या एमआरएमुळे तांदूळ, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ, ग्रीन/ब्लॅक आणि हर्बल चहा, औषधी वनस्पतींपासून निर्मित उत्पादने इत्यादींसारखी प्रमुख भारतीय सेंद्रीय उत्पादने तैवानला निर्यात करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
नवी दिल्ली – भारत आणि यांच्या दरम्यान सेंद्रीय उत्पादनांसाठी 8 जुलै 2024 पासून परस्पर मान्यता करार (एमआरए) लागू करण्यात आला आहे. तैवानसोबत व्यापारासंदर्भातील कार्यगटाच्या नवी दिल्ली येथे झालेल्या 9 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारत आणि तैवान यांच्यादरम्यानचा हा करार ( एमआरए) हा सेंद्रीय उत्पादनांसाठीचा पहिला द्विपक्षीय करार असल्यामुळे ही या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आहे.
या एमआरएसाठी अंमलबजावणी संस्था म्हणून भारतातर्फे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण तर तैवानतर्फे तेथील कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतील कृषी आणि खाद्य संस्था यांची नेमणूक करण्यात आली आहे.
या करारान्वये, राष्ट्रीय सेंद्रीय उत्पादन कार्यक्रमाबरहुकूम (एनपीओपी) सेंद्रीय पद्धतीने उत्पादित आणि हाताळणी होणारी, तसेच एनपीओपीच्या अखत्यारीतील मान्यता प्रमाणपत्र संस्थेने जारी केलेली सेंद्रीय असल्याचे जाहीर करणारी कागदपत्रे असलेल्या भारतीय उत्पादनांच्या तैवानमधील विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच “इंडिया ऑरगॅनिक” हे चिन्ह असलेल्या या उत्पादनांना सेंद्रीय पद्धतीने निर्मित म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
त्याच पद्धतीने, सेंद्रीय कृषी प्रोत्साहन कायद्याशी सुसंगत अशा सेंद्रीय पद्धतीने उत्पादित आणि हाताळणी होणारी तसेच तैवानच्या नियमांतर्गत सेंद्रीय उत्पादने असल्याचे जाहीर करणारी कागदपत्रे (हस्तांतरण प्रमाणपत्र, इत्यादी) सोबत असलेली उत्पादने “तैवान ऑरगॅनिक” या चिन्हाच्या प्रदर्शनासह सेंद्रीय पद्धतीने निर्मित म्हणून भारतात विक्रीला ठेवता येतील.
परस्पर मान्यता करारामुळे दुहेरी प्रमाणन प्रक्रिया टळून सेंद्रीय उत्पादनांची निर्यात अधिक सुलभ होईल आणि त्यायोगे नियामकीय खर्च कमी करून, नियमांची अनिवार्यता सुलभ करुन केवळ एकाच नियमाच्या अधीन राहून सेंद्रीय उत्पादने क्षेत्रातील व्यापाराच्या संधींमध्ये वाढ करता येईल.
या एमआरएमुळे तांदूळ, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ, ग्रीन/ब्लॅक आणि हर्बल चहा, औषधी वनस्पतींपासून निर्मित उत्पादने इत्यादींसारखी प्रमुख भारतीय सेंद्रीय उत्पादने तैवानला निर्यात करण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे.
