किशोर कदम लिखित प्रभा प्रकाशन प्रकाशित बालविश्व काव्यसंग्रहसंग्रहाचे प्रकाशन
कणकवली – कणकवलीतील प्रभा प्रकाशन ही संस्था चांगली पुस्तकांची निर्मिती करत असून कोकणात नव्या जुन्या लेखकांसाठी अन्य प्रकाशन संस्था शोधायची गरज भासणार नाही. याच प्रभा प्रकाशन संस्थेने किशोर कदम यांचा बालविश्व हा देखना बालकाव्यसंग्रह प्रकाशित केला असून बालविश्व कवितांमधून बालकांचे नेमकेपणाने बालविश्व प्रकट होते याचा प्रत्यय येतो. कदम यांनी भविष्यात सातत्याने बालसाहित्य लेखन करावे, असे आवाहन जेष्ठ कवयित्री, कादंबरीकार, नाटककार उषा परब यांनी येथे केले.
प्रभा प्रकाशन प्रकाशित आणि किशोर कदम लिखित बालविश्व या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा कणकवली वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात कवी अजय कांडर यांच्या अध्यक्षतेखाली तर उषा परब यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना श्रीमती परब यांनी किशोर कदम यांचा पहिलाच बाल काव्यसंग्रह असूनही त्यातील बालकविता मुलांचे अचूकपणे भावविश्व मांडते. आजच्या काळात लेखन करणारी नवी पिढी बाल लेखनापासून दूर जात असताना किशोर कदम बाल लेखनाकडे वळले हे फार महत्त्वाचे आहे असेही आग्रहाने सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून समाज साहित्य कार्यकर्ते ॲड. विलास परब, ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम, समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर, केंद्रप्रमुख श्री हरकुळकर आदी उपस्थित होते.
गंभीरपणे साहित्य चळवळ राबवली की त्या चळवळीशी जोडून घेऊन लिहिणारी माणसे गंभीरपणे लेखन करतात. किशोर कदम हेही नव्याने अशाच गांभीर्याने कविता लेखन करत आहेत. भवतालाला समजून घेऊन कदम हे बाल लेखन करतात ही चांगली गोष्ट आहे.
अजय कांडर
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक लोक बालसाहित्य लिहीत आहेत परंतु नव्या पिढीमध्ये नव्याने किशोर कदम बालकविता लिहीतात ही सिंधुदुर्गची बाल साहित्य चळवळ पुढे जाणारी महत्त्वाची घटना आहे. चांगलं लिहू पाहणाऱ्याच्या पाठीमागे मोठ्या मनाने प्रोत्साहन देणारी माणसं लागतात. किशोर कदम यांच्या लिहिण्याला प्रभा प्रकाशन प्रेरणा देत आहे अशा गोष्टी अपवादाने आता साहित्य क्षेत्रात घडत आहेत.
विठ्ठल कदम
ॲड. परब म्हणाले, आमच्या गावच्या शाळेतील शिक्षक किशोर कदम आहेत. याचा मला अभिमान वाटतो. किशोर कदम हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. साहित्य क्षेत्रात त्यांची अशीच वाटचाल पुढे पुढे जात राहावी .
श्री मातोंडकर म्हणाले, कदम यांच्या बालकविता वेगळ्या आहेत. त्यांनी कवितेतून प्राण्यांची सभा भरलेली कल्पना मांडली. त्याचे वर्णन केले.वाघ, सिंह, हत्ती यांची शाळा भरवण्याचा विचार केला गेला. हिच कदम यांच्या कवितांची वेगळी गुणवत्ता आहे.
यावेळी किशोर कदम, श्री हरकुळकर यांनीही विचार व्यक्त केले. राजेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत साळुंखे यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.