१७ सप्टेंबर २०२६.
प्रथम पुण्यस्मरण वर्षदिन.
गजानन भास्कर मेहेंदळे: एक ऋषितुल्य इतिहास संशोधक !
इतिहास केवळ सांगायचा नसतो, तो पुराव्यांतून शोधायचा असतो… या विचाराला आयुष्यभर जागत गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मराठ्यांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि युद्धशास्त्राच्या अभ्यासासाठी आपले संपूर्ण जीवन वाहून घेतले. मोडीपासून संस्कृत, फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच आणि पोर्तुगीजपर्यंत विविध भाषांचा अभ्यास, देशभरातील ऐतिहासिक साधनांचा शोध आणि हजारो संदर्भांच्या आधारे केलेले लेखन—ही केवळ एका इतिहासकाराची कारकीर्द नव्हती, तर सत्याच्या शोधासाठी केलेली प्रदीर्घ तपश्चर्या होती. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या या असामान्य संशोधनवारशाकडे पुन्हा एकदा पाहण्याची ही संधी…
✍️श्रीनिवास कुलकर्णी
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर,कार्यकारी मंडळ सदस्य,
मो. ९८२२०५१५७४
ज्येष्ठ शिवचरित्रकार आणि इतिहास-संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या एक वर्षांपूर्वी झालेल्या आकस्मिक निधनाने,आपला देश,समाज आणि इतिहास संशोधक क्षेत्र मराठयांच्या इतिहासाच्या आणि युद्ध शास्त्रातील तज्ज्ञ अशा महनीय इतिहास संशोधकाला मुकला आहे.महाराष्ट्राला केवळ गौरवशाली इतिहासच नाही तर तज्ञ इतिहासकारांची गौरवशाली परंपरा देखील लाभली आहे.सातवाहन ते यादव नंतर महापराक्रमी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य ते मराठा साम्राज्य आणि पुढे अनेक क्रांतिकारी स्वातंत्र्यवीरांच्या शौर्य,धैर्य आणि दूरदृष्टीच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहासाचा एक विलक्षण प्रवास महाराष्ट्राने पाहिला आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य हे तर भारतीयांच्या स्वदेश, स्वभाषा आणि स्वधर्म याबद्दलच्या अस्मिता व आकांक्षा यांचा एक दीपस्तंभ म्हणून आजहि उभे आहेत.आधुनिक भारताच्या १९व्या व २०व्या शतकाच्या काळात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, सर गोपाळ कृष्ण भांडारकर,सर जदुनाथ सरकार,सुरेंद्रनाथ सेन,आर. सी. मुजुमदार,ग. ह. खरे,वा.सी.बेंद्रे, सेतुमधराव पगडी,रियासतकार सरदेसाई,बाबासाहेब पुरंदरे यांच्यासारख्या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी इतिहासकारांची एक उदात्त परंपरा उदयाला आली.त्याच ऐतिहासिक विद्वानांच्या पुढच्या काळात सत्यनिष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचा उदय झाला आणि एक इतिहास संशोधनाचे एक नवे पर्व सुरू झाले.
गजाभाऊ मेहेंदळे एक अद्वितीय व्यक्ती :
अफाट वाचन त्यातून मिळविलेले प्रकांड पांडित्य,सखोल संशोधन वृत्ती आणि ध्येयासक्त जीवन जगलेले गजाभाऊ मेहेंदळे,यांनी आपले संपूर्ण आयुष्यच युद्धशास्त्र आणि मराठ्यांचा इतिहासच्या अभ्यासासाठी आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्सल इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले होते,असे म्हटले तर वावगे होणार नाही.स्वर्गीय गजाभाऊंचा जन्म १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला.गजाभाऊंना शालेय जीवना-पासूनच इतिहासाची खूप आवड होती.गजाभाऊंनी १९६९ साली पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि इतिहास अभ्यासाला सुरुवात केली,ती शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहिली.
