May 30, 2026
Home » दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

दृष्टिदिव्यांगांनी स्पर्श, गंध, चवीतून ‘अनुभवले’ वनस्पतीजगत

Visually impaired students exploring plants through touch and smell during National Science Day activity at Shivaji University Kolhapur.

शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘सुगम्यविज्ञान’ उपक्रम

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाने यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त दृष्टीदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘बीजारोपण ते उत्पादन’ या विषयावर विशेष ‘सुगम्यविज्ञान’ हा उपक्रम आयोजित केला. याअंतर्गत स्पर्श, गंध, आकार आणि चवीच्या माध्यमातून विविध वनस्पती ओळखण्याचे तंत्र या विद्यार्थ्यांना आत्मसात करता आले. वनस्पतीजगताची अनोखी ओळख आणि अनुभव या विद्यार्थ्यांना घेता आला.

राष्ट्रीय विज्ञान दिन – २०२६ अंतर्गत शिवाजी विद्यापीठात युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्यावतीने दृष्टि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित विज्ञान उपक्रम राबविण्यात आला. बीजरोपणापासून उत्पादनापर्यंतच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर करत वनस्पतींची वाढ, बियांची रचना, अंकुरण प्रक्रिया, रोपांची निगा आणि शेतीतील उत्पादन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना विविध फळे, मसाले, औषधी व सुगंधी वनस्पतींचे स्पर्श, गंध तसेच चव यांच्या माध्यमातून ओळख करून देण्यात आली.

या उपक्रमात सुशिलाबाई घोडावत अंध विद्यालय (सांगली-मिरज), ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध विद्यालय (कोल्हापूर) आणि श्री सद्‌गुरु धोंडीराज निवासी अंध विद्यालय (पलूस) येथील सुमारे शंभर दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांच्यासोबत त्यांचे शिक्षक आणि पालकही उपस्थित होते. स्पर्श, सुगंध, चव आणि आकार यांच्या आधारे वनस्पती ओळखण्याचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. माधुरी वाळवेकर, संयोजक डॉ. एस. आर. यंन्कंची, युजीसी स्कीम फॉर पर्सन्स विथ डिसेबिलिटीज आणि समावेशी शिक्षण संसाधन केंद्राच्या समन्वयक डॉ. प्रतिभा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा जाधव आणि डॉ. एस. ए. पाटील यांनी उपक्रमाचे नियोजन केले.

Related posts

तंजावरमधील मराठा समाधी संकुलाचे होतय नूतनीकरण

ओळखा पाहू ? हे छायाचित्र कोणत्या गडाचे आहे ?

वाचककेंद्री पत्रकारिता : जगातील माध्यमांनी शोधलेले नवे सूत्र

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!