May 27, 2026
Home » श्रीराम पचिंद्रे यांच्या कादंबरीतील पाठ मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

श्रीराम पचिंद्रे यांच्या कादंबरीतील पाठ मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमात

Shriram Pachindre Shahu novel chapter included in Madhya Pradesh school textbook curriculum

कोल्हापूर: श्रीराम पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ ह्या कादंबरीतील एका प्रकरणाचा मध्य प्रदेश सरकारच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश केला आहे. मध्य प्रदेशच्या शालेय अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली आहे. मराठी माध्यमाच्या ‘प्रथम भारती’ ह्या मराठीच्या इयत्ता सातवीच्या पुस्तकासाठी ह्या पाठाची निवड केलेली आहे.

पचिंद्रे यांच्या ‘शाहू’ कादंबरीच्या मराठी आणि इंग्रजी अनुवादाच्या नऊ -नऊ आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. याच कादंबरीतील पाठ बालभारतीच्या शालेय अभ्यासक्रमात इयत्ता पाचवीच्या पुस्तकात यापूर्वीच समावेश करण्यात आलेला आहे.

‘शाहू’ ही श्रीराम ग. पचिंद्रे यांनी राजर्षी शाहू महाराजांवर लिहिलेली पहिली आणि एकमेव कादंबरी आहे. ती प्रथम २००४ मध्ये विदर्भ सत्यशोधक मंडळातर्फे प्रकाशित झाली. त्यानंतर पुण्यातील प्रकाशकांकडून पुढील काही आवृत्त्या प्रकाशित झाल्या. सातवी आणि आठवी आवृत्ती कोल्हापूरच्या अक्षरदालन या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केली. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी या कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केला. इंग्लिश अनुवादाच्या देखील आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. गोव्याच्या बुक वे या प्रकाशन संस्थेने इंग्लिश अनुवादाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आणि त्यानंतरच्या इंग्लिश अनुवादाच्या सर्व आवृत्त्या कोल्हापूरच्या वृषाली प्रकाशनाने प्रकाशित केल्या.

शाहू कादंबरीवर चार विद्यार्थ्यांनी एम. फील. केलेली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रमात बालभारती ह्या मराठीच्या पुस्तकात पाचव्या इयत्तेमध्ये शाहू कादंबरीतील पाठ समाविष्ट करण्यात आला. गेल्या काही वर्षात लाखो विद्यार्थ्यांनी या पाठाचा अभ्यास केला. आता हा पाठ मध्य प्रदेश सरकारच्या ‘प्रथम भारती’च्या इयत्ता सातवीच्या पुस्तकात समाविष्ट होत आहे.

‘शाहू’ या कादंबरी विषयी प्रख्यात साहित्यिक गंगाधर गाडगीळ म्हणतात, “शाहू कादंबरीत राजर्षी शाहू महाराजांचं प्रभावी बहुरंगी व्यक्तिमत्त्व परिणामकारकपणे व्यक्त झालेलं आहे. एक राजा म्हणून त्यांनी केलेल्या बहुविध कार्याचचं दर्शन श्रीराम पचिंद्रे यांनी घडवलं आहे. हा राजा किती साधा होता, अगदी कुष्ठरोग्यांपासून आपल्या सर्व प्रजाजनांची कशी काळजी घेत असे, त्याची हृद्य नोंद पचिंद्रे यांनी केलेली आहे. शाहू महाराज हा कादंबरीला अगदी योग्य विषय आहे आणि श्री. पचिंद्रे यांनी त्याला न्याय दिलेला आहे. ही कादंबरी लिहून मराठी साहित्यातील एक त्रुटी त्यांनी समर्थपणे भरून काढली आहे.”

महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते आणि सुजाण वाचक, माजी केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणतात, “अतिशय सुरेख अशी ही कादंबरी आहे शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा वारसा चालवणारे शाहू महाराज समताग्रणी होते. ही कादंबरी वाचताना पुढे काय अशी उत्सुकता वाटत राहाते. पचिंद्रे यांची ओघवती भाषा, शब्दांची मांडणी वाचनीय आहे. साध्या, सरळ आणि सोप्या शैलीतील ही कादंबरी मनाला तर सुखावतेच, पण विचार करायला लावते. राजा कसा असावा ? प्रजेबद्दलची त्याची कर्तव्य काय ? त्याचे रोजचे व्यवहार कसे चालतात इत्यादी अनेक प्रश्न मनात उद्भवतात. ‘शाहू’ या कादंबरीमध्ये त्याची उत्तरे मिळतात.”

Related posts

आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज

भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…

UPSC वनसेवा परीक्षेत मराठी विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!