युद्ध वार्ताहार म्हणून प्रारंभ:
गजाभाऊ वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी दैनिक तरुण भारतचे पत्रकार म्हणून ते १९७१ मध्ये बांगलादेशात युद्धभूमीवर पोहोचले. युद्ध सुरू होण्याच्या सात-आठ महिने आधीच गजाभाऊ युद्ध-भूमीवर पोहोचले होते.त्या वेळी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले नव्हते,पण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होऊन; कारण बांगलादेश मधील मुक्ती वाहिनीने सशस्त्र क्रांती चळवळीला सुरुवात केली होती.त्याच काळात गजाभाऊंनी बांगलादेशच्या वेगवेगळ्या सीमांमधून आत प्रवेश केला आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहून वृत्त पाठविण्यास सुरवात केली होती. त्या काळात त्यानीं अनेक बांग्लादेशी लोकांच्या मुलाखती घेतल्या,त्यांच्या गुप्त शिबिराला भेट दिली.पाकिस्तानी सैन्या ने केलेल्या भयानक अत्याचारांमुळे त्यांच्या विरुद्ध बांगलादेशी जनते मध्ये असलेला प्रचंड तिरस्कार त्यांनी पाहिला.त्यावर वार्तांक केलेले लेख गजाभाऊ तार करून तरुण भारतला पाठवीत असत.प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले तेव्हादेखील गजाभाऊ बांगलादेशातच होते.बांगलादेश मुक्ती वाहिनीच्या एका तुकडी समवेत गजाभाऊ युद्धक्षेत्रात काही काळ वावरले,त्यांच्या बरोबर पाकिस्तानी लष्कराशी झालेल्या चकमकी प्रत्यक्ष अनुभवल्या. आधीपासूनच बांगलादेशात तळ ठोकून असलेल्या अनेक प्रमुख भारतीय लष्करी अधिकाऱ्यांशी त्यांच्या भेटी झाल्या व त्यांच्या बरोबर मुलाखती झाल्या.त्यानंतर त्यांनी भारतीय लष्कराच्या माध्यमातून आजच्या पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवरसुद्धा पत्रकार म्हणून भटकंती केली होती.युद्ध संपल्यावर गजाभाऊ दिल्लीमध्ये परत आले आणि त्यांनी बांगलादेश युद्धावर एक पुस्तक देखील लिहिले.परंतु ते अप्रकाशितच राहिले आहे. गजाभाऊंनी संरक्षण आणि सामरिक युद्धशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली होती.युद्ध पत्रकारितील अनुभवा नंतर,छत्रपती शिवाजी महाराजांवर लष्करी दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या युद्ध नेतृत्वा बद्दल संशोधन करून पुस्तक लिहावे असा विचार त्यांच्या मनात आला.
शिवचरित्रकार गजाभाऊ :
युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राचे संशोधन करण्यास उद्युक्त झाले आणि त्यातून त्यानीं निश्चय केला की,शिवाजी महाराजांच्या चरित्राचा संपूर्ण व सखोल अभ्यास करावयचा,मग त्याच्या संशोधनासाठी त्यांनी मराठी मोडी लिपी बरोबरच संस्कृत,फारसी,उर्दू,जर्मन,फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा अवगत करण्यास प्रारंभ केला. मराठी,हिंदी,संस्कृत आणि इंग्लिश भाषेतील इतिहासाची सर्व साधने यांचा सखोल अभ्यास सुरू केला.ज्याला या भाषा येतात,तोच ऐतिहासिक दस्तऐवज्यांच्या खोलात जाऊन शिवचरित्राचा अभ्यास करू शकतो हे ते पक्के जाणून होते.