मुंबई कॉलिंग:
अजितदादांच्या मृत्यूभोवती गूढ कायमच; अधिवेशनात मात्र शांतता !
महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला दोन महिने उलटत असतानाही या प्रकरणावर विधिमंडळात सविस्तर चर्चा झाली नाही, ही बाब अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली आहे. अपघात की घातपात, ब्लॅक बॉक्सचे काय झाले, एफआयआर का नोंदवला गेला नाही—अशा अनेक शंकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाही अधिवेशन शांततेत संपले. विरोधकांनी चर्चा घडवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. त्यामुळे अजितदादांच्या मृत्यूभोवतीचे गूढ अधिकच गडद झाले आहे.डॉ. सुकृत खांडेकर
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. पाच आठवडे पण प्रत्यक्षात वीस बैठका झाल्या. या काळात १९७ तास ३७ मिनिटे कामकाज झाले. पण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्युविषयी चर्चा झाली नाही. विरोधी पक्षांनी अजितदादांच्या मृत्युवर चर्चा घडविण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही. शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी , अजितदादांच्या विमान दुर्घटनेत घातपात किंवा कारस्थान असल्याचे आढळल्यास सरकार आकाश पाताळ एक करीन व यामागे कुणीही असले तरी त्याचा मुडदा खणून काढला जाईल, असे ठणकावून सांगितले.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते. तब्बल अकरा वेळा त्यांनी राज्याचा अर्थंसंकल्प सादर केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस ( अप ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. महायुती सरकारमधील घटक पक्षाचे प्रमुख होते. शरद पवारांचे पुतणे हे नाते तर राज्यात घराघरांत सर्वांना ठाऊक होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमानअपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वत्र संभ्रमाचे वातावर निर्माण झाले, त्यांचा मृत्यु हा अपघात की घातपात ? या विमान अपघातामागे दोषी कोण आहे ? ब्लॅक बॉक्स जळाला की सुरक्षित आहे ? तिथे झाडच नाही मग विमान झाडावर कसे आदळले ? व्हीएसआर विमान कंपनीच्या सेवेबद्दलही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. कंपनीचे मालक मोकाट कसे ? इथपासून त्यांच्या मृत्यूमागे कोणी काळी जादू केली आहे काय ? इत्यादी प्रश्नांचा व शंका कुशंकांचा गेले दिड पावणे दोन महिने भडिमार होत आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली, अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निवेदन केले पण या संवेदनशील विषयावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा का झाली नाही ? सरकारची इ्च्छा नव्हती ? अजितदादांच्या मृत्युच्या घटनेची तीव्रता कमी झाली ? की चर्चेसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी विरोधी पक्ष कमी पडला ?
अजितदादांच्या विमान अपघाती मृत्युला नेमके कोण जबाबदार आहे, असा प्रश्न सरकारला विचारण्याची संधीच विरोधी पक्षाला मिळाली नाही. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही. विरोधी पक्षा्च्या बाकांवरून सरकारला कठोर शब्दात जाब विचारणारे कोणी नाही. गेले दिड महिना आमदार रोहित पवार अजितदादांच्या मृत्युची सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी मुंबई –दिल्लीत सर्वत्र वणवण फिरत होते.सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही ते भेटले. ते अजितदादांचे पुतणे असल्याने त्यांची त्यामागे तळमळ आहे हे समजू शकते पण विधिमंडळात अजितदादांचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही चर्चेसाठी आग्रह धरला असे दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ( अप ) हा पक्ष सत्तेत सहभागी आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत व त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. प्रफुल पटेल व सुनिल तटकरे हे दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांशी थेट बोलू शकतात. तरीही दादांच्या मृत्युवर पाच आठवड्याच्या अधिवेशन काळात सभागृहात चर्चा होऊ नये याचे आश्चर्य वाटते.
