पावसाळ्यात वातावरणातील गारवा, सततचा ओलावा आणि बदलते हवामान यामुळे पचनशक्ती मंदावते आणि शरीराची प्रतिकारक्षमताही प्रभावित होऊ शकते. त्यामुळे या ऋतूत काय खावे, कोणते पाणी प्यावे, स्वच्छता कशी राखावी आणि दैनंदिन जीवनशैलीत कोणते बदल करावेत, याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आयुर्वेदातही वर्षा ऋतूत वातदोष वाढण्याचा उल्लेख आढळतो. या पार्श्वभूमीवर आहार-विहाराची योग्य काळजी घेतली तर पचनाच्या तक्रारी, अंगदुखी, सांधेदुखी आणि संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. वर्षा ऋतूत आरोग्याची नेमकी कोणती काळजी घ्यावी? याबाबत डॉ. राधा खडक्कार ( मोबाईल - 8805643624 )यांचे सविस्तर मार्गदर्शन…
शरीराची स्थिती: वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) गार वारा व पावसामुळे शरीरातील जठराग्नी (पचनशक्ती) मंद असते व बळ क्षीण झालेले असते.
दोष: या काळात शरीरात वात दोष प्रामुख्याने वाढतो.
लक्षणे: वात वाढल्यामुळे अंगदुखी, सांधेदुखी व विविध प्रकारचे इन्फेक्शन्स पाहायला मिळतात.
१. आहार (काय खावे व कसे खावे?)
पचनशक्तीनुसार अन्न: पूर्वी खाल्लेले अन्न पूर्ण पचल्यानंतर आणि भूक लागल्यावरच जेवण करावे.
ताजे व गरम अन्न: अन्न नेहमी ताजे व गरम असावे. शिळे,थंड किंवा फ्रिजमधील अन्न खाणे टाळावे.
आहारातील रस: आहारात मधुर,आम्ल (आंबट)आणि लवण (खारट)रसांचे सेवन करावे.
काय खावे:
जुने जव, गव्हाचे पीठ, तांदूळ आणि मुगाचे कढण (सूप).
जिरे, हिंग, गरम मसाला आणि लसूण यांची फोडणी दिलेले व पचायला हलके असणारे पदार्थ.
काय टाळावे:
मैदा, बेसन आणि बाहेरचे पचायला जड असलेले पदार्थ टाळावेत.
पचायला जड अन्न खाल्यास अन्नाचे पचन न होता आमनिर्मिती (टॉक्सिन्स)होते व विविध आजार निर्माण होतात.
२. पेय (पाणी कसे प्यावे?)
उकळलेले पाणी: उकळून थंड केलेले स्वच्छ व निर्मळ पाणी प्यावे.
पावसाचे पाणी: आकाशातून पडणारे पावसाचे पाणी स्वच्छ पात्रात साठवून पिणे सर्वोत्कृष्ट मानले आहे.
बाहेरचे पाणी/अन्न टाळावे: रस्त्यावरील/ठेल्यावरील पाणीपुरी किंवा उघड्यावरील अस्वच्छ पाणी व अन्न खाणे टाळावे, कारण त्यामुळे त्वरित इन्फेक्शन्स किंवा पोटदुखी होऊ शकते.
३. विहार व जीवनशैली (काय करावे?)
वस्त्र व स्वच्छता: हलके, पातळ, कोरडे व स्वच्छ कपडे घालावेत.
उटणे व लेप: शरीराला उटणे लावावे, आंघोळीनंतर सुगंधी द्रव्यांचा लेप लावावा.
कोरड्या जागी राहावे: ओलावा असलेल्या ठिकाणी राहणे टाळावे; अन्यथा फंगल इन्फेक्शन्स (त्वचेचे आजार) होऊ शकतात.
अभ्यंग (तेल मालिश):
वातदोषामुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे शरीराला तेल लावणे (अभ्यंग) गरजेचे आहे.
यामुळे वाताचे शमन होते, त्वचेला स्निग्धता येते आणि सांधेदुखी/मानदुखी कमी होते.
यासाठी तिळतेल (किंवा वैद्यकीय सल्ल्यानुसार तेल) सर्वोत्तम मानले जाते.
चप्पल वापरणे:
घराबाहेर आणि घरातही चप्पल वापरावी.
घरातील फरशी थंड असल्याने अनवाणी चालल्यास पाय थंड पडून वातदोष वाढतो.
बाहेर अनवाणी फिरल्यास अलस (फंगल इन्फेक्शन्स) सारखे आजार होऊ शकतात.
४. अपथ्य (काय टाळावे?)
सत्तू: पचायला जड असल्यामुळे सत्तू खाणे टाळावे.
झोप व जागरण: दिवसा झोपणे आणि रात्री जागरण करणे दोन्ही टाळावे.
अति व्यायाम: अतिप्रमाणात व्यायाम किंवा जिममध्ये खूप घाम गाळणे टाळावे, कारण यामुळे वातदोष वाढून पाय किंवा शरीर दुखू शकते.
इतर: ताक पिणे टाळावे व मैथुन वर्ज्य करावे.
