
गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ बाह्य गुरूंना वंदन करण्याचा दिवस नाही; तर आपल्या अंतर्याम्यातील विवेकगुरूचा आवाज ऐकण्याचाही दिवस आहे. जीवन, कर्तव्य, क्षमा, कृतज्ञता आणि अपूर्णतेचा स्वीकार यांविषयीचा हा आत्मसंवाद प्रत्येकाला स्वतःकडे नव्याने पाहायला शिकवतो.
यशवंत थोरात
आज मी माझ्या अंतर्याम्यातील गुरुला विचारले, “आजच्या दिवशी मला काय सांगशील?”
तो म्हणाला—
“यशवंत, लक्षात ठेव—काळ ही सतत कमी होत जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे चार गोष्टींबाबत सदैव सजग राहा.
पहिली गोष्ट.ज्यांचे आभार मानायचे राहिले असतील, त्यांचे आभार मान.ज्यांना क्षमा करायची असेल, त्यांना क्षमा कर.ज्यांची क्षमा मागायची असेल, ती विनम्रपणे माग.आणि ज्यांचे योगदान मान्य करायचे असेल, ते मनापासून मान्य कर.हे सारे शांतपणे कर—दिखाऊपणाने नव्हे.
दुसरी गोष्ट.तुझ्या आयुष्याचे खरे मोजमाप हे नाही की तुझी आठवण किती दिवस राहील; तर हे आहे की जे काही काम तुझ्या वाट्याला आले, त्यात तू प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले योगदान दिलेस का.जर उत्तर ‘हो’ असेल, तर मनःशांती बाळग.आपले कर्तव्य पूर्ण झाल्यावर नाव, मान, स्मृती किंवा कायमस्वरूपी स्थान मिळावे, ही आसक्ती सोडून दे.स्वतःला अपरिहार्य समजून त्यालाच चिकटून राहणे, हे मनाच्या कारागृहाकडे जाणारे एकमार्गी तिकीट आहे.
तिसरी गोष्ट.आश्चर्य अनुभवण्याची क्षमता जप.ध्यान कर. वाच. लिही. चालत राहा. पावसाकडे निरखून पाहा. विद्यार्थ्यांशी आणि मुलांशी मनमोकळेपणाने बोल.आणि संध्याकाळचा प्रकाश झाडांवर अलगद उतरू लागला की, पाटगावच्या तुझ्या वनकुटीत निवांत बस. त्या क्षणी काहीच घडण्याची गरज नाही, हे मनापासून अनुभव.तू आत्मसाक्षात्कार प्राप्त केला आहे म्हणून नव्हे, तर हा क्षण जसा आहे तसाच पूर्ण आहे म्हणून.
आणि शेवटची गोष्ट.एक गोष्ट कायमची सोडून दे—सर्व काही पूर्ण करूनच उठायची महत्त्वाकांक्षा.माणूस कधीच पूर्ण होत नाही.जीवन हे पूर्ण करून ठेवायचे हस्तलिखित नसते; ते काळ संपेपर्यंत सुरू राहणारे एक संभाषण असते.
मी हसलो आणि म्हणालो, “हे तर फार शहाणपणाचे बोल आहे. पण सांग, तू स्वतः हे सगळे आचरणात आणलेस का?”
तोही हसला आणि म्हणाला,
“प्रश्न तू विचारलास; मी नाही!
