📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 18, 2026
विश्वाचे आर्त

भास-अभास

Dnyneshwari article by Rajendra Ghorpade on Illusion

आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत ?

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल 9011087406

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।
तेंचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।। 97 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 था

ओवीचा अर्थ – अथवा जो नावेत बसून जातो, त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते पण वस्तूस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो.

विहिरीच्या काठावर उभे राहून विहिरीत पाहिले, तर आपलेच प्रतिबिंब आपणास दिसते. ते आपले प्रतिबिंब असते. आपण स्वतः तेथे नसतो. म्हणजे तो आणि मी वेगळे आहोत. याची जाणीव आपणास असायला हवी. मडक्‍यात पाणी भरून मडके बाहेर ठेवले तर त्यात आकाश दिसते. मडक्‍यातही ते आकाश सामावते. पण ते मडके फुटले तर ते आकाशही नाहीसे होते. याचा अर्थ मडक्‍यात असणारे आकाश हे खरे नव्हते. त्या आकाशाची ती प्रतिमा होती. नावेमध्ये किंवा रेल्वेतून प्रवास करताना आपणास बाहेरची झाडे मागे मागे पळत जात आहेत असे वाटते. प्रत्यक्षात झाडे आहेत तिथेच असतात आपण पुढे जात असतो. त्यामुळे आपणास तसा भास होतो. मांजराने हवेत उडी मारली तेव्हा त्याची प्रतिमा भिंतीवर उमटली. त्यात ते मांजर न वाटता बिबट्या वाटला. पण प्रत्यक्षात तो तसा भास होतो. खरे तर ते मांजरच आहे. 

आपणाला जे भासते ते खरे नसते. खरे काय आहे हे ओळखायला हवे. दृष्टीभासाची अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतात. यातून सांगण्याचे तात्पर्य हेच आहे की सत्य परिस्थिती काय आहे हे ओळखायला हवे. आपण म्हणजे कोण आहोत? आपले नाव म्हणजे आपण आहे का ? नाही, कारण एकाच नावाची अनेक माणसे असू शकतात. मग आपण कोण आहे? हे नाव शरीराला दिले आहे. मग आपण म्हणजे शरीर आहोत का ? पृथ्वी, आप, वायू, तेज, गगन या पंच महाभूतांनी हा देह, हे शरीर तयार झाले आहे. ते आपण आहोत का? नाही कारण आपण मेल्यानंतर हे शरीर पंचत्वात विलीन होते. विविध रसायनांनी युक्त असणारे हे शरीरही आपण नाही. कारण या शरीरात जो पर्यंत जीव आहे तोपर्यंत हे शरीर जिवंत आहे. तो जीव गेला की शरीराची क्रिया संपते. त्या शरीराला मग किडा मुंगा लागतात त्या लागू नयेत यासाठी ते शरीर जाळले जाते. किंवा त्यापासून रोगराई पसरू नये यासाठी ते जमिनीत गाढतात. म्हणजे शरीर हे नष्ट होते.

मग या शरीरात असणारा जीव आपण आहोत का? या जीवात असणारा हा आत्मा म्हणजे मी आहे का? मी आत्मा आहे. हे खरे आहे. पण तो प्रत्येकाच्या शरीरात आहे. शरीराची नावे वेगळी असली तरी आत्मा हा एकच आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा हा एकच आहे. सबका मालिक एक हे यासाठीच म्हटले आहे. हा आत्मा अविनाशी आहे. तो ओळखायला हवे. शरीरात आल्यामुळे तो आपणास वेगळा वाटत नाही. प्रत्यक्षात शरीर आणि आत्मा हे वेगवेगळे आहेत. हे ओळखायला हवे. हे ज्याने ओळखला तोच आत्मज्ञानी होतो.

Related posts

संसार भय नाहीसे कसे करायचे ?

पल्लवीचे महत्त्व जाणा…

आपणपेयां या एका शब्दात ब्रह्मज्ञानाचे, आत्मसाक्षात्काराचे, ध्यानाचे आणि भक्तीचे रहस्य

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!