलभ भाषा असल्यामुळे लहान वाचकांना कथा सहज समजतात. संवाद नैसर्गिक आहेत. प्रसंगचित्रण चित्रदर्शी आहे. लेखकाने अनावश्यक शब्दबंबाळपणा टाळून नेमक्या शब्दांत प्रभावी कथाविश्व उभे केले आहे. ग्रामीण बोलीतील काही शब्द कथांना वास्तवाची आणि जिव्हाळ्याची किनार देतात.

प्रत्येक कथेला दिलेली पूरक चित्रे हा या पुस्तकाचा आणखी एक महत्त्वाचा गुण आहे. चित्रांमुळे मुलांची उत्सुकता वाढते, कथानक अधिक स्पष्ट होते आणि वाचनाचा आनंद द्विगुणित होतो. बालवाचकांचे लक्ष वेधून घेण्यात चित्रांची भूमिका अत्यंत प्रभावी ठरते.

या कथासंग्रहातील कथांमध्ये कृत्रिम उपदेशाचा अतिरेक नाही. लेखक मुलांशी त्यांच्या भाषेत बोलतो. कथा वाचून मुलांना विचार करायला प्रवृत्त करणारी मांडणी आहे. प्रत्येक कथेमध्ये एखादे मूल्य, संस्कार किंवा जीवनविषयक संदेश सहजगत्या येतो. त्यामुळे कथा रंजन आणि प्रबोधन यांचा सुंदर मिलाफ घडवतात.

आजच्या डिजिटल युगात मुलांचे बालपण बदलत चालले आहे. अशा वेळी गाव, निसर्ग, खेळ, संस्कार, पर्यावरण आणि सामाजिक जबाबदारी यांची आठवण करून देणारा हा कथासंग्रह अत्यंत उपयुक्त ठरतो. शिक्षक, पालक आणि ग्रंथालयांनी मुलांच्या हातात हे पुस्तक आवर्जून द्यावे, असे वाटते. शालेय विद्यार्थ्यांसाठी वाचनपूरक साहित्य म्हणूनही हा संग्रह निश्चितच उपयोगी ठरेल.

एकंदरीत, ‘गड्या आपुला गाव बरा’ हा बालकथासंग्रह मुलांच्या जीवनात आनंद पेरणारा, कल्पनाशक्तीला चालना देणारा, संस्कारमूल्ये रुजवणारा आणि सामाजिक जाणीवा जागृत करणारा असा उत्कृष्ट साहित्यसंग्रह आहे. साधी भाषा, प्रभावी कथानक, जीवनमूल्यांचा सहज आविष्कार, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन, पर्यावरणप्रेम आणि आधुनिकतेकडे समतोल नजरेने पाहण्याची दृष्टी या सर्व गुणांमुळे हा संग्रह मराठी बालसाहित्यात निश्चितच उल्लेखनीय ठरतो. लेखक प्रा. डॉ. नरसिंग कदम यांचे हे लेखन बालसाहित्याच्या समृद्ध परंपरेत मोलाची भर घालणारे असून या कथासंग्रहाला बालवाचकांसह पालक, शिक्षक आणि रसिक वाचकांचा भरभरून प्रतिसाद लाभेल, असा विश्वास वाटतो.

पुस्तकाचे नाव – गड्या आपुला गाव बरा
लेखक – प्रा. डॉ. नरसिंग कदम
प्रकाशक इसाप प्रकाशन

Related posts

सनदशीर मार्गाने विविध प्रश्नांवर लढा उभारणारी शारदा

मन वृद्ध झाले तर शरीरालाही वृद्धत्व येते

द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406