यासाठी मूळ सर्व भाषांमधील ऐतिहासिक साधने आणि मुघल दरबारची ऐतिहासिक साधने अभ्यासणे आवश्यक होते म्हणून ती सर्व साधने त्यांनी अव्याहतपणे तपासली,अभ्यासली आणि त्याची सत्यता देखील पडताळून घेतली. या सगळ्या अभ्यासासाठी ते भारतभर फिरले.जिथे जिथे ही संदर्भ कागदपत्रे होती,ती शोधून काढली,ती मिळवली आणि अनेक अभ्यासकांशी त्यावर गहन चर्चा केली.त्या सखोल अनेक वर्षांच्या कष्टप्रद संशोधना नंतर त्यांनी शिवचरित्र प्रथम इंग्रजीतून लिहून काढले होते. शिवचरित्राचे मराठीतूनही लेखन पूर्ण केले आणि तीन खंडांत प्रकाशित केले,ज्या मध्ये १६६० पर्यंतच्या शिवकाळाच्या इतिहासावरील २५०० पाने प्रकाशित आहेत.आज मराठीत मध्ये प्रकाशित झालेले असे हे अस्सल ऐतिहासिक संदर्भ असलेले आणि सत्यनिष्ठ लिखाण असणारे दुसरे शिवचरित्र नाही.गजाभाऊनीं २०१२ मध्ये लिहिलेला ‘Shivaji & his Life and Times’ हा एक हजार पानांचा इंग्रजी ग्रंथ आणि ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा अडीच हजार पानांचा मराठी ग्रंथ हे त्यांच्या जवळजवळ ३० वर्षांच्या अथक संशोधन तपस्येतून साकार झाले आहेत.यामध्ये जवळजवळ सात हजार संदर्भ दिले आहेत तसेच उत्कृष्ट नकाशे देखिल आहेत. त्यांचे मराठीत लिहिलेले शिवचरित्र हे इतिहास संशोधक आणि अभ्यासक यांना संशोधन कसे करावे याचा सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक ग्रंथ आहे.
गजाभाऊंनी लिहिलेले इंग्रजी शिवचरित्र:
‘शिवाजी अँड हिज लाईफ अँड टाईम्स’ हे इंग्रजीत आजपावेतो लिहिलेले सगळ्यात उत्कृष्ट आणि वस्तुनिष्ठ शिवचरित्र आहे ज्याला संपूर्ण जगात तोड नाही.त्यातूनच त्यांनी नंतर ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हे या विषयावरील उत्कृष्ट पुस्तक लिहिले.त्यांनी २०१७ साली लिहिलेल्या ‘टिपू: ऍज हि रियली वॉज’ या छोट्या इंग्रजी पुस्तिकेत, टिपू सुलतानची जिहादी व अत्याचारी कारकीर्द उघड करून,टिपूच्या खोट्या उद्गतीकरणाला खोदून काढण्यासाठी लिहून ठेवली आहे.त्या पुस्तिकेतील वैशिष्ट्यपूर्ण स्पष्टतेने,मेहेंदळे यांनी तथाकथित धर्मनिरपेक्ष टिपूला नायक म्हणून नव्हे तर कट्टर इस्लामी महजबी हुकूमशहा म्हणून उघड केले आहे व दीर्घकाळ दडवलेले अस्वस्थ करणारे सत्य लोकं समोर उघड केले आहे. याबरोबरच ‘आदिलशाही फर्माने’ या पुस्तकाचे ते एक लेखक आहेत.गजाभाऊंनी एकदा म्हटले होते,”शिवाजी महाराजांना भारतीय इतिहासातून काढले तर आपला इतिहास कुठे गेला असता?आणि त्यांचा इतिहासात समावेश केला तर कुठे जातो? हे सर्वात महत्त्वाचे आहे. भारतातील इस्लामी जुलमी राजवटींना शिवाजी महाराजांनी रोखले,हे जर कळले तरच शिवचरित्र कळले.”
युद्धशास्त्र तज्ज्ञ गजानान मेहेंदळे :
गजाभाऊंनी सन २००० ते २०१७ अशी १७ वर्षे, पहिले आणि दुसरे महायुद्ध यांचा सखोल अभ्यास करून,त्यावर सुमारे सहा हजार पानांचे,१० ते १२ खंड होतील इतके लेखन पूर्ण केलेले आहे.त्यातील ‘कोड सायफर’ या जटिल विषयावर,म्हणजेच ‘गुप्त संदेश उलगडणे आणि त्यांचे वाचन करणे’,जो त्यांचा अत्यंत आवडीचा विषय होता,या विषयावर देखील त्यांनी लिखाण करुन ठेवले आहे.
