समर्थ रामदासांचे मठ तंत्रज्ञानाने जोडावेत – डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन
श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन
पुणे – ‘समर्थ रामदास स्वामींनी देशातील विविध ठिकाणी स्थापन केलेले मठ तंत्रज्ञानाशी (इंटरनेट) जोडावेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी आणि हिंदी भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून द्यावी. यामुळे देशातील विविध राज्यांमधील नागरिकांना मदत होईल,’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. समर्थसृष्टीच्या निर्मितीसाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासनही डॉ. गोऱ्हे यांनी या वेळी दिले.
‘श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ च्या श्रीमत् ग्रंथराज दासबोध अध्ययनातर्फे डोंगरे महाराज लिखित ‘तत्त्वार्थ रामायण’ या ग्रंथाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्या वेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. ज्येष्ठ कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर, ‘श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’चे कार्याध्यक्ष अच्युत गोडबोले, कार्यवाह योगेशबुवा रामदासी, सुहास क्षीरसागर,अक्षय महाराज भोसले या वेळी उपस्थित होते..
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘सरकारातर्फे देवस्थानांना मदत केली जात आहे. समर्थसृष्टी समाज जोडण्यासाठी असावी. सर्किट निर्मितीसाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई काम करतील. दासबोधाच्या प्रचार प्रसारासाठी सरकार मदत करील.’
‘शिवसृष्टीप्रमाणेच समर्थसृष्टीची उभारणी करावी. चाफळ आणि सज्जनगडाचे सर्किट निर्माण करावे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झालेल्या ठिकाणाकडे सरकारने लक्ष द्यावे. दासबोधाच्या किमान एक लाख प्रतींचे वाटप शाळा-महाविद्यालयांमध्ये करावे,’ अशी मागणी या वेळी क्षीरसागर यांनी केली.
‘सर्व गुणमूल्याचे एकत्रित सार रामायणात असल्याने ते सर्वव्यापी आहे. रामचंद्र प्रभू हे केवल ब्रह्म आहेत. संत देवाला सगुण साकार मांडतात. अभेद्य पाहण्यासाठी ताकद लागते. अभिमानाचा परिणाम अहंकारात होऊ नये याची काळजी घेतल्यावर सर्व पंथ एकत्र चालतील,’ असे देगलूरकर यांनी सांगितले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
