सत्य काय आहे, त्यांनी दिलेली उदाहरणे खोटी आहेत का हे निवडणूक आयोग पुढे येऊन का सांगत नाही ? त्यांनी केलेल्या आरोपांची स्वत:हून चौकशी का करीत नाही ? जर राहुल गांधी यांचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करीत नाही ? राहुल गांधी किंवा शरद पवार, उद्धव ठाकरे , राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवावर हे निवडणूक आयोगाच्या नावाने शंख फुंकत आहेत मग सत्ताधारी पक्षाचे नेते मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी का धावत येत आहेत ?
डॉ. सुकृत खांडेकर
बिहारमधे सहा नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यात १२१ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले आणि महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे. पश्चिम बंगालसह देशातील बारा राज्यात मतदार याद्यांची पुनर्रचना करण्याचे काम सुरू झाले आहे. मतांची चोरी करून भाजप पाठोपाठ निवडणुका जिंकत असल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष करीत आहेत. गेल्या वर्षी सन २०२४ मधे मतांची चोरी करूनच भाजपने महाराष्ट्र व हरियाणात सत्ता मिळवली असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी केला आहे आणि याच मुद्दयावरून शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या विरोधात हाळी दिली. राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीच्या विरोधात विरोधी पक्षांनी देशात रस्त्यावर संघर्ष सुरू केला आहे आणि त्याच वेळी राहुल गांधी यांनी हरयाणा फाइल्स च्या माध्यमातून भाजपाने मतचोरीच्या बळावर हरयाणाची सत्ता काबीज केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांना भाजपने तर गेल्या दहा- अकरा वर्षापासून पप्पू ठरवले आहे. ते खोटे बोलतात, दडपून बोलतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करतात, निवडणुका आल्या की लपून छपून कंबोडिया व थायलंडला जातात, अशी टीका भाजपचे बडे बडे नेते वारंवार करीत असतात. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, हे भाजपचे राजकारणातील आवडते टार्गेट आहे. पंडित नेहरूंपासून ते राहुल गांधींपर्यंत सर्व घरण्यावर संधी मिळेल तेव्हा टीका करणे हा तर अनेकांचा छंद आहे. पण राहुल गांधी गेले चार महिने व्होट चोरीसारखा गंभीर आरोप करीत आहे, पत्रकार परिषदा घेऊन ठोस पुरावे मांडत आहेत, व्होट चोरीचे प्रेझेंटेशन करीत आहेत, ज्यांची नावे वगळली त्यांना सर्वासमोर उभे करीत आहेत, मतदाराचा निवासी पत्ता शून्य अशी नोंद असलेले कसे असंख्य मतदार आहेत याकडे लक्ष वेधत आहेत. एकाच पत्त्यावर चाळीस पन्नास ऐंशी मतदारांची नोंद कशी आहे हे उघड करीत आहेत. तरीही ते पप्पू आहेत अशी टीका करण्यातच सत्ताधारी धन्यता मानत आहेत.
सत्य काय आहे, त्यांनी दिलेली उदाहरणे खोटी आहेत का हे निवडणूक आयोग पुढे येऊन का सांगत नाही ? त्यांनी केलेल्या आरोपांची स्वत:हून चौकशी का करीत नाही ? जर राहुल गांधी यांचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोग त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का करीत नाही ? राहुल गांधी किंवा शरद पवार, उद्धव ठाकरे , राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवावर हे निवडणूक आयोगाच्या नावाने शंख फुंकत आहेत मग सत्ताधारी पक्षाचे नेते मतचोरीच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी का धावत येत आहेत ?
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी हैड्रोजन बॉम्ब फोडणार असा गाजावाजा मोठा झाला. राहुल यांनी काही आरोप केले की सत्ताधारी लगेचच फुस्स म्हणून संबोधतात पण त्यात तथ्य किती आहे याची कधी चौकशी होत नाही. राहुल यांनी एक तास वीस मिनिटांच्या पत्रकार परिषदेत हरियाणा फाइल्स सादर करून गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत २५ लाख मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. हरयाणात एकूण मतदारांची संख्या दोन कोटी, त्यात जर पंचवीस लाख मतचोरी झाली असेल तर संपूर्ण निवडणूक हा एक मोठा घोटाळा होता असेच म्हणावे लागेल.