कर्मठ इतिहासकार आणि संशोधक गजाभाऊ :
गजाभाऊ १९६८ पासून भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद होते.आज भारत इतिहास संशोधक मंडळातील अनेक तरुण संशोधक हे त्यांचे विद्यार्थी आहेत.मागील पन्नास वर्षात असा दिवस क्वचितच गेला असेल की गजाभाऊंनी शिवकालीन कागदपत्रे अभ्यासली नाहीत किंवा ऐतिहासिक साधनांचा अभ्यासही केला नाही.अभ्यास कसा करावा,काटेकोर लेखन कसे करावे,ध्येयासक्त होऊन काम कसे करावे,अभ्यासासाठी विविध भाषा शिकल्याने कशी माहिती मिळविता येते,हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. शेवटच्या दिवसांतदेखील गजाभाऊ जर्मन भाषा शिकत होते.अतिशय बुद्धिमान आणि दांडगी स्मरणशक्ती असलेल्या गजाभाऊंचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यामधील विशेष उल्लेख करावा लागेल,तो म्हणजे लोकप्रिय व व्यासंगी असणारे पुण्याचे माजी खासदार आणि सध्याचे भाईसमं चे अध्यक्ष श्री. प्रदीपदादा रावत,यांचे ते त्यांचे सगळ्यात जवळचे सहकारी व जिवलग मित्र.प्रदीपदादा रावत यांच्या सर्वप्रकारच्या सहकार्यामुळे आणि पाठपुराव्यामुळे गजाभाऊ इतके मोठे इतिहास संशोधन व लिखाण करू शकले,असे ते स्वतः अनेकदा सांगत असत.माझा त्यांचा सहवास गेली ३० वर्षे होता.मी त्यांचा एक सर्वार्थाने लहानसा शिष्य,मित्र आणि सहकारी होतो.त्यांचा जो विलक्षण सहवास मला लाभला हे माझे परम भाग्य आहे,असे मी मानतो.मला व इतर अनेक सहकार्यांना सामाजिक, व्यक्तीगत विषयांत आणि कठीण प्रसंगात त्यांच्या मिळालेल्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे माझ्या सारख्यासह अनेकांची आयुष्ये उजळली आहेत; हा त्यांच्या सहृदय आणि भावोत्कट स्वभावाचा सकारात्मक परिणाम आहे.
गजाभाऊ; एक संस्था :
भारत इतिहास संशोधक मंडळाबरोबरच भांडारकर संस्था,डेक्कन कॉलेज,श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ,गोखले अर्थशास्त्र संस्था या संस्थांशी गजाभाऊ अनेक वर्षे संलग्न होते.विशेष म्हणजे भारत सरकारच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर) या संस्थेमध्ये गजाभाऊंना निमंत्रण देऊन सल्लागार सदस्य केले गेले होते.महाराष्ट्र शासनाने शिवरायांची जन्मतिथी निश्चित करण्यासाठी केलेल्या समितीत देखील ते होते.काही काळ बालभारतीच्या इतिहास पाठ्यपुस्तक मंडळाचे सल्लागार होते.
