📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
September 19, 2026
मुक्त संवाद

जन्मजन्मांतरीच्या वैचारिक गुंतवणूकीची गोष्ट: द अल्टिमेट इन्व्हेस्टर… गोष्ट जन्मजन्मांतरीची

आशिष मुळे यांच्या ‘द अल्टिमेट इन्व्हेस्टर’ कादंबरीचे परीक्षण. दोन समांतर कथा, गुंतवणूक, अध्यात्म, नातेसंबंध आणि जन्मजन्मांतरीच्या गूढ प्रवासाची अनोखी सांगड.

संपत्तीची शाश्वत वाढ आपल्यापैकी प्रत्येकालाच हवी असते. आजच्या टोकाच्या अनिश्चिततेच्या जगात तर ती जास्तच तीव्रतेनं हवी असते… पण जास्त म्हणजे किती…एका इन्व्हेस्टरचा उन्नतीकडे जाणारा चित्तथरारक प्रवास उलगडणारी आणि मी हीसुद्धा एक गुंतवणूक आहे… याची प्रचिती देणारी गोष्ट…! गोष्ट जन्मजन्मांतरीची…!

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.
९४२१२२५४९१

बरेच वर्षे कादंबरी वाचनात आली नव्हती आणि अचानकपणे एक नवी कोरी कादंबरी हातात आली.कादंबरीही नवीन आणि लेखकही नवीन.तरीही ती वाचण्याचा योग येईना.अखेर काही दिवसांपूर्वी वाचून झाली.मात्र मनाला एक गोष्ट पटेना.ती म्हणजे लेखकाची म्हणजे आशीष  मुळे यांची ही पहिलीच कादंबरी आहे.

एखाद्या अनुभवी लेखकाने कथानक गुंफत जावे, नवीन पात्रे त्यात वाढत जावीत , मूळ कथानकाशी एकरूप व्हावीत आणि कथानक अगदी शेवटपर्यंत उत्सुकता वाढवणारे होत जावे …ही भट्टी नव्या लेखकाला जमू शकते हे आशिष यांनी दाखवून दिले आहे. फक्त त्यासाठी संपूर्ण कथानकाचा आवाका आणि त्यातून व्यक्त करायचा असलेला आशय प्रथम लेखकाच्या मनात स्पष्ट असायला हवा.आशिष मुळे यांना ते साधले आहे याबद्दल शंका नाही.

खरं तर ही एक कादंबरी नसून एकात एक गुंफलेल्या दोन कादंबऱ्या आहेत.एकीकडे राघव आणि सायली , शिरीन यांची कथा आणि त्याच वेळेला हळूहळू फुलत जाणारी निम आणि नादिया यांची कथा.दोनही कथानकांना पोषक असे वातावरण , त्यानुसार पात्र निर्मिती आणि त्याला उचित ठरेल अशी भाषाशैली.त्यामुळे प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.शिवाय निसर्ग, शहरी वातावरण, हिमालयाचे वर्णन, संवादाची भाषा  या बाबतीत अचूकता आहे आणि या सगळ्याला आध्यात्मिक विचारांची असलेली किनार ! दोन्ही कथानकांमध्ये समतोल साधून मूळ सूत्र सुटू न देता कथानक वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

आवश्यक त्या ठिकाणी गंभीरपणे व्यक्त केलेले विचार हे लेखकाच्या परिपक्व विचारांचे प्रतिबिंब आहे.उदाहरणार्थ, सागराला उद्देशून काढलेले उद्गार पहा :” माणसाचा दुराभिमान आणि अहंकार क्षणात नाहीस करण्याचं आणि त्याच्या क्षुद्रपणाची जाणीव करून देण्याचं सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे  “. किंवा
” आदमी बादशाह नहीं है , वक्त बादशाह है | ” हे वाक्य.
तर दुसरीकडे,  ‘ दारुडा माणूस सगळं विसरत असला तरी स्वतःच्या घरी व्यवस्थित कसा काय पोचतो ?” असा मजेशीर पण खरा प्रश्न त्यांना पडतो. पुढे बिलावाला यांच्या मृत्यूच्या प्रसंगी राघवच्या तोंडी आलेले “मृत्यू थांबवण्याचं काम विज्ञान करु शकत असेल पण मृत्यू टाळण्याचं नाही.” हे वाक्य आपल्याला नकळत एका सत्याची जाणीव करून देते.इनव्हेस्टमेंट संबंधी ‘ बेसीक रुल ‘ राघवच्या तोंडून सांगताना लेखकाच्या अंगभूत व्यावसायिक विचारांची दिशा दिसून येते.तसेच अध्यात्माविषयी आचार्यांनी मांडलेले विचार हे लेखकाच्या अध्यात्म विषयक चिंतनाचे प्रकटीकरण आहे हे जाणवते.

कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात लेखकाने केलेले वर्णन,विवेचन , संवाद वाचल्यानंतर महाभारतातील पांडवांच्या अखेरच्या प्रवासाच्या वर्णनाची आठवण होते.या अखेरच्या लिखाणात दोन जन्मांची घातलेली सांगड अत्यंत कठीण पण कौशल्यपूर्ण आहे.गुंतवणूक संबंधी असलेल्या आपल्या व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव , चिंतनशीलतेची जोड ,मातोश्रींकडून आलेले  लेखनाचे कौशल्य,जगण्याकडे पाहण्याचा चौकटी पलीकडचा दृष्टिकोन या सर्वांच्या घुसळणीतून मिळालेले ‘ रिटर्नस’ म्हणजे द अल्टिमेट इन्व्हेस्टर.. गोष्ट जन्मजन्मांतरीची असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते.

पुस्तकाचे नाव – द अल्टिमेट इन्व्हेस्टर..गोष्ट जन्मजन्मांतरीची
लेखक प्रकाशक – आशिष मुळे
पुस्तक खरेदीसाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.in/d/0hvafOm5

Related posts

साठी पार योगा…

स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता – ऐक सखी

Neettu Talks : टुथपेस्ट निवडताना `ही` काळजी जरूर घ्या…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406