ब्राझिलीयन मॉडेलच्या नाव अन् फोटोपासून ते दुबार मतदारांच्या नावापपर्यंत त्यांनी पोलखोल केला. राहुल यांच्या मते हरयाणात पंचवीस लाख मतांची चोरी झाली. बनावट ओळखपत्र वापरून मतदान झाले. ब्राझिलीयन मॉडेलचा फोटो दाखवून तिचे नाव हरयाणात मतदार यादीत आहे व तिने अनेकवेळा मतदान केल्याचा दावा त्यांनी केला. तिने कधी सीमा, कधी स्विटी किंव सरस्वती अशा नावाने मतदान केले आहे. हजारो लोक उत्तर प्रदेश व हरयाणा दोन्ही राज्यात मतदार आहेत व दोन्ही निवडणुकीत ते मतदान करतात हे त्यांनी मतदारांची नावे घेऊन सांगितले. हरयाणाच्या मतदार यादीतून साडे तीन लाख नावे वगळण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.पुलाखाली, रस्त्याच्या कडेला किंवा दिव्याच्या खांबाखाली राहणाऱ्या लोकांचा निवासी नंबर शून्य लिहिण्यात येतो. हे मतदार सहज सापडणे कठीण असते पण निवडणुकीत घराचा पत्ता शून्य असलेल्या हजारो जणांनी मतदान केले आहे. फेक फोटो असलेले एक लाख चोवीस हजार मतदार हरयाणाच्या मतदार यादीत आहेत, असाही आरोप राहुल यांनी केला आहे.
राहुल गांधींनी बिहारमधील काही मतदारांना व्यासपीठावर आणले व त्यांनी आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले. राज्यात दोन कोटी मतदार, पंचवीस लाख मतांची चोरी, याचा दुसरा अर्थ आठ पैकी एक मत बनावट असा निघू शकतो. एका घरात शंभर मतदारांची नोंद आहे, प्रत्यक्षात तिथे कोणीच सापडत नाही, एका घरात दहा पेक्षा जास्त मतदारांची नोंद असेल तर निवडणूक आयोगाने त्याची पडताळणी केली पाहिजे पण तसे कुठे घडत नाही. मतदानांची व्हिडिओग्राफी मागणी करूनही राजकीय पक्षांना दाखवली जात नाही. निवडणूक आयोगाकडे दुबार मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे मग त्या वापर का होत नाही ? हरयाणाच्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोलमधे काँग्रेसच जिंकणार अशी आकडेवारी सांगत होती पण काँग्रेसचा पराभव झाला तो मतचोरीमुळे हाच हरियाणा फाइल्सचा निष्कर्ष आहे.
भाजपने म्हटले आहे की, आम्ही अनेक निवडणुका हरलो, पण आम्ही कधी रडलो नाही. निवडणूक आयोगाला दोष दिला नाही. बिहारमधे मतदारांना विचलीत करण्यासाठी राहुल गांधी मत चोरीचे आरोप करीत आहेत.. राहुल गांधी गेले काही महिने मत चोरीचे आरोप करीत आहे पण त्यांना निवडणूक आयोग समाधानकारक उत्तर देत नाही. मतदान केंद्रावर उमेदवारांचे पोलिंग एजंट असताना त्यांनी आक्षेप का नाही घेतला, असा प्रश्न आयोगाकडून विचारला जात आहे. काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद का मागत नाही अशीही विचारणा केली जात आहे. मतदार यादीत घोळ आहेत, असे सांगून राहुल गांधी स्वत:चे अपयश लपवत आहेत, असे केंद्रीयमंत्री किरेन रिजिजू यांनीच म्हटले आहे. यापुर्वीच्या निवडणुकांमधे इव्हीएममधे बिघाड किंवा बूथ कॅपचरिंगचे आरोप झाले आहेत. पण निवडणूक आयोगावर थेट आरोप कधी झाले नव्हते. मतांची चोरी करून राज्याराज्यांत सत्ता काबीज केली जात आहे हा आरोप गंभीर आहे. नेमके सत्य काय आहे हे जनतेपुढे येणे आवश्यक आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