सत्यनिष्ठ संशोधक गजाभाऊ:
ते एक कसलेले इतिहास संशोधक होते. त्यांनी पुराव्यांशिवाय कोणतेच लिखाण केले नाही आणि मानले देखील नाही.ते कायम सांगत,’इतिहासकाराने सत्याचीच बाजू घ्यायची असते; मग ते कितीही कठोर वा अप्रिय असले तरी’.गजाभाऊ मेहेंदळे संशोधन इतिहासाच्या प्राथमिक स्त्रोतांमध्ये जास्तीत जास्त खोलात जाऊन करीत असत.म्हणूनच त्यांचे इतिहास-लेखन पुराव्यांवरून परिश्रमपूर्वक तयार केलेले अस्सल दस्तऐवज आहेत.गजाभाऊ मेहेंदळे ऐतिहासिक संशोधनातून त्यातील फक्त आणि फक्त सत्यच निर्भीडपणे सांगणारे एक विलक्षण परखड व्यक्तिमत्त्व होते.अथक विद्वत्तेला समर्पित असलेल्या आयुष्यात,मेहेंदळे यांनी तथ्यातून आख्यायिका वेगळ्या केल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज या अद्वितीय हिंदू शासकाचे खरोखरंच प्रेरणादायी असलेले चरित्र लिहिले.अलिकडच्या काळात,काही बेगडी इतिहासकार व राजनेते राजकीय स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना ‘तथाकथित धर्मनिरपेक्ष’ ठरविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात.त्यासाठी ते बेगडी इतिहासकार असे खोटे दावे करतात की, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम होते,त्यांचे एक गुरु मुस्लिम सूफी होते किंवा त्यांनी मशिदी व दर्ग्यांना अनुदान दिले होते.अशा असत्य व दिशाभूल करणाऱ्या अपप्रचाराला खोडून काढण्यासाठी,गजाभाऊ मेहेंदळे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवक’ नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली आहे,ज्यात सर्व अस्सल ऐतिहासिक संदर्भ व पुराव्यांनिशी त्या बेगडी, बदमाश,भंपक तथाकथित इतिहासकारांचा पूर्ण पर्दाफाश केला आहे.त्यांनी तथाकथित ‘पुरोगामी’ किंवा ‘मार्क्सवादी’ इतिहासकारांना स्पष्टपणे फटकारताना म्हटले आहे की- ‘इतिहासकारांचे काम समाजाला ‘मार्गदर्शन’ करणे नाही तर केवळ कागदपत्रांवरून काय घडले ते सांगणे आहे’ आणि तोच त्यांचा ठाम दृष्टिकोन होता.गजाभाऊ यांनी सांगितले होते की बहुतेक महाराष्ट्रीय मुलांप्रमाणे ते देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून,आदर करत मोठे झाले होते; पण त्यांच्या श्रद्धेचे स्वरूप बदलले आणि त्यांनी लष्करी इतिहासात विस्तृतपणे वाचन केले असता,त्यांना जाणवले की छत्रपती शिवाजी महाराजांची गणना ‘जगातील एक महान सेनापती’ म्हणून केली जाऊ शकते आणि त्यांचा वारसा केवळ फक्त एका धाडसी सेनापतीच्या नव्हता तर एका दूरदृष्टी असणाऱ्या स्वदेश आणि स्वधर्म यावर प्रबळ निष्ठा असणाऱ्या युगप्रवर्तक प्रशासकाचा देखील होता.
तत्त्वनिष्ठ आणि ध्येयासक्त :
गजाभाऊ मेहेंदळे यांनी २०१६ मध्ये,त्यांच्या सर्वात एक महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक संशोधन प्रकल्पाला सुरुवात केली होती.त्याची सुरुवात त्यांच्या एका भाषणाचे शब्दांकन केले गेले होते त्यातून सुरू झाली.”छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते,तर…” ही त्यांच्या त्या अत्यंत प्रभावशाली भाषणाची पुस्तिका.या छोटेखानी पुस्तिकेने इतिहास क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती.छत्रपती शिवराय हे कसे स्वधर्म,स्वभाषा आणि स्वराज्य याचेच निष्ठावान पुरस्कर्ते होते हे या पुस्तिकेतून त्यांनी सप्रमाण भारतातील इस्लामी राजवटींच्या जुलमी कारभाराशी तुलना करून सिद्ध केले आहे.