रोहित पवार यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस स्टेशनवर अजितदादांच्या मृत्युप्रकरणी एफआयआर नोंदवि्ण्याचा प्रयत्न केला. पण तेथे त्यांनाच नकार देताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जी उत्तरे दिली ती चिंताजनक होती. नंतर रोहित यांनी बारामतीला जाऊन तेथे पोलीस स्टेशनवर एफआयआर नोंदविण्याचा प्रयत्न केला तिथेही त्यांना नकार देण्यात आला. अजितदादांच्या मृत्युनंतर महाराष्ट्रात पोलिसांकडे एफआयआर सुध्दा नोंदवला गेलेला नाही. राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले , रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेतली , अजितदादांच्या मृत्युची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी त्यांनी मागणी केली. पुढे काय झाले, सीबीआय कडे चौकशी सोपविण्यात आली का ? याची कोणतीही माहिती पुढे आलीच नाही. ज्या अजितदादांनी त्यांच्या हयातीत हजारो लोकांना न्याय दिला, सामान्यांना आधार दिला, स्वत:च्या पायावर उभे केले, त्यांच्या आकस्मिक अपघाती मृत्युच्या चौकशीसाठी राजकीय उदासिनता दिसते, हे अतिशय वेदनादायी आहे.
राहुल गांधी यांच्या सल्ल्यावरून रोहित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरू पोलीस स्टेशनवर अजितदादांच्या मृत्युविषयी एफआयआर नोंदवला. ही बाब अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खटकली. रोहित पवारांनी तर एफआयआरची प्रत सभागृहातच दाखवली तेव्हा भाजपाच्या सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. महाराष्ट्रात एफआयआर नोंदवला जात नाही आणि कर्नाटकमधे झिरो एफआयआर नोंदवला जातो हा महाराष्ट्राचा अवमान आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. महाराष्ट्राची देशात मानहानी व्हावी म्हणून तेथे झिरो एएफआयआर नोंदवला गेला आहे. कर्नाटकात राजकीय सूड बुध्दीने एफआयआर नोंदवला आहे, अशीही टीपणी मुख्यमंत्र्यांनी केली. महाराष्ट्रात तपास नीट चाललेला नाही, हे दाखविण्यासाठी बंगळुरूमधे एफआयआर नोंदविण्यात आला ही बाब मुख्यमंत्र्यांना मुळीच आवडलेली नसावी.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचे पुत्र पार्थ राज्यसभा खासदार झालेत. मग महाराष्ट्रात एफआयआर नोंदवायला पोलीस नकार का देतात? जय पवार यांनीही ९ मार्च रोजी आपण पत्रकार परिषद घेणार आहोत असे म्हटले होते. पण कुणाच्या सल्ल्यावरून ती रद्द झाली हेही गुलदस्त्यात आहे.
अभिनेता सुशांत सिंग याची मुंबईत झालेली हत्या की आत्महत्या यावरून काही वर्षापूर्वी देशभर वादळ उठले होते. त्याच्या वडिलांनी बिहारमधे पोलीस स्टेशनवर एफआयआर नोंदवला व तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांत सिंग मत्युची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी केंद्र सरकारला शिफारस केली. बिहारमधे एफआयआर नोंदवला म्हणून तेव्हा महाराष्ट्रात कुठे गहजब झाला नव्हता.
रोहित पवार यांचे अजितदादा काका आहेत, पण याचा अर्थ त्यांचा कळवळा केवळ तुम्हालाच आहे, असे समजू नका, माझे ते निकटचे मित्र होते, अशा कानपिचक्याही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रोहित यांना दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस ( अप ) चे आमदार अमोल मिटकरींनी विधान परिषदेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी दादांवर केलेली कविता म्हणून दाखवली- माफ करा दादा आम्हाला, तुम्हाला विसरू शकत नाही, अर्थसंकल्पीय अधिवेशनात, तुम्हाला न्याय देऊ शकलो नाही…. भोंदू बाबा अशोक खरातचे शेकडो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, पण अजितदादांचा विमान अपघातात मृत्यु होऊन दोन महिने होत आले तरी साधे सीसीटीव्ही फूटेज पुढे येत नाही…. अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
