May 21, 2026
Home » विठ्ठलाच्या मागे लोड का लावतात ?
मुक्त संवाद

विठ्ठलाच्या मागे लोड का लावतात ?

Why Load put behind Vittal in Pandharpur Temple

श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो.

मीरा उत्पात-ताशी.

तुम्ही विठ्ठलरूक्मिणीचे सध्या काढलेले फोटो पाहात असाल तर तुम्हाला विठ्ठलाच्या मागे लोड लावलेला दिसेल. आणि रूक्मिणी मातेच्या मागे तक्क्या लावलेला. दिसेल. याच्या मागे काय कारण आहे? ही काय परंपरा आहे? असा प्रश्न पडला असेल ना? तर त्याचं उत्तर असं आहे की आषाढी वारीची देव सुद्धा वाट पहात असतो. या विठ्ठलाचं सगळं उलटं आहे. इतर ठिकाणी भक्त देवाच्या भेटीसाठी आतुर असतात. पण इथे देव सुद्धा भेटीसाठी भक्तांइतकाच आतुर असतो.

आषाढी कार्तिकी विसरू नका मज।
सांगतसे गूज पांडुरंग।
असं प्रत्यक्ष विठ्ठल सांगतो आहे. कारण त्याला भक्तांचा नित्य सहवास आवडतो. त्यामुळे जसे भक्त त्याच्या भेटीसाठी आसुसलेले असतात. तसा तोही त्यांच्या भेटी साठी आसुसलेला असतो. त्यामुळेच तो केवळ आणि केवळ त्यांच्या मनमुक्त भेटीसाठी आपले राजोपचार त्यागतो. अन् विटेवर तासन् तास तिष्ठत उभा राहतो. काकडा, अपरान्ह पूजा, धुपारती, शेजारती सगळं सगळं त्यागतो. केवळ नित्य स्नान आणि भोजन इतकेच उपचार करवून घेतो.. ज्यामुळे भक्तमांदियाळींना अविरत भेटता येईल. आणि त्यांचं सुखदुःख जाणता येईल. देवाणघेवाण होईल. कारण देवालाही आपली सुखदुःखं सांगायची आहेत. त्याला हे सांगायला भक्तांशिवाय कोण आहे? तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी। म्हणे चक्रपाणी नामयासी।

इतर उपचारांमध्ये, निद्रेमध्ये कालापव्यय होईल. पर्यायाने भक्तांच्या भैटीचा कालावधी कमी होईल म्हणून देव या साऱ्या गोष्टी त्यागतात. अन् केवळ भक्त भेटीसाठी विटेवर उभे राहतात.
ते अगदी यात्रा संपेपर्यंत. मग रात्रंदिवस उभं राहून देवाला किती शीण होतो. श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो लोड आषाढ शुद्ध द्वितीये पासून प्रक्षाळपुजा होईपर्यंत असतो. आणि देवही प्रक्षाळपूजेपर्यत भक्तभेटीसाठी तिष्ठत उभा असतो.. रूक्मिणीमातेसह…

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

तपोवन आश्रमाची स्थापना

प्रेमासाठी स्वातंत्र्याची छाटणी : ‘माझं’ आणि ‘आपलं’ यामधला मानवी संघर्ष

संस्कृती संरक्षण हवे देशाच्या संरक्षणासाठी

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406