आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
जवळपास सलग महिनाभर थंडीची अनुभूती-
तीस नोव्हेंबर पासुन ते १९ डिसेंबर( वेळ आमावस्या)पर्यंतच्या २० दिवसात महाराष्ट्रात जाणवलेली थंडी अजुन तशीच पुढे ९ दिवस म्हणजे रविवार ( दि. २८ डिसेंबर ) पर्यन्त जाणवू शकते. उत्तरेतील ही थंडी सध्या महाराष्ट्र ओलांडून तेलंगणा कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. नाताळ सणादरम्यानच्या ह्या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटांची शक्यताही नाकारता येत नाही.
विदर्भात रात्री बरोबर दिवसाही थंडीचा अनुभव
आजपासुन रविवार ( दि. २८ डिसेंबर) पर्यन्त, खान्देशातील जळगांव, नंदुरबारसह विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात एखाद – दुसऱ्या दिवशीही दिवस थंड राहून दिवसाही थंडाव्यातून गारवा जाणवेल व हूड-हुडी भरेल.
त्यानंतर आठवडाभर काहीशी थंडी कमी होणार !
सोमवार ( दि. २९ नोव्हेंबर २०२५ ) ते मंगळवार (दि.६ जानेवारी२०२६ )(अंगारकी चतुर्थी)पर्यन्तच्या ९ दिवसात महाराष्ट्रात पहाटे ५ दरम्यानच्या किमान तापमानात वाढ होवून महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता जाणवते. छत्तीस गड सह मध्य भारतात उद्भवलेल्या( घड्याळ काटा दिशेने) कमकुवत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे, उत्तर भारतातून येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्यांना होणाऱ्या काहींश्या अटकावामुळे थंडीचा हा बदल जाणवेल. परंतु असे असले तरी 👇
महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात मात्र ह्या ९ दिवसातही थंडी टिकूनच राहणार!
महाराष्ट्रातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर व अहिल्यानगर अश्या ३ जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, चांदवड, येवला, नांदगाव, कन्नड, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, नेवासा, शेवगांव, पाथर्डी, राहुरी, श्रीरामपूर, राहता, कोपरगांव व संगमनेर अश्या १७ तालुक्यात मात्र सोमवार (दि. २९ नोव्हेंबर २०२५) ते मंगळवार (दि.६ जानेवारी २०२६ अंगारकी चतुर्थी)पर्यन्तच्या ९ दिवसातही थंडी ही जाणवेलच. तेथील कमाल तापमान २८ ते ३० डिग्री तर किमान तापमान ८ ते १२ दरम्यान जाणवेल. मुंबईसह कोकणात मात्र कमाल २८ ते ३० तर किमान १६ ते १८ डिग्री जाणवेल.
