कोल्हापूर : बौद्धिक हक्क संपादन करणे ही आजच्या काळाची महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. गजाजन राशीनकर यांनी केले. मराठी विभाग आयोजित ‘स्वामित्व हक्क : काही नव्या दिशा’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार होते.
डॉ. राशीनकर म्हणाले, कोणतीही सर्जनशीलता नावीन्यपूर्णरित्या जेव्हा प्रत्यक्ष रूपात अवतरते तेव्हा त्या कर्त्याला स्वामित्व हक्क प्राप्त होतो. यासाठी कोणत्याही वयाची अट असत नाही. आजच्या एआयच्या जमान्यात याकडे आपल्या हक्काची बाब म्हणून गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी काही आवश्यक बाबींची पूर्तता पूर्ण करून, ज्ञानक्षेत्रात काम करणाऱ्यांनी स्वामित्व हक्क प्राप्त करावा. याबरोबरच त्यांनी कॉपीराईट वापरण्याच्या संदर्भातील कायदे व नियम यासंदर्भात मूलभूत असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. पवार म्हणाले, कल्पनांना स्वामित्व हक्क नाहीत; पण आजचा तुमचा विचार उद्या एका नव्या जगात घेऊन जाणारा ठरणार आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाची काळजी म्हणून याकडे पाहणे गरजेचे आहे.
यावेळी प्रा. नंदकुमार मोरे यांच्या पुस्तकाला ‘असे होते आपले शाहू महाराज’ या पुस्तकाला स्वामित्व हक्क मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. रणधीर शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन भक्ती नाईक यांनी केले. आभार ज्योती वराळे यांनी मानले. यावेळी डॉ. सुखदेव एकल, लेखिका विमल मोरे, डॉ. कोळेकर व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.