या पुस्तिकेला मिळालेल्या प्रतिसादा मुळेच त्यांनी नंतर “भारतातील इस्लामी राजवटीचे धार्मिक धोरण,त्याचा सत्य इतिहास आणि शिवस्वराज्य” या संशोधन प्रकल्पाला प्रारंभ केला आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते त्याचे संशोधन आणि लिखाण करीत होते.’औरंगजेब व उत्तर कालीन मुघल’ हा त्यांच्या धार्मिक धोरणावरील त्यांचा ग्रंथ प्रकाशित होऊ घातलेला होता आणि त्यांचे आकस्मित निधन झाले.भारतात इस्लामिक सत्तेचे पाय पहिल्यांदा रोवल्यापासून पुढे जवळजवळ हजार वर्षे या राजवटींनी येथील प्रजेवर जे अनन्वित अत्याचार केले याचे सप्रमाण लेखन त्यांनी करून ठेवले आहे.या राजवटींनी अवलंबिलेले धार्मिक धोरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे झालेला आमूलाग्र बदल हा आगामी काळात प्रकाशित होणाऱ्या ‘भारतातील इस्लामी राजवट आणि शिवछत्रपतींचे स्वराज्य’ या ग्रंथाचा विषय असणार आहे. त्यातील ‘इस्लामची ओळख’ हा एक अद्वितीय ग्रंथ अगोदरच प्रकाशित झाला आणि खूप गाजला देखील आहे.याच खंडात्मक ग्रंथ-मालिकेतील मोहम्मद बिन कासीम ते गजनी यांची राजवट,दिल्ली सल्तनती, सर्व मुघल राजवटी,प्रांतिक सल्तनती आणि विशेषतः औरंगजेब,टिपू,अकबर, सूफीमौलवी,यांच्यावरील लिखाण गाजभाऊंनी पूर्ण केले होते व ते प्रकाशित होणे बाकी होते.कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीपासून,सत्कार सोहळे यांपासून पूर्णपणे दूर राहणारे गजाभाऊ मेहेंदळे हे पुणे आणि महाराष्ट्रातील इतरत्र असणारी ग्रंथालये आणि अभिलेखागारां मध्ये रमत होते.त्यांनी त्यांच्या संशोधक जीवनाचा बराचसा काळ भारत इतिहास संशोधक मंडळ आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर सारख्या संस्थांमध्ये घालवला. आज भारत इतिहास संशोधक मंडळ सर्व तरुण विद्यार्थी आणि संशोधक यांना खुले करून देण्यात,गजाभाऊंनी अथक २५ वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्या मुळे शक्य झाले आहे.भारत इतिहास संशोधक मंडळाने राष्ट्रवादी, सत्यनिष्ठ इतिहासकारांचा अभिमानी वारसा जोपासला आहे ज्यात वि.का.राजवाडे, वासुदेव शास्त्री खरे,ग.ह. खरे,दत्तो वामन पोतदार, बाबासाहेब पुरंदरे,असे दिग्गज आहेत,याच परंपरेतील स्व.गजानन भास्कर मेहेंदळे हे त्या गौरवशाली इतिहासकारांच्या मांदियाळीत एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते.शेवटी, पुन्हा एकदा असे म्हटले पाहिजे की महाराष्ट्राला केवळ गौरवशाली इतिहासाची परंपराच नाही तर त्याचे जतन करून लोकांसमोर तो गौरवास्पद इतिहास प्रसारित करणारे महान इतिहासकार देखील लाभले आहेत,गजानन भास्कर मेहेंदळे हे त्यातील एक असामान्य बौद्धिक उंची असणारे इतिहास संशोधक व इतिहासकार होते.आयुष्यभर गजाभाऊंनी इतिहासातील सत्याचा अटूट पाठलाग करीत,एक कालातीत वारसा मागे सोडून हा महान ऋषितुल्य इतिहास तपस्वी आपल्या साठी त्यानीं केलेल्या इतिहास संशोधनाचे मोठे भांडार वारसा म्हणून ठेवून गेला आहे.आपण त्यांचा आदर्श समोर ठेवून,त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून इतिहास संशोधनाचे कार्य पुढे नेणे आणि आपला प्रेरणादायी इतिहास पुढील पिढीला ज्ञात करून देऊन त्यांच्यावर राष्ट्रभक्तीचा आणि हिंदुत्व निष्ठतेचा संस्कार देत राहणे,हